Thursday, July 28, 2011

सुरवातीचे दिवस – भाग २





………….. मला कधी एकदा रूम मध्ये जाऊन झोपतो असे झाले होते. वेळापत्रका प्रमाणे आता एकदम दुपारी ४ वाजता गेम्स पिरियड होता.



मला कधी एकदा रूम मध्ये जाऊन झोपतो असे झाले होते. वेळापत्रका प्रमाणे आता एकदम दुपारी ४ वाजता गेम्स पिरियड होता. मी जेवण पटकन संपवून माझ्या खोलीमध्ये पोहोचतो व कपडे बदलून आता पलंगावर आडवे होणार तेवढ्यात मधल्या अंगणात जिसी परितोष शहाने अनाऊन्स्मेंट केलेली मी ऎकली.



अटेन्शन अटेन्शन अटेन्शन 14 प्लटून. ऑल फर्स्ट टर्मर्स टु फॉलइन, इन द स्क्वेअर, इमीडिएटली इन गेम्स रिग. अटेन्शन ….. ……………स्क्वेअर म्हणजे मधले अंगण.



झाले... मला समजले, की आम्हाला सीनियर्सने बोलावले आहे. पटापट आम्ही सगळेजण गेम्स ड्रेस घालून मधल्या अंगणात फॉलइन झालो. संख्या मोजली गेली. सीनियरला संख्येचा रिपोर्ट द्यायचा होता पण आमच्या ४० जणांमध्ये दोन जिसी कमी आढळल्या मुळे जिसी अमित वर्मा बुचकळ्यांत पडला. आमच्या टर्मचा ह्या आठवड्याचा संख्या देणारा जिसी अमित वर्मा होता. रिपोर्ट न देता, अमित गैरहजर जिसींची वाट बघत थांबला पण आमचा सीनियर, कॉर्पोरल बैन्सलाला मुळीच दम धरवत नव्हता.



यु ब्लडी क्लॉट गिव द रिपोर्ट एज इट इज. बैन्सला अमित वर्मावर खेकसला. तसा जिसी अमित वर्माने पटकन रिपोर्ट दिला.



परेड सावधान. तसे आम्ही लागलीच ताठ उभे राहून सावधान झालो. अमित वर्मा स्वतः पळत जाऊन कॉर्पोरल बैन्सला समोर उभा झाला. सावधान केले व मोठ्याने रिपोर्ट दिला.





गुड अफटर्नून सर, 38 जिसीज प्रेझेंट 2 जिसीज अब्सेंट फॉर द परेड. सर. तेवढ्यात जिसी सुब्रमण्यम आणि जिसी अशोक पांडे लडखडत आले. जिसी सुब्रमण्यमला आम्ही सुब्बू म्हणायचो. सुब्बूची चाल विचित्र होती. तो नेहमी डुलत डुलत चालायचा. हा डुलतं चालणारा सुब्बू जेव्हा पळायचा म्हणजे आयएमएच्या भाषेत ‘ऑन डबल्स’ मध्ये यायचा तेव्हा अगदी सोंग दिसायचा. अशा प्रत्येक फॉलइनला कोणी एक नेहमी उशिरा यायचा. फॉलइनला लवकर येणारे नेहमीच लवकर येतात व जे उशिरा येतात ते नेहमीच उशिरा येतात. काही लोकांची खुबी असते ऎनवेळेवर पोहोचायची व काही लोकं किमान पंधरा मिनिटे तरी आधी येऊन उभी राहायची.



यु क्लाऊन्स व्हाय आर यु लेट. स्टार्ट रोलिंग फ्रॉम देअर इटसेल्फ अॅन्ड जॉईन द फॉलइन. सुब्बू व पांडेला उद्देशून कोर्पोरल बैन्सला खेकसला. माझ्या सारख्यांना बरे वाटले मनातून. आम्ही मरत लवकर यायचे मग उशिरा येणाऱ्यांना काही प्रसाद नको का.



नाव लिसन. यु शुड बी एबल टू पुट युअर रिग इन 2 मिनीटस्. डॅटस् द रिझन वि हॅव कॉल्ड यु.....



झाले काय होते, आमची पिटी परेड झाल्यावर कॅप्टन गिलनी आमच्या सीनियर्सना प्री मस्टर निट केले नव्हते म्हणून झापले होते. सुब्बू आणि पांडे यांना कपडे बदलायला उशीर लागला, व फॉलइनला उशीर झाला हे कारण ऎतेच मिळाले होते आमच्या सीनियर्सना. मग काय विचारता लागलीच कॉर्पोरल बैन्सलाने पट्टी परेडचा हुकूम सोडला. आम्हाला गणवेश व पोशाख निट, वेळेत व बरोबर कसा घालायचा हे शिकवण्यासाठी ही पट्टी परेड. आमची पट्टी परेड पुढे दोन तास चालली. पट्टी परेड म्हणजे पटापट वेगवेगळे पोषाख बदलायचे. प्रत्येक पोषाख बदलण्यासाठी दोन मिनिटे मिळायची. मग सगळे पोषाख व गणवेश त्या दोन तासात दोन दोन मिनटात बदलले गेले.



त्या दिवशीचे दृश्य पाहण्यासारखे होते. कोणी रोलिंग, क्रॉलिंग करत आहे, तर कोणी मुर्गा बनले आहे, कोणी जिसी स्वतःची सायकल गळ्यात अडकवून उभा आहे, तर अजून कोणी फायरमॅन्स लिफ्ट सारखे दुसऱ्याला पाठीवर घेऊन पळते आहे. मजा अशी की प्रत्येकाला दुसऱ्याला झालेली शिक्षा सोपी वाटत होती व आपल्याला ती मिळायला पाहिजे होती अशी हुरहूर प्रत्येक जिसीच्या मनाला लागून राहिलेली होती. कॉर्पोरल बैन्सलाने बरोबर साडेतिनाला पट्टी परेड संपवली. चहा पिऊन गेम्स परेडला जाण्यासाठी लागतो तेवढाच वेळ दिला होता त्या महाभागाने आम्हाला.



आम्ही गेम्स ड्रेस घालून परेड ग्राउंड वर गेलो. गेम्स परेड मध्ये, कॅप्टन गिलने प्रत्येक जिसी, कोणकोणत्या खेळांमध्ये प्रवीण आहे ते जाणून घेतले. सैन्यात खेळाला खूप महत्त्व देण्यात आले आहे. दररोज, खेळाच्या रूपाने व्यायाम झाला तर आपले शरीर निकोप राहते व मनाचे संतुलन बिघडत नाही हे आयएमए मध्ये सुरवाती पासूनच बिंबवले जाते. सैनिकांबरोबर एक प्रकारचे सकारात्मक नाते जमवायला, खेळ हे अत्यंत प्रभावी प्रशासनाचे साधन आहे ही शिकवण पायी पायी आयएमएत दिली जाते. खेळताना सैनिक किंवा सैन्यातले जवान सेनाअधिकाऱ्याच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीने खेळतात. तसेच युद्धामध्ये सैन्यातले जवान सेनाअधिकाऱ्याच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीने लढतात. युद्धा मध्ये एकदुसऱ्याबरोबरचा तालमेळ खूप महत्त्वाचा ठरतो. एकमेकात तालमेळ जागृत होण्यास सामूहिक खेळाचा उपयोग होतो. म्हणूनच खेळ येणे व त्यात प्रवीण असणे ही आयएमए मध्ये एक ‘ऑफिसर लाइक क्वालिटी’ समजली जाते. ह्या ‘ऑफिसर लाइक क्वालिटीला’ थोडक्यात ओएलक्यू असे म्हणतात. ओएलक्यू हा शब्द आयएमएत आल्यापासूनच सारखा कानावर पडू लागला होता. त्या बद्दलचे ज्ञान जेयुओ भुल्लरने पहिल्याच दिवशी आम्हाला दिले होते. ज्यांचे आपण नेतृत्व करीत आहोत ते आपला आदर्श पुढे ठेवून आपल्या सारखे वागायचा प्रयत्न करायला लागतील असे प्रत्येकाचे आचरण असले पाहिजे व अशा आचरणाला ओएलक्यू म्हणतात. आपण सैन्यातल्या जवानांच्या गळ्यातला ताईत बनू शकू असे आपले वर्तन असले पाहिजे त्यासाठीच आयएमएच्या अभ्यासक्रमात ओएलक्यू वर एवढा जोर दिला जातो. पुढच्या काळात येणारी कोठचीही जबाबदारी समर्थपणे पेलण्यास सक्षम ठरेल असे आचरण आपण अंगी बाणले पाहिजे हे सारखे बिंबवले जाते. टर्मच्या सुरवाती पासून शेवट पर्यंत जिसीला त्यांच्या ओएलक्युवर आधारीत गुण प्रदान केले जातात व पुढे गुणवत्ताक्रम ठरवताना ओएलक्युचे गुण विचारात घेतले जातात एवढे त्याचे महत्त्व.



