Sunday, May 29, 2011

पुढे सरकत रहा

पुण्याच्या पिएमटी बस मध्ये जेव्हा मी प्रवास करतो तेव्हा खिडकीवर जागे जागेवर लिहीलेल्या एका सुचनेकडे माझे लक्ष वेधले जाते. पुढे सरकत रहा अशी सुचना दोन्ही कडच्या बाकांमध्ये उभे राहून प्रवास करणा-या प्रवाशांसाठी लिहीलेली असते. ही सुचना मागच्या दारातून येणा-या प्रवाशांना उभे राहायला जागा मिळावी व, पुढच्या दारादून उतरणा-या प्रवाशांना उतरण्याची सुविधा व्हावी अशा साठी असते.

ह्या एका वाक्याने माझ्या विचारांची गाडी बस सुरु होण्या अगोदरच सुरु होते. आपल्या आयुष्या साठी हे वाक्य किती सुचक आहे. वेगवेगळ्या पातळीवरुन बघीतले तर त्यातून केवढा बोध मिळतो.

पुर्णपणे भौतिक अर्थ घेतला तर आपण जे काम करतो, छंद जोपासतो त्यात निपूण होऊन आपल्या प्रतिभेची पुढची पायरी गाठा व मागून येणा-यांना जागा करुन द्या असा होतो. ब-याच लोकांना मागून येणा-याना जागा करुन द्यायचे जिवावर येते, ह्याला कारण की ते जेथे असतात तेथे आता ते स्थिरावलेले असतात. त्यांना रोजचे काम नेहमीचे झालेले असल्या कारणाने ते करण्यासाठी फार श्रम घ्यावे लागत नाहीत. पाट्या टाकावे तसे ते काम करतात. पुढे सरकायचे म्हणजे जेथे ठेवला नसतो तेथे पाय ठेवावा लागतो. ह्या साठी नव्या गोष्टी शिकाव्या लागतात. श्रम करायची तयारी लागते. पुढे सरकून नवे शिकताना मिळणारी अस्थिरता माणसाला बोचते. अस्थिरतेला तोंड द्यावे लागते. नव्या जागेवर आपल्याला कामात आपले कौशल्य दाखवावे लागते. लोकांना आपले काम आवडायला वेळ लागतो व आपला वेळ लोकांना पटवून देण्यात जातो. एक
दुस-यामध्ये नाते जमवायला वेळ लागतो. मेळ बसवायला ब-याच खस्ता खाव्या लागतात. त्यापेक्षा असतो तिथेच राहीलो तर काम येत असल्या मुळे सोपे जाते. झालेल्या ओळखींचा उपयोग कामात होतो व चटकन आपले काम दुस-याच्या नजरेत भरते. त्यामुळेच खुप वेळा माणूस आहे त्याच जागेवर पाय रोवून ठेवतो व मागच्याला येऊ देत नाही आपल्या जागेवर. काही लोकंतर स्वतः पुढे सरकत राहतात पण मागच्याला तरी सुद्धा पुढे येऊ देत नाहीत.

पारमार्थिक अर्थ अगदी सरळ, सोपा व साधा आहे. पुढे सरकत रहा. आपण पुढे सरकत राहून राहीलेल्या आयुष्यात आपल्या असलेल्या चित्ताच्या पातळीतून पुढच्या पातळीत सरकत रहावे. आज जर आपण मद, मत्सर, लोभ, भेद ह्याने ग्रासलो असू तर पुढे सरकून हे जड दगड धोंडे मागे ढकलून द्यावेत म्हणजेच चित्त शुद्धीच्या पाय-यांवर पुढे सरकत रहावे. असे म्हणतात चित्ताच्या जागरुकतेत प्राणीमात्रांमध्ये मनुष्यजन्म ही खुप वरची पायरी आहे. पण मनुष्य जन्मात सुद्धा चित्ताच्या जागरुकतेच्या पातळ्या आहेतच की. त्या पाय-या चढून पुढे सरकत आत्मशुद्धीची अंतीम व परमोच्च पायरी गाठायच्या ध्येयाचे बिज पुढे सरकत रहा ह्यात लपलेले आहे.

कधी कधी ट्रॅफिक जॅम मध्ये फसल्या प्रमाणे आपले आयुष्य होते. ट्रॅफिक जॅम मध्ये अडकलेले असतो तेव्हा ज्या वाहनात आपण प्रवास करत असतो त्या वाहनात असलेल्या शक्तीचा तो जॅम फोडायला काही जसा उपयोग होत नसतो. नाईलाजाने जॅम मध्ये अडकलेल्या वाहन चालकाला ट्रॅफिक प्रमाणे जॅम सुटे पर्यंत हळू हळू वाहन हाकत पुढे सरकत रहावे लागते. तसेच आपल्या आयुष्याचे आहे. ट्रॅफिक जॅम मध्ये फसल्या मुळे संथ गतीने गाडी हाकावी लागते तसेच विपरीत परिस्थितीत स्वतःची कितीही प्रतिभा असली तरी तिला फुलोरा येत नाही. त्या वेळेला सुद्धा पुढे सरकत रहा हे वाक्य उपयोगी पडते. जॅम संपे पर्यंत हळूहळू पुढे सरकत राहण्यातच शहाणपण असते. नाहीतर पुढच्याला धक्का तरी लागतो, किंवा मागच्याच्या शिव्या तरी झेलाव्या लागतात. अशा वेळेला आयुष्याची साडेसाती संपे पर्यंत असेच संथ गतीने पुढे सरकत राहीलेले बरे असते. मोठे अपघात होत नाहीत ट्रॅफिक जॅम किंवा चाकोरी बद्ध आयुष्यात – अनंत फंदींनी त्यांच्या फटक्यात म्हटलच आहे -
 बिकट वाट वहिवाट नसावी , धोपट मार्गा सोडू नको, संसारामधि ऐस आपुल्या , उगाच भटकत फिरू नको ||

Monday, February 21, 2011

२० वर्ष - विस्थापीत काश्मिरी हिंदू – भाग ४ (अंतीम)





(१९८९ मध्ये काश्मीरच्या हिंदूंना अतिरेकी संघटनांनी पत्रके वाटून - खोऱ्यातून बाहेर जा - अशी ताकीद दिली व त्या वेळी हजारोंच्या संख्येने काश्मिरी हिंदू खोऱ्यातले पिढ्यांपिढ्यांचे त्यांचे घरदार सोडून जम्मू व दिल्ली ला निघून गेले. हा एक प्रकारचा होलोकास्टच त्यांनी अनुभवला................ वाचा २० वर्ष - विस्थापित काश्मिरी हिंदू – भाग १)



(आमच्या बॅच मध्ये सुनील खेर नावाचा काश्मिरी जिसी होता. आमच्या सारखाच तो ही एक कॅडेट. अधिकारी होण्याच्या प्रतीक्षेत दिवस मोजत. त्याला वडील नव्हते. तो आणि त्याची आई, बारामुल्ला जवळच्या सोयीबुक ह्या गावात राहायचे. त्यांची छोटी हवेली होती तिथे. त्याचे वडील काश्मीर खोऱ्यात एका दैनिकाचे संपादक होते. एक दिवस ते त्यांच्या कचेरीतून परत आलेच नाहीत.......... वाचा २० वर्ष - विस्थापित काश्मिरी हिंदू – भाग २)



(चार दिवस होऊन सुद्धा आला नाही त्यामुळे आम्ही काळजीत होतो. तो कोठे असेल आता, येईलका परत. परत आयएमएत आला तर त्याचे कायहोईल. आम्हाला त्याचा तो निग्रही चेहरा आठवून आम्हाला वारंवार वाईट वाटत होते. आठ महीने एकत्र रगडा खाल्लेले आम्ही. एकमेकांचे जिवाभावाचे मित्र झालो होतो........... वाचा २० वर्ष - विस्थापित काश्मिरी हिंदू – भाग ३)



आम्ही घर सोडताना माझ्या वडीलांचे श्री माटू नावाचे एक जवळचे मित्र भेटायला आले होते. त्यांच्या डोळ्यात पाणी होते. म्हणाले मी आज माझ्या मित्रासाठी काही करू शकत नाही. आम्हीच ठरवले होते की त्यांच्या कडे रहायचे नाही. आमच्या शेजारच्या वाखलू कुटूंबाला जेव्हा काश्मीर सोडून जायला सांगीतले होते तेव्हा ते काश्मीर सोडून जाण्या ऐवजी त्यांचे राहाते घर सोडून त्यांच्या आप्तेष्टांकडे राहायला लागले होते. पण काहीच दिवसात त्यांच्या आप्तेष्टांसकट त्या संपूर्ण कुटूंबासच प्राणास मुकावे लागले होते. माटू अंकलने आम्हाला जम्मू मधल्या मूठी नावाच्या विस्थापितांच्या शिबिरात जायचा सल्ला दिला. माटू अंकल म्हणाले, काय माहिती, काही दिवसांने मला पण तेथेच जावे लागेल. आमच्याकडे खोऱ्यातले घर सोडून दुसरे कोठचेच राहाण्याचे ठिकाण नव्हते. निघायच्या आधी घरात वडलांकरता एक चिठ्ठी लीहून ठेवली. माझी आई जवळ जवळ बत्तिस वर्ष त्या घरात राहीली होती. मी वीस वर्ष. त्या घराची भिंतीदारे बोलायला लागली होती. आज तेच घर आम्ही सोडून चाललो होतो. त्याघरात परत जाऊ शकू का त्याला कायमचे मुकू हे माहित नव्हते. घर परत बघायला मिळेल की नाही. मिळालेच तर किती वर्षाने आणि कोठच्या स्तिथीत. काहीच कल्पना नव्हती. आईसाठी मी गरम गरम कहावा केला. आमचा तो तेथला शेवटचा कहावा. रोज सकाळी आईला बाहेरच्या खोलीत बसून कहावा प्यायची सवय होती. आईने व मी घराला न्याहाळले. आईला रडू आवरत नव्हते व माझ्या घशात हुंदक्याचा गोळा जमून दुखायला लागला होता. आम्ही एकमेकांच्या हातावर चमचाभर विरजलेले दही दिले. घराला कुलूप ठोकले व बाहेर पडलो. मला आईचे खुप वाईट वाटत होते. ती शिबिरात गेल्यावर स्वतःला कशी सावरेल ह्याची कल्पनाच करवत नव्हती. एक टॅक्सी करून थेट जम्मूला पोहोचलो.



आम्ही मूठी शिबिराच्या दाराशी येऊन धडकलो. एका जुन्या सरकारी गोदामाचे तात्पुरते शिबिर केले होते. आम्हाला एक खोली देण्यात आली. माझी आई एकटी होती म्हणून एक खोली तरी मिळाली. नाहीतर कुटूंबच्या कुटूंब ताडपत्रीच्या टेंट मध्ये राहताना मी बघीतले. मला तशा परिस्थीतीत सुद्धा आयएमएतल्या टेंट बांधायला शिकवायच्या कॅम्पची आठवण आली. आम्ही आयएमएत होतो व सैन्यातली नोकरी करण्यासाठी आलो होतो. आम्हाला शिकवतात टेंट मध्ये राहायला ते यद्धजन्य परिस्थीतीशी तोंड देण्यासाठी. वाईट ह्याचे वाटते की, येथे आपल्याच देशातल्या आपल्याच लोकांना त्यांचा प्रदेश सोडून कडाक्याच्या थंडीत टेंट मध्ये राहायला लागत होते. राज्यकर्त्यांना जर असे राहावे लागले असते तर ह्या प्रश्नाकडे पाहाण्याच्या त्यांच्या दृष्टीकोनात निश्चित बदल झाला असता. आपल्याच देशात आपणच पोरके. देव करो आणि येथे पदोपदी तुडवला जात होता तसा कोणाचा स्वभिमान पायतळी तुडवला जाऊ नये. मी आईला सोडले. शिबिरातल्या खानावळीत कहावा घेतला व परत जायला निघालो. आजचा चवथा दिवस होता. पोहोचायला अजून एक दिवस लागणार होता. माझ्या डोळ्या पुढे आता पुढची आयएमएतली लढाई दिसत होती. आईला एवढेच सांगीतले होते की मला जायला पाहीजे नाहीतर कोर्स बुडेल. काय सांगू अजून. आईचे दुःख काय कमी होते. त्या कॅम्प मध्ये एकटे रहायचे. इतक्या वर्षाचे स्वतःचे घर एका दिवसात सोडून, आपल्या सगळ्या जवळच्यांना सोडून येथे परक्या जागेत नवीन घर तयार करायचे. एक प्रकारचा वनवासच हा. बरेच विस्थापित मनोरुग्ण झाले ते ह्याच परिस्थिती मुळे. माझी आई खोऱ्यात शिक्षिका होती त्यामुळे ती मूठी शिबिरातल्या शाळेत शिकवायला लागली. तीने स्वतःला सावरून घेतले. आई येणाऱ्या डिप्रेशनशी कामात मग्न होऊन लढू शकली. एका अर्थाने ते बरेच झाले नाहीतर मी एवढ्या लांबवर राहून काहीच करू शकलो नसतो. बाकीच्यांचे काय हाल झाले असेल इश्वरच जाणे.



मी परत आयएमएत परतलो. माझ्या दिलेल्या सुट्टीच्या तब्बल २४ तास उशीरा. सकाळच्या पिटी परेडला हजर झालो. मला पिटी परेड मधून बाहेर काढून डि एस ने आपल्या ऑफिस मध्ये बोलावले. म्हणाला तु माझा दिलेला शब्द पाळला नाहीस. तूझे सैन्याच्या नियमांनुसार ओव्हर स्टेइंग ऑफ लिव्ह झाले आहे. उशिरा येणाऱ्याला आर्मी मध्ये कडक शिक्षा असते. तुझी केस आता माझ्या हातात नाही. तुला बटालियन कमांडर कडे जावे लागणार आहे. मी, डि एस गिलला मुठी कॅंप मध्ये आईला दाखल केले त्याची कागदपत्रे दाखवली. ती त्याने बघीतली पण त्याचा फार काही उपयोग झाला नाही. आयएमए मधल्या नियमांनुसार उशीरा आलो हा गुन्हा हातून घडलाच होता व त्यासाठी काही अपील नव्हते. त्याच्या साठी होणारी शिक्षा भोगावीच लागणार होती. आपल्याकडे नियमांविरुद्ध अर्ज करणे व नियम का पाळला नाही त्याला कारणे देणे आपल्यात भिनले आहे. नियम फक्त दुसऱ्यांसाठी असतात असे प्रत्येकाला वाटत राहाते. आपल्यावर नियमा प्रमाणे वागण्याची वेळ येते तेव्हा कारणे सुचतात व सुचलेली कारणे किती उचीत आहेत ह्याचे महत्व दुसऱ्याला पटवले जाते. मग नियमाचे उल्लंघन करायला आपण मोकळे होतो. गंमतीची गोष्ट अशी की आपले काम झाल्या झाल्या आपण त्याच नियमाचे समर्थन करायला सुरवात करतो व दुसऱ्याने नियमाने कसे वागले पाहिजे ह्याचे धडे देण्यास लागतो. ही सवय बरोबर नाही ह्याची कल्पना आयएमए करून देते. नियम न पाळणे ह्यात काही शहाणपण नाही. माणसाचे थोरपण तेव्हाच कळते जेव्हा तो नियम पाळून यशस्वी होतो. जर नियमांचे उल्लंघन झाले तर त्याला असलेली शिक्षा भोगाविच लागते त्या विरुद्ध अर्ज करण्याचा काही फायदा होत नाही व अर्ज करण्याची सवय पण तितकीच वाइट आहे हे ही आयएमएत नियमांचे काटेकोर पालन करायला लाउन उदाहरणाने शिकवले जाते.



कंपनी कमांडर कडे गेल्यावर त्याने मला सांगीतले की माझ्या कडून चार दिवसाच्या सुट्टीचे उल्लंघन झाले आहे व आयएमएच्या नियमांनुसार शिक्षा होऊ शकते. आता निर्णय बटालियन कमांडर व उपकमांडंट ह्यांच्यावर अवलंबून आहे. जेव्हा कंपनी कमांडर मेजर शेखावतने उपकमांडंटचे नाव घेतले तेव्हाच मी समजून चुकलो की माझ्या रेलीगेशनचा किंवा मला काढून टाकण्याचा विचार चालला आहे. कारण रेलीगेशनचा निर्णय व आयएमएतून काढून टाकायचा निर्णय बटालीयन कमांडर व उपकमांडंट दोघे मिळून घेतात. बटालियन कमांडर माझ्यावर आधीच नाराज आहेत ह्याची कल्पना होतीच. उपकमांडंटचा निर्णय बराचसा बटालियन कमांडर च्या शिफारसीवर अवलंबून असतो.



