Friday, January 28, 2011

२० वर्ष - विस्थापीत काश्मिरी हिंदू – भाग २



(१९८९ मध्ये काश्मीरच्या हिंदूंना अतिरेकी संघटनांनी पत्रके वाटून - खोऱ्यातून बाहेर जा - अशी ताकीद दिली व त्या वेळी हजारोंच्या संख्येने काश्मिरी हिंदू खोऱ्यातले पिढ्यांपिढ्यांचे त्यांचे घरदार सोडून जम्मू व दिल्ली ला निघून गेले. हा एक प्रकारचा होलोकास्टच त्यांनी अनुभवला................ वाचा २० वर्ष - विस्थापित काश्मिरी हिंदू – भाग १)

आमच्या बॅच मध्ये सुनील खेर नावाचा काश्मिरी जीसी होता. आमच्या सारखाच तो ही एक कॅडेट. अधिकारी होण्याच्या प्रतीक्षेत दिवस मोजत. त्याला वडील नव्हते. तो आणि त्याची आई, बारामुल्ला जवळच्या सोयीबुक ह्या गावात राहायचे. त्यांची छोटी हवेली होती तिथे. त्याचे वडील काश्मीर खोऱ्यात एका दैनिकाचे संपादक होते. एक दिवस ते त्यांच्या कचेरीतून परत आलेच नाहीत. आज पर्यंत त्यांचा पत्ता लागला नाही. हल्ली त्याच्या कुटुंबाने वडील परत भेटण्याची आशा सोडून दिली आहे.

तो आम्हाला काश्मीर बद्दलच्या गोष्टी सांगायचा. तो पर्यंत मला लोकसत्ता, म टा ह्या नियतकालिकामधून व वेगवेगळ्या मासिकातून वाचलेला तपशील एवढीच काय ती काश्मीर बद्दलची माहिती होती. आय एम ए च्या मुलाखती साठी केलेली तयारी, ती पण अशी तशीच. थोडक्यात काश्मीर प्रश्ना विषयी एकदम तोकडी कल्पना होती. मला इंडियन एक्सप्रेस नियतकालीकेत, १९८६- ८७ मध्ये छापून आलेला काश्मीर विषयीचा लेख वाचल्याचे आठवत होते. त्यात निवृत्त ब्रिगेडियर एन बि ग्रॅन्ट ह्यांनी लिहिले होते की १९४८, १९६५ आणि १९७१ मध्ये भारत पाक युद्धांमधून झालेल्या पाकिस्तानच्या जबरदस्त पराजयाचा धक्का पाकिस्तानाला सतत सतावत असतो. पाकिस्तानाला कळून चुकले आहे की, भारता बरोबर सरळ युद्ध केल्याने त्या देशाची वित्त व मनुष्य हानी फार होते आहे. ह्या सर्व बाबींचा विचार करून पाकिस्तानच्या इंटर सर्विसेस इंटलीजन्स (आय एस आय) ने एक नवी योजना आखली आहे. त्या योजने नुसार सरळ युद्धा पेक्षा अतिरेकी संघटना उभारून भारत आतून पोखरून टाकायचा. मग अशा पोखरून अशक्त भारताला हरवायला वेळ लागणार नाही. योजना चार पदरी कार्यक्रमावर आधारित अशी राबवायची. पाहिला पदर – काही काश्मिरी युवकांना भडकवून पाक व्याप्त काश्मीर मध्ये नेऊन प्रशिक्षण देऊन अतिरेकी बनवणे. काश्मीर मधल्या भारत पाक युद्ध विराम सीमे (लाइन ऑफ कंट्रोल) मधून अशा अतिरेक्यांना खोऱ्यात धाडायचे. एकदा अतिरेकी आत घुसले की मग त्यांचे थैमान चालू द्यायचे. अशा अतिरेक्यांना एके ४७, हॅन्ड ग्रेनेड्स व तत्सम साधन सामुग्री पुरवायची. दुसरा पदर – जम्मू काश्मीर राज्य प्रशासन अतिरेकी कारवायांनी व अतिरेकी फतव्यांनी खिळखिळे करायचे. तिसरा पदर – काश्मिरी हिंदूंना पहिल्यांदा खोऱ्यातून व नंतर उधमपूर जम्मू मधून हुसकवून लावून काश्मिरी हिंदूंची संख्या नगण्य करायची. त्याच युक्तीचे पुनरावर्तन कारगिल व त्याच्या वरती लडाख भागात मग करायचे. शेवटचा चौथा पदर – काश्मिरी मुस्लिम जनतेला भारता विरुद्धं जेहाद साठी उत्तेजित करायचे.