मैदानी खेळात आपण निपुण नाही त्याचे मला नेहमी दुःख वाटे. मैदानी खेळ येणे हा एक ओएलक्युचा भाग झाला. मैदानी खेळ म्हणजे हॉकी, बास्केटबॉल, फुटबॉल, हॅन्डबॉल आणि एथलेटीक्स सारखे सामूहिक खेळ. टेबल टेनिस व बॅडमिंटन ह्या खेळांना तितकेसे महत्त्व नाही. बॉक्सिंग हा खेळ तर प्रत्येक जिसीने एकदा तरी खेळलाच पाहिजे असा नियम. कोणते जिसी कोणते खेळ खेळतात व कशात तरबेज आहेत ह्याची कदर आयएमेत केली जाते. खेळात ज्याने विशेष प्रावीण्य दाखवले आहे त्याला आयएमए मध्ये त्या खेळासाठी निळ्या रंगाचा मानाचा कोट म्हणजे ब्लेझर मिळतो व अशा जिसीला आयएमए ब्लु म्हणतात. आयएमए ब्लु होणे म्हणजे जिसीसाठी फार अभिमानाची गोष्ट असते. प्रबोधिकेत खेळले जाणारे प्रत्येक खेळ भयंकर चुरशीचे होतात. मी पळण्यातच त्यातल्यात्यात बरा होतो. आमच्या वेळेला डोंबिवललीकरांचे लाडके खेळ म्हणजे कोठेही खेळता येणारा अगदी बाल्कनीत सुद्धा असा क्रिकेट व कबड्डी. त्यावेळेला भागशाळा मैदानावर वार्षिक कबड्डी सामने व्हायचे आता होतात की नाही माहीत नाही. त्यामुळे हेच खेळ जास्त माहिती. ह्या खेळांना फारशी काही साधनं लागत नाहीत. मला अजूनही आठवते, पूर्वी आपल्याकडे हॉकी, बास्केटबॉल, फुटबॉल, हॅन्डबॉल अशा मैदानी खेळाची परंपराच नव्हती व अशा खेळांचे वातावरण नव्हते. त्या मानाने उत्तर हिंदुस्थानात व भारताच्या ईशान्य राज्यातून खेळांना जास्त प्रोत्साहन मिळते हा फरक प्रकर्षाने जाणवला. एकूणच मध्यम वर्गीय लोकांची खेळांच्या बाबतीतल्या उदासिनतेमुळे मुलांना खेळांसाठी प्रोत्साहन कमी मिळायचे. चाकोरीच्या बाहेर जाऊन, खेळाला महत्त्व देऊन, सरावासाठी लागणारा वेळ काढावा लागतो. तो माझ्या लहानपणी काढता येण्यासारखा नव्हता. परिस्थितीचा दोष म्हणता येईल कदाचित पण चाकोरी बाहेर जाण्याचे स्वातंत्र्य फार क्वचित आपल्याकडे अनुभवायला मिळायचे. जसेकाही अनंत फंदी ह्यांचा ‘बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्ग सोडू नको’ हा फटका आपण तंतोतंत पाळतो असे वाटावे, इतके आपल्याकडे चाकोरीबद्ध जीवन कसे जगायचे त्याचे उत्तम धडे दिले जायचे.



गेम्स पिरेड मध्ये फार काही घडले नाही व आम्ही आमच्या खोल्यांवर आलो. मी संध्याकाळच्या फॉलइनची वाट बघत होतो आणि फॉलइनची घोषणा झालीच. आम्ही मधल्या अंगणात जमलो. ह्या वेळेला पटकन जमलो. आम्हाला दिवसातल्या चुका सांगण्यात आल्या व अजून काही नियम समजावून सांगण्यात आले. पहिला नियम असा होता की शॉपिंग सेंटर मधले कँटिन आमच्या साठी ‘आऊट ऑफ बाऊंड’ करण्यात आले होते. म्हणजे तेथे जायचे नाही व त्यातले काही खायचे नाही. खरेतर तेवढा वेळच मिळणार नव्हता आम्हाला. दुसरा नियम असा की घरातल्या कपड्यात जर खोली बाहेर पडायचे असेल तर प्रत्येकाला दिलेला, तो, ‘पिक्चर मध्ये नायिकेचा बाप घालतो तसा’ गाऊन घातल्या शिवाय बाहेर पडायचे नाही. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे जो पर्यंत ड्रिल टेस्ट पास होत नाही तो पर्यंत ‘लिबर्टी गेटेड’. म्हणजे आयएमएच्या बाहेर जाता येणार नाही. नाहीतर नियमानुसार जिसीजना दर रविवारी सकाळी ९ ते संध्याकाळी ८ पर्यंत डेहराडून शहरात मुफ्ती ड्रेस घालून, सायकलने जाता येत असे. पण आमच्या सीनियर्सनी त्याला काट लावली होती. आता आम्हाला ड्रिल टेस्ट पास झाल्या शिवाय बाहेर जायचे स्वातंत्र्य नसणार होते.



माझ्या शेजारच्या खोलीत ब्रजेशप्रतापसिंह राहायचा. तो बिहारचा होता. त्या पलीकडच्या खोलीत जिसी परितोष शहा राहायचा तो सिक्कीमचा राहणारा. माझ्या समोरच्या फ्लॅन्क मध्ये जिसी अमित वर्मा होता. तो दिल्लीचा होता, एनडिए मधून आलेला व त्याचे वडील सुद्धा सैन्यातलेच होते. त्या मुळे आमच्या सारख्या वासरांमध्ये जिसी अमित वर्मा लंगडी गाय होती. अजून एक लंगडी गाय म्हणजे जिसी हरबिंदर सिंह. तो रेलीगेटेड जिसी होता. रेलीगेशन म्हणजे कोर्स मधून नापास होणे. रेलीगेशन झाले की पुन्हा सहा महीने टर्म रिपीट करावी लागायची. रेलीगेशन झाले की आणखीन सहा महिने आयएमएचे सारे नियम व शिक्षा झेलाव्या लागायच्या व पुढे नोकरी मध्ये पदोन्नती करता लागणारी ज्येष्ठता कमी व्हायची, ती वेगळीच. त्यातून जर दोनदा रेलीगेशन झाले तर प्रबोधिकेतून काढून टाकले जायचे व तेथेच एखाद्या जीसीची अधिकारी व्हावयाची स्वप्न भंग पावायची. शीख पंथी वेगवेगळ्या प्रकाराने पगड्या बांधतात. पगड्या बांधण्याची पद्धत व ठेवण त्यांच्या पंथातल्या जातींवर आधारीत असते. आयएमएच्या गणवेशात एका विशिष्ट प्रकारानेच पगडी बांधायची असते. जिसी हरबिंदर रोज रात्री जितके शीख पंथी सरदार जिसी होते त्यांची ‘पगडी परेड’ घ्यायचा. एका विशिष्ट पद्धतीने पगडी बांधायला शिकवायचा, जेणे करून गणवेश घातल्यावर सगळ्या शीख सरदारांची पगडी एकसारखी दिसू शकेल अशी.