संध्याकाळी मला हॅकल ऑर्डर मध्ये बटालीयन कमांडर कडे नेण्यात आले. शिक्षा होणाऱ्या जिसीला हॅकल ऑर्डर मध्ये जावे लागते. हॅकल ऑर्डर मध्ये आयएमएचा पोषाख घालायचा व बॅरे वर लागलेल्या आयएमएच्या बिल्ल्यावर लाल पिसांचा तुरा खोवायचा. ह्या पोषाखात जिसी एकदम रुबाबदार दिसतो. आयएमएत डोक्यावर घालतो त्या टोपीला बॅरे म्हणतात. बॅरेवर लावायचा पिसांचा तुरा आयएमएच्या शॉपिंगसेंटरवर मिळतो. प्रत्येक जिसीकडे तो असतो. जेव्हा शिक्षेसाठी जावे लागायचे त्यावेळेला हा तुरा खुपसावा लागायचा. असा तुरा खुपसलेला जिसी दिसला की समजावे की काहीतरी चूक जिसीच्या हातून झालेली आहे व तो कोणत्या शिक्षेसाठी तरी जात आहे नाहीतर शिक्षा सुनावणीसाठी तरी जात आहे. आयएमएतल्या शिक्षा सुद्धा अजब असायच्या. प्रामुख्याने बजरी ऑर्डर, २८ डेज, पट्टी परेड, हॅकल ऑर्डर, मंदिर दाये छोड, चिंडिट ऑर्डर अशा विचित्र नावांच्या त्या शिक्षा.



बजरी ऑर्डर मध्ये अंगावरच्या रुट मार्चच्या पॅक्स मध्ये सामाना ऐवजी टॉन्स नदीच्या किनाऱ्यावरली वाळू व गोटे भरावे लागायचे. मागे भदराज कॅंपच्या वेळेला वर्णन केलेला पंधरा किलो वजनाचा पॅक असे गोटे भरल्या मुळे चांगला तीस चाळीस किलो वजनाचा भरायचा. मग असा वाळूने म्हणजेच बजरीने भरलेला पॅक घेऊन उभे रहायचे किवा काही अंतर चालावे लागायचे. ते शिक्षा देणाऱ्याच्या मर्जीवर अवलंबून असायचे. पाठीची अक्षरशः वाट लागायची त्या शिक्षेत. मणक्याला ते टॉन्स नदी मधले गोटे टोचत राहायचे. ह्याच पॅक मध्ये बजरी ऐवजी जर कॅंपचे सामान घातले तर त्याला चिंडीट ऑर्डर म्हणायचे. ह्या चिंडीट ऑर्डरचा पॅक जरा मोठा असायचा. कांबळे, मछरदाणी, खायचा डब्बा, दाढीकरायचे सामान, विजेरी, खायचे सामान इत्यादी सगळ्या मिळून पन्नास गोष्टी भराव्या लागायच्या. तपासनी मध्ये एकही गोष्ट कमी आढळली की अजून शिक्षा वाढायची. दुसऱ्या महायुद्धात चिंडीट नावाची एक स्पेशल फोर्स ब्रिगेडीयर विनगेटने तयार केली होती. ब्रह्मदेशातल्या मंदीरांचा –चिंथे- नावाचा राखणकरणारा देव आहे असे तेथिल लोकांचे मानणे. त्यावरून त्या स्पेशल फोर्सला चिंडीट हे नाव पडले. स्पेशल फोर्सेसना ब्रह्मदेशातल्या इरावडी नदी पार करायला जंगलातून व नद्या नाले पार करण्यास उपयुक्त असे सामान घेऊन जावे लागले होते. त्या मुळे चिंडीट ऑर्डर मध्ये अशा प्रकारचे सामान बांधलेले असते. आयएमएत चिंडिट ऑर्डरचा अर्थ हे सगळे सामान मोठ्या पॅक मध्ये बांधायचे व निर्देशवल्या ठिकाणी हजर रहायचे. ह्या शिक्षेनी तसे सामान बांधण्याची सवय होते. पट्टी परेड म्हणजे पटापट वेगवेगळे पोषाख बदलायचे. प्रत्येक पोषाख बदलायला दोन मिनिटे मिळायची. आयएमएतले पोषाख तरी किती प्रकारचे असत. एक पोषाख पिटी परेड साठी. ड्रिल साठी वेगळा. आयएमएतल्या क्लासेस साठी वेगळा. शस्त्रांचे शिक्षण (विपन ट्रेनिंग) साठी वेगळा, मुफ्ती ड्रेस जो संध्याकाळच्या जेवणासाठी आसायचा तो वेगळा. असे ८ – ९ प्रकारचे पोषाख. संध्याकाळच्या वेळेला जेव्हा बाकीचे जिसी अभ्यासाला बसायचे त्यावेळेला ही पट्टी परेड चालायची. मंदिर दाये छोड ही गमतीदार शिक्षा असायची. डि एस एखादे लांबवर दिसणारे मंदीर, जिसीला बोटाने दाखवायचा व म्हणायचा त्या मंदिराला शिवून ये. मग जिसी दुरवर दिसणाऱ्या त्या मंदीराच्या दिशेने पळत जायचा व मंदीराची प्रदक्षिणा घालून यायचा. अगदी स्टिपल चेस मध्ये जसे पळावे लगाते तसेच. कोठचे मंदीर दाखवायचे ते डि एसच्या मनावर अवलंबून असायचे. कधी कधी ते मंदीर दोन किलोमीटरवर असायचे कधी कधी डि एस खुप चिडला असेल तर पाच किलोमीटर दूर असलेल्या मंदीराकडे बोट दाखवायचा. ह्यात सगळ्यात सोपी शिक्षा हॅकल ऑर्डरच असायची. अजून एक शिक्षा होती जी सगळ्यात कठीण व कठोर अशी मानली जायची. त्यात ह्या शिक्षेस पात्र जिसी साठी वेगळे वेळापत्रक केलेले असायचे. त्यात आत्ताच वर्णन केलेल्या सगळ्या शिक्षा दिवसभरात केव्हा ना केव्हा वेळापत्रकाप्रमाणे कराव्या लागायच्या. जिसी हे सगळे करता करता अगदी जेरीला यायचा. ह्या शिक्षे मध्ये जिसीचा दिवस सकाळी चार वाजता सुरू व्हायचा – सकाळी चार वाजता जिसी, ड्रिलस्क्वेअरवर हॅकल ऑर्डर मध्ये रिपोर्ट करायचा. तशात आयएमएतली अंतरे एवढी लांब लांब असायची कि ड्रिलस्क्वेअर दोन तीन किलोमीटर दुर असायचे. सायकल वरून जायला लागायचे. हे झाल्यावर मग जेवणा पर्यंत जिसीचा नेहमीचा ठरलेला दिनक्रम बाकीच्या आयएमएच्या वेळापत्रकाप्रमाणे चालायचा. दुपारी जेव्हा बाकीचे जिसी एक तासाची विश्रांती घ्यायचे त्या वेळात ही शिक्षा झालेला जिसी एक्स्ट्रॉ ड्रिल – ड्रिलच्या पोषाखात करायचा. परत दुपारी बाकीच्या जिसीज बरोबर गेम्स परेड चालायचीच. संध्याकाळी स्मॉलपॅक लाऊन व रायफल घेऊन बॅटल ऑर्डर मध्ये ५ किलोमीटरची दौड लागायची. त्यानंतर संध्याकाळी ६ वाजता परत ड्रिलस्क्वेअर वर हॅकल ऑर्डर मध्ये रिपोर्ट द्यावा लागायचा. संध्याकाळी बाकीच्या जिसीजना अभ्यासासाठी जेव्हा वेळ मिळायचा त्या वेळेला ह्या शिक्षेत जिसी रात्रीच्या चिंडीट ऑर्डरची तयारी करायचा. रात्री अकरा वाजता अशा जिसीला चिंडीट ऑर्डर मध्ये ड्रिल स्क्वेअरला रिपोर्ट करावे लागायचे. रात्री अकरा वाजता त्याच्या पॅक मधले सामान चेक व्हायचे. छोट्या छोट्या अशा पन्नास गोष्टी असायच्या आणि एकही गोष्ट ठेवायची राहिली की मग अशी शिक्षा अजून एका दिवसाने वाढायची. हा ह्या कठोर शिक्षेचा अजून एक नियम. असा हा खास वेळापत्रकाने बांधलेला ह्या कठोर शिक्षेचा एक दिवस. किती दिवस अशी शिक्षा झेलायची ते जिसीच्या चूकीवर अवलंबून असे. परेडला लेट आला तर साधारण तीन दिवस अशी शिक्षा मिळायची. पोषाख वाईट असेल तर एक दिवसाची ही कठोर शिक्षा मिळायची. गंमत अशी की शिक्षा करताना जर काही चूक झाली तर मागे सांगितल्या प्रमाणे शिक्षेत हळू हळू वाढ व्हायची. एका टर्म मध्ये जिसीला जर अशी कठोर शिक्षा मिळून अठ्ठाविस दिवसा पेक्षा जास्त दिवस झाले तर त्याचे आपोआप रेलीगेशन व्हायचे. सगळ्यात कठोर अशी ती शिक्षा असायची व साधारण जिसीला एका वेळेला दहा दिवसा पेक्षा जास्त ही शिक्षा मिळायची नाही. त्या मुळे ह्या कठोर शिक्षेचा हिशोब प्रत्येक जिसी ठेवायचा व आपले वर्तन सांभाळायचा.



रेलीगेशन होते की आपल्याला आयएमएतूनच काढून टाकले जाणार ह्या पैकी काय कानावर पडणार ह्या विचारात मी हॅकल ऑर्डर मध्ये बटालीयन कमांडरच्या ऑफिसच्या पोर्च मध्ये उभा होतो. माझा पोषाख ठिक आहे का हे कॅप्टन गिल स्वतः जातीने बघत होता. छान खोचलेला शर्ट, बेल्टच्या वर फक्त तीन बटणे दिसली पाहिजेत म्हणजे छान दिसतो पोषाख. तसा आहे ह्याची खात्री करत मला धिर देत होता कॅप्टन गिल. ड्रिलचे नाळ लावलेले पॉलीशने लख्ख चमकावलेले जोड्याचे पुढचे काळे टोक, मी माझ्या रुमालाने हलकेच साफ केले. हॅकल लावलेली बॅरे डोक्यावर चापून बसवली. बॅरेची कपाळावर बसणारी पट्टी आणि भुवया ह्यात तीन बोटांचे अंतर आहे हे सुनिश्चीत केरून मी तयारीत उभा राहिलो. तेवढ्यात सुभेदारमेजरचा खडा आवाज माझ्या कानावर आदळला. साsssव धान. जिसी सुनील खेर आगे चलेगाssssss तेज चल. जसा मी बटालियन कमांडरच्या ऑफिसात टेबला पुढे संचलन करत पोहोचलो तसा मागून पुन्हा आवाज आला. जिसी सुनील खेर sssss......... थम १ २. मी सावधान मध्ये उभा राहीलो. सुभेदारमेजरचा पुन्हा आवाज जिसी सुनील खेर सॅल्यूट १ २. माझ्या बरोबर शेजारी उभ्या असलेला कॅप्टन गिलने पण बटालियन कमांडरला त्याच तालावर सॅल्यूट केला.



सुभेदारमेजरने खड्या आवाजात माझा गुन्हा म्हणून दाखवला. नं ३८९७ जिसी सुनील खेर चार दिनकी छुट्टीपर गया था। छुट्टीके बाद एक दिन देरीसे उसने रिपोर्ट किया है। आर्मी एक्ट ३२ के मुताबिक जिसी सुनील खेर एक दिन बिना छुट्टी लिये छावनीसे बाहर था। सजा के लिये हाजिर है।



हे ऐकून बटालियन कमांडर करड्या आवाजात म्हणतो - जिसी सुनील खेर, यु वेअर एब्सेंट विदाऊट लिव फॉर वन डे. एज पर आर्मी एक्ट ३२ यु आर गिल्टी. डु यु प्लिड गिल्टी.



मी म्हणालो - येस सर.



बटालियन कमांडर - फॉर युअर एक्ट ऑफ धिस यु आर गिवन अ पनिशमेंट ऑफ २८ डेज. सुभेदारमेजर मार्च हीम ऑफ.



मला मागून सुभेदारमेजरचा आवाज आला. जिसी सुनील गाडरू सॅल्यूट १ २. पिछेssss मुड......... जिसी सुनील खेर आगेसेssssss तेज चल. बाकीची कवायत एका यंत्रा सारखी मी करत होतो. लांबवर कोठे तरी अजून बटालियन कमांडरचा आवाज कानात घुमत होता. – २८ डेज. २८ दिवसांची कठोर शिक्षा. सगळ्यात कठोर वाटणारी ती शिक्षा ऐकून कोणा जिसी वर आभाळच कोसळले असते पण मला एकदम हूरुप आला. माझ्या आनंदाला पारावार राहीला नाही. माझे रेलीगेशन सुद्धा झाले नव्हते मग आयएमएतून काढून टाकणे राहिले बाजूला. बटालियन कमांडरनेच माझी तशी शिफारिश केली असणार उपकमांडंट कडे. मनातल्या मनात मी बटालियन कमांडरला धन्यवाद दिला. माझ्या मित्रांना ही बातमी कधी सांगतो असे झाले. आईला ह्यातले काहिच माहित नव्हते त्या मुळे सांगायचे असे काहीच नव्हते. आज रात्री शिक्षेवरून आल्यावर आईला पत्र लिहिणार होतो आमच्या नव्या पत्त्यावर – श्रीमती इंदूकुमारी खेर, नं २६७५, मूठी विस्थापित शिबिर, फेज

२, जम्मू १८११२४.

२० वर्षा नंतर –



आपणाला जर जाणून घ्यायची इच्छा असेल की आज सुनील खेर आणि त्याचा

परिवार कोठे आहे तर वाचा....



जिसी सुनील खेर आता कर्नल सुनील खेर झाला आहे. पुण्यात एक छोटा दोन

खोल्यांचा ब्लॉक आहे. जेव्हा त्याची पोस्टींग फिल्ड मध्ये असते तेव्हा त्याची आई तिथे राहाते. वडील परत कधी भेटलेच नाहित. इतर वेळेला आई त्याच्या बरोबर राहते. गेल्या वीस वर्षात काश्मीर मधिल घरात ते कधी गेले नाहीत. कमीशन मिळाल्यावर काश्मीर मध्ये त्याची पोस्टींग दोनदा झाली. तरी सुद्धा. एकदा पोस्टींगवर असताना हेलीकॉप्टर मधून त्याने त्याचे घर बघितले होते. दुसरेच कोणी तरी राहाते त्यात आता. त्याचे काश्मीर सुटले पण त्या आठवणी व तो कडवटपणा गेला नाही. असेच काहिसे बाकीच्यांबरोबर झाले आहे. आता काश्मीर मध्ये काश्मिरी हिंदू नगण्य राहिले आहेत. त्यांची घरे, त्यांची स्थावर मिळकत, सारे फस्त झाले आहे. मागे राहिलेत फक्त कटू आठवणी, मानसिक क्लेश व मनोरुग्ण. जम्मू मध्ये आता आठ शिबिरे आहेत व दिल्ली मध्ये साधारण पंधरा जागी शिबिरांसारखे साधारण पस्तीस हजार काश्मिरी कुटूंब राहतात.



(राजाराम सिताराम एक, राजाराम सिताराम दो – ही आय एम ए वर आधारीत कथा लवकरच प्रसिद्ध करत आहे)




Thursday, February 10, 2011

२० वर्ष - विस्थापीत काश्मिरी हिंदू – भाग ३


जीसी सुनील खेर चार दिवसाच्या सुट्टीवर गेल्या पासून परत आला नव्हता. तो गेल्या पासून आजचा पाचवा दिवस होता. आम्ही काळजीत होतो. तो कोठे असेल आता, येईल का परत? सुट्टी वरून उशीराने परत जरी आला तरी आय एम ए च्या नियमानुसार त्याचे काय होईल? त्याचा तो निग्रही चेहरा आठवून आम्हाला वारंवार वाईट वाटत होते. आठ महीने एकत्र रगडा खाल्लेले आम्ही जीसी, एकमेकांचे जिवाभावाचे मित्र झालो होतो. त्यातून तो आमच्याच बटालियनचा, आमच्याच कंपनी मधला व आमच्याच प्लटूनचा. मला दोन गोष्टींची काळजी लागून राहीली होती. तो परत येईल का, व तो त्याच्या आईला कोठे सोडणार – त्याची आई घर सोडून कोठे जाइल, कोठे राहील व तीचे कसे होईल.