ह्या पार्श्वभूमीवर जेव्हा जीसी सुनील खेरच्या रूपाने प्रत्यक्ष काश्मिरी हिंदू भेटला तेव्हा काश्मीर संबंधी बऱ्याच गोष्टी कळायला लागल्या. आम्ही वेळ मिळेल तेव्हा सुनील खेर व अजून एक काश्मीरचा राहणारा जीसी हिरालाल गाडरू ह्या दोघां कडून काश्मीरच्या स्थिती बद्दल चौकशी करायचो. हिंदूंची होणारी गळचेपी व ससेहोलपट खरेच होतेका, हे आम्हाला जाणून घ्यायची प्रबळ इच्छा असायची. त्या दोघांकडून आम्हाला कळले की काश्मिरी हिंदूंची घरे रोज कशी जाळली जात आहेत व धमक्या कशा मिळत आहेत ते. आम्ही जीसी सुनीलला नेहमी सांगायचो की आईला घेऊन दुसरीकडे राहा म्हणून आणि त्यालाही तसे राहायचे होते पण दुसरीकडे राहायला लागणारे पैसे नव्हते व त्याची आई तयार नव्हती काश्मीर सोडायला. काश्मीर सोडून दुसरीकडे राहायचे म्हणजे काश्मीर मधले घर विकावे लागणार होते. दुसरीकडे म्हणजे कोठे स्थायिक व्हायचे हा प्रश्न होताच त्याला सतावणारा. आता पर्यन्त खोरे सोडून कोठेही गाडरू कुटुंब राहिले नव्हते. त्यातून वडील सापडत नाहीत ह्याची सतत मनाला खंत लागून राहिलेली. सैन्यात जाऊन अधिकारी होण्याचे लहानपणापासूनचे सुनीलचे स्वप्न होते. सैन्यात राहायला सरकारी घर मिळते हे कळल्यावर तर सुनीलला त्याच्या अडचणीचे उत्तरच सापडल्या सारखे झाले होते. म्हणूनच जरी आई एकटी राहणार असली तरी तो तिच्याशी भांडून आय एम ए मध्ये दाखल झाला होता. आय एम ए चे शिक्षण पूर्णं करूनच आता घर बदलायचे असे त्याने ठरवले होते.

काश्मीर मध्ये हिंदूंची घरे विकली जात नाहीत तर ती बळजबरीने घेतली जातात हे त्यावेळेला मला पहिल्यांदा समजले. जीसी हिरालाल गाडरू (हा जीसी, वर्ष भर आम्हाला त्याच्या आडनावाचा उच्चार बरोबर कसा करायचा हेच शिकवीत राहिला व आम्हीही मुद्दामून त्याला गदरू असे बोलवत राहायचो. हा खेळच झाला जणू काही. शेवटी त्याचे नाव जीसी हिरालाल गाडरू ऐवजी - जीसी हिरालाल गदरू नहीं गाडरू - असे लांबलचक पडले. वीस वर्षांनी जेव्हा त्याची भेट पुन्हा झाली तेव्हा मी त्याला ह्याच नावाने संबोधले होते. ) ह्या गाडरू च्या वडलांची लाकडाची वखार होती ती जाळली होती अतिरेक्यांनी.