संध्याकाळच्या फॉलइन मध्ये जेयुओ भुल्लर व कॉर्पोरल बैन्सलाने आम्हा प्रत्येकाला स्वतः बद्दल माहिती द्यायला सांगितले. दोन शब्द बोलायला सांगितले.



अमित वर्मा – दिल्लीचा पंजाबी मुलगा. त्या आधी सहावी ते बारावी डेहराडूनच्याच राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजात शिकलेला. पुढे बारावी नंतरची तीन वर्ष पुण्याच्या राष्ट्रीय सैन्य प्रबोधिकेत खस्ता खाऊन आता येथे आयएमएत दाखल झालेला. उंची ६ फुट. देखणा बांधा व गोरा गोमटा.



आशुतोष महापात्रा – ओडिशा मधल्या संभलपुरचा, बिएस्सी करून सिडीएसची परीक्षा देऊन आलेला डायरेक्ट एंट्री होता. अत्यंत सालस. पळण्यात नेहमी पहिला नंबर असायचा. क्रॉसकंट्री रनर.



मद्रासचा सुब्रमण्यम – सावळा, घारे डोळे असलेला. कपाळावर आडवे भस्म लावणारा, पण आयएमएतल्या पाहिल्याच दिवशी सीनियर्सने त्याला त्याच्या कपाळावरचे भस्म उतरवायला लावले होते. कोणत्याही पोषाखात हे भस्म बसत नाही. भस्म्याकडे बोट दाखवत ‘आय विल नेssssव्हर टेक धिस ऑफ’ असे म्हणणारा सुब्बू, त्या दिवशी पासून विदाऊट भस्म असा आम्हाला दिसायला लागला. हा जिसी अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन युनिव्हर्सिटी एंट्री स्कीम मधून निवडून आयएमएत आला होता.



सुनील खेर – काश्मिरी ब्राह्मण, खूप बोलणारा. आमच्या सारखाच अधिकारी होण्याच्या प्रतीक्षेत दिवस मोजत. त्याला वडील नव्हते. तो आणि त्याची आई, बारामुल्ला जवळच्या सोयीबुक ह्या गावात राहायचे. तिथे त्यांची एक छोटी हवेली होती. त्याचे वडील काश्मीर खोऱ्यात एका दैनिकाचे संपादक होते. दीड वर्षापूर्वी एक दिवस त्याचे वडील कचेरीत गेले व परत आलेच नाहीत. त्यांना म्हणे अतिरेक्यांनी पळवून नेले व आजपर्यंत त्यांचा थांगपत्ता लागला नव्हता. त्यामुळे खूप बोलणारा हा जिसी मधूनच कधी कधी दुःखी दिसायचा.



मी, जिसी आकाश काशिनाथ शिरगावकर, डोंबिवलीचा राहणारा..........

Saturday, July 2, 2011

सुरवातीचे दिवस – भाग १




मी सकाळी चार वाजता उठून तयार झालो. अंगणात आलेला चहा व बिस्किटे खाऊन प्रि मस्टर साठी फॉल इन झालो. आमचे सीनियर्सचे ते काम होते की आमचा पोषाख – टर्न आऊट बरोबर आहे का तो बघणे व नसेल तर परेड आधी करवून घेणे. आम्ही सगळे आयएमएला शोभेल असा सोल्जर कट घेतला होता. म्हणजे कानावरती एक इंच भर सगळे केस छाटणे व डोक्यावरील बाकीचे एकदम बारीक करणे. पुण्याच्या राष्ट्रीय रक्षा प्रबोधिकेच्या कॅडेटस चे केस पण असेच छोटे छोटे कापलेले असतात. छोटे झाल्या मुळे केस उभे राहतात व कॅडेटस चे डोके फणसाच्या साली सारखे दिसते म्हणून पुण्यातली कॉलेजातली मुले असल्या केस कापलेल्या कॅडेटला फणस असे म्हणतात. पुढे दर आठवड्याला शनवारी दुपारी हेअर कट घ्यायची सवयच झाली कारण नाहीतर शिक्षा ठरलेली. प्रत्येकाने गुळगुळीत दाढी केलेली. दाढी रोज करायची असा नियम आहे व तो पोषाखाचा एक भाग आहे. तो पर्यंत मी चार दिवसातून एकदा दाढी करायचो. आम्हाला पोषाखातल्या आमच्या चुका समजावून दाखवल्या व ताकीद दिली की समजावलेल्या चुका परत दिसल्या तर शिक्षेस पात्र व्हाल म्हणून. हे सगळे करे पर्यंत सकाळचे साडे पाच वाजले होते.



आम्ही पिटी परेड साठी निघालो, आठ जिसीजचा सायकलचा स्क्वॉड केला, पाठीवर शर्टाच्या कॉलरला दुसऱ्या तासाला लागणारे कपडे टांगलेला हॅन्गर अडकवला, त्याचबरोबर, उजवा आणि डावा ड्रिल बूट एकमेकांच्या नाड्याने बांधून सायकलच्या हॅन्डलवर अडकवला व पिटी ग्राउंड वर येऊन धडकलो. सकाळची कवायत म्हणजे पिटी, आमचा पिटी उस्ताद हवालदार केसरराम घ्यायचा. पिटी परेडला संख्या घेतली तेव्हा पहिल्यांदाच आम्ही आमचा डायरेक्टींग स्टाफ बघितला. प्रत्येक प्लटून साठी एक डायरेक्टींग स्टाफ होता, त्याचे काम हॉस्टेल वॉर्डन् सारखेच असायचे व अजून पुष्कळ जबाबदाऱ्या होत्या त्या डायरेक्टींग स्टाफवर. डायरेक्टींग स्टाफ एक सैन्य आधीकारी असतो. आयएमएतला अभ्यासक्रम घेणारे सगळेच सैन्य अधिकारी आमच्या साठी डायरेक्टींग स्टाफ म्हणजे डिएस असायचे. आमचा डिएस कॅप्टन गिल होता. कॅप्टन गिल स्वतः २४, २५ वर्षांचा असल्या कारणाने, प्रचंड उत्साह ओतप्रोत भरलेला, स्फुर्तीदायक आधीकारी होता. आमचा मानदंड होता. त्याने फॉल इन घेतले. पाहिलाच दिवस असल्या मुळे आम्हाला त्याने पिटीचा सिलॅबस सांगितला.



कमीत कमी २५ पुशअपस्, २५ सिटअपस्, व्हर्टिकल रोप, होरीझॉन्टल रोप, १३ मिनटात २ माइल पळणे, मंकी रोप, जंप एंड रिच, फायरमॅन लिफ्ट, ८ फिट डीच पार करणे, १५ पुलअपस असा पाहिल्या सहामाहीसाठी अभ्यास होता. त्याचा सराव रोज सुरू करायचा होता. जे एनडीए मधून आले होते त्यांना ह्या सगळ्या गोष्टी आधीच माहीत होत्या पण आमच्या सारखे सिव्हिल वातावरणातून आले होते त्यांच्यासाठी हे सगळे नवीन होते. त्यातल्या त्यात मला निदान पुशअपस् सिटअपस् माहीत होते कारण पूर्वी शाखेत जायचो तेव्हा सूर्यनमस्कार, जोर, बैठका काढायचो. पण बऱ्याच जणांना ह्यातले काही माहीत नव्हते.



नाऊ फर्स्ट थिंग्स फर्स्ट. युअर टर्न आऊट. बिफोर वी स्टार्ट प्रॅक्टीसिंग, यु ऑल मस्ट लर्न टु ड्रेस अप प्रॉपर्ली फॉर द परेड (म्हणजे प्रि मस्टरचा बट्ट्याबोळ). असे म्हणत कॅप्टन गिलने काही जणांना बनियन चांगला खोचला नाही म्हणून बाहेर काढले, काहींच्या सॉक्स मध्ये दोष काढला, काहींच्या शु लेसेस बांधण्यात दोष काढला व माझ्या गालावरून हात फिरवीत दाढी निट झाली नाही म्हणून मला बाहेर काढले. एकही जिसी उरला नाही ज्याच्या टर्न आऊट मध्ये काही दोष नाही असा. मग आम्हाला सगळ्यांना एका ओळीत उभे केले व म्हणाला



टुडे वी विल जस्ट कॉनसंट्रेट ऑन डिसिप्लीन रादर दॅन पिटी.