कोणाला जर का फर्मावले की, तुमचे राहाते घर तडकाफडकी खाली करा व चालते व्हा तर काय वाटेल त्या कुटूंबाला? कोठे राहतील, कसे होईल? त्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम होईल? कोणाच्या आयुष्यात भोगाव्या लागणाऱ्या अशा अचानक घडामोडी पाहील्या की पुर्व संचित म्हणून काही असते का असा विचार डोकावून जातो. वाटते, आपण असतो तर त्यांच्या जागी? त्यांनाच का ही पिडा? जी लोकं संचित मानत नाहीत, ते अशा घडामोडींकडे कसे पाहतात? लॉटरी लागण्या एवढी निसर्गात ही प्रोसेस रॅन्डम असते असे जे संचीत मानित नाहीत ते सुचीत करतात. संचीताला अंधश्रद्धा म्हणून त्याविरुद्ध बोलत राहतात. अंधश्रद्धा मानू नये हे खरे आहे. पण कोणती गोष्ट अंधश्रद्धा मानावी व कोणती नाही हे कोण ठरवणार? डोळस श्रद्धा असते का? का श्रद्धा हाच एक भंपकपणा आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे संचित म्हणजे अंधश्रद्धा मानणाऱ्या लोकांना जर स्वतः उद्या अशा परीस्थीतीला तोंड द्यावे लागले तरी ते निसर्गातील एक रॅन्डम प्रोसेसचा भाग आहे असे समजतील का त्या वेळेला सोयीने त्यांच्या दृष्टीकोनात फरक येईल? ह्याचे उत्तर मी अजून शोधत आहे. संचित जर नसेलच तर अशा घटनांना निसर्ग नियम म्हणून आपण विषय संपवू शकतो का. अशा घटना काहींनाच का भोगाव्या लागतात ह्या प्रक्रियेला काही नाव व कारण देऊ शकतो का.

सुनील खेर गेल्या पासून आमच्या डोक्यात एकच विषय – त्याचे काय झाले व आय एम एत परतला तर काय होणार.

आमच्या रोजच्या कार्यक्रमात सुनील गेल्याने काही बदल झाला नाही. नाही म्हणायला आमचा डि एस कॅप्टन गिल आम्हाला सांगून गेला होता की सुनीलच्याबद्दल काहीही माहीती समजल्यास त्वरीत कळवा. सुनील सुट्टीवर गेल्याच्या सहाव्या दिवशी जीसी सुनीलच्या खोलीत आम्हाला दिवा लागलेला दिसला. आमच्या जिवात जीव आला. आम्ही पि टी परेड ला जायच्या आधी त्याला भेटलो. कॅप्टन गिलनी निरोप पाठवला की जीसी सुनीलला आठ वाजता कंपनी कमांडरने त्याच्या ऑफीस मध्ये बोलावले आहे. आम्हाला त्याच्याशी बोलून गेल्या सहा दिवसांचा हिशोब घ्यायला वेळच नव्हता. तो आम्ही संध्याकाळसाठी सोडला, व आम्ही पि टी परेडला गेलो. त्याचे रेलीगेशन होणार का त्याला काढून टाकणार अशा अटकळी लावे पर्यंत संध्याकाळ झाली. जीसी सुनील दिवसभर दिसला नाही. संध्याकाळी जेवायच्या वेळेला भेटला. खुप थकल्या सारखा वाटत होता. पण चिंता कमी झाली होती. आम्ही आतूर होतो त्याच्या दोन्ही गोष्टी ऐकायला. एक तर तो सूट्टीच्या तब्बल २४ तास उशीरा आला होता व त्यामूळे बटालीयन कमांडरने त्याचे काय केले हे ऐकायचे होते व दूसरे त्याच्या आईचे काय झाले, सुखरुप आहे का कशी आहे. ह्या दोन्ही गोष्टी ऐकूया त्याच्याच शब्दात...............



ज्या दिवशी भदराजवरून आल्यावर मला आईची तार मिळाली व त्या नंतर सुट्टी मिळत नाही असे कळले तसा मी खुप उदास झालो. कर्नल कटोच ह्यांचा भयंकर राग आला होता. आईची आठवण येत होती. काळजी लागली होती. कशातच लक्ष लागत नव्हते. डोक्यात गोंधळ उडाला होता. संध्याकाळ झाली तसा एक एक क्षण एक तासा सारखा जाणवत होता. शांत राहा, १ ते १० मोजा, उलटी गिनती करा, देवाचे नाव घ्या, डोळे मिटून स्वस्थ बसा हे सगळे डोके शांत ठेवण्यासाठी करायचे उपाय माहीत असून राहून गेले. हे उपाय करायचे सुद्धा स्वारस्य राहीले नव्हते. मलाच माहीत होते काय परिस्थीती होती खोऱ्यात ती. सगळ्यात वाईट वाटत होते ते कर्नल कटोच ह्यांचा माझ्या सुट्टी मागण्याच्या कारणावर विश्वास बसला नव्हता ह्या गोष्टीचा. खोऱ्यातले वातावरण हळू हळू बदलायला लागले होते. रोज जवळच्या मशिदीतून प्रक्षोभक भाषणे सुरू झाली होती. रोज कोणते न कोणते काश्मिरी हिंदू कुटूंब खोरे सोडून जाण्याचा विचार करत होते व जात होते. तेव्हा आम्हाला काय माहीती होते की काश्मिरी हिंदूंचे खोरे सोडून जाण्याच्या ह्या प्रक्रियेचा शेवट सगळ्यात मोठ्या विस्थापनात होणार आहे ते. ह्या आधी सहादा असे मोठ्या प्रमाणात काश्मिरी हिंदूंचे स्थलांतरण झाले होते. पहीले स्थलांतरण तेराव्या शतकात झाले – सुलतान शमसुद्दीनने मोठ्या प्रमाणात हिंदूं मंदिरांची तो़ड फोड करून हिंदूंना धाक दाखवून पळवून लावले असा इतिहास आहे. १४ व्या शतकात दुसरे व तिसरे स्थलांतरण, सुलतान अली शाहच्या जाचक सुलतानशाहीने उद्भवले. त्याने पहील्यांदा काश्मीर मध्ये हिंदूंवर झिझीया कर सुरू केला. १४ व्या शतकातच पूढे मीर शमसुद्दीन इराकी ह्या नवाबाने जोर जबरदस्तीने हजारो हिंदूंना पळवून लावले. चवथे व सगळ्यात मोठे स्थलांतरण १६ व्या शतकातले. औरंगझेबच्या बादशाहीत झाले. ह्या बादशहाशी लढता लढता शिखांच्या नवव्या गूरुंना गुरू तेग बहादूरांना प्राणाना मुकावे लागले होते. हा औरंगझेबच्या काळातील इतिहास पाहाता असे वाटते की जसे महाराष्ट्राला शिवाजी राजे मिळाले तसे काश्मीरला लाभले असते तर कदाचीत इतिहास काही वेगळा झाला असता. पण काश्मिरी हिंदूंपेक्षा महाराष्ट्रातल्या हिंदूंचे नशिब जास्त बलवोत्तर होते असेच म्हणावे लागेल. पाचवे स्थलांतरण, १७ व्या शतकात मुल्ला अब्दुल ह्याच्या नवाबीत झाले. सहावे स्थलांतरण, अफघाण सुलतांनांच्या क्रूर कारवायांमुळे झाले. १९८९-९० सालातले सातवे स्थलांतरण पाकीस्तानच्या ऑपरेशन टोपूक मुळे होत होते. ते त्यावेळेला आम्हाला अवगत नव्हते. कोणालाच माहीत नव्हते. कोठल्याही देशा पुढील समस्येवर देशातल्या जनतेचा मानसिक दृष्टीकोण बदलायला वेळ लागतो. खुपदा लोकांना समजे पर्यन्त वेळ निघून गेलेली असते. ह्या सगळ्या सहा स्थलांतरांने जे एकेकाळी काश्मीर मध्ये फक्त हिंदूच होते ते कमी होत होत, १९४८ मध्ये फक्त १० टक्के राहीले. हिंदूंची संख्या सातव्या स्थलांतरानंतर १ टक्का राहीली. ज्या समाजाला इतिहासाचा विसर पडला तो समाज संपला हे आम्हाला सातव्यांदा कळणार होते. शेवटी जिसकी लाठी उसकी भैस हेच फक्त सत्य आहे बाकी ह्या कलीयुगात सभ्यता वगैरे सोयीच्या गोष्टी आहेत. आपल्या जवळ ती लाठी का नसते कधी. सभ्यतेखातर आपण लाठी सोडली हे खरे पण त्याचबरोबर दुसरे सोडतात की नाही हे पाहीले नाही. दुसऱ्याने जर लाठी घेतली असेल व आपल्यावर उगारत असेल तर तेवढ्या पुरती तरी आपण लाठी घेतली पाहीजे नाहीतर शतकानुशतके आपण असेच भरडले जाणार. पुर्वी क्रृर सुलतानशाही होती आता एक क्रृर असे शेजारी राष्ट्र आहे.

१९८९ च्या सुरवातीला हिंदूंचे एखाद दुसरे कुटूंब सोडून गेल्याचे ऐकीवात होते. त्यात हळू हळू वाढ होऊ लागली. अतीरेकी प्रेरित हिंदूंच्या स्थलांतराची मोहीम पाकिस्तानच्या ऑपरेशन टोपूक प्रमाणे कशी घडत आहे ती आमच्या लक्षात यायला लागली. अतिरेक्यांचा डाव एकदम चपखल बसला होता. खोऱ्यात तणावाचे वातावरण निर्माण करायचे. कोठच्यातरी गल्लीतल्या एका दोघा तरुणाला किंवा काश्मिरी हिंदूला मारायचे. त्याचे परिणाम लागलीच त्या गल्लीतल्या इतर हिंदूंवर व्हावयाचे. गर्भगळीत अवस्थेत ती गल्लीची गल्ली रिकामी होऊन खोरे सोडून जायची. ह्याच बरोबर सतत मशिदीदतून होणारी प्रक्षोभक भाषणे एक प्रकारचे भयानक तणावाचे वातावरण निर्माण करायचे. त्यात हिंदूना काफिर म्हणवून त्यांच्या विरुद्ध जिहाद पुकारण्याची मुस्लीम जनतेला हाक असायची. खोऱ्यात अशा प्रकारचा तणाव कायम आसायचा. कधी कोणा हिंदूला पळवून धाक निर्माण करायचा. कोणा हिंदूचे घर जाळून त्या गल्लीतल्यांचे मनोधैर्य खच्ची करायचे, असे वारंवार घडू लागले. ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना, राज्याचे प्रशासन दिलासा वाटण्यासारखे काही करत आहे असे आढळत नव्हते. तो विश्वास राहिलाच नव्हता. अतिरेक्यांना फार काही करावे लागायचे नाही. गल्लीतल्या कोणा हिंदूला मारले की गल्लीतले सगळे हिंदू आपले सामान घेऊन पसार व्हायचे. त्यामुळे जर कोणी मानव हत्या किती झाली ह्यावरच फक्त क्रुरता ठरवणार असेल तर मानव हत्या फार झाली नाही. साधारण २५० ते ३०० हिंदूंची हत्या झाली असेल. पण महीलांवर सततचे अत्याचार करून, हिंदूंना पळवून नेउन, धाक धप्पटशहा दाखवून, घाबरवून लोकांच्या मनात भीती उत्पन्न करून स्थलांतरण करायला अनावृत्त केल गेले. वाईट ह्याचेच वाटत होते की पाकिस्तान हे हिंदूंना पळवून लावायचे व इथल्या मुस्लीम जनतेला चिथवण्याचे काम त्यांचे परराष्ट्रधोरण म्हणून ऑपरेशन टोपूकच्या नावा खाली राबवत होता, व आपल्या सरकारला हे समजत नव्हते. इथले मुस्लीम पण जिहादाच्या नावाखाली भरकटून जात होते व काश्मिरी हिंदूंच्या विरुद्ध शस्त्र घेऊन सज्ज होत होते. तशातच कलम ३७० लागू होते. त्यामुळे काश्मिरात एकीकडे कोणाला स्थायिक होता यायचे नाही व दुसरीकडे हजारोंच्या संख्येने असलेले काश्मिरी हिंदू लोकं खोरे सोडून जात होते. त्यामुळे साहजिकच खोऱ्यातल्या काश्मिरी हिंदूंच्या संख्येत घट पडत चालली होती.



संध्याकाळी कॅप्टन गिल माझ्या रुमवर आला. तो म्हणाला बटालीयन कमांडरला अजून सुद्धा वाटते की जीसी रोजच्या आय एम एच्या रगड्यातून काही दिवस सुटण्यासाठी हा कांगावा करत आहे. १९८९ च्या सुरवातीच्या काळात काश्मीरच्या बाहेर काश्मीरच्या स्थितीवर अगदी त्रोटक बातम्या यायला लागल्या होत्या. त्यामुळे काश्मिरी हिंदूंच्या विस्थापना बरोबर उत्पन्न होणाऱ्या अडचणी, काश्मिरी हिंदू कुटूंबियांना झेलावे लागणारे प्रश्न ह्या बिकट परिस्थीतीशी बाकीची जनता अवगत नव्हती. काश्मीर बाहेर राहणाऱ्यांच्या कानावर पडणाऱ्या बातम्यांनी काश्मीर मधली खरी स्थिती किती गंभीर रुप घेत आहे हे त्या लोकांना समजले नव्हते. ह्याचा परिणाम त्यांच्या निर्णयांवर व काश्मीर प्रश्नाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनावर होत होता. माझ्या सुट्टीच्या अर्जात दिलेल्या कारणा बद्दल सुद्धा हेच झाले असावे. बटालियन कमांडरच्या दृष्टीने माझा सुट्टीचा अर्ज अवाजवी होता. ह्या उलट कॅप्टन गिल जरी कठोर होता तरी आमचा प्लटून कमांडर असल्या मुळे आम्हाला रोज सकाळ संध्याकाळ भेटायचा. आमचे प्रश्न तो जाणायचा.

तो मला म्हणाला की - संध्याकाळी बटालियन कमांडरने मला परत बोलावले होते. मी त्यांना सांगितले की जी सी सुनील खेरच्या घरची परिस्थिती गंभीर आहे. त्याचे वडील आधीच अतीरेक्यांच्या कारवायांना बळी पडले आहेत व अजूनही बेपत्ता आहेत. आता हीच परिस्थिती त्याच्या आईवर येऊन ठेपली आहे. कर्नल कटोच ह्यांनी फक्त माझ्या शब्दाखातर तुला चार दिवसाची सुट्टी देऊ केली आहे. चार दिवसात परत ये नाहीतर मी दिलेला शब्द वाया जाईल. कॅप्टन गिलने चार दिवसाच्या सुट्टीचे पत्र माझ्या हातात दिले व म्हणाला सुट्टी जरी उद्या पासून सुरू होत आहे तरी आजच रात्री जायची परवानगी तुला देतो. माझ्या जिवात जिव आला. हूरुप आला. आता एक नवा प्रश्न उभा राहीला माझ्या समोर. चार दिवस – ह्या चार दिवसात डेहराडूनहून खोऱ्यात जायचे व आईचा राहण्याचा कोठेतरी बंदोबस्त करून परत यायचे. भदराजचा कॅंप मला ह्याच्या पुढे एकदम सोपा वाटायला लागला.