अशा परिस्थितीत भर म्हणजे लहानपणापासून काश्मिरी जनतेने टेलिव्हिजन वर फक्त पाकिस्तानी कार्यक्रमच बघितले होते कारण तेवढेच दिसायचे. आपले दूरदर्शनचे प्रक्षेपण तेथ पर्यंत पोहचायचे नाही. लहानपणापासून त्यांना रेडियोवर फक्त उर्दू ऐकायला मिळालेले. त्यात सुद्धा पाकिस्तानी कार्यक्रम. काश्मीर हून जम्मू भागाला जोडणारा असा एकच रस्ता – जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग - एन एच वन. थंडीत बर्फवृष्टीमुळे जवाहर बोगदा कित्येक वेळेला बंद व्हायचा. त्यामुळे एन एच वन बंद व आवक जावक बंद. रेल्वेचा प्रवास तर अजून सुद्धा नाही श्रीनगरला. ह्याच्या उलट पाक व्याप्त काश्मीर कडून मात्र दळणवळण नेहमी चालू असायचे. काश्मीर खोऱ्यातल्या लोकांचे नातेवाईक व लग्न संबंध असायचे पाक व्याप्त काश्मिरात.

ह्या सगळ्याचा परिणाम काश्मिरी हिंदू मानसिकतेवर होत होता व अजूनही होत आहे. भोवतालची लोकवस्ती आपल्या बरोबर नसेल तर केवढी पंचाईत होते सगळ्या बाबतीत. आपल्याला सगळ्यांनी वाळीत टाकल्या सारखे वाटायला लागते. काश्मिरात त्या वेळेला अशी परिस्थिती होती की साधे घरा बाहेर सुद्धा पडता यायचे नाही. दिसता क्षणी गोळी घालण्याचे आदेश सतत असायचे. दोन दोन महीने कर्फ्यू चालायचा. शाळातर नेहमीच बंद असायच्या. बऱ्याच शाळा हळूहळू सशस्त्रबलांनी ताब्यात घ्यायला सुरवात केली होती. त्यांना तिथे छावण्या लावायच्या होत्या. सतत हिंदूंची घरे जाळणे, त्यांना पळवून नेणे, त्यांना धाक दाखवून घरे खाली करायला लावणे, त्यांना नोकऱ्या न देणे, मुली व महिलांवर अत्याचार होणे हे सगळे प्रकार हळूहळू १९८९ मध्ये वाढायला लागले होते. त्या मुळे जरी ती लोकं काश्मिरी हिंदू असली तरी बाकीच्या हिंदूंपेक्षा खूपच दूरचे झालेले व दुरावलेले असे होते. मानवी हक्क समिती (ह्युमन राईटस कमिशन) त्या वेळेला मूग गिळून बसले होते का काय कोण जाणे.

आम्हाला कोर्स मध्ये आठ महीने झाले होते. आम्ही ८ दिवसांच्या भदराज कॅम्पला गेलो होतो. हा कॅम्प डोंगराळ प्रदेशात युद्ध कसे करायचे ह्या शिक्षणाचा भाग म्हणून असतो (माउंटन वॉरफेअर ट्रेनिंग). संपूर्ण कोर्स ४ बटालियनस मध्ये विभागलेला असायचा. ह्या ४ बटालीयन् स नेतृत्व आलटून पालटून कोण्या जीसी वर सोपोवले जायचे. भदराज ह्या कॅम्प साठी त्या त्या तुकडीचा तेवढ्या वेळे पुरता नेमून दिलेला जीसी मग सेनापती असायचा. माउंटन वॉरफेअर संबंधी आय एम ए मध्ये जे काही शिकवले ते उपयोगात आणून भदराज वर धावा बोलायचा.