आय डोंट वॉन्ट धिस शॅबिनेस टुबी रिपीटेड अगेन. नाव गेट रोलिंग.



जे एनडीएतून आले होते त्यांना माहीत होते रोलिंग ह्या शब्दाचा अर्थ. आता हे रोलिंग काय प्रकरण आहे ते समजावून सांगतो. आपण कशा लहानपणी गाद्या टाकल्यावर कोलांट्याउड्या मारायचो. अगदी तशाच कोलांट्याउड्या मारणे म्हणजे रोलिंग. फक्त हे रोलिंग गाद्यांवर नाही करायचे तर कोठेही होऊ शकते व कोणत्याही पोषाखात होऊ शकते. त्यामुळे आम्ही रोलिंग करायचा प्रयत्न करायला लागलो. हळू हळू जमू लागले. रोलिंग जर निट जमले नाही तर पाठीच्या कण्याला व डोक्याला खूपं छोटे छोटे दगड टोचतात. अगदी असह्य होते. पण जसे आपण रोलिंग मध्ये तरबेज व्हायला लागतो तसे त्यातल्या खुब्या कळतात. रोलिंग मध्ये आपली मान आपण जेवढी दुमडू व मणका जेथून सुरू होतो त्याच्या वरच्या बाजूवर मानेच्या मागच्या भागावर पहिल्यांदा भार दिला म्हणजे डोके वाचते. पुढे एवढा जोर देऊन शरीर पालथे घालायचे की मणका लागतच नाहीत जमिनीला. आदळतात फक्त आपले कूले. ईश्वराने त्या पार्श्व भागाची जनुकही तेवढ्यासाठीच घडण अशी काही केली आहे की बरोबर रोलिंग केल्याने अलगद सगळा भार कमर व कुल्ल्यावर येतो व न लागता कोठेही रोलिंग केले जाऊ शकते. पण ही कला दोन चारदा डोक्याला व मणक्याला दगड टोचे पर्यंत आत्मसात होत नाही. मग आम्ही पिटी परेड भर फक्त रोलिंगचीच सवय करत होतो. आता मला समजून चुकले की प्रत्येकाला पिटी ड्रेसचे ५ जोड का दिले होते ते, कारण पूर्णं पिटी ग्राउंड छापले गेले होते आमच्या कपड्यांवर एव्हाना, सकाळच्या दवाने तर अजूनच कपडे मळले. सकाळची सगळी झोप निघून गेली. आता पुढचा तास होता ड्रिलचा.



पिटीचा तास जसा संपला तसा आम्ही स्क्वॉड बनवला व ड्रिलस्क्वेअर कडे निघालो. अंतर साधारण २ किलोमीटर. प्रत्येक वेळेला स्क्वॉड ने जाताना कोणी आधीकारी दिसला की सगळ्यात पुढचा सायकल स्वार एखाद्या मशीन सारखे स्क्वॉड साsssवधान म्हणायचा, लागलीच आम्ही सारे सायकल स्वार पाठीचा कणा अजूनच ताठ करून मान वर करून त्याला दुजोरा द्यायचो. जसा आधीकारी शेवटच्या सायकाल स्वाराला पार करायचा तसा शेवटचा सायकल स्वार स्क्वॉड विssssश्राम असे ओरडायचा, अधिकाऱ्या ऐवजी जर सुभेदार आला तर पाहिला सायकल स्वार जयहिंद साब असे त्याला अभिवादन करायचा व तो सुद्धा कडक सॅल्यूट मारायचा. जर मधूनच हे करायचे राहून गेले तर एखादा स्क्वॉड पुढची पाच मिनिटे गळ्यात सायकली अडकवून उठाबशा काढताना आढळायचा. गळ्यात कधी सायकली अडकवल्यात का कोणी. आम्ही अडकवल्यात. सोपे असते तसे पण ह्यात वेळ जातो व पुढच्या तासाला उशीर होतो. परत उशीर का झाला ह्याचे कारण न विचारताच उशीर झाल्याची शिक्षा सुरू होते. हिरो किंवा एटलासच्या सिट व हॅन्डल मध्ये आडवा दांडा असलेल्या जेंट्स सायकलचा दांडा मानेच्या मागे ठेवला की आपोआप आपले डोके त्या सायकलच्या दांड्यांच्या त्रिकोणात जाऊन सायकल गळ्यात अडकते, हात सुटे राहतात व उठाबशा पण काढता येतात. हे आत्ता पर्यंत मला कोणच्याही कॉलेजांत शिकायला मिळाले नव्हते.



स्क्वॉड करुन आम्ही ड्रिल स्क्वेअरपाशी आलो. सायकल स्टॅन्ड मध्येच पटापट कपडे बदलले व फॉल इन झालो. ड्रिल रिग बदलण्यास बऱ्याच जिसीज ना वेळ लागला व रिपोर्ट देण्यास साहजिकच उशीर झाला. आता तेथल्या ड्रिल उस्तादाची वेळ होती आमचा ड्रिल रिग तपासण्याची. पिटी परेड पेक्षा ड्रिल रिग मध्ये बरीच अवधाने सांभाळायची असतात, बेल्ट, बॅरे, शर्ट खोचणे (शर्टाची फक्त तीनच बटण दिसली पाहिजेत आठवते ना) वगैरे, व त्यात बऱ्याच चुका ड्रिल उस्ताद ने काढल्या. बॅरे चापुनचोपून लावणे म्हणजे एक कठीण कला आहे. बॅरे जरका चुकीची घातली तर फुगलेल्या भटोऱ्या सारखी दिसते. आडवी सपाट घातली गेली तर कडक पोळी किंवा चपाती सारखी दिसते पण जर बॅरेचा आयएमएचा बिल्ला डाव्या डोळ्याच्या रेषेत वर आणला व बाकीचे कापड डोक्यावर चापून बसवून तिरपे उजव्या कानाच्यावर आणले व बॅरेची कपाळावर बसणारी पट्टी आणि भुवया ह्यात तीन बोटांचे अंतर सुनिश्चित केले की मग मुंडा एकदम छान रुबाबदार दिसतो. आम्हाला ड्रिल उस्तादाने सांगितले की जो पर्यंत ड्रिल टेस्ट पास होत नाही तो पर्यंत आम्हाला सॅल्यूट करण्यास मनाई आहे व पी कॅप घालण्यास सुद्धा मनाई आहे, हे सांगितल्यावर ड्रिल परेड मध्ये गणवेश निट नाही म्हणून ड्रिल उस्ताद ने परेड ग्राउंडच्या चार फेऱ्या हात उंच करून रायफल हातात आडवी घेऊन पळत लावायला सांगितल्या. आता साडे पाच किलो वजनाची रायफल हातात उंच धरून आडवी घेऊन पळायचे म्हणजे नाकात दम येतो हे पळाल्यावर कळते. आयएमेत वेपन ट्रेनिंग, ड्रिल, घोड स्वारीचे काही वर्ग 'साब' म्हणजे सैन्यातले सुभेदार घेतात व त्यांना मदतीला व आम्हाला शस्त्रांचे हिस्से पुर्जे उघडणे, जोडणे, ड्रिल व पिटी शिकवून आणि करवून घ्यायला उस्ताद म्हणजे सैन्यातले हवालदार किंवा नायक असतात. आमची परिस्थिती अशी होती की शिकवताना सैन्यातला नायक सुद्धा आम्हा जिसीजना सहजच शिक्षा करायचा. अशा त्या ड्रिल उस्ताद ने दिलेल्या शिक्षेतच ड्रिल पिरेड संपला आणि आम्ही रायफली शस्त्रागारात ठेवल्या. शस्त्रागाराला सैन्यात कोत असे म्हणतात. आयएमएत दोन प्रकारच्या रायफली प्रत्येक जिसीला मिळतात. एक रायफलीच्याच आकाराची, वजनाची व दिसण्यात अशी असलेली ड्रिल प्रॅक्टिस रायफल व दुसरी खरी रायफल. ड्रिल आम्हाला ड्रिल प्रॅक्टिस रायफलने करायला लागायची.