मला सुट्टी तर मिळाली आता चार दिवसात येण्याचा आराखडा ठरवत मी माझे मोजकेच सामान बांधले. मित्रांकडून काही पैसे उसने घेतले व रात्रीच्या बसने डेहराडूनहून निघालो. दिल्लीहून जम्मूला सुट्टीच्या पहील्या दिवशी रात्री पोहोचलो. कॅप्टन गिलने रात्रीच जाऊ दिले होते म्हणून बरे झाले नाहीतर अजूनच वेळ लागला असता. जम्मू ते श्रीनगर ह्या एक दिवसाच्या रस्त्याला दोन दिवस लागले पोहोचायला. बर्फवृष्टी मुळे बनीहाल घाटात असणारा जवाहर बोगदा बंद होता. त्यामुळे एक रात्र रामबन येथेच काढावी लागली होती. जवाहर बोगदा थंडीत नेहमीच असा मधून मधून बंद असतो. रामबनला थांबणे माझ्या जिवावर आले होते. कारण सुट्टीचा एक दिवस वाया जाणार होता. मजल दर मजल करत तिसऱ्या दिवशी सकाळी मी घरी पोहोचलो. मला बघून आईला आनंद व थोडे आश्चर्य वाटले. तिला वाटले नव्हते मला सुट्टी मिळेल असे. आम्हाला एकमेकांशी आय एम एतल्या गोष्टी करायला वेळच नव्हता. राहाते घर सोडून जायचे ह्या नुसत्या कल्पनेनेच आईला खूप वाईट वाटत होते. सामान कसे घेऊन जायचे हा प्रश्न होता. वडीलांचा अजून पत्ता नव्हता. शेवटी आम्हाला दोघांना नेता येईल ईतकेच सामान घेऊन जायचे असे ठरले. मग सामान बांधायला वेळ लागला नाही.

(क्रमशः)

(राजाराम सिताराम एक, राजाराम सिताराम दो – ही आय एम ए वर आधारीत कथा लवकरच प्रसिद्ध करत आहे)


Friday, January 28, 2011

२० वर्ष - विस्थापीत काश्मिरी हिंदू – भाग २



(१९८९ मध्ये काश्मीरच्या हिंदूंना अतिरेकी संघटनांनी पत्रके वाटून - खोऱ्यातून बाहेर जा - अशी ताकीद दिली व त्या वेळी हजारोंच्या संख्येने काश्मिरी हिंदू खोऱ्यातले पिढ्यांपिढ्यांचे त्यांचे घरदार सोडून जम्मू व दिल्ली ला निघून गेले. हा एक प्रकारचा होलोकास्टच त्यांनी अनुभवला................ वाचा २० वर्ष - विस्थापित काश्मिरी हिंदू – भाग १)

आमच्या बॅच मध्ये सुनील खेर नावाचा काश्मिरी जीसी होता. आमच्या सारखाच तो ही एक कॅडेट. अधिकारी होण्याच्या प्रतीक्षेत दिवस मोजत. त्याला वडील नव्हते. तो आणि त्याची आई, बारामुल्ला जवळच्या सोयीबुक ह्या गावात राहायचे. त्यांची छोटी हवेली होती तिथे. त्याचे वडील काश्मीर खोऱ्यात एका दैनिकाचे संपादक होते. एक दिवस ते त्यांच्या कचेरीतून परत आलेच नाहीत. आज पर्यंत त्यांचा पत्ता लागला नाही. हल्ली त्याच्या कुटुंबाने वडील परत भेटण्याची आशा सोडून दिली आहे.

तो आम्हाला काश्मीर बद्दलच्या गोष्टी सांगायचा. तो पर्यंत मला लोकसत्ता, म टा ह्या नियतकालिकामधून व वेगवेगळ्या मासिकातून वाचलेला तपशील एवढीच काय ती काश्मीर बद्दलची माहिती होती. आय एम ए च्या मुलाखती साठी केलेली तयारी, ती पण अशी तशीच. थोडक्यात काश्मीर प्रश्ना विषयी एकदम तोकडी कल्पना होती. मला इंडियन एक्सप्रेस नियतकालीकेत, १९८६- ८७ मध्ये छापून आलेला काश्मीर विषयीचा लेख वाचल्याचे आठवत होते. त्यात निवृत्त ब्रिगेडियर एन बि ग्रॅन्ट ह्यांनी लिहिले होते की १९४८, १९६५ आणि १९७१ मध्ये भारत पाक युद्धांमधून झालेल्या पाकिस्तानच्या जबरदस्त पराजयाचा धक्का पाकिस्तानाला सतत सतावत असतो. पाकिस्तानाला कळून चुकले आहे की, भारता बरोबर सरळ युद्ध केल्याने त्या देशाची वित्त व मनुष्य हानी फार होते आहे. ह्या सर्व बाबींचा विचार करून पाकिस्तानच्या इंटर सर्विसेस इंटलीजन्स (आय एस आय) ने एक नवी योजना आखली आहे. त्या योजने नुसार सरळ युद्धा पेक्षा अतिरेकी संघटना उभारून भारत आतून पोखरून टाकायचा. मग अशा पोखरून अशक्त भारताला हरवायला वेळ लागणार नाही. योजना चार पदरी कार्यक्रमावर आधारित अशी राबवायची. पाहिला पदर – काही काश्मिरी युवकांना भडकवून पाक व्याप्त काश्मीर मध्ये नेऊन प्रशिक्षण देऊन अतिरेकी बनवणे. काश्मीर मधल्या भारत पाक युद्ध विराम सीमे (लाइन ऑफ कंट्रोल) मधून अशा अतिरेक्यांना खोऱ्यात धाडायचे. एकदा अतिरेकी आत घुसले की मग त्यांचे थैमान चालू द्यायचे. अशा अतिरेक्यांना एके ४७, हॅन्ड ग्रेनेड्स व तत्सम साधन सामुग्री पुरवायची. दुसरा पदर – जम्मू काश्मीर राज्य प्रशासन अतिरेकी कारवायांनी व अतिरेकी फतव्यांनी खिळखिळे करायचे. तिसरा पदर – काश्मिरी हिंदूंना पहिल्यांदा खोऱ्यातून व नंतर उधमपूर जम्मू मधून हुसकवून लावून काश्मिरी हिंदूंची संख्या नगण्य करायची. त्याच युक्तीचे पुनरावर्तन कारगिल व त्याच्या वरती लडाख भागात मग करायचे. शेवटचा चौथा पदर – काश्मिरी मुस्लिम जनतेला भारता विरुद्धं जेहाद साठी उत्तेजित करायचे.

ह्या पार्श्वभूमीवर जेव्हा जीसी सुनील खेरच्या रूपाने प्रत्यक्ष काश्मिरी हिंदू भेटला तेव्हा काश्मीर संबंधी बऱ्याच गोष्टी कळायला लागल्या. आम्ही वेळ मिळेल तेव्हा सुनील खेर व अजून एक काश्मीरचा राहणारा जीसी हिरालाल गाडरू ह्या दोघां कडून काश्मीरच्या स्थिती बद्दल चौकशी करायचो. हिंदूंची होणारी गळचेपी व ससेहोलपट खरेच होतेका, हे आम्हाला जाणून घ्यायची प्रबळ इच्छा असायची. त्या दोघांकडून आम्हाला कळले की काश्मिरी हिंदूंची घरे रोज कशी जाळली जात आहेत व धमक्या कशा मिळत आहेत ते. आम्ही जीसी सुनीलला नेहमी सांगायचो की आईला घेऊन दुसरीकडे राहा म्हणून आणि त्यालाही तसे राहायचे होते पण दुसरीकडे राहायला लागणारे पैसे नव्हते व त्याची आई तयार नव्हती काश्मीर सोडायला. काश्मीर सोडून दुसरीकडे राहायचे म्हणजे काश्मीर मधले घर विकावे लागणार होते. दुसरीकडे म्हणजे कोठे स्थायिक व्हायचे हा प्रश्न होताच त्याला सतावणारा. आता पर्यन्त खोरे सोडून कोठेही गाडरू कुटुंब राहिले नव्हते. त्यातून वडील सापडत नाहीत ह्याची सतत मनाला खंत लागून राहिलेली. सैन्यात जाऊन अधिकारी होण्याचे लहानपणापासूनचे सुनीलचे स्वप्न होते. सैन्यात राहायला सरकारी घर मिळते हे कळल्यावर तर सुनीलला त्याच्या अडचणीचे उत्तरच सापडल्या सारखे झाले होते. म्हणूनच जरी आई एकटी राहणार असली तरी तो तिच्याशी भांडून आय एम ए मध्ये दाखल झाला होता. आय एम ए चे शिक्षण पूर्णं करूनच आता घर बदलायचे असे त्याने ठरवले होते.

काश्मीर मध्ये हिंदूंची घरे विकली जात नाहीत तर ती बळजबरीने घेतली जातात हे त्यावेळेला मला पहिल्यांदा समजले. जीसी हिरालाल गाडरू (हा जीसी, वर्ष भर आम्हाला त्याच्या आडनावाचा उच्चार बरोबर कसा करायचा हेच शिकवीत राहिला व आम्हीही मुद्दामून त्याला गदरू असे बोलवत राहायचो. हा खेळच झाला जणू काही. शेवटी त्याचे नाव जीसी हिरालाल गाडरू ऐवजी - जीसी हिरालाल गदरू नहीं गाडरू - असे लांबलचक पडले. वीस वर्षांनी जेव्हा त्याची भेट पुन्हा झाली तेव्हा मी त्याला ह्याच नावाने संबोधले होते. ) ह्या गाडरू च्या वडलांची लाकडाची वखार होती ती जाळली होती अतिरेक्यांनी.

अशा परिस्थितीत भर म्हणजे लहानपणापासून काश्मिरी जनतेने टेलिव्हिजन वर फक्त पाकिस्तानी कार्यक्रमच बघितले होते कारण तेवढेच दिसायचे. आपले दूरदर्शनचे प्रक्षेपण तेथ पर्यंत पोहचायचे नाही. लहानपणापासून त्यांना रेडियोवर फक्त उर्दू ऐकायला मिळालेले. त्यात सुद्धा पाकिस्तानी कार्यक्रम. काश्मीर हून जम्मू भागाला जोडणारा असा एकच रस्ता – जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग - एन एच वन. थंडीत बर्फवृष्टीमुळे जवाहर बोगदा कित्येक वेळेला बंद व्हायचा. त्यामुळे एन एच वन बंद व आवक जावक बंद. रेल्वेचा प्रवास तर अजून सुद्धा नाही श्रीनगरला. ह्याच्या उलट पाक व्याप्त काश्मीर कडून मात्र दळणवळण नेहमी चालू असायचे. काश्मीर खोऱ्यातल्या लोकांचे नातेवाईक व लग्न संबंध असायचे पाक व्याप्त काश्मिरात.

ह्या सगळ्याचा परिणाम काश्मिरी हिंदू मानसिकतेवर होत होता व अजूनही होत आहे. भोवतालची लोकवस्ती आपल्या बरोबर नसेल तर केवढी पंचाईत होते सगळ्या बाबतीत. आपल्याला सगळ्यांनी वाळीत टाकल्या सारखे वाटायला लागते. काश्मिरात त्या वेळेला अशी परिस्थिती होती की साधे घरा बाहेर सुद्धा पडता यायचे नाही. दिसता क्षणी गोळी घालण्याचे आदेश सतत असायचे. दोन दोन महीने कर्फ्यू चालायचा. शाळातर नेहमीच बंद असायच्या. बऱ्याच शाळा हळूहळू सशस्त्रबलांनी ताब्यात घ्यायला सुरवात केली होती. त्यांना तिथे छावण्या लावायच्या होत्या. सतत हिंदूंची घरे जाळणे, त्यांना पळवून नेणे, त्यांना धाक दाखवून घरे खाली करायला लावणे, त्यांना नोकऱ्या न देणे, मुली व महिलांवर अत्याचार होणे हे सगळे प्रकार हळूहळू १९८९ मध्ये वाढायला लागले होते. त्या मुळे जरी ती लोकं काश्मिरी हिंदू असली तरी बाकीच्या हिंदूंपेक्षा खूपच दूरचे झालेले व दुरावलेले असे होते. मानवी हक्क समिती (ह्युमन राईटस कमिशन) त्या वेळेला मूग गिळून बसले होते का काय कोण जाणे.

आम्हाला कोर्स मध्ये आठ महीने झाले होते. आम्ही ८ दिवसांच्या भदराज कॅम्पला गेलो होतो. हा कॅम्प डोंगराळ प्रदेशात युद्ध कसे करायचे ह्या शिक्षणाचा भाग म्हणून असतो (माउंटन वॉरफेअर ट्रेनिंग). संपूर्ण कोर्स ४ बटालियनस मध्ये विभागलेला असायचा. ह्या ४ बटालीयन् स नेतृत्व आलटून पालटून कोण्या जीसी वर सोपोवले जायचे. भदराज ह्या कॅम्प साठी त्या त्या तुकडीचा तेवढ्या वेळे पुरता नेमून दिलेला जीसी मग सेनापती असायचा. माउंटन वॉरफेअर संबंधी आय एम ए मध्ये जे काही शिकवले ते उपयोगात आणून भदराज वर धावा बोलायचा.

डेहराडूनहून मसुरी चे डोंगर दिसतात. त्या डोंगरांच्या रांगेतला भदराज नावाचे सगळ्यात डावीकडचे शिखर. त्या शिखरा वरती एक मंदिर आहे. भदराज साधारण ५५०० फुटा उंचीचा. त्या पर्वतराशीला लोअर हिमालयन रेंजेस असे म्हणतात. ते शिखर सर करून परत आय एम ए मध्ये यायचे. चारही बटालीयन् स मध्ये चुरस. जी बटालीयन भदराज सर करून पहिल्यांदा आय एम ए त पोहोचेल ती जिंकली. त्या बटालीयनला भदराज चषक मिळायचा. भदराज चढायला रात्री सुरवात करायची. पूर्णं युद्ध पोषाखात – जंगलात घालतात ते कॅमोफ्लॉज कपडे, तोंड ब्ल्यांको ने काळे केलेले, पाठीवर मोठा पॅक त्यात अत्यावश्यक लागणारे सामान. भूक शमवण्यासाठी शक्करपाऱ्याच्या वड्या, टेंट बांधण्यासाठी आवश्यक असे ताडपत्रीचे बिवोक, एक दुर्बीण व चुंबकीय कंपास. ह्या सगळ्याचे वजन साधारण १५ किलो भरायचे. कमरेच्या पट्टयाला लागलेली अर्ध्या लीटरची पाण्याची बाटली. तेवढेच काय ते पाणी (माहीत नसलेल्या ठिकाणाहून पाणी पिण्यास सक्त मनाई कारण शत्रूच्या इलाक्यात शत्रूने इलाका सोडून पळताना विहिरींमध्ये विष घालून ठेवले असेल तर जिंकलेला इलाका पाण्याच्या लोभापायी घालवावा लागेल. आपली माणसे मरतील ते वेगळेच). हातात गवत कापण्यासाठी दाह किंवा खुरपे व खांद्यावर साडे पाच किलो वजनाची आता पर्यंत अंगाचाच भाग झालेली अशी रायफल. पहाटे पर्यंत भदराज सर करून आपला तिरंगा फडकवून आय एम ए कडे परत यायला लागायचे. परतीचा रस्ता दिलेल्या नकाशा वरून थोधत. असा तो भदराजचा कॅंप. साधारण ४० किलोमीटर चा तो शेवटचा मार्च म्हणजे चिकाटी, ताकद, शिस्त, धाडस, नेतृत्व व तुकडीतले सामंजस्य ह्या वर अवलंबून असायचे. परतताना आमच्या माणेकशॉ तुकडीचे नेतृत्व जीसी रोहित वर्मा ह्यावर सोपोवले गेले होते. आम्ही नकाशे पाहत आमच्या गटातल्या साथीदारांसह आय एम एत परतलो. ४० किलोमीटर चालून आल्याने सगळे जीसी दमले होते. पण साथिदारांबरोबर चालताना एवढे दमलो असे वाटत नाही. कदाचित एकट्याला एवढे अंतर जड गेले असते. पंढरपूरच्या वारीचे पण तसेच असेल. ग्यानबा तुकारामाचा गजर व आजूबाजूला वारकऱ्यांचा मेळा ह्या मुळे तेच अंतर समजून येत नाही, सहनिय होते व उलट आनंद मिळतो.