डेहराडूनहून मसुरी चे डोंगर दिसतात. त्या डोंगरांच्या रांगेतला भदराज नावाचे सगळ्यात डावीकडचे शिखर. त्या शिखरा वरती एक मंदिर आहे. भदराज साधारण ५५०० फुटा उंचीचा. त्या पर्वतराशीला लोअर हिमालयन रेंजेस असे म्हणतात. ते शिखर सर करून परत आय एम ए मध्ये यायचे. चारही बटालीयन् स मध्ये चुरस. जी बटालीयन भदराज सर करून पहिल्यांदा आय एम ए त पोहोचेल ती जिंकली. त्या बटालीयनला भदराज चषक मिळायचा. भदराज चढायला रात्री सुरवात करायची. पूर्णं युद्ध पोषाखात – जंगलात घालतात ते कॅमोफ्लॉज कपडे, तोंड ब्ल्यांको ने काळे केलेले, पाठीवर मोठा पॅक त्यात अत्यावश्यक लागणारे सामान. भूक शमवण्यासाठी शक्करपाऱ्याच्या वड्या, टेंट बांधण्यासाठी आवश्यक असे ताडपत्रीचे बिवोक, एक दुर्बीण व चुंबकीय कंपास. ह्या सगळ्याचे वजन साधारण १५ किलो भरायचे. कमरेच्या पट्टयाला लागलेली अर्ध्या लीटरची पाण्याची बाटली. तेवढेच काय ते पाणी (माहीत नसलेल्या ठिकाणाहून पाणी पिण्यास सक्त मनाई कारण शत्रूच्या इलाक्यात शत्रूने इलाका सोडून पळताना विहिरींमध्ये विष घालून ठेवले असेल तर जिंकलेला इलाका पाण्याच्या लोभापायी घालवावा लागेल. आपली माणसे मरतील ते वेगळेच). हातात गवत कापण्यासाठी दाह किंवा खुरपे व खांद्यावर साडे पाच किलो वजनाची आता पर्यंत अंगाचाच भाग झालेली अशी रायफल. पहाटे पर्यंत भदराज सर करून आपला तिरंगा फडकवून आय एम ए कडे परत यायला लागायचे. परतीचा रस्ता दिलेल्या नकाशा वरून थोधत. असा तो भदराजचा कॅंप. साधारण ४० किलोमीटर चा तो शेवटचा मार्च म्हणजे चिकाटी, ताकद, शिस्त, धाडस, नेतृत्व व तुकडीतले सामंजस्य ह्या वर अवलंबून असायचे. परतताना आमच्या माणेकशॉ तुकडीचे नेतृत्व जीसी रोहित वर्मा ह्यावर सोपोवले गेले होते. आम्ही नकाशे पाहत आमच्या गटातल्या साथीदारांसह आय एम एत परतलो. ४० किलोमीटर चालून आल्याने सगळे जीसी दमले होते. पण साथिदारांबरोबर चालताना एवढे दमलो असे वाटत नाही. कदाचित एकट्याला एवढे अंतर जड गेले असते. पंढरपूरच्या वारीचे पण तसेच असेल. ग्यानबा तुकारामाचा गजर व आजूबाजूला वारकऱ्यांचा मेळा ह्या मुळे तेच अंतर समजून येत नाही, सहनिय होते व उलट आनंद मिळतो.

पोहोचल्या बरोबर शस्त्रागारात आपआपल्या रायफली, दुर्बिणी व चुंबकीय कंपास जमा झाल्यावर आमचे स्वागत गरम गरम चहा व बिस्किटांनी झाले. हा प्रत्येक कॅंप चा आमचा सगळ्यात आवडणारा भाग असे. आम्ही आतुरतेने ह्या मेजवानीची वाट बघायचो. आमचे शिक्षक कॅप्टन गिल - आय एम ए मध्ये अशा शिक्षकाला डायरेक्टींग स्टाफ (डी एस) असे संबोधले जाते. आमच्या डी एस ह्यांनी त्या दिवशीचे बाकीचे आय एम ए चे कार्यक्रम आमच्या साठी रद्द झाल्याची घोषणा करताच सगळ्या जीसी कडून उत्फुर्त पणे माणेकशॉ बटालीयन की जय निघाले. आमचे अर्धे दमणे तेथेच विरून गेले. आता प्रत्येक जण त्यांना आलेल्या पत्रांचे वाचन करण्यात गुंग झाला. १९८९ मध्ये मोबाईल काय असते ते कोणालाच माहीत नव्हते व दूरध्वनी सेवा नुकतीच सुरू झाली असल्या कारणाने ती फक्त आय एम एच्या शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्येच असायची अन तेथे जायचे म्हणजे काही सोपे नव्हते. त्या मुळे आम्ही व आमचे आप्तेष्ट ह्या मध्ये असणारा पत्र हा एकच दुवा होता.