आम्ही ब्रेकफास्ट साठी मेस मध्ये पोहोचलो. पंधरा मिनटात ब्रेकफास्ट संपवला. सकाळच्या सगळ्या व्यायामाने भलतीच भूक लागली होती. त्यामुळे दलीया, ब्रेड, एग ऑम्लेट व दूध पटकन पोटात गेले. पुढे आमचे साडे बारा वाजे पर्यंत क्लासेस होते. त्यात टॅक्टिक्स्, विपन ट्रेनिंग, रेडियो टेलिफोनी कम्युनिकेशन ह्या सगळ्याचे धडे होते. आम्हाला त्यात काही स्वारस्य राहिले नव्हते. इतके दमलो होतो की झोप अनावर होत होती. पण झोपलेला जिसी दिसला की त्या पायऱ्या पायऱ्यांच्या वर्गात बाकांच्या मध्ये रोलिंग करायला लागायचे. त्यामुळे माझा सगळा वेळ झोप आवरण्यात गेला. काय शिकवले ते कळले काहीच नाही. वहीत लिहून सुद्धा घेतले नाही. दुपारी मेस मध्ये जेवण झाले. पोळीचे तुकडे बोटाने न तोडता, त्याची सुरनळी करून डाव्या हातात धरून एकेक घास तोंडाने तोडून चमच्याने डाळ (आपली आमटी), भाजी, भात खाण्याचे तंत्र पहिल्यांदाच येथे बघत होतो. शाकाहाऱ्यांसाठी डाळ भात भाजी, मांसाहारी असतील त्यांच्या साठी ह्या व्यतिरिक्त एक मांसाहारी डिश असे. मला कधी एकदा रूम मध्ये जाऊन झोपतो असे झाले होते. वेळापत्रका प्रमाणे आता एकदम दुपारी ४ वाजता गेम्स पिरियड होता.

(क्रमशः)

Thursday, June 30, 2011

पुढचे चार दिवस

ह्या आधीचे ..........राजाराम सीताराम एक, राजाराम सीताराम दो। प्रवेश


पुढचे चार दिवस आम्हाला आमचे सीनियर्स दहा दहा मुलांचा गट करून रोज सकाळी नाष्टा झाल्यावर चेटवोड हॉलवर घेऊन जायचे. आमच्या कडून सविस्तर वेगवेगळे फॉ्र्मस भरून घ्यायचे. ज्यातले मला काहीच कळत नव्हते. कळत नव्हते म्हणण्या पेक्षा कळून घ्यायची इच्छा नव्हती. रॅगिंग होत नव्हते त्या मुळे एक प्रकारचे कुतूहल वाढले होते. रॅगिंग सुरू झाले असते तर एका अर्थाने त्या बाजूने मन मोकळे झाले असते. आता मनाचा एक कोपरा रॅगिंग बद्दलचा विचार सतत करण्यात गुंतला असल्या कारणाने मी कोठे सह्या करत आहे व कसले फॉर्मस् आहेत ह्या बद्दल जाणून घ्यायचा मला अत्यंत कंटाळा आला होता. ढोबळ मानाने ते फॉर्मस् असे होते



... प्रशिक्षणात काही उणे पुरे झाले तर घरच्यांना निदान इन्शुरन्स मिळावा ह्या हेतूने आयुर्विमा,

... दुसरा प्रशिक्षण पूर्णं झाले तर पुढची २० वर्ष सैन्य सोडणार नाही अशी प्रतिज्ञा असलेला कागद होता,

... तिसरा कागद प्रशिक्षण अर्धवट सोडून निघून किंवा पळून गेलो तर झालेला खर्च देऊ असे आश्वासन देणारा होता,

... तदनंतरचा कागद प्रशिक्षणात काही कारणाने मृत्यू ओढवला तर कमावलेला पगार कोणाला द्यायचा ह्या संबंधीचे इच्छापत्र (हा फॉर्म भरताना क्षण भर अंगावर काटा आला),

... अजून एका पत्रकावर सही घेतली की ज्यात लिहिले होते अशा प्रकारचे काहीतरी लिहिले होते. पुढे जर आढळून आले की मी सुपूर्त केलेली पदवी व मार्क्स नंतर करण्यात येणाऱ्या तपासणीत बरोबर निघाली नाहीत तर मला प्रबोधिकेतून काढून टाकले जाईल व खोटे कागदपत्र दिली म्हणून कारवाई होईल,

... पोलीस चाचणीमध्ये चारित्र्या बद्दल जर काही आक्षेपहार्य आढळल्यास काढून टाकले जाईल व कारवाई होईल ती वेगळीच ह्याची नोंद अशा अनेक कागद पत्रांवर सह्या घेतल्या गेल्या.



कोर्स संपल्यावर परत करायच्या बोलीवर आम्हाला प्रत्येकांना सायकली देण्यात आल्या. सायकलचा लागणारच कारण प्रबोधिका साधारण दीड हजार एकरांमध्ये पसरलेली आहे व एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जायला सायकल सारखे दुसरे वाहन नाही. सोपा, स्वस्त, टिकाऊ पण वेगवान असे गुण दुसऱ्या कोठल्याच वाहनात नाही. शिवाय सायकलचा उपयोग प्रभावी शिक्षेत कसा होऊ शकतो ते पुढे आम्हाला समजणार होते. मग आम्हाला शोपिंगसेंटर मधल्या ठराविक दुकानातून कोर्स मध्ये लागणारे तऱ्हे तऱ्हेचे गणवेश, बूट, पोषाख घेऊन दिले गेले. तद्नंतर, त्या चार दिवसातल्या एका सकाळी आम्हाला सीनियर्सनी सायकल वरून आयएमएची सफर करवली. कोठे काय आहे ते दाखवले. परेड ग्राउंड, पिटी ग्राउंड, विपन ट्रेनिंग स्टॅन्ड, स्विमिंग पुल, शॉपिंगसेटर, क्लासरुम्स, दवाखाना, हॉस्पिटल, मेस, स्टडियम, ऑडिटोरियम, जिमनॅशियम, घोड सवारी साठी वेगळी जागा, फायरिंग रेंजेस कोठे कोठे गेलो आम्ही कधी मध्येच चहाच्या बागा लागायच्या तर कधी जंगल लागायचे. त्या वेळेला आम्हाला खरी कल्पना आली आम्ही केवढ्या मोठ्या संस्थेत आलो आहोत ह्याची. आयएमए मध्ये प्रशिक्षण घ्यायला आलेला जंटलमन कॅडेटसचे गट केले जातात. साधारण ४० जंटलमन कॅडेट जिथे राहतात त्याला प्लॅटून म्हणतात. अशा चार प्लॅटूनची एक कंपनी बनते. चार कंपन्यांचे बटालियन होते. आयएमए मध्ये चार बटालियनस आहेत. प्रत्येक बटालियनचे पिटी ग्राउंड, ड्रिल स्क्वेअर, क्लास रूम्स वेगवेगळे. इमारती पूर्वीच्या भारदस्त व भव्य. अंतरं लांब लांब. प्रत्येक इमारत छान रंगलेली. स्वच्छता तर टोकाची. रुंद आखलेले रस्ते. नियमित पणे निट झाडलेले. मोठमोठाली ट्रेनिंग फील्ड्स. मोठमोठाली पिटी ग्राउंड्स व ड्रिल स्क्वेअर. मी मानेकशॉ बटालियनच्या मॅक्टीला कंपनीच्या फोर्टीनथ् प्लॅटून मध्ये होतो. रुम नं ७. मॅकटीला कंपनी टॉन्स नदी किनारी होती. तिनचारशे यार्डावर नदी किनारा लागायचा. जर हा कोर्स करत नसतो तर त्या अतिशय सुंदर निसर्ग दृश्याचा लाभ घेतला असता. बाकी सगळ्या बटालियनस व आमच्या क्लासेस कडे जायचे म्हणजे चढाव चढून जावे लागायचे. जवळ जवळ १०० मीटरचा चांगलाच चढाव लागायचा. सायकलवरून बळेच उतरावे लागायचे इतका चढाव. त्या उलट सायकल वरून त्या उतारावरून येताना भुर्रकन येता यायचे, मजा यायची.



