Sunday, January 23, 2011

२० वर्ष - काश्मिरी विस्थापीत

(१९८९ मध्ये काश्मीरच्या हिंदूंना अतिरेकी संघटनांनी पत्रके वाटून - खोऱ्यातून बाहेर जा - अशी ताकीद दिली व त्या वेळी हजारोंच्या संख्येने काश्मिरी हिंदू खोऱ्यातले पिढ्यांपिढ्यांचे त्यांचे घरदार सोडून जम्मू व दिल्ली ला निघून गेले. हा एक प्रकारचा होलोकास्टच त्यांनी अनुभवला. त्यामुळे खोऱ्यात आता हिंदू नगण्य राहिले आहेत व हिंदू मत नगण्य झाले आहे. पुढे कधी मताधिकार राबवून (प्लेबिसाईट) काश्मीर प्रश्न सोडवायचा असा निर्णय कार्यान्वित झाला तर फुटिरतावाद्यांना त्यांचा डाव जिंकायला साहजिकच सोपे जाईल. कलम ३७० लागू असल्या कारणाने जम्मू काश्मीर सोडून बाकी लोकं तिथे वस्ती करू शकत नाहीत, पण हिंदूंना मात्र तेथून घालवून देऊन पाकिस्तानचा इरादा सफल होत आहे. १९८८ मध्ये पाकिस्तान च्या राष्ट्राध्यक्ष ह्यांचा ऑपरेशन टोपुक कार्यान्वित झाल्यावर १९८९ – ९० मध्ये ज्या हजारो हिंदूंना मारून, धाक दाखवून पद्धतशीर पणे खोऱ्यातून हुसकवून लावले त्याला गेल्या आठवड्यात २० वर्षे झाली, नव्या पिढीला कदाचित ह्या इतिहासाचे विस्मरण झाले असेल किंवा कदाचित हा इतिहास माहीत पण नसेल. त्या होलोकास्ट चे व त्या काळ्या दिवसांचे स्मरण करून विस्थापित काश्मिरी हिंदूंनी गेल्या आठवड्यात एक मोर्चा काढला होता.

जर नवीन पिढीला होऊन गेलेला इतिहास माहीत नसेल तर पूर्वी राष्ट्राकडून झालेल्या चुका पुन्हा होण्याची भीती निर्माण होते. बरोबर इतिहास माहीत नसेल तर नवी पिढी आहे त्या परिस्तिथीचा विचार वेगळ्याच दृष्टिकोनातून घेऊ शकते. काही वर्षाने मग इतिहास माहीत नसल्याने किंवा त्याचे विस्मरण झाल्याने नव्या नव्या पिढी कडून ही चूक होण्याची देखिल शक्यता आहे आणि मग असे उद्गार निघायला लागतील - की, एवी तेवी हिंदू कोणी तेथे राहत नाहीत, जे राहतात त्यांना काश्मीर भारतात नको आहे आपण का धरून बसायचे काश्मीरला, सोडून द्या ना. भारत विरोधी अरुंधती रॉय ह्यांच्या सारख्या प्रसिद्धीची हाव असणारे स्वयंघोषित नेते ह्याच गोष्टीचा फायदा आता सुद्धा घेताना दिसतात. येणाऱ्या पिढ्या काश्मीर प्रश्नावर सतत उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत राहणार, पण गेल्या २० वर्षांचा इतिहास कोणच्याही शैक्षणिक संस्थांमधून शिकवला जात नाही व ही इतिहासाची जी रिक्त स्थाने आहेत ती भरल्या शिवाय काश्मीर प्रश्नाचे गांभीर्य, सोडवण्याची प्रबळ इच्छा व प्रश्न सोडवण्याचा मार्ग सुकर होणार नाही.

ह्याच पार्श्वभूमीवर ही कथा लिहिली आहे. ह्या कथेत पात्रांची नावे जरी बदलली असली तरी प्रसंग खरे आहेत. परिस्थितीचे वर्णन कथेच्या रूपाने केले असले तरी ज्यांना जाणून घ्यायची इच्छा आहे त्यांनी ऑपरेशन टोपुक व त्यानंतर चे काश्मिरी हिंदूंचे विस्थापन ह्या विषयावर लेख, बातम्या, इतिहास ह्या वर अधिक संशोधन करावे. )







२० वर्षापूर्विची गोष्ट. १९८९ चा काळ. आम्ही इंडियन मिलिटरी अकादमी, डेहराडून (आय एम ए) मध्ये होतो. एक वर्षाच्या कालावधीचा सैन्यात अधिकारी बनण्याचा कोर्स. आम्हाला जंटलमॅन कॅडेट (जीसी) असे संबोधले जायचे. आय एम ए चे सकाळी ४ पासून रात्री १० पर्यंत शिस्तबद्ध भरगच्च कार्यक्रम व त्यात काही चूक झाली तर मिळणाऱ्या रोजच्या शिक्षा ह्या मुळे दिवस व महिने कसे संपायचे हे कळायचेच नाही. आय एम ए चे कठोर नियम व ते पाळले नाही तर मिळणाऱ्या कठोर शिक्षा. बऱ्याच नियमांमध्ये एक अजूनच कठीण असा नियम म्हणजे ह्या कोर्सच्या दरम्यान सुट्टी मिळत नाही. अगदीच जर नाईलाज असेल तर चार दिवसाची सुट्टी मिळायची. आय एम ए च्या शब्दकोशात नाईलाज ह्या शब्दाची परिभाषा म्हणजे - जीसी च्या दुर्दैवाने त्याच्या पालकांपैकी कोणाचा मृत्यू झाला तर चार दिवसाची सुट्टी मिळायची. एरव्ही सुट्टी मागितली तर आय एम ए मधल्या शिक्षकगणां कडून त्वरित उत्तर मिळायचे – तुझ्या स्वतःच्या अंत्यसंस्कारासाठी सुद्धा तुला सुट्टी मिळणार नाही मग उगाच कशाला मागतोस. नाही म्हणायला जर कोणी जास्त सुट्टी घेतली तर कोर्स मधून नापास व्हावे लागायचे. त्याला रेलीगेशन म्हटले जायचे. रेलीगेशन म्हणजे आणखीन सहा महिने आय एम ए चे ते नियम व त्या शिक्षा झेला. जर दोनदा रेलीगेशन झाले तर अकादमी मधून काढून टाकले जायचे व तेथेच जीसीची अधिकारी व्हावयाची स्वप्न भंग पावायची. त्यामुळे आम्ही कोणी सुट्टी घेण्याचा विचारही डोक्यात आणायचो नाही.


(क्रमशः)


2 comments:

  1. लवकर लिहा... काश्मीर हा माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे... खूप उत्सुकता आहे...

    ReplyDelete
  2. बरोबर लिहिले आहेस.. आजच्या मुलांना इतिहास चुकीचा माहित झाला तर कालांतराने ही पिढी त्यालाच खरा इतिहास मानायला लागतील.

    ReplyDelete