मी माझ्या आईचे पत्र संपवतच होतो तेव्हा माझ्या कडे जीसी सुनील खेर व जीसी हिरालाल गाडरू आले. सुनीलचा रडवेला चेहरा पाहून मी काय झाले म्हणून विचारले. मला म्हणाला – आईला अतिरेक्याचा धमक्या आल्या आहेत व त्यांनी महिना अखेर पर्यंत घर सोडायला सांगितले आहे. त्याच्या तोंडाचे पाणीच पळाले. एक तर घर सोडून ती अशी एकटी जाणार कोठे. खोऱ्या बाहेर नवे घर घ्यायला पैसे नाहीत. असलेले घर विकता येत नाही अशी काश्मीर खोऱ्यात परिस्थिती आणि हे सगळे करायला सुनीलला सुट्टी कोण देणार व कशी मागणार सुट्टी. आमचा डि एस, कॅप्टन गिल असा कर्दन काळ होता की त्याच्या कडे जाणे म्हणजे शिक्षा घेऊनच येणे असे होते. आम्ही काही बोलायच्या आधीच, तो आमच्या चुका काढायचा. आमच्या पोशाखात जरा जरी खोट सापडली तर तेथेच आमची रोलिंग सुरू. आता हे रोलिंग काय तंत्र आहे ते समजावून सांगतो. आपण कशा लहानपणी गाद्या टाकल्या वर कोलांट्या उड्या मारायचो. अगदी तशाच कोलांट्या उड्या मारणे म्हणजे रोलिंग. फक्त हे रोलिंग गाद्यांवर नाही करायचे. आता हे रोलिंग कधीही कोठेही व कोणच्याही कपड्यांमध्ये होऊ शकते. आम्ही रोलिंग अंडरवेअर (फक्त) पासून कोट टाय मध्येही केलेले आहे. रस्त्यावर, खेळाच्या मैदानावर, उथळ वाहणाऱ्या टॉन्स नदीच्या पात्रात, ड्रिल स्क्वेअर मध्ये भर दुपारी असे वाटेल तिथे केलेले आहे. त्या मुळे आम्ही शक्यतोवर आमच्या डि एस कडे जायचे टाळायचो. पण आजचा दिवस वेगळा होता. एक तर आमच्यावर कॅप्टन गिल खूश होता कारण माणेकशॉ बटालीयन भदराज मध्ये सगळ्या बटालीयन् स मधून पहिली आली होती व म्हणूनच त्या दिवशी सुट्टी मिळाली होती. बाकीच्या बटालीयन् स आल्या आल्या कपडे बदलून पुढच्या कार्यक्रमाला लागल्या होत्या. धीर धरून आम्ही कॅप्टन गिल कडे गेलो. घाबरत घाबरत सुनीलने सगळे सांगितले. कॅप्टन गिलला सुनीलची घरची सगळी परिस्थिती माहीत होती. त्या मुळे त्याने सगळे नीट ऐकून घेतले. आज आमच्या पोषाखाची खिल्ली उडवली गेली नाही व शिक्षेचे नावही