आता रॅगिंग बद्दलचे कुतूहल जाऊन ते अजून का सुरू होत नाही त्याचे कुतूहल अधिक वाटायला लागले होते. कोण करील कसे करील व आम्हाला काय काय करावे लागेल. रॅगिंग केव्हा एकदा सुरू होईल असे वाटत होते, ह्याला कारण असे की रॅगिंग बद्दलचे गुपित काय आहे ते समजून घ्यायचे होतेच व मनात एक अटकळ होती की रॅगिंग जेव्हा सुरू होईल तेव्हाच संपेल ना, त्या मुळे रॅगिंग संपण्यासाठी तरी ते सुरू होईलच पाहिजे होते. त्या वेळेला हे कोठे माहीत होते की आयएमेतले रॅगिंग कधी संपत नाही, कोर्स पूर्णं होई पर्यंत चालूच राहते. फक्त त्या रॅगिंगची नंतर सवय होते व म्हणून मग त्याचे काही वाटेनासे होते इतकेच.



आम्ही नवे बकरे भारतातल्या वेगवेगळया ठिकाणाहून आलो होतो. अगदी म्हणतातना काश्मीर ते कन्याकुमारी व गुजरात ते मणीपूर, अगदी तसेच. माझी मराठी डेहराडून एक्सप्रेस मध्येच संपली होती होती, कारण कोणीच मराठी दिसत नव्हते त्यात. नेहमीच मराठी वातावरणात वाढलेला मी, जेव्हा दाखल झालो तेव्हा पासून माझी बंबय्या हिंदी व इंग्रजी मधून हळू हळू संभाषणाला सुरवात झाली व बाकीच्यांची ओळख होऊ लागली. सगळेच खरे म्हणजे हरवलेले व बावचळलेले पण दाखवण्यासाठी बेडकाच्या गोष्टी सारखे उगाचच छाती फुगवून चालणारे. आमचे चार दिवस हे सगळे प्रकार चालले होते. मेस मध्ये नाष्टा, दुपारचे व रात्रीचे जेवण व्हायचे.



मेस मध्ये आमच्या साठी कोपऱ्यात वेगळे टेबल लावले असायचे. बाकीचे सीनियर्स दुसरी कडे जेवायचे. आयएमए मध्ये साधारण एक ते दीड वर्षाचा कोर्स असतो. काही मुले राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच एनडीए, खडकवासला येथून येतात, काही इंजिनियरिंग करून येतात. एनडीए व इंजिनियरिंग करून येतात त्यांचा कोर्स एक वर्षाचा असतो व काही बिएस्सी, बिकॉम, बीए करून आलेल्यांचा कोर्स दीड वर्षांचा असतो. त्या मुळे सीनियरच्या दोन फळ्या असतात आपल्या डोक्यावर, पाहिली फळी ज्यांचे सहा महीने झाले त्यांची व दुसरी ज्यांचे एक वर्ष झाले त्यांची. सैन्यात सिनीयॉरीटी जोपासतात, जपतात व त्या प्रमाणे सैन्याच्या फळ्या पुढे चालवतात.



चार दिवसाचे आमचे आयएमए दर्शन संपत आले. चवथ्या दिवशी संध्याकाळी आयएमेतली पुढची रूपरेषा समजावून सांगण्यासाठी सिनीयर्सने आमचे 'फॉल इन' घेतले. फॉल इन म्हणजे तीन पंक्ती करून आडव्या फळीत एकामागेएक असे उभे राहायचे. आम्ही सगळे मधल्या आवारात जमा झालो. आम्हाला आमचे सगळे गणवेश आणायला सांगितले होते. प्रत्येक गणवेश कसा घालायचा, कोणत्या वेळेला घालायचा हे आमच्या सीनियरने शिकवले व दाखवून दिले. आयएमएतले पोषाख तरी किती प्रकारचे. एक नूर आदमी दस नूर कपडा ह्या म्हणीचा अर्थ तेव्हा कळला.



पिटी परेड साठी पांढरा बनियन – गंजीफ्रॉक, पांढरी अर्धी चड्डी व पांढरे कॅनव्हासचे बूट. आयएमएतल्या रोजच्या क्लासेस साठी ऑलिव्ह ग्रीन रंगाचा शर्ट हा 'ओजी' रंग, ऑलिव्ह ग्रीन रंगाला थोडक्यात ओजी असे म्हणतात तो रंग पुढे सैन्यात जिथे तिथे दिसतो. ओजीचा खरा अर्थ काही दिवसाने मला कळणार होता. त्या ओजी शर्टावर उजवीकडे खिशावर नावाची छोटी पाटी. काळ्या पाटीवर पांढऱ्या रंगाने नाव कोरलेले असायचे. शर्टाच्या कॉलरवर ब्रासच्या रोमन अंकात टर्मचे बिल्ले, पॅन्ट अशी चढवलेली की पट्ट्यावर जिथे शर्ट दिसायला लागतो त्या भागात शर्टाची फक्त तीन बटणे दिसली पाहिजेत, पॅन्टवर आयएमएचे बक्कल असलेला काळा जाड कातड्याचा पट्टा, डोक्यावर आयएमएच्या स्टील ग्रे रंगाची बॅरे. आयएमएत डोक्यावर घालतो त्या टोपीला बॅरे म्हणतात. त्यावर आयएमएचा ब्रासचा बिल्ला शोभून दिसतो. खांद्यावर आयएमएच्या ब्लड रेड आणि स्टील ग्रे रंगाच्या एपलेटस्, खाली ऑफिसर पॅटर्नचे काळे जोडे. ह्याच गणवेशात जर काळ्या ऑफिसर पॅटर्न शूज ऐवजी ड्रिल शूज चढवले व पॅन्ट व जोडे जेथे मिळतात तेथे काळी पट्टी ज्याला इंग्रजीत एंकलेट असे म्हणतात तसे बांधले म्हणजे ड्रिल रीग तयार झाला. एंकलेट मुळे उठावदार दिसतो पोषाख. आयएमेत ड्रेसला रीग म्हणतात. ड्रिल शूज चामड्याचे असतात व नडगी पर्यंत येतात. टाचेला १३ खिळ्यांनी घोड्याची नाल ठोकलेली असते. ते जोडे घालून चालताना लक्षवेधी खाड खाड आवाज करतात त्या ठोकलेल्या नाले मुळे. त्या जोड्याची लेस लांब असते. लेस बांधताना ती दुमडली गेली नाही पाहिजे म्हणजे छान दिसते. ड्रिलसाठी खांद्यावर रायफल. आऊट डोर ट्रेनिंग साठी कॅमोफ्लॅजचा शर्ट व पॅन्ट. शर्ट खोचून त्यावर कापडाचा जाड वेब बेल्ट. पाठीवर स्मॉल किंवा बिग पॅक, कमरेला पाण्याची बाटली व खांद्यावर रायफल. पायात डिएमएस शूज. ड्रिल शूज सारखेच फक्त टाच रबराच्या सोलची बनवलेली असली कि झाले डिएमएस बूट. डिएमएस बूट असले म्हणजे जंगलातून जायला बरे पडते. पॅन्ट व बूट जेथे मिळतात तेथे बॅन्डेज बांधल्या सारखी कापडी 'ओजी' रंगाची पट्टी बांधावी लागते एंकलेट सारखीच असते फक्त येथे त्याचा उपयोग जंगलातून चालताना किडे, साप, विंचू ह्या पासून वाचवण्यासाठी होतो. अशी पट्टी बांधण्याने किडे बुटांमध्ये घुसण्याची शक्यता दुरावते. वरती जॅप कॅप. गेम्स परेड साठी पांढरा टीशर्ट, पांढरी अर्धी चड्डी व कॅनव्हास शूज. जेवणासाठी मुफ्ती ड्रेस. मुफ्ती मध्ये पांढरा फुल शर्ट व स्टील ग्रे कलरची पॅन्ट असते. त्यावर आयओमएचा टाय व पायात ब्रोग शूज. हा झाला उन्हाळ्याचा मुफ्ती ड्रेस, हिवाळ्यात त्यावर कोट येतो. विपन ट्रेनिंग साठी अमेरिकनं खाकी रंगात डांगरी, डिएमएस शूज, स्मॉल पॅक पाठीवर, कमरेला पाण्याची बाटली, डोक्यावर जॅप कॅप व खांद्यावर रायफल असे ना ना प्रकारचे पोषाख.