पोहोचल्या बरोबर शस्त्रागारात आपआपल्या रायफली, दुर्बिणी व चुंबकीय कंपास जमा झाल्यावर आमचे स्वागत गरम गरम चहा व बिस्किटांनी झाले. हा प्रत्येक कॅंप चा आमचा सगळ्यात आवडणारा भाग असे. आम्ही आतुरतेने ह्या मेजवानीची वाट बघायचो. आमचे शिक्षक कॅप्टन गिल - आय एम ए मध्ये अशा शिक्षकाला डायरेक्टींग स्टाफ (डी एस) असे संबोधले जाते. आमच्या डी एस ह्यांनी त्या दिवशीचे बाकीचे आय एम ए चे कार्यक्रम आमच्या साठी रद्द झाल्याची घोषणा करताच सगळ्या जीसी कडून उत्फुर्त पणे माणेकशॉ बटालीयन की जय निघाले. आमचे अर्धे दमणे तेथेच विरून गेले. आता प्रत्येक जण त्यांना आलेल्या पत्रांचे वाचन करण्यात गुंग झाला. १९८९ मध्ये मोबाईल काय असते ते कोणालाच माहीत नव्हते व दूरध्वनी सेवा नुकतीच सुरू झाली असल्या कारणाने ती फक्त आय एम एच्या शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्येच असायची अन तेथे जायचे म्हणजे काही सोपे नव्हते. त्या मुळे आम्ही व आमचे आप्तेष्ट ह्या मध्ये असणारा पत्र हा एकच दुवा होता.

मी माझ्या आईचे पत्र संपवतच होतो तेव्हा माझ्या कडे जीसी सुनील खेर व जीसी हिरालाल गाडरू आले. सुनीलचा रडवेला चेहरा पाहून मी काय झाले म्हणून विचारले. मला म्हणाला – आईला अतिरेक्याचा धमक्या आल्या आहेत व त्यांनी महिना अखेर पर्यंत घर सोडायला सांगितले आहे. त्याच्या तोंडाचे पाणीच पळाले. एक तर घर सोडून ती अशी एकटी जाणार कोठे. खोऱ्या बाहेर नवे घर घ्यायला पैसे नाहीत. असलेले घर विकता येत नाही अशी काश्मीर खोऱ्यात परिस्थिती आणि हे सगळे करायला सुनीलला सुट्टी कोण देणार व कशी मागणार सुट्टी. आमचा डि एस, कॅप्टन गिल असा कर्दन काळ होता की त्याच्या कडे जाणे म्हणजे शिक्षा घेऊनच येणे असे होते. आम्ही काही बोलायच्या आधीच, तो आमच्या चुका काढायचा. आमच्या पोशाखात जरा जरी खोट सापडली तर तेथेच आमची रोलिंग सुरू. आता हे रोलिंग काय तंत्र आहे ते समजावून सांगतो. आपण कशा लहानपणी गाद्या टाकल्या वर कोलांट्या उड्या मारायचो. अगदी तशाच कोलांट्या उड्या मारणे म्हणजे रोलिंग. फक्त हे रोलिंग गाद्यांवर नाही करायचे. आता हे रोलिंग कधीही कोठेही व कोणच्याही कपड्यांमध्ये होऊ शकते. आम्ही रोलिंग अंडरवेअर (फक्त) पासून कोट टाय मध्येही केलेले आहे. रस्त्यावर, खेळाच्या मैदानावर, उथळ वाहणाऱ्या टॉन्स नदीच्या पात्रात, ड्रिल स्क्वेअर मध्ये भर दुपारी असे वाटेल तिथे केलेले आहे. त्या मुळे आम्ही शक्यतोवर आमच्या डि एस कडे जायचे टाळायचो. पण आजचा दिवस वेगळा होता. एक तर आमच्यावर कॅप्टन गिल खूश होता कारण माणेकशॉ बटालीयन भदराज मध्ये सगळ्या बटालीयन् स मधून पहिली आली होती व म्हणूनच त्या दिवशी सुट्टी मिळाली होती. बाकीच्या बटालीयन् स आल्या आल्या कपडे बदलून पुढच्या कार्यक्रमाला लागल्या होत्या. धीर धरून आम्ही कॅप्टन गिल कडे गेलो. घाबरत घाबरत सुनीलने सगळे सांगितले. कॅप्टन गिलला सुनीलची घरची सगळी परिस्थिती माहीत होती. त्या मुळे त्याने सगळे नीट ऐकून घेतले. आज आमच्या पोषाखाची खिल्ली उडवली गेली नाही व शिक्षेचे नावही निघाले नाही. सगळे ऐकून घेतल्यावर तो म्हणाला – मी समजू शकतो तुला सुट्टी हवी आहे. तू सुट्टी चा अर्ज लिही मी शिफारीश करतो बाकी पुढचे कंपनी कमांडर व बटालीयन कमांडर वर अवलंबून आहे. मी पण तुझ्या सुट्टी बद्दल त्यांच्याशी बोलेन. सुनीलने वेळ जायला नको म्हणून डि एस कडे जाण्या अगोदरच लिहून ठेवलेला अर्ज पुढे केला. कॅप्टन गिलने लागलीच त्याची शिफारिश लिहून तो कंपनी कमांडर कडे स्वतः गेला. सुनीलला रात्री कंपनी कमांडर कडून निरोप आला की त्याला बटालीयन कमांडरने मुलाखती करता सकाळी बोलावले आहे. आमचा डि एस कॅप्टन गिल ह्यांच्याशी रोजच्या रोज संबंध यायचा. पण कंपनी कमांडर मेजर शेखावत कडे जाण्याचा किंवा त्याला भेटण्याचा प्रसंग गेल्या आठ महीन्यात क्वचितच आला होता. बटालियन कमांडर चे डर तर मग विचारुच नका. त्याचे ऑफिस जेथे असायचे तो रस्ता आम्हा जीसीज ना रहदारी साठी बंद होता. त्या रस्त्या वरून आम्हाला जाता यायचे नाही. आम्ही बटालीयन कमांडरला फक्त खेळाच्या मैदानावर किंवा कॅंपस च्या वेळेला पाहीले होते. कर्नल कटोच नाव होते त्यांचे. ज्या जीसीच्या हातून त्यांच्या गेल्या जन्मात घोर पापे घडली असावीत तेच जीसी बटालीयन कमांडरच्या ऑफिस मध्ये जायचे असे काहीसे चित्र होते. ज्यांचे रेलीगेशन होणार असायचे त्यांनाच फक्त तो एकदा भेटायचा हे सांगायला की तु रेलिगेट झालास म्हणून. हे सांगायला फारसा वेळ लागत नाही. त्यामुळे कोणताही जीसी त्याच्या ऑफिस मध्ये दोन मिनटा पेक्षा जास्त वेळ कधीही उभा राहिला नव्हता. त्या मुळे जीसी सुनील खुप घाबरला होता. जेव्हा दुपारच्या जेवणाच्या वेळेला भेटला तेव्हा त्याचा चेहेरा अजूनच रडवेला झाला होता. तो म्हणाला बटालीयन कमांडर ने सुट्टी चा अर्ज रद्द केला. म्हणाला हे काही कारण होत नाही सुट्टी मागायला. आम्हाला राग आला व खुप वाईट वाटले. जीसी सुनील खेर तर वेडापीसा झाला होता. खूप शिव्या घातल्या बटालियन कमांडरला. त्याला त्याच्या आई व्यतीरिक्त कोणीच दिसत नव्हते.

त्या संध्याकाळी कॅप्टन गिल आमच्या बरॅक मध्ये सुनीलला येऊन भेटला. सुनील म्हणाला त्याला पण खूप वाईट वाटत होते अर्ज रद्द झाल्या बद्दल कारण त्याने सूनीलच्या सुट्टी साठी कंपनी कमाडरला स्वतः भेटून जीसी सुनील वर बेतलेल्या संकटा बद्दलची कल्पना दिली होती.

कॅप्टन गिल ला संध्याकाळी भेटल्या पासून जीसी सुनील खेर मध्ये आम्हाला अचानक एक बदल जाणवला. तो जरी दुःखी होता तरी त्याचा रडवेला चेहरा जाऊन निश्चयी बनला होता. त्याचा चेहरा निग्रही वाटत होता जसा काही त्याला त्याच्या वर बेतलेल्या संकटावर तोडगा सापडला आहे असा.

(क्रमशः)

(राजाराम सिताराम एक, राजाराम सिताराम दो – ही आय एम ए वर आधारीत कथा लवकरच प्रसिद्ध करत आहे)




Sunday, January 23, 2011

२० वर्ष - काश्मिरी विस्थापीत

(१९८९ मध्ये काश्मीरच्या हिंदूंना अतिरेकी संघटनांनी पत्रके वाटून - खोऱ्यातून बाहेर जा - अशी ताकीद दिली व त्या वेळी हजारोंच्या संख्येने काश्मिरी हिंदू खोऱ्यातले पिढ्यांपिढ्यांचे त्यांचे घरदार सोडून जम्मू व दिल्ली ला निघून गेले. हा एक प्रकारचा होलोकास्टच त्यांनी अनुभवला. त्यामुळे खोऱ्यात आता हिंदू नगण्य राहिले आहेत व हिंदू मत नगण्य झाले आहे. पुढे कधी मताधिकार राबवून (प्लेबिसाईट) काश्मीर प्रश्न सोडवायचा असा निर्णय कार्यान्वित झाला तर फुटिरतावाद्यांना त्यांचा डाव जिंकायला साहजिकच सोपे जाईल. कलम ३७० लागू असल्या कारणाने जम्मू काश्मीर सोडून बाकी लोकं तिथे वस्ती करू शकत नाहीत, पण हिंदूंना मात्र तेथून घालवून देऊन पाकिस्तानचा इरादा सफल होत आहे. १९८८ मध्ये पाकिस्तान च्या राष्ट्राध्यक्ष ह्यांचा ऑपरेशन टोपुक कार्यान्वित झाल्यावर १९८९ – ९० मध्ये ज्या हजारो हिंदूंना मारून, धाक दाखवून पद्धतशीर पणे खोऱ्यातून हुसकवून लावले त्याला गेल्या आठवड्यात २० वर्षे झाली, नव्या पिढीला कदाचित ह्या इतिहासाचे विस्मरण झाले असेल किंवा कदाचित हा इतिहास माहीत पण नसेल. त्या होलोकास्ट चे व त्या काळ्या दिवसांचे स्मरण करून विस्थापित काश्मिरी हिंदूंनी गेल्या आठवड्यात एक मोर्चा काढला होता.

जर नवीन पिढीला होऊन गेलेला इतिहास माहीत नसेल तर पूर्वी राष्ट्राकडून झालेल्या चुका पुन्हा होण्याची भीती निर्माण होते. बरोबर इतिहास माहीत नसेल तर नवी पिढी आहे त्या परिस्तिथीचा विचार वेगळ्याच दृष्टिकोनातून घेऊ शकते. काही वर्षाने मग इतिहास माहीत नसल्याने किंवा त्याचे विस्मरण झाल्याने नव्या नव्या पिढी कडून ही चूक होण्याची देखिल शक्यता आहे आणि मग असे उद्गार निघायला लागतील - की, एवी तेवी हिंदू कोणी तेथे राहत नाहीत, जे राहतात त्यांना काश्मीर भारतात नको आहे आपण का धरून बसायचे काश्मीरला, सोडून द्या ना. भारत विरोधी अरुंधती रॉय ह्यांच्या सारख्या प्रसिद्धीची हाव असणारे स्वयंघोषित नेते ह्याच गोष्टीचा फायदा आता सुद्धा घेताना दिसतात. येणाऱ्या पिढ्या काश्मीर प्रश्नावर सतत उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत राहणार, पण गेल्या २० वर्षांचा इतिहास कोणच्याही शैक्षणिक संस्थांमधून शिकवला जात नाही व ही इतिहासाची जी रिक्त स्थाने आहेत ती भरल्या शिवाय काश्मीर प्रश्नाचे गांभीर्य, सोडवण्याची प्रबळ इच्छा व प्रश्न सोडवण्याचा मार्ग सुकर होणार नाही.

ह्याच पार्श्वभूमीवर ही कथा लिहिली आहे. ह्या कथेत पात्रांची नावे जरी बदलली असली तरी प्रसंग खरे आहेत. परिस्थितीचे वर्णन कथेच्या रूपाने केले असले तरी ज्यांना जाणून घ्यायची इच्छा आहे त्यांनी ऑपरेशन टोपुक व त्यानंतर चे काश्मिरी हिंदूंचे विस्थापन ह्या विषयावर लेख, बातम्या, इतिहास ह्या वर अधिक संशोधन करावे. )







२० वर्षापूर्विची गोष्ट. १९८९ चा काळ. आम्ही इंडियन मिलिटरी अकादमी, डेहराडून (आय एम ए) मध्ये होतो. एक वर्षाच्या कालावधीचा सैन्यात अधिकारी बनण्याचा कोर्स. आम्हाला जंटलमॅन कॅडेट (जीसी) असे संबोधले जायचे. आय एम ए चे सकाळी ४ पासून रात्री १० पर्यंत शिस्तबद्ध भरगच्च कार्यक्रम व त्यात काही चूक झाली तर मिळणाऱ्या रोजच्या शिक्षा ह्या मुळे दिवस व महिने कसे संपायचे हे कळायचेच नाही. आय एम ए चे कठोर नियम व ते पाळले नाही तर मिळणाऱ्या कठोर शिक्षा. बऱ्याच नियमांमध्ये एक अजूनच कठीण असा नियम म्हणजे ह्या कोर्सच्या दरम्यान सुट्टी मिळत नाही. अगदीच जर नाईलाज असेल तर चार दिवसाची सुट्टी मिळायची. आय एम ए च्या शब्दकोशात नाईलाज ह्या शब्दाची परिभाषा म्हणजे - जीसी च्या दुर्दैवाने त्याच्या पालकांपैकी कोणाचा मृत्यू झाला तर चार दिवसाची सुट्टी मिळायची. एरव्ही सुट्टी मागितली तर आय एम ए मधल्या शिक्षकगणां कडून त्वरित उत्तर मिळायचे – तुझ्या स्वतःच्या अंत्यसंस्कारासाठी सुद्धा तुला सुट्टी मिळणार नाही मग उगाच कशाला मागतोस. नाही म्हणायला जर कोणी जास्त सुट्टी घेतली तर कोर्स मधून नापास व्हावे लागायचे. त्याला रेलीगेशन म्हटले जायचे. रेलीगेशन म्हणजे आणखीन सहा महिने आय एम ए चे ते नियम व त्या शिक्षा झेला. जर दोनदा रेलीगेशन झाले तर अकादमी मधून काढून टाकले जायचे व तेथेच जीसीची अधिकारी व्हावयाची स्वप्न भंग पावायची. त्यामुळे आम्ही कोणी सुट्टी घेण्याचा विचारही डोक्यात आणायचो नाही.


(क्रमशः)


Thursday, January 20, 2011

हसन अली

हसन अली ह्या इसमा कडे ३७००० कोटी रुपयाची करबाकी आहे असे एक दोन वर्षापूर्वी वाचनात आले होते.

त्या नंतर आता म्हणे त्याच्या कडे ५०००० कोटी रुपयाची कराची थक बाकी आहे.



हा इसम पुण्याचा.



१. हा कोण आहे. कोणाला माहीत आहे का. माझ्या माहिती प्रमाणे ह्या माणसाचे स्टड फार्म आहे पुण्यात. स्टड फार्म एवढा पैसा मिळवून देत असेल तर आतापर्यंत मोठ मोठ्या उद्योजकांनी त्यात पैसा ओतून बरेच असे फार्मस् निर्माण केले असते. मग एवढा पैसा आला कोठून.



२. टाइम्स नाऊच्या नुसार हा कोण्या राजकीय पुढाऱ्याचा मोहरा आहे. कोण असेल तो पुढारी. ५०००० कोटी रुपये जर कर बाकी असेल तर स्विस बॅंकेत त्याच्या तिप्पट पैसा जरुर असणार - म्हणजे साधारण १५०००० कोटी रुपये झाले. ह्या पैशात किती अतिरेकी संघटनांना पैसा पुरवता आला असेल. २०१० - २०११ मध्ये भारताचा सगळा मिळून संरक्षण खर्च १४७००० कोटी रुपये झाला. ह्या राष्ट्रात अराजक माजवण्याचे सामर्थ्य ह्या माणसा कडे आहे. हा विचार डोक्यात येतो. आपल्याला काय वाटते.