निघाले नाही. सगळे ऐकून घेतल्यावर तो म्हणाला – मी समजू शकतो तुला सुट्टी हवी आहे. तू सुट्टी चा अर्ज लिही मी शिफारीश करतो बाकी पुढचे कंपनी कमांडर व बटालीयन कमांडर वर अवलंबून आहे. मी पण तुझ्या सुट्टी बद्दल त्यांच्याशी बोलेन. सुनीलने वेळ जायला नको म्हणून डि एस कडे जाण्या अगोदरच लिहून ठेवलेला अर्ज पुढे केला. कॅप्टन गिलने लागलीच त्याची शिफारिश लिहून तो कंपनी कमांडर कडे स्वतः गेला. सुनीलला रात्री कंपनी कमांडर कडून निरोप आला की त्याला बटालीयन कमांडरने मुलाखती करता सकाळी बोलावले आहे. आमचा डि एस कॅप्टन गिल ह्यांच्याशी रोजच्या रोज संबंध यायचा. पण कंपनी कमांडर मेजर शेखावत कडे जाण्याचा किंवा त्याला भेटण्याचा प्रसंग गेल्या आठ महीन्यात क्वचितच आला होता. बटालियन कमांडर चे डर तर मग विचारुच नका. त्याचे ऑफिस जेथे असायचे तो रस्ता आम्हा जीसीज ना रहदारी साठी बंद होता. त्या रस्त्या वरून आम्हाला जाता यायचे नाही. आम्ही बटालीयन कमांडरला फक्त खेळाच्या मैदानावर किंवा कॅंपस च्या वेळेला पाहीले होते. कर्नल कटोच नाव होते त्यांचे. ज्या जीसीच्या हातून त्यांच्या गेल्या जन्मात घोर पापे घडली असावीत तेच जीसी बटालीयन कमांडरच्या ऑफिस मध्ये जायचे असे काहीसे चित्र होते. ज्यांचे रेलीगेशन होणार असायचे त्यांनाच फक्त तो एकदा भेटायचा हे सांगायला की तु रेलिगेट झालास म्हणून. हे सांगायला फारसा वेळ लागत नाही. त्यामुळे कोणताही जीसी त्याच्या ऑफिस मध्ये दोन मिनटा पेक्षा जास्त वेळ कधीही उभा राहिला नव्हता. त्या मुळे जीसी सुनील खुप घाबरला होता. जेव्हा दुपारच्या जेवणाच्या वेळेला भेटला तेव्हा त्याचा चेहेरा अजूनच रडवेला झाला होता. तो म्हणाला बटालीयन कमांडर ने सुट्टी चा अर्ज रद्द केला. म्हणाला हे काही कारण होत नाही सुट्टी मागायला. आम्हाला राग आला व खुप वाईट वाटले. जीसी सुनील खेर तर वेडापीसा झाला होता. खूप शिव्या घातल्या बटालियन कमांडरला. त्याला त्याच्या आई व्यतीरिक्त कोणीच दिसत नव्हते.