फॉल इन मध्ये उभे होतो तेव्हाच आमचा एक सीनियर - ज्युनियर अंडर ऑफिसर ज्याला जेयुओ म्हणतात तो जेयुओ भुल्लर कडाडला आणि म्हणाला की इतके दिवस तो आम्हाला बघत होता आम्ही कसे जेवतो, कसे सायकलवरून जात होतो, कसे चालत होतो, कसे बोलत होतो व त्याच खड्या आवाजात आम्हाला कळवण्यात आले....



युअर इटिंग हॅबिटस्, युअर एटीकेटस्, युअर टर्न आऊट. नॉट एक्सेप्टेबल एटऑल. अट्टरली एट्रोशियस.

प्यूsssट्रीड. यु डोंट इव्हन नो हाऊ टु विश द टाइम ऑफ द डे टु युअर सीनियर्स.

एट धिस रेट यु विल गो बॅक होम, डबल द स्पीड यु हॅव कम.



आम्ही एकदम शांत.



फ्रॉम टुमॉरो यु आर जंटलमन कॅडेटस एंड यु विल बिहेव लाइक ए जिसी. जिसी म्हणजे जंटलमन कॅडेट. त्यावेळे पासून मी आकाश काशिनाथ शिरगावकर चा जिसी आकाश काशिनाथ शिरगावकर झालो किंवा मित्रांमध्ये नुसतेच आकाशी.



आम्हाला दुसऱ्या दिवसा पासूनचे रुटीन समजावून सांगण्यात आले. आयएमएत 'समजावणे' नसते फक्त आदेश असतात व ते पाळायचे असतात. जेवताना काट्या चमच्याने कसे जेवायचे त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. आयएमएत सायकली नेहमी दोन स्तंभात चालवायच्या, दोन सायकल स्वार पुढे एकमेकांच्या शेजारी व बाकीचे सहा त्यांच्या मागे. आठ सायकलींचा एक स्क्वाड होतो. जर एकटा जिसी असेल तर एकटे सायकल वरून नाही जायचे, मग सायकलचे हॅन्डल धरून पळत जायचे. सायकल नसेल तर जिसीने दोन स्तंभात आठ आठचा स्क्वाड करून जायचे. आयएमेत कधी चालायचे नाही फक्त डबल्स म्हणजे नेहमी जॉगिंग करतच जायचे. कोणताही अधिकारी दिसला की स्क्वाड मधल्या पुढच्याने जोरात स्क्वाड साssssवधान चा इशारा देताक्षणिक बाकीच्या सगळ्यांनी सायकलवर बसल्या बसल्या स्वतः ताठ होऊन सायकलचे हॅन्डल धरलेले कोपऱ्यात वाकलेले स्वतःचे हात सुद्धा सरळ करायचे, तो अधिकारी गेला की शेवटचा सायकल स्वार स्क्वाड विsssश्राम असे ओरडला की स्क्वाड मधल्या सगळ्या जिसीजने सायकली पूर्ववत चालवण्यास लागायचे.........



रात्री बारा पर्यंत आम्ही सगळे उभे होतो व आमचे सीनियर्स आम्हाला वेगवेगळे नियम सांगत होते. बारा वाजता आम्हाला सोडले. नाऊ गो टू बेड एंड वि वॉन्ट लाइट्स ऑफ बाय ट्वेल्ह थर्टी. गेट रेडी फॉर प्री मस्टर एट फोरथर्टी टुमॉरो मॉर्निंग.



मी माझ्या रुम नं ७ मध्ये पोहोचलो, पटकन कशीबशी दुसऱ्या दिवशीची तयारी केली व गादीवर आडवा झालो. रहदारी नाही, आवाज नाही सगळी कडे सामसूम. त्या निरव शांततेचा भंग जवळच वाहणाऱ्या टॉन्स नदीच्या पाण्याच्या खळखळाटांनी होत होता. माझ्या खोलीच्या खिडकीतून लांबवर मसुरीचा पहाड दिसत होता. त्यात लुकलुकणारे दिवे बराच वेळ गादीवर पडल्या पडल्या पाहत राहिलो. दुसरा दिवस उजाडूच नाही अशी आर्त प्रार्थना देवाजवळ करता करता कधी झोप लागली कळलेच नाही.

(क्रमशः)

Saturday, June 18, 2011

राजाराम सीताराम एक राजाराम सीताराम दो- प्रवेश




इंडियन मिलिटरी एकॅडमी – भारतीय सैन्य प्रबोधिनी. डेहराडून स्थित भारताची प्रमुख सैनिकी शिक्षण देणारी व थलसैन्यातले आधीकारी देणारी संस्था. त्या संस्थे बद्दल व तेथल्या अनुभवांवर बांधलेली एक कथा.



प्रवेश



गाडी डेहराडून स्टेशनावर थांबली. मी एसी फर्स्ट क्लास मधून पाय उतार झालो. मला घ्यायला सैन्यातला एक सुभेदार आला होता. मला बघितल्या बरोबर सावधान होऊन कडक सॅल्यूट ठोकून त्याने राम राम साब असे मला संबोधले. राम राम, रामचरणसाब, कैसे हो। त्याच्या गणवेशावर लावलेल्या नावाची पाटी वाचत मी म्हणालो. ठिक हैं साब। असे म्हणत सुभेदार रामचरणसाब माझ्या बरोबर स्टेशनाबाहेर पडला. माझे सामान तोपर्यंत मला घ्यायला आलेल्या गाडीत ठेवले गेले होते. मी काळ्या अंब्यासॅडर मध्ये बसून, गाडीच्या सिटवर माझ्यासाठी ठेवलेली फाइल चाळायला घेतली. त्या फाइलच अनुसार पुढचे काही दिवस इंडियन मिलिटरी एकॅडमी म्हणजे आयएमए मधल्या ऑफिसर मेस मधली शिवालीक नावाची रूम माझ्यासाठी राखीव ठेवली होती. फाइल मध्ये माझा तेथला कार्यक्रम दिला होता तो न्याहाळत असतानाच माझ्या गाडीने आयएमएच्या मुख्य द्वारातून आत प्रवेश घेतला. प्रवेश घेतल्या घेतल्या समोर भव्य चेटवोड बिल्डिंगचे विहंगम दृश्य बघायला मिळाले. लाल छोट्या छोट्या विटांनी बांधलेली ती पूर्विची भली मोठी इमारत, गेरुच्या लाल रंगांच्या भिंती, मध्ये मध्ये गोल पांढ-या खांबांचा उठावदार आधार, मोठ्या मोठ्या शिसवीच्या लाकडी खिडक्या, मजल्याची उंची आजच्या दोन मजल्यांएवढी भरेल अशी व छत म्हणून नवीनंच शाकारणी केलेली काळपट रंगाची डौलदार कौलांनी सजलेली ती इंग्रजकाळीन सरंजामी ब्रिटिश थाटाची इमारत १९३० साली रसेल साहेबांच्या देखरेखीखाली बांधली गेली होती. ही इमारत भारतीय सैन्य प्रबोधीकेचे गर्भगृह आहे. ह्या इमारतीचे नाव फील्ड मार्शल सर फिलिप चेटवोड ह्या आयएमएच्या संस्थापकांचे स्मरण राहावे म्हणून ठेवले गेले आहे. चेटवोड साहेबांनी त्या वेळची इंडियन मिलिटरी एकॅडमी वाढवली. १९३० साला पासून ह्या इमारतीच्या मध्यभागी असलेल्या उंच मनो-यावरचे मोठे घड्याळ पासिंग आऊट परेड बघत आले आहे. ह्याच चेटवोड हॉलच्या पुढच्या भल्या थोरल्या ड्रिलस्क्वेअरवरून फील्डमार्शल मानेकशॉ ह्यांचा पाहिला कोर्स पास आऊट झाला होता. ह्या हॉलच्या मुख्य द्वारावर फील्ड मार्शल सर फिलीप चेटवोड ह्यांचे वाक्य कोरले आहे जे प्रत्येक पासआऊट होणा-या जंटलमन कॅडेटच्या छातीवर कोरले जावे अशी आशा आयएमएचा प्रत्येक कमांडंट करत असतो. ते हे आयएमएचे व भारतीय सेनेचे ब्रीद वाक्य



“The safety, honour and welfare of our Nation comes first, always and every time.