एवढे सगळे असून सरकार अजून सुद्धा चुप का.  मला वाटते सरकार ने ह्या पैशाचा जर प्रामाणिकपणाने शोध लावला व ही गोष्ट पुर्णत्वाला नेऊन जर देशा समोर एक केस स्टडी म्हणून ठेवली तर त्यातून फार मोठे कार्य होणार आहे. हे घडवून आणण्यासाठी लागणारी यंत्रणा सरकार कडे आहे, पैसा आहे. फक्त इच्छा शक्ती नाही असे वाटते. ह्याचीच खंत आहे. पैसे खाऊ पणा पुर्वी पण होता पण आता पाणी डोक्यावरून जाऊ लागले आहे. लोक हतबल आहेत का लोकांच्या संवेदना बोधट झाल्या आहेत. त्यांना उठवणारा व जागे करणारा एखादा जांबूवंत पाहिजे आहे.



Monday, November 15, 2010

शाळे बाहेरच्या शाळा

आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आमची आई रोज दुपारी आम्हाला रेल्वेलाईन जवळच्या गणपतीच्या देवळात घेऊन जायची. कधी तिथे किर्तन चाललेले असायचे ते ऐकायला बसायचो, कधी प्रवचन चाललेले असायचे त्याला जायचो. किर्तन दोन भागात असायचे पहील्या भागात भागवतातली एक कथा किंवा पुराणातली एखादी घटना भजनां बरोबर किर्तनकार सांगायचे. मजा यायची. दुस-या भागात सांगितलेल्या कथेचा मतीतार्थ सांगायचे. हा भाग जरा गंभीर असायचा व सुरवातीला कंटाळा यायचा वय वाढल्यावर आवडायला लागला. कथेचे सार दुस-याच भागात असते हे कळले. प्रवचनेचे विषय जरा गंभीर असायचे. कधी महाभारतातील सोळा महत्वाची पात्रं, तर कधी गीतेचा अकरावा अध्याय, कधी उपनिषदांवर चर्चा. कधी कधी तर शेवडे गुरुजी प्रवचन करणार असतील तर चक्क १९७१ च्या भारत पाक युद्धातील अभिमन्यु असापण विषय असायचा. पण येवढे मात्र खरे एकदा का जायला सुरवात झाली ह्या किर्तन, प्रवचनांना की आवड वाढते. नवं नव्या गोष्टी कानावरुन जातात. उपनिषदांतून केवढे प्रगाढ तत्वज्ञान आहे ते तेव्हा लहानपणी समजले नाही तरी त्याची कल्पना येते. पुढे त्याचा खुप फायदा होणार असतो. वयाच्या कोणच्या ना कोणच्या टप्प्यावर आपण सर्व जण त्यातले तत्वज्ञान स्विकारतो व त्या तत्वज्ञानाकडे आकृष्ट होतो. हा साक्षातकार केव्हा ना केव्हा प्रत्येक माणसाला होतो. लहानपणी ते तत्वज्ञान नुसते कानावरुन जरी गेले तरी आपल्या आंतरमनात खोल कोठेतरी आपल्या नकळत रुतुन बसते. जिवनाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोण चांगला होतो. मन विशाल होते व आपले मन प्रसन्न व आनंदी रहावयास मदत मिळते.



शाळेला सुट्टी लागायची तशी बाबासाहेब पुरंद-यांच्या शिवाजी महाराजांवरच्या भाषणांना आम्ही जायचो. पुढचे दोन तास प्रत्यक्ष शिवाजी महाराजांबरोबर काढायचो आणि नंतरचे काही दिवस त्याच धुंदीत जायचे.



डोंबिवलीच्या नगरपालीकेचे पुस्तकालय चांगल्या पुस्तकांसाठी खुप प्रसीद्ध होते व ठेवले सुद्धा छान होते. सुट्टीत दुपारी सावरकरांचे काळेपाणी, १८५७ चे स्वातंत्र्य समर, सहा सोनेरी पाने. लोकमान्यांचे गीता रहस्य (त्या वेळेला जरी पुर्णपणे डोक्यावरुन गेले तरी आता कळते त्याचे महत्व) आर्टीक होम ऑफ वेदाज, ऑरायन. पुलंची सगळी पस्तके, वपुंची कथाकथने, रणजित देसाईंची पुस्तके इत्यदी कित्येक अनेक. किशोर मासिक, चांदोबा, गोट्या, चिंगी व चिमणराव, साने गुरुजींची शामची आई, गोनीदां ची पुस्तके व अजुन खुप खुप पुस्तके, आमच्या व बाकीच्या लहान मुलांच्या आवडीनिवडीवर वाचली जायची.



संध्याकाळ झाली की कोणी मोठी उत्सुक ‘ग्राऊंड’ घ्यायचे. म्हणजे जवळच्या मैदानावर खेळ घ्यायचे. मुलं, मुली त्या ‘ग्राऊंड’ वर जायचे. व खेळ घ्यायचे. आम्ही म्हणायचो ‘ग्राऊंडला’ जातो. मोठी समजायची की अमका अमका नेहरु मैदान किंवा बागशाळा मैदानावर गेलाय. मला आठवताय संध्याकाळी लक्ष्मीनारायणाच्या मंदिरा समोर एक घर होते त्यात राहणारे आजोबा त्यांच्या घराच्या गच्चीवर, उत्सुक अशा शालेय मुला मुलींना सभाधीट पणा शिकवायचे. एखादा विषय समोर ठेवायचे व त्यावर बालायला लावायचे. बाकीची ऐकणारी मुले, बोलणारा कसा बोलतो व चुका कसे करतो ते बघायची. त्याची वेळ आली की मग तो बोलायचा व बाकीची ऐकायची. काही मुले संध्याकाळची संघाच्या शाखेत जायची, त्यांच्या शिबिरात जायची. मी पण एक दोनदा शिबिरांना गेलेलो आहे. बहुतेक मुलांना एखादा छंद असायचा. शाळेला लागलेल्या सुट्टीत मग मुलं आपापला छंद जोपासायची. त्यातुन मिळणारा विरंगुळा काही वेगळाच असतो. दिवसभराचा डोक्यावरला ताण काही क्षणातच निघुन जातो.



हे सगळे होत असताना शाळा चालु असायची. शाळेतला अभ्यासक्रम जरी व्यापक असला तरी समर्पक कधीच होऊ शकत नाही. मुलाला एकदा शाळेत पाठवले, मग ती कोठलीही शाळा असो – शेजारची सरकारी शाळा घ्या किंवा अद्ययावत अंतरराष्ट्रीय विद्यालय असो, त्यात वेगवेगळ्या विषयांवरची माहिती जरुर मिळते, वेगवेगळे विषय शिकायला मिळतात, जशी शाळा असेल तसे वगवेगळ्या गोष्टी पहायला मिळतात एखाद दुसरा अनुभव पण गाठी लागतो. पण आपल्या विचारसरणीत बसणारे संस्कार होऊ शकत नाहीत. जिवन चांगल्या प्रकारे कसे जगायचे त्याचे पाढे मिळु शकत नाहीत. आपल्या लोकनेत्यांचे जिवन कसे घडले, त्यांचे विचार हे उमजु शकत नाहीत. आपल्या संस्कृतीचा इतिहास व आपली संस्कृती कशी तयार झाली हे समजु शकत नाही. आपले सामाजिक कर्तव्य काय आहे ह्याची कल्पना फार क्वचीतच येऊ शकते. एकुणच शाळा ही ‘अ ब क ड’ शिकवणारी असते पण जिवनाचे ‘कडबोळे’ सोडवण्यासाठी लागणारे धडे देणारी नसते. आपल्या डोक्यावरला आलेला ताण नैसर्गिकरीत्या कसा कमी करायचा ह्याचे शिक्षण नसते. मनाची प्रसन्नता कशी टिकवुन ठेवायची ह्याचे शिक्षण नसते. ह्या जगात तोच मनुष्य यशस्वी गणला जातो ज्याला प्रसन्नतेने व आनंदाने जगता आले आहे.



ह्या सगळ्याचे नकळत शिक्षण देणा-या व चांगले संस्कार करवणा-या शाळेबाहेरील शाळा अजुनही आहेत पण त्यांचा आपण वापर फार कमी करायला लागलो आहे. धकाधकीचे आयुष्य ह्या नावाखाली आपण सगळ्यांनी ह्या शाळेबाहेरील शाळां मधुन आपल्या मुलांचे नाव काढले आहे. आपल्या लहानपणी सुद्धा धकाधकीचे आयुष्य होते. प्रत्येक पिढीला आयुष्य धकाधकीचेच वाटत आलेले आहे. पण आता ग्राऊंड घेणारे काका सहसा सापडत नाहीत. सभेत कसे बोलावे हे शिकवणारे आजोबा स्वतःच वृद्धाश्रमात दाखल आहेत. वेगवेगळे छंद व कला शिकवणारी काकु – का कु करायला लागली आहे. तिला दुरदर्शन वर दिसणा-या ‘सास बहु’ मालिकांमधुन उसंत मिळत नाही. वाचनालये आता गेम्स व ईंटरनेट पार्लर्स मध्ये बदलली आहेत त्यात मुले, नाही नाही ते ज्ञान सर्रास मिळवतात. आपल्या सभोवारचे निरिक्षण करायचे सोडुन स्वतःच्या मोबाइलवर तासनतास बटनं दाबत तल्लीन झालेली मुले आपण हमखास पाहतो. अशाने आपल्या भोवतीची एक प्रकारची जागरुकता असायला हवी ती कमी कमी होऊ लागली आहे. हल्ली आपले काँप्युटर मित्र फार व आसपासच्या ख-या लोकांशी आपल्याला बोलायला वेळ नाही अशी परिस्थिती झाली आहे. मुले फुटबॉल व इतर मैदानी खेळ खेळतात पण पि एस् ३ वर! अशाने जिवाभावाचे मित्रगण व नेत्रुत्व गुण विकसात होण्या पेक्षा मुलांमध्ये माणुसघाणी व विकृत मनोवृत्ती आणि पुढे नैराष्यवादी मनोदशा तयार होते. एवढेच काय पण गणकयंत्रावरच्या काही खेळ सारखे खेळल्याने मुलांमध्ये चुक झाल्यावरच्या पश्चातापाची नैसर्गिक भावना असते ती बोथट होते व चुक होऊन सुद्धा पश्चाताप होईनासा होतो. मुल बिघडण्यामागचे हमखास कारण म्हणजे त्यांच्यातली पश्चातापाची नैसर्गिक भावना नाहिशी होणे.



कोणाला जर वाटत असेल की काय करायचे हल्लीची मुले ऐकतच नाहीत, येतच नाहीत खेळायला कारण मुले म्हणे कॉम्प्युटरलाच चिकटुन बसतात. त्यात मुलांना दोष देण्या पेक्षा त्यांच्या आई वडिलांना द्यावा लागेल. हल्ली साधारण अशा त-हेचे उद्गार आपल्याला सर्रास ऐकायला मिळतात - माझे आयुष्य, मला माझी स्पेस, मी काही फक्त मुलांसाठी जगत नाही मला माझे जगायचे आहे, मी मुलांसाठी का म्हणुन स्वतःच्या स्वतंत्र्यावर आळा घालु?, मी त्यांच्या साठी का म्हणुन बंधन ओढवुन घेऊ?.



आपले आई वडील असेच विचार करते असते तर आज आपण हे वाचत नसतो. पुर्वी डिप्रेशन, बोर होणे हा शब्दच आपण कधी ऐकला नव्हता. हल्ली पालकच म्हणतात व मुले पण बोर व्हायला लागली आहेत. बोर होण्याची पुढची पायरी म्हणजे डिप्रेशन.



हल्ली समाजातील प्रौढ व लहान मुले एकत्र भेटतात व एकमेकांत सुसंवाद सादतात असे बघायला मिळत नाही. ते प्रयत्नपुर्वक पणे केले पाहीजे. शाळेबाहेरील शाळा सक्षम करण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे किर्तन, प्रवचनांना प्रोत्साहन देणे. सगळ्यात चांगले प्रोत्साहन म्हणजे आपल्या मुलांना घेऊन अशा कार्यक्रमांना जाणे. किर्तन, प्रवचनांना फक्त म्हातारी लोकं जातात असा जो एक समाजात समज आहे तो आपण स्वतः जायला लागुन बदलला पाहीजे. त्यात कोणाला कमीपणा वाटायला नको, लाज वाटायला नको व मागासलेपणा पण वाटायला नको. आपले क्रिश्चन बांधव पण रविवारच्या मास ला जवळच्या चर्च मध्ये जातातच ना. ते मागासलेले वाटतात का आपल्याला? त्यांना लाज वाटते का? त्यांना त्यात कमीपणा वाटतो का? ते जातियवादी होतात का लागलीच? किर्तनात, प्रवचनात जे सांगितले जाते ते सगळेच्या सगळे देश, काल पात्रानी आपल्याला आणि आपल्या समाजाला लागु होतच असेल असे नाही पण निदान आपल्याला विचाराला चालना तरी मिळेल. ब-याच जणांना आपल्या मुलांना किर्तन प्रवचनांना घेऊन जायचे म्हणजे मुलाला शामळू बनवायचे किंवा लहानवयापासुन वैराग्याचे व अल्पसंतुष्ट होण्याचे धडे द्यायचे असे वाटते. थोडक्यात किर्तन प्रवचनांना लहान मुलांना घेऊन जाणे म्हणजे गृहास्थाश्रमासाठी मुलाला नालायक बनवणे असे काही लोकांना वाटेल. उलट आपली विचारसरणी अशी सर्वसमावशक आहे की वेदांतुन, शास्त्रांतुन, उपनिषदांमधुन, गीतेतुन कधीही टोकाची भुमिका घ्या असे प्रतिपादिले नाही. टोकाचे वैराग्य, टोकाचा संन्यास, टोकाचा उपवास, टोकाची व्रते, टोकाची कर्मे, टोकाचा निस्वार्थीपणा ह्याला विरोधच नाही तर ते तामसी कर्म मानले गेले आहे. माणसाने जगात राहुन, जगाच्या चांगल्या गोष्टींचा अस्वाद घेउन, कर्म न सोडता, प्रसन्न व आनंदी राहुन आपली सदसदविवेक बुद्धी हळु हळु कशी वाढवावी व आत्म्याची उन्नती कशी करावी व त्यासाठी कसे जगायचे हेच प्रत्येक ठिकाणी प्रतिपादिले आहे. हे सगळे करण्यासाठी आपली विचारसरणी ही सर्व समावेशक ह्यासाठी आहे की आपला धर्मच आपल्या शिकवतो की आनंदी कसे रहायचे, प्रसन्न मन कसे ठेवायचे, शरिरास व्यायाम कसा द्यायचा, रोगव्याधीं पासुन दुर राहण्यासाठी घरगुती आयुर्वेदिक औषधे व पथ्यपाणी हे आपल्या हिंदुनावाच्या जिवनसरणीतच सामावलेले आहे.



कोठच्याही विचारसरणीचे दोन भाग असतात पहीला भाग – विचार. त्यात समाजापुढे विवेकबुद्धीला अनुसरुन विचार ठेवण्यात येतो. धार्मीक सुत्रे व तत्वज्ञान ह्यात मोडते. दुसरा भाग – क्रिय. त्यात त्या मांडलेल्या विचारांना क्रियेत उतरवणे.



विचार - कोणतिही विचारसरणी लोकांनी अंगीकारण्यासाठी लोकांना ते तत्वज्ञान पटायला पाहीजे. अशा दृष्टीने विचारांची मांडणी केली पाहीजे. आपला धर्म किंवा आपली विचारसरणी हजारो वर्षांपासुन चालत आलेली आहे. कालांतराने त्या परीसावर कधी कधी बुरशी जमते. प्रत्येक पिढीचे मग कर्तव्य बनते की समाजातील मोठ्यानी ती बुरशी वेळोवेळी दुर करावी. आपली विचारसरणी समजायला सोपी ठेवावी. पाखड आहेत म्हणुन आपण तांदुळ टाकुन थोडेच देतो. वेळोवेळी समाजातील मोठ्यांनी पाखड पाखडुन टाकुनद्यावेत. देश, काल व पात्राच्या परिसीमेत ती विचारसरणी कशी सोपी होईल ह्याकडे लक्ष घालायला हवे. लहानपणा पासुन किर्तन प्रवचनांना जाण्याने हे विचार त्यांना विचार करायला लावतात. त्यांच्यातली सारासार विचारकरण्याची ताकद प्रज्वलित होते. चुक झाल्यावर नैसर्गिक पश्चातापाची भावना उफाळुन येते. ही भावनाच लहानांना चांगले गुण आत्मसात करण्यात प्रद्युप्त करते. लहानपणा पासुन विचार कानावर पडले नाहीत तर मग आपली विचारसरणी एकदम अंगिकारली कशी जाऊ शकेल.