त्या संध्याकाळी कॅप्टन गिल आमच्या बरॅक मध्ये सुनीलला येऊन भेटला. सुनील म्हणाला त्याला पण खूप वाईट वाटत होते अर्ज रद्द झाल्या बद्दल कारण त्याने सूनीलच्या सुट्टी साठी कंपनी कमाडरला स्वतः भेटून जीसी सुनील वर बेतलेल्या संकटा बद्दलची कल्पना दिली होती.

कॅप्टन गिल ला संध्याकाळी भेटल्या पासून जीसी सुनील खेर मध्ये आम्हाला अचानक एक बदल जाणवला. तो जरी दुःखी होता तरी त्याचा रडवेला चेहरा जाऊन निश्चयी बनला होता. त्याचा चेहरा निग्रही वाटत होता जसा काही त्याला त्याच्या वर बेतलेल्या संकटावर तोडगा सापडला आहे असा.

(क्रमशः)

(राजाराम सिताराम एक, राजाराम सिताराम दो – ही आय एम ए वर आधारीत कथा लवकरच प्रसिद्ध करत आहे)




Sunday, January 23, 2011

२० वर्ष - काश्मिरी विस्थापीत

(१९८९ मध्ये काश्मीरच्या हिंदूंना अतिरेकी संघटनांनी पत्रके वाटून - खोऱ्यातून बाहेर जा - अशी ताकीद दिली व त्या वेळी हजारोंच्या संख्येने काश्मिरी हिंदू खोऱ्यातले पिढ्यांपिढ्यांचे त्यांचे घरदार सोडून जम्मू व दिल्ली ला निघून गेले. हा एक प्रकारचा होलोकास्टच त्यांनी अनुभवला. त्यामुळे खोऱ्यात आता हिंदू नगण्य राहिले आहेत व हिंदू मत नगण्य झाले आहे. पुढे कधी मताधिकार राबवून (प्लेबिसाईट) काश्मीर प्रश्न सोडवायचा असा निर्णय कार्यान्वित झाला तर फुटिरतावाद्यांना त्यांचा डाव जिंकायला साहजिकच सोपे जाईल. कलम ३७० लागू असल्या कारणाने जम्मू काश्मीर सोडून बाकी लोकं तिथे वस्ती करू शकत नाहीत, पण हिंदूंना मात्र तेथून घालवून देऊन पाकिस्तानचा इरादा सफल होत आहे. १९८८ मध्ये पाकिस्तान च्या राष्ट्राध्यक्ष ह्यांचा ऑपरेशन टोपुक कार्यान्वित झाल्यावर १९८९ – ९० मध्ये ज्या हजारो हिंदूंना मारून, धाक दाखवून पद्धतशीर पणे खोऱ्यातून हुसकवून लावले त्याला गेल्या आठवड्यात २० वर्षे झाली, नव्या पिढीला कदाचित ह्या इतिहासाचे विस्मरण झाले असेल किंवा कदाचित हा इतिहास माहीत पण नसेल. त्या होलोकास्ट चे व त्या काळ्या दिवसांचे स्मरण करून विस्थापित काश्मिरी हिंदूंनी गेल्या आठवड्यात एक मोर्चा काढला होता.

जर नवीन पिढीला होऊन गेलेला इतिहास माहीत नसेल तर पूर्वी राष्ट्राकडून झालेल्या चुका पुन्हा होण्याची भीती निर्माण होते. बरोबर इतिहास माहीत नसेल तर नवी पिढी आहे त्या परिस्तिथीचा विचार वेगळ्याच दृष्टिकोनातून घेऊ शकते. काही वर्षाने मग इतिहास माहीत नसल्याने किंवा त्याचे विस्मरण झाल्याने नव्या नव्या पिढी कडून ही चूक होण्याची देखिल शक्यता आहे आणि मग असे उद्गार निघायला लागतील - की, एवी तेवी हिंदू कोणी तेथे राहत नाहीत, जे राहतात त्यांना काश्मीर भारतात नको आहे आपण का धरून बसायचे काश्मीरला, सोडून द्या ना. भारत विरोधी अरुंधती रॉय ह्यांच्या सारख्या प्रसिद्धीची हाव असणारे स्वयंघोषित नेते ह्याच गोष्टीचा फायदा आता सुद्धा घेताना दिसतात. येणाऱ्या पिढ्या काश्मीर प्रश्नावर सतत उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत राहणार, पण गेल्या २० वर्षांचा इतिहास कोणच्याही शैक्षणिक संस्थांमधून शिकवला जात नाही व ही इतिहासाची जी रिक्त स्थाने आहेत ती भरल्या शिवाय काश्मीर प्रश्नाचे गांभीर्य, सोडवण्याची प्रबळ इच्छा व प्रश्न सोडवण्याचा मार्ग सुकर होणार नाही.

ह्याच पार्श्वभूमीवर ही कथा लिहिली आहे. ह्या कथेत पात्रांची नावे जरी बदलली असली तरी प्रसंग खरे आहेत. परिस्थितीचे वर्णन कथेच्या रूपाने केले असले तरी ज्यांना जाणून घ्यायची इच्छा आहे त्यांनी ऑपरेशन टोपुक व त्यानंतर चे काश्मिरी हिंदूंचे विस्थापन ह्या विषयावर लेख, बातम्या, इतिहास ह्या वर अधिक संशोधन करावे. )