The honour, welfare and comfort of the family you belong to come next.



Your own ease, comfort and safety come last, always and every time.”



माझी गाडी ऑफिसर्स मेस मधल्या माझ्या शिवालीक ह्या खोली जवळ पोहोचली तसे लागलीच कोणीतरी दार उघडायला पुढे झाले. सामान रूम मध्ये ठेवले गेले. माझा येथला पहिलाच दिवस असल्या कारणाने मी गणवेश चढवला व चेटवोड हॉल मधल्या एडज्युटंटच्या आलिशान ऑफिसमध्ये दाखल झालो. एडज्युटंटने चहा बोलावला व माझ्या प्रवासा बद्दल चौकशी केली.....



मी त्या दिवशीचे काम आटोपून माझ्या रूमवर संध्याकाळी दाखल झालो. १३१ व्या कोर्सच्या पासिंग आऊट परेड जिला थोडक्यात पिओपी असे संबोधले जाते त्या पिओपी साठी मी आलो होतो. २० वर्षांपूर्वी मी ८४ व्या कोर्समधून पास आऊट झालो होतो. वीस वर्षांपूर्वीची आयएमए व माझे जंटलमन कॅडेट म्हणून तेथील वास्तव्य क्षणार्धात माझ्या मनःपटलावर उमटले. असे वाटत होते की मी अजून जंटलमन कॅडेटच आहे व माझीच पिओपी आहे.



गाडी डेहराडून स्टेशनावर थांबली. मी जेव्हा प्रवास सुरू केला होता नेमके तेव्हाच माझ्या कडे आरक्षण नव्हते. त्या वर्षी आमच्या कॉलेजचा निकाल नेमका उशीरा लागला होता त्यांतच आयएमए मध्ये निवड झाल्यामुळे मला तडका फडकी रुजू व्हायचे पत्र आले होते. त्यावेळी तत्काळ बुकींग सेवा किंवा इंटरनेट बुकींग असल्या काहीच सुविधा नव्हत्या. डोंबिवलीला रेल्वेची आरक्षण सुविधा नव्हती. कल्याण स्थानकावर जावे लागायचे. मला दादर स्थानका पर्यंत सोडण्यासाठी वडील आले होते. डेहराडून एक्प्रेसच्या जनरल बोगी मध्ये हमालाला पैसे देऊन सगळ्यात वरचा बर्थ पटकावला होता. त्याच बर्थ वर माझी ट्रंक व एक सुटकेस चढवली गेली. वडलांना सांगितल्या नुसार मी पुढचे ३६ तास त्या बर्थवरून हालणार नव्हतो, नाहीतर त्या जनरल बोगीत कोणीतरी माझ्या जागेवर बसले असते.



३६ तासांनी रात्री ८ वाजता डेहराडून आले व मी पायउतार झालो. हमाल शोधला व ट्रंक व बॅग घेऊन स्थानका बाहेर पडलो. आयएमएच्या प्रवेश सूचनांप्रमाणे आम्हाला घ्यायला गाडी येणार होती, त्यामुळे तिला शोधण्याचा पुढचा कार्यक्रम हाती घेतला. बाहेर चांगलाच अंधार पडला होता. नवीन स्थानक व रात्र. स्थानका बाहेर इकडे तिकडे बघितले व हरवलेले चेहरे घेऊन विशीतली काही मुले एके ठिकाणी उभी होती तेथे जाऊन धडकलो. सेनेची हिरव्यारंगाची एक बस उभी होती व एक सेनेतला एक गणवेशधारी, स्वतःच्या डायरीमध्ये आलेल्या मुलांची नावे लिहीत होता. माझे नाव डायरीमध्ये दाखल होतच होते तेवढ्यात एक रुबाबदार सरदारजी आला. गणवेशात नव्हता पण बोलण्या वागण्यावरून कोणी सैन्य आधीकारी असावा असे वाटले. पुढे येऊन आम्हाला म्हणतो –



गाइज,

वेलकम टू द ग्राईंड.

यु ऑल, गेट पॅक्ड इन दॅट बस क्युकली एंड लेटस गो.



आयएमए जॉईन होण्या आधी ब-याच जणांकडून तिथल्या रॅगिंग बद्दल ऐकले होते. त्यामुळे मनात त्याची सुप्त भीती बाळगून होतो. रॅगिंग होतेच हे माहीत असल्या कारणाने ते कधी सुरू होणार ह्या बद्दलची अटकळ लावत बस मध्ये बसलो. रॅगिंग गेल्या गेल्या सुरू होणार की कसे असे हजार प्रश्न. बस मध्ये कोणीच एक दुस-याशी बोलत नव्हते. सगळेच बहुतेक घरच्या विचारात असावेत. मी तरी होतो. त्या वेळेला अजून

एस टी डी दूरध्वनी सुरू झाले नव्हते. मोबाईल्स हे नाव सुद्धा अस्तित्वात नव्हते. घरच्यांना माझे पत्र पोहचल्यावरच कळणार होते माझे सुखरूप पोहोचणे. मी प्रवेश सूचनांचे पुस्तक नजरे समोर न्याहाळत उगाचच बसलो होतो. बाहेरचे बघण्यात काही स्वारस्य नव्हते. आमच्या बसने आयएमएच्या मुख्य द्वारातून आत प्रवेश घेतला. रात्र झाली होती व आयएमए बद्दल काहीच माहिती नसल्याने त्या अंधारात आम्हाला कोठे नेत होते ते काही समजत नव्हते. बस थांबली तसे मी जड मनाने खाली उतरलो. सामान उतरवले. आम्ही अंगणात उभे होतो. अंगण चौरस आकाराचे होते. त्याच्या चहू बाजूने, बैठ्या कौलारू चाळे सारख्या छोट्या छोट्या खोल्या होत्या. वरून बघितले तर कोणाला मध्ये चौकोनी अंगण व भोवताली चारी बाजूने असलेली बैठी चाळ दिसेल. चौरसाची एकेक बाजू, दहा दहा स्वतंत्र खोल्यांची होती. चौरसाच्या प्रत्येक कोप-या मध्ये सार्वजनिक स्नानगृह. आमच्या सिनियर्सने आमचे स्वागत केले. प्रवास कसा झाला विचारले. प्रत्येकाला त्याची त्याची खोली दाखवली. आमच्या साठी अंगणा मध्ये गरम चहाचे स्टीलचे पिप ठेवले गेले होते व बिस्किटे होती. आम्ही चहा प्यायलो व तेथेच थोड्या वेळाने एका टेबलावर जेवण मांडून ठेवले होते ते उभ्या उभ्या पटकन जेवलो व आपआपले सामान घेऊन प्रत्येकाच्या नेमून दिलेल्या खोल्यांत जाऊन आडवे पडलो. घरच्या आठवणीने घशात हुंदक्याची गाठ निर्माण झाली होती. रामाचे नाव घेत घट्ट डोळे मिटून पडून राहिलो. झोप कधी लागली कळलेच नाही. सकाळ झाल्