क्रिय – मांडलेल्या विचारांना क्रियेत उतरवण्या साठी, समजलेले तत्वज्ञान जिवनात उतरवण्या एवढे सोपे व व्यावहारिक पाहीजे. फार क्लिष्ट चाली रुढींचा लोकांना अनुसरायला कंटाळा येतो व त्या मागचा उद्देश स्पष्ट नसेल तर विचारसरणीवरचा विश्वासच उडतो. तसेच जर देश, काल व पात्र ह्यांना अनुलक्षून आपल्या विचारसरणीला वेळोवेळी धार दिली नाही तर ती लौकरच कालबाह्य होते व अनुसरणीय रहात नाही. आता हे करण्यासाठी काही कोणती धार्मीक बैठक बोलावण्याची गरज नाही किंवा राजकारण्यांसारखी कमिटी बनवण्याची गरज नाही. आपण समाजातील वयस्कर व मोठ्या लोकांनीच वेळोवेळी आपणहोऊन हे हाती घेतले पाहीजे. म्हणजे सुपातले तांदुळ न सांडता पाखड तेवढे जातील असे बघितले पाहीजे. ह्याची सुरवात अगदी आपल्या प्रत्येकाच्या घरात होऊ शकते. आपण लहानांना लागणारी विचारांची योग्य सामुग्री त्यांच्या बालपणीच बालकडु म्हणुन द्यायला हवी. हे साध्य करण्यासाठी काही रुपरेषा दिल्या आहेत –



• आपल्या मुलांना जवळच्या देवळात आठवड्यातुन एकदा किर्तन वा प्रवचनांना घेउन जा. ह्या गोष्टीला आठवड्यात दोन ते तिन तास लागतात जास्तीत जास्त. साधारण वयाच्या चार वर्षांपासुन बारा वर्षांपर्यंत हे करावे लागेल.

• लहान मुलांन मध्ये मिसळा. त्यांच्या बरोबर संध्याकाळी खेळ खेळा. जर का आसपास खेळायचे मैदान नसेल तर त्यांच्याकडुन पळायचा व्यायाम करवुन घ्या. सुर्यनमस्कारांचे मह्त्व पटवुनद्या व त्यांच्या कडुन सुर्यनमस्कार घालुन घ्या.

• लहानांना राष्ट्रव्रती बनवा व राष्ट्रव्रत काय असते ते समजवा.



शाळेबाहेरच्या शाळेची प्रथा तेवत ठेवणे आपल्या हाती आहे. लहान मुलांना दोष द्यायचा सोडुन आपला माणुसघाणेपणा आपण कमी करायला शिकला पाहीजे. आपणच परत पुर्वी आपल्या बरोबर होत असायची तशी लहान मुलां बरोबर सुसंवादास सुरवात केली पाहीजे. ह्या शाळे बाहेरील शाळा कार्यक्षम केल्या पाहिजेत. शाळेबाहेरील शाळांना आपण प्रत्येकाने महत्व दिले पाहीजे.













Thursday, November 4, 2010

सोसायटीचा आदर्श

आदर्श सोसायटी च्या घोटाळ्यावर भरपुर सध्या लिहुन येत आहे. आज पर्यंत मला स्वतःला आभिमान होता की सैन्य हे सरकारी लाचखोर व पैसाचोरी ह्या पासुन ब-यापैकी दुर आहे. आज तो कमी झाला.

ज्यांच्या कडे कौशल्य, कर्तब, शक्ती किंवा बुद्धी असते, आणि परिश्रम करण्याची तयारी असते, तो मनुष्य आपल्या कर्तबगारीवर पैसे मिळवतो. स्वतःचे इमान व स्वतःचा धर्म विकुन नव्हे. थोड्याशा पैशासाठी, आत्मा विकुन आपल्या स्वतःला व आपल्या घरच्या लोकांना सामोरं जाता येणार नाही. प्रत्येक लाचखोर माणसापाठीमागे नेहमी त्याचे हवरट कुटूंबं असते. लाचखोरी करुन कोणाला असे म्हणुन टाळता पण येत नाही की दुस-यानी त्याला लाच घ्यायला लावली - कारण लाच घ्यायची का नाही हे ठरवणारे शेवटी आपण स्वतःच असतो व हा निर्णय आपला स्वतःचा वैयक्तीक असतो. जो लाच खातो व देतो तो आपल्या राष्ट्राचा शत्रू ठरतो, मग तो किती का इतरवेळेला राष्ट्रप्रेमाचा आव आणुदे. जो लाच घेतो, लाच देतो व भ्रष्टाचार करतो तो पापी व राष्ट्रद्रोही असतो. तो देशभक्त असुच शकत नाही. ह्याच साठी जे स्वतःला देश भक्त समजतात त्यांनी राष्ट्रव्रत ( http://rashtravrat.blogspot.com/2010_05_01_archive.html , किंवा


http://bolghevda.blogspot.com/2010/10/blog-post.html )घेतले पाहीजे.

असल्या घोटाळ्यांनी देशा पुढील महत्वाचे प्रश्न - काश्मीर व त्यावर अरुंधती रॉय ह्यांचे व्यक्तव्य, नक्सल कारवाया, अतीरेकी कारवाया व बाकीचे प्रश्न आपोआपच नजरेआड होतात. हे प्रश्न सोडवायला आपल्याला एका शिवाजीची गरज आहे.

आज आपल्याला एका परशुरामाची गरज आहे. जो सा-या भ्रष्टाचारी लोकांचा निप्पात करेल (भारतात मग किती लोकं उरतील? कोण जाणे – का उरणारच नाही? – मध्यम वर्ग सोडला तर). आदर्श ह्याचा इंग्रजी शब्दार्थ Role model असा आहे. छान आदर्श ठेवले जात आहेत नविन पिढी पुढे.

आज आपल्याला एका परशुरामाची व एका शिवाजीची गरज आहे. कोण आहे आपल्यातला असा?

Friday, October 22, 2010

अतिरेक्यांचे मित्र




२१ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे अरुणधती रॉय व त्यांच्या मानवी हक्क जपणा-या मित्रपरीवारांनी (श्री वरावर राव व बाकीचे माओईस्ट मित्र) एक सभा बोलावली होती. ह्या सभेत हुरीयत पुढारी व काश्मीर तोडायला बसलेले श्री सय्यद अली शहा गीलानी हे बोलले. ह्या सभेचा विषय होता काश्मीरला आझादी एकच पर्याय. सभा - कमीटी फॉर द रिलीज ऑफ पोलिटीकल प्रिझनर्स ने बोलावली होती. (हे वृत्त द हिंदु ह्या २२ ऑक्टोबरच्या वृत्तपत्रात छापुन आले आहे.) महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या सभेतुन अरुणधती रॉय व तीच्या मित्रांनी ह्या काश्मीर तोडु लोकांना त्यांच्या आझादीच्या भारताच्या विरुद्धच्या लढाईत पाठींबा जाहीर केला आहे.
अशी सभा बोलावण्याची कृती, व अश्या सभेत साक्षात भाग घेणे व त्याही वरुन काश्मीर तोडु अतीरेक्यांना पाठींबा जाहीर करणे हेच मुळी भारतीय कायद्याचे १२४अ कलमाचे उल्लंघन होते. राष्ट्रविरोधी कारवायांसाठी ह्या कलमाखाली आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावता येते. (१२४ अ राष्ट्रविरोधी कृत्य (sedition) – ‘whoever, by words, either spoken or written, or by signs, or by visible representation, or otherwise, brings or attempts to bring into hatred or contempt, or excites or attempts to excite disaffection towards. the Government established by law in India, shall be punished with imprisonment for life, to which fine may be added, or with imprisonment which may extend to three years, to which fine may be added, or with fine’) व त्या दृष्टीकोनातुन बघीतले तर सरकारने अरुणधती रॉय व त्यांच्या मित्रांवर तात्काळ हे कलम लागु केले पाहीजे. व असे होत नसेल तर आपण भारतियांनी व त्यातल्या त्यात राष्ट्रव्रत (राष्ट्रव्रता बद्दल अजुन कोणाला जाणुन घ्यायचे असल्यास, http://rashtravrat.blogspot.com/2010/05/rashtravrat.html ह्या वर टिचकी मारा) घेतलेल्यांने अरुणधती रॉय व त्यांच्या मित्रांवर व त्यांच्या सगळ्या वाङ्मयावर बहिष्कार घातला पाहीजे. हे सच्च्या भारतियांच्या हातुन उपजत झाले पाहीजे. हा बहिष्कार त्यांचे डोके ठिकाणावर येई पर्यंत व त्यांना त्यांची चुक समजुन येई पर्यंत टिकला पाहीजे.
अजुन विचार करण्या सारख्या गोष्टी अशा आहेत
()   अरुणधती रॉय सारखी लोक प्रसिद्ध होण्या साठी व राहण्या साठी कोणच्या ही थराला पोहोचतात. अशा लोकांपासुन आपण सावध रहायला शिकले पाहीजे व अशा लोकांना खत पाणी घालणे बंद केले पाहीजे.           
(ब)    अरुणधती रॉय सारख्या लोकांनी हे समजुन घ्यायला पाहीजे की आपल्या देशाचे ऐक्य सर्वोच्च्य आहे व असायला पाहीजे. भारताचे सार्वभौमुत्व व एकता हे त्यांच्या पैसा, प्रसिद्धी व समाजात नावाजलेले राहण्याच्या ईर्षे पेक्षा जास्त महत्वाचे आहे. भारत आहे तर ते आहेत. व हे जर अशी लोक लौकर समजली नाहीत तर आपल्या सारख्या राष्ट्रप्रेमी व राष्ट्रव्रती लोकांचे कर्तव्य आहे की त्यांना ते समजुन सांगायचे त्यांच्याच भाषेत त्यांच्यावर बहीष्कार घालुन. अशा लोकांना प्रसिद्धी व पैसा हा खुप प्रिय असतो व बहीष्कार घातला तर तो जातो. तेव्हा त्यांची भ्रष्ट झालेली बुद्धी ठिक होते.
(क) आपले सरकार व राजकिय पक्षांनी डोळ्यात तेल घालुन अशा सभांना कोणाचा पाठींबा मिळतो, पैसे कोण देतो ह्याचा थांगपत्ता लावला पाहीजे. त्यांना असे ब-याच वेळेला कळुन येईल की पुष्कळ वेळेस पाकिस्तानच अशा सभांना व एन जो ओ ना पैसे व मदत देत असतो.
()       भारत सरकारने भारतिय कायद्यांचा योग्यतो प्रयोग व उपयोग करुन अशा लोकांना तेथेच व तेव्हाच धडा शिकवला पाहीजे व अशा वेळेस सुज्ञ भारतियांनी त्याला उपजत व पुर्णपणे पाठींबा दिला पाहीजे.
लक्षात ठेवा अब्राहम लिंकन चे वाक्य the idea of secession is the essence of anarchy”. आपले सरकारने ह्याला अजाणपणे पण खत पाणी घालायला नको व सुज्ञ भारतियांनी डोळ्यात तेल घालुन असल्या सगळ्या डावपेचांना शह दिला पाहीजे.



Wednesday, October 6, 2010

हनुमानाला मिळालेला शाप व त्यावर उतारा – भाग ४ (अंतिम)





ज्या धर्माने ज्या विचारसरणीने आपल्या देशाला जिवंत केले, ज्याला अर्थ दिला आहे, देशाचे राष्ट्र बनवले आहे, त्या देशातल्या जर कोणी हिंदू हे नाव घेतले, त्याचा उच्चार केला तर तो जातीय कसा बनेल. ज्या श्वासांनी आपल्यात जीव फुंकरला आहे, तोच घ्यायला मला आता लाज वाटते असे कोणाला वाटायला लागले तर त्याने मेलेलेच बरे. मला श्वास तर घ्यायचा नाही पण जगायचे मात्र आहे असे कदापि शक्य होणार नाही. हे तर सोडाच पण हल्ली आपल्या देशात आपण हिंदू धर्माचा अभिमान न धरणे म्हणजे आपोआपच ‘सेक्युलर’ मानले जातो, असे वातावरण झाले आहे. ह्या विश्वात इतर अनेक देशात आपला म्हणण्यासारखा भारत एक देश आहे व ह्या भारताचे आम्ही आग्रही आहोत व त्याचा आम्हाला अभिमान आहे असे म्हणणे म्हणजे साऱ्या मानवजातीचा जसा अपमान होत नाही तसेच ह्या आपल्या देशात आपला म्हणण्यासारखा आमचा धर्म आहे व त्याचा आम्हाला अभिमान आहे असे म्हणण्याने बाकीच्या धर्मांचा अपमान होत नाही. आता गरज आहे आपल्या धर्माबद्दलची जाणीव होऊन अभिमान बाळगण्याची.



काही लोकांना उगाचच असंबद्ध प्रश्न करायची सवय असते. ते मग नेहमीच्या बिनबुडाच्या शंका काढतात - "लोकांना हिंदू असण्याचा नुसता गर्व असून काय उपयोग होणार. कोणाला नीट माहिती नाही हिंदू धर्म किंवा हिंदुत्त्वा बद्दल. हिंदू हिंदू करणाऱ्यांनी गीता पण कधी वाचलेली नसते. ह्या लोकांना हिंदुह्या शब्दाचा अर्थही कळलेला नसतो. हिंदुत्व म्हणजे काय हे ही समजावून घ्यायचे नसते वगैरे वगैरे". त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की, जो भारतात राहतो, जो भारतासाठी जगतो, जो भारता साठी झटतो, ज्याच्या पूर्वजांनी येथे जन्म घेतलेला आहे – हो तरच त्याला आपल्या देशा बद्दल आपुलकी वाटणार. जो मनुष्य भारतहीच त्याची पुण्यभुमी आहे असे समजतो, जो भारतहीच त्याची कर्मभुमी आहे असे समजतो. ज्याला भारताच्या, पूर्वीपासून चालत आलेली समृद्ध अशी संस्कृती ही त्याचीच आहे असे वाटते. ज्याचा आपल्या विचारसरणीवर विश्वास आहे. तो हिंदू होय व त्या तत्त्वावर जो जीवनक्रम उभारतो, ह्या तत्त्वाचा ज्याला अभिमान आहे ते म्हणजे हिंदुत्व. ह्या पुढे जाऊन जो राष्ट्रवताच्या दहा सूत्रांबरहुकूम वागतो तो राष्ट्रव्रती व त्याचे राष्ट्रव्रत हेच खरे हिंदुत्व. इतकेच आपल्या हिंदू बांधवांसाठी पुरे आहे. प्रत्येकाने काही गीता वाचायलाच पाहिजे असे नाही. सगळेच लोकनेते होऊ शकत नाहीत. ज्यांना लोकसंग्रह करायचा आहे, त्यांनी हे व बाकीचे सगळे अभ्यासावे, मनन करावे व लोकांना शिकवावे. लोकांनी अशा श्रेष्ठांचा पुरस्कार करून, त्यांनी दिशा दाखवल्या प्रमाणे जीवनक्रम अनुसरावा. सामान्य जनांसाठी श्रेष्ठांवर विश्वास व हिंदुत्वाचा अभिमान एवंम राष्ट्रव्रताचा पुरस्कार व त्याचे आचरण एवढेच पुरे आहे. श्रेष्ठलोकनेत्यांनी काय करायचे ते श्रेष्ठांना सांगावे लागत नाही. ते करतात व म्हणूनच त्यांना लोकसंग्रहाचे कार्य करायचे काम ईश्वर सोपवतो. अशा श्रेष्ठलोकांनी गीतेत काय आहे त्याचा जरूर अभ्यास केला पाहिजे.





यद्यदाचरती श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः। स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते।।



गीतेचा हा श्लोक ह्या बद्दलचा संभ्रम दूर करतो. सामान्य लोकं नेहमी श्रेष्ठ लोकांचे अनुसरणं करतात असे दिसून येते, कारण श्रेष्ठ लोकांचे कर्म सामान्य लोकं प्रमाण मानतात. व श्रेष्ठ लोकं उत्तुंग कार्य करतात म्हणूनच ते लोकमान्य होतात. त्यांचा लोकसंग्रह कारणी लागतो.