२० वर्षापूर्विची गोष्ट. १९८९ चा काळ. आम्ही इंडियन मिलिटरी अकादमी, डेहराडून (आय एम ए) मध्ये होतो. एक वर्षाच्या कालावधीचा सैन्यात अधिकारी बनण्याचा कोर्स. आम्हाला जंटलमॅन कॅडेट (जीसी) असे संबोधले जायचे. आय एम ए चे सकाळी ४ पासून रात्री १० पर्यंत शिस्तबद्ध भरगच्च कार्यक्रम व त्यात काही चूक झाली तर मिळणाऱ्या रोजच्या शिक्षा ह्या मुळे दिवस व महिने कसे संपायचे हे कळायचेच नाही. आय एम ए चे कठोर नियम व ते पाळले नाही तर मिळणाऱ्या कठोर शिक्षा. बऱ्याच नियमांमध्ये एक अजूनच कठीण असा नियम म्हणजे ह्या कोर्सच्या दरम्यान सुट्टी मिळत नाही. अगदीच जर नाईलाज असेल तर चार दिवसाची सुट्टी मिळायची. आय एम ए च्या शब्दकोशात नाईलाज ह्या शब्दाची परिभाषा म्हणजे - जीसी च्या दुर्दैवाने त्याच्या पालकांपैकी कोणाचा मृत्यू झाला तर चार दिवसाची सुट्टी मिळायची. एरव्ही सुट्टी मागितली तर आय एम ए मधल्या शिक्षकगणां कडून त्वरित उत्तर मिळायचे – तुझ्या स्वतःच्या अंत्यसंस्कारासाठी सुद्धा तुला सुट्टी मिळणार नाही मग उगाच कशाला मागतोस. नाही म्हणायला जर कोणी जास्त सुट्टी घेतली तर कोर्स मधून नापास व्हावे लागायचे. त्याला रेलीगेशन म्हटले जायचे. रेलीगेशन म्हणजे आणखीन सहा महिने आय एम ए चे ते नियम व त्या शिक्षा झेला. जर दोनदा रेलीगेशन झाले तर अकादमी मधून काढून टाकले जायचे व तेथेच जीसीची अधिकारी व्हावयाची स्वप्न भंग पावायची. त्यामुळे आम्ही कोणी सुट्टी घेण्याचा विचारही डोक्यात आणायचो नाही.


(क्रमशः)


Thursday, January 20, 2011

हसन अली

हसन अली ह्या इसमा कडे ३७००० कोटी रुपयाची करबाकी आहे असे एक दोन वर्षापूर्वी वाचनात आले होते.

त्या नंतर आता म्हणे त्याच्या कडे ५०००० कोटी रुपयाची कराची थक बाकी आहे.



हा इसम पुण्याचा.



१. हा कोण आहे. कोणाला माहीत आहे का. माझ्या माहिती प्रमाणे ह्या माणसाचे स्टड फार्म आहे पुण्यात. स्टड फार्म एवढा पैसा मिळवून देत असेल तर आतापर्यंत मोठ मोठ्या उद्योजकांनी त्यात पैसा ओतून बरेच असे फार्मस् निर्माण केले असते. मग एवढा पैसा आला कोठून.



२. टाइम्स नाऊच्या नुसार हा कोण्या राजकीय पुढाऱ्याचा मोहरा आहे. कोण असेल तो पुढारी. ५०००० कोटी रुपये जर कर बाकी असेल तर स्विस बॅंकेत त्याच्या तिप्पट पैसा जरुर असणार - म्हणजे साधारण १५०००० कोटी रुपये झाले. ह्या पैशात किती अतिरेकी संघटनांना पैसा पुरवता आला असेल. २०१० - २०११ मध्ये भारताचा सगळा मिळून संरक्षण खर्च १४७००० कोटी रुपये झाला. ह्या राष्ट्रात अराजक माजवण्याचे सामर्थ्य ह्या माणसा कडे आहे. हा विचार डोक्यात येतो. आपल्याला काय वाटते.



एवढे सगळे असून सरकार अजून सुद्धा चुप का.  मला वाटते सरकार ने ह्या पैशाचा जर प्रामाणिकपणाने शोध लावला व ही गोष्ट पुर्णत्वाला नेऊन जर देशा समोर एक केस स्टडी म्हणून ठेवली तर त्यातून फार मोठे कार्य होणार आहे. हे घडवून आणण्यासाठी लागणारी यंत्रणा सरकार कडे आहे, पैसा आहे. फक्त इच्छा शक्ती नाही असे वाटते. ह्याचीच खंत आहे. पैसे खाऊ पणा पुर्वी पण होता पण आता पाणी डोक्यावरून जाऊ लागले आहे. लोक हतबल आहेत का लोकांच्या संवेदना बोधट झाल्या आहेत. त्यांना उठवणारा व जागे करणारा एखादा जांबूवंत पाहिजे आहे.