Friday, August 28, 2020

प्रसिद्ध वर्तमानपत्र

 


एकेकाळी माधव गडकऱ्यांसारखे वृत्तपत्राचे संपादक होऊन गेले. सडेतोड संपादकीय, भ्रष्टाचारा विरुद्ध घणाघाती लिखाण, मुद्देसूद भाषा, अभ्यासपूर्ण व सरकारच्या धोरणांच्या योग्य मूल्यमापनाने सजलेले त्यांचे लेख म्हणजे एक पर्वणी असायची. हल्लीचे लांगूलचालन करणारे संपादक व नव नवे वार्ताहर म्हणजे वृत्तपत्राचा ऱ्हासच समजायचा. हेही थोडके नव्हते की काय. काही राजकीय पक्षाच्या वृत्तसंपादकांची मराठी भाषा शैली इतकी वाईट की गटारातले पाणी पण स्वच्छ वाटायला लागेल. वृत्तपत्र नाही, पक्षाचे मुखपृष्ठ वाटते. अशा वृत्तपत्रात काम करणाऱ्या तरुण वार्ताहरांबद्दल वाईट वाटते. ते पण तेच शिकणार व पुढे असलीच भाषा वापरणार. 

ट्विटर व सोशल मेडीयामुळे हल्ली सगळेच वार्ताहर झाले आहेत. काहींचा अपवाद वगळता जवळ जवळ सर्व, घाल माती काढ गणपती सारखे पत्रकारितेचा अभ्यास कसाबसा संपवून स्वतःला वार्ताहर म्हणणारेच जास्त नजरेस दिसतात.  जे जर्नालिझमचा कोर्स करून वार्ताहराचे करियर करण्याच्या उद्देशाने येतात त्यांनी जास्त जबाबदारीने बातम्या देणे योग्य नव्हे का. पण बातमी व मत ह्यात अंतर आहे ते विसरले जाते. किंबहुना बातम्या देणे कमी व स्वतःची किंवा दुसऱ्यांची मतं स्वतःच्या नावावर छापून बाजार मांडणारेच मोकाट सुटलेत. 

तथ्यावर आधारीत बातम्यांपेक्षा शब्दांचे भांडवल करून प्रसिद्धी मिळवणे व स्वतःचा मार्ग सुकर करणे हेच बघायला मिळते. असे वार्ताहर सोशल मेडीयावर त्यांच्या वैयक्तिक पानावर ते ज्या वृत्तसंस्थेत काम करतात त्यांच्या धोरणानुसार त्यांचे लेखन रंगवताना दिसतात. त्यावर त्यांच्या मित्र मैत्रिणींकडून लाईक्स व शेअर मिळवतात पण अभ्यास करून काही लिहिले किंवा बोलले हे क्वचितच वाचायला किंवा ऐकायला मिळते.

No comments:

Post a Comment