माणसाच्या मानसिक प्रगल्भतेच्या श्रेणी आहेत. त्या त्या मानसिक प्रगल्भतेच्या श्रेणीत, माणूस त्याच्या पुढे येणाऱ्या सगळ्या गोष्टींचे आकलन करून विचार करतो, निष्कर्ष काढतो. समोर येणाऱ्या प्रश्नांना उत्तरं शोधतो. संकटाला तोंड देतो. प्रत्येक मानसिक प्रगतीच्या श्रेणीत त्याचे स्वतःचे मानसिक स्वास्थ्य वाढवायचे ध्येय असते. प्रत्येक श्रेणीत त्याची विचार करण्याची कक्षा ठरलेली असते. तितकीच तो करू शकतो. ती कक्षा ओलांडता येत नाही त्याला. जेव्हा एक मानसिक प्रगल्भतेची श्रेणी पार करून तो दुसऱ्या अजून उच्च दर्जाच्या मानसिक प्रगल्भतेच्या श्रेणीत पदार्पण करतो, तेव्हाच तो आधीची कक्षा ओलांडू शकतो. प्रत्येक चढत्या मानसिक प्रगल्भतेच्या श्रेणीत त्याचे विचार व्यापक बनतात. सामावून घेण्याची कक्षा वाढते. जगाकडे बघण्याची दृष्टी बदलते. मन विशाल होते. आधीच्या मनाच्या श्रेणीत त्याला बऱ्याच गोष्टी पटण्यापलीकडे होत्या. जेव्हा मनुष्य मनाच्या इतक्या प्रगल्भावस्थेत पोहोचतो तेव्हा त्याच्या दृष्टीने वेगवेगळे देश किंवा राष्ट्र ही कल्पना फार कोती ठरते. तो साऱ्या जीवसृष्टीचा विचार करतो. तो मग कोणत्याही धर्माचा, देशाचा, राष्ट्राचा राहत नाही. तो विश्वाचा होतो. विश्व त्याचे असते. त्याचा धर्म हा ‘जिववाद’ होतो. त्याचे राष्ट्र अखिल मानवजात ठरते. त्याचा देश संपूर्ण विश्व असते. त्याच्या दृष्टीने कोणी शेजारी राष्ट्रे नसतात. कोणी शत्रू राष्ट्रे नसतात. ह्याच संकल्पनेतून "सर्व भूत हित" हे ब्रीद वाक्य आपल्या धर्माने आपल्याला दिले आहे. बृहदअरण्यक उपनिषदात सर्व सृष्टीला उद्देशून केलेली सर्वेपिसुखिनःसंतू । सर्वेसंतू निरामया। सर्वेभद्राणी पश्यंतु। मा कश्चित दुःखमाप्नुयात। (१. ४. १४ बृहदअरण्यक) अशी प्रार्थना आढळेल. ही प्रार्थना सर्व सृष्टीला लागू आहे. तसेच "सर्व भूत हीतार्थ" (भगवद्गीता, १२ अध्याय, ४ श्लोक) ही संकल्पना हल्लीच्या "सर्व धर्म समभाव" ह्या पेक्षा प्रगल्भ आहे. "सर्व भूत हितार्थ" ही संकल्पना सर्व धर्मांना तर सामावून घेतेच पण त्याही पुढे जाऊन सगळ्या प्रकारच्या विचारसरण्यांना सामावून घेते, नास्तिक लोकांना सामावून घेते, जिवंत गोष्टी व त्यापेक्षाही पुढे जाऊन निर्जीव गोष्टींना सुद्धा सामावून घेते. एवढेच काय आपली पृथ्वी ही साऱ्या सृष्टीचा एक घटक समजून साऱ्या सृष्टीचा येथे विचार असतो व त्या सर्वांचे उत्थान करण्याचा प्रयत्न ह्या संकल्पनेत केलेला आढळतो. आपली "वसुधैव कुटुंबकम्" ही संकल्पना आजच्या "ग्लोबल व्हिलेज" पेक्षा फार पूर्वीची व सर्व समावेशक आहे.



बहुतांशी असे आढळून येते की अश्या मानसिक प्रगतीच्या उच्चतम श्रेणीत पोहोचलेली माणसे हाताच्या बोटावर मोजण्या सारखी असतात. त्यांच्या मानसिक प्रगल्भतेच्या कमतरते मुळे, बहुतांशी लोकांची विचारांची क्षमता, ह्या संतांएवढी व्यापक होऊ शकत नाही. त्यांचे विश्व एवढे विशाल नसते व अशांची जर प्रगती व्हायची असेल तर त्यांना झेपणाऱ्या अशा छोट्या वर्गात पहिल्यांदा त्यांना बसवून, शिकवून मगच ते पुढच्या इयत्तेत जायला तयार होतात. अशा कोट्यवधी लोकांच्या प्रगतीसाठी राष्ट्रांची संकल्पना उभारावी लागते. अशातऱ्हेने मग वेगवेगळ्या राष्ट्रांचा पुढचा प्रवास - प्रगतीच्या दिशेने त्या त्या लोकसमूहावर सोपविला जातो. त्या त्या विचारसरणीने मंत्रीत होऊन, ते ते देश मग प्रगत होण्यात गढून जातात. ह्या प्रक्रिये मधूनच हळू हळू अजून अजून प्रगल्भ, अजून अजून उन्नत व उत्तम विचारसरणी जन्म पावते. ही गोष्ट राष्ट्रा राष्ट्रात विश्व वाटले गेल्यामुळेच होऊ शकते.



‘हे विश्वची माझे घर’ मानणारे महात्मे मंडळी सुद्धा प्रबोधन करताना, त्यांच्या दृष्टीने क्षुल्लक पण सामान्य लोकांच्या प्रगती करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी धर्म व राष्ट्रांची संकल्पना उभारतात. जो शिक्षक दोन गटात खेळाचे सामने घेतो, त्याच्या दृष्टीने दोन्ही गट सारखेच असतात. पण दोन्ही गटांचे नेतृत्व करणाऱ्या कर्णधारांना त्यांचा त्यांचा गट, अत्यंत महत्त्वच वाटतो. चुरशी शिवाय प्रगती नाही. त्यामुळे खेळात कर्णधाराने, त्याचा त्याचा गट कसा पुढे जाईल हेच बघायचे असते व शिक्षकाला दोन्ही गटात फरक वाटत नसून सुद्धा त्याने चुरस निर्माण करायची असते – खेळ व खेळाडूंच्या फायद्या साठी. ह्या प्रक्रियेत कर्णधारही बरोबर आहे व शिक्षकही बरोबर आहेत. इथे फक्त त्यांची श्रेणी वेगवेगळी असल्या मुळे त्यांना ह्या भूमिका घ्याव्या लागतात. कर्णधार जर शिक्षका सारखा विचार करू लागला तर त्याच्या गटाला परवडणार नाही. प्रगती – म्हणजे खेळात त्या गटाची आगेकूच थांबेल व त्याचा गट हरेल. अजून एक उदाहरण पाहण्या सारखे आहे. ह्या भौतिक जगात, भूमितीची जी प्रमेय लागू आहेत, उदाहरणार्थ त्रिकोणाच्या तीन अशांची बेरीज १८० अंश भरते, चौरसाच्या अंशांची बेरीज ३६० असते व आपल्याला वाटत राहते की हे नेहमी असेच राहणार आहे. ही प्रमेय आपण विविध गणिते सोडवायला वापरतोही आणि ती गणिते बरोबरही येतात. हे किती बरोबर आहे ते बघू. ह्या रोजच्या वापरातल्या भूमितीला ‘युक्लीडीयन’ भूमिती असे म्हणतात. कोणाच्या स्वप्नात सुद्धा येणार नाही की हिच भूमितीची प्रमेय जेव्हा संपूर्ण विश्वाला (युनीव्हर्स) आपण लावतो तेव्हा ती चूक ठरतात. गणितं चुकतात, कारण जेव्हा संपूर्ण सापडलेल्या, व अवलोकन करता येण्या सारख्या विश्वाला आपण ही प्रमेय लावतो, तेव्हा आपण पृथ्वीच्या नेहमीच्या लांबी, रुंदीच्या मापदंडां पासून मुक्त होऊन त्याच्या कोट्यवधीच्या पटीने मोठ्या व गोलाकार अशा मापांशी खेळत असतो. पृथ्वीवर काढलेली लांबलचक सरळ रेघ, खूप वरून बघितले कर पृथ्वीचा गोलाकार घेतलेली दिसते. त्या वेळेला तेथे ‘युक्लीडीयन’ भूमिती कामास येत नाही. ‘युक्लीडीयन’ प्रमेयांनी ह्या विश्वाची गणितं चुकू लागतात. कारण येथे भूमितीच्या ‘युक्लीडीयन’ पेक्षाही वेगळ्या प्रमेयांची गरज पडते. ह्या प्रमेयां प्रमाणे त्रिकोणाच्या कोनांची बेरीज नेहमीच १८० अशांपेक्षा जास्त भरते. पण म्हणून आपण ‘युक्लीडीयन’ भूमिती बाद ठरवत नाही. कारण आपल्या श्रेणीला तीच बरोबर आहे व उपयोगी आहे. आपल्यासाठी जशी ‘युक्लीडीयन’ भूमिती आहे, तशीच राष्ट्रांची संकल्पना आपल्या प्रगती साठीच आहे. देश जिवंत करणाऱ्या, देशाचे राष्ट्रात रुपांतर करणाऱ्या धर्माची आपल्याला अत्यंत गरज आहे. तो धर्म ज्या विचारसरणीतून जन्मपावला त्या विचारसरणीचा आपल्याला अभिमान असला पाहिजे, कारण तीच विचारसरणी, आपल्या मनुष्य समूहाची मानसिक, भौतिक व आधिभौतिक प्रगती करणारी आहे.





आपल्या धर्माचे आपणच रक्षण कर्ते आहोत. धर्माचे रक्षण करणे म्हणजे तलवारी काढणे नव्हे. जर वेळोवेळी कालबाह्य झालेल्या संकल्पनांचा आढावा घेऊन आपल्या धर्माला लागलेली बुरशी काढून तो सोपा करून व लहान, तरुण व वयस्कर लोकांना आकलनीय करून आकर्षित करणारा असा आपला धर्म केला व आपल्या धर्मातल्या चांगल्या प्रथा ठेवून बाकीच्या काढून टाकल्या तर आपल्या धर्माचे आपोआपच रक्षण होईल, तो वाढीस लागेल, त्याला परत पूर्वीचा कस येईल व तो वृद्धींगत होईल. तरुण पिढीला आलेली आपल्या धर्माबाबतची ग्लानी अशीच दूर होईल.



उठा ह्याची जाणीव करून घ्या. ह्याची जाणीव दुसऱ्यांना करून द्या. आपला धर्म जागवा. हे काम आपले आहे. वेळ गेलेली नाहीये, उशीर झालेला नाहीये. आपली ताकद ओळखा. हनुमानाच्या प्रचंड शक्तीची जाणीव करून द्यायला जांबुवंत होता. आपल्यावर लागलेल्या शापाचा आपला उतारा आपणच शोधला पाहिजे. आपल्यातल्या सुप्त ताकदीची जाणीव करून घ्या. संघटित शक्तीचे राष्ट्रव्रत घ्या. आपणच आपले जांबुवंत बना. राष्ट्रव्रती व्हा. राष्ट्रव्रत घ्या.



आता जे राष्ट्रव्रताच्या संकल्पनेशी आकृष्ट झाले असतील त्यांना राष्ट्रव्रत कसे घेता येईल ते पाहू. ज्यांना राष्ट्रव्रत घेण्याचे महत्त्व पटले आहे त्यांनी सर्वात आधी दहा सूत्री राष्ट्रव्रत घेण्याचे मनात ठामपणे आणले पाहिजे. बरेचजण ह्या सूत्रामधील काही सूत्र किंवा कधी कधी सोयी प्रमाणे सगळी सूत्र अमलात आणत असतील. पण म्हणून तो मनुष्य काही राष्ट्रव्रती ठरत नाही. हे व्रत पूर्णतः स्वीकारले पाहिजे. हे ज्यांना पटले त्यांनी राष्ट्रव्रती बनायचा प्रयत्न करावा, कोणाला दाखवायचे म्हणून तेवढ्या पुरते नको. पैशासाठी नको, जोर जबरदस्तीने नको, सोयीसाठी नको. राष्ट्रव्रत हे स्वतःला मानसिक प्रगतीच्या वरच्या श्रेणीत नेण्यासाठी हाती घ्या. आपल्या राष्ट्राच्या कल्याणासाठी घ्या, हिंदू धर्माच्या पुनर्उत्थानासाठी घ्या. आपल्या मानसिक समाधानासाठी घ्या. राष्ट्रव्रत घेण्याने आपोआप आपल्या जीवनाला अर्थ येईल. ह्या विश्वातले आपले वास्तव्य अर्थपूर्ण करण्यासाठी घ्या. नाहीतर आयुष्याच्या शेवटी आपण का जगलो व काय मिळवले असे वाटायला नको. श्वास आहे तोवर जगलो, खाल्ले, प्याले, काही पैसे जोडले गाठीला व प्रजनन केले असे नको. एवढे उद्योग तर बाकीचे प्राणीपण करतात आणि ते सुद्धा आपल्या सारखे रडत कुढत नाही.



आपण ठरवा, पटले तर राष्ट्रव्रत घ्या व एकदा घेतल्यावर स्वतःला दिलेला शब्द पाळा. आपल्या सदसद्विवेक बुद्धीला चालना द्या.



राष्ट्रव्रत घेतल्याने काय होईल? – आपली चित्तशुद्धी होईल. मानसिक प्रगल्भतेच्या अजून वरच्या श्रेणीत आपण सहजच पदार्पण करू शकाल. आपण जर ही सूत्र तंतोतंत नेहमी पाळत गेलो तर आपोआपच आपले एक वेगळे अस्तित्व तयार होईल. बाकीचे लोक आपल्याला राष्ट्रवती म्हणून ओळखतील व आपला आदर्श पुढे ठेवून आपल्या सारखे जगण्याचा प्रयत्न करायला लागतील. आपल्या सगळ्यांच्या अशा राष्ट्रवती आचरणांनी सांघिक शक्तीचा प्रत्यय येईल जे आपल्या राष्ट्राला पोषक ठरेल.



राष्ट्रव्रत घेतले नाही तर काय होईल?

काही नाही, आपले आयुष्य तसेच पुढे रेटत राहील बिनार्थाचे, रडत कुढत. आपल्या धर्मावर, आपल्या राष्ट्रावर विश्वास असेल तर आपण राष्ट्रव्रती होऊ शकता. प्रसिद्ध ब्रिटिश सेनांनी फील्ड मार्शल फिलिप चेटवुडच्या शब्दात थोडा बदल करून राष्ट्रव्रती कसा असावा हे थोडक्यात सांगतो -



आपल्या राष्ट्राची सुरक्षा, राष्ट्राचा सन्मान आणि राष्ट्राचे कल्याण - नेहमीच सगळ्यात आधी.



तदनंतर आपल्या परिवाराचा सन्मान, परिवाराचे कल्याण आणि परिवाराची सोय.



स्वतःची सोय, स्वतःचे कल्याण व स्वतःची सुरक्षा - शेवटी, नेहमीच शेवटी.



आपले राष्ट्र बलाढ्य, समृद्ध व कल्याणकारी करायचे असेल व ते तसे टिकवून ठेवायचे असेल तर पिढ्या पिढ्यांचा प्रयत्न सतत झाला पाहिजे. हे राष्ट्रबांधणीचे कार्य हा आपला राष्ट्रधर्म झाला पाहिजे, आपला स्वभाव झाला पाहिजे. राष्ट्रव्रताची अशी आपली संस्कृती निर्माण झाली पाहिजे. राष्ट्रव्रत हे प्रत्येकाने त्याच्या कुवतीला धरून घेतलेले पवित्र व्रत आहे. रामाच्या खारुटली प्रमाणे राष्ट्रबांधणी रुपी सेतू मध्ये घातलेले खारुटलीचे छोटे दगड आहेत. हे राष्ट्रव्रत आपल्या परिवाराच्या कल्याणाच्या आड न येणारे असे आहे. स्वतःवर ओझे न पाडणारे आहे, आपली गैरसोय न करणारे आहे आणि तरी सुद्धा राष्ट्रासाठी लागणारे सुकार्य आपल्या हातून घडवून आणणारे आहे.



तर मग केव्हा घेताय आपण राष्ट्रव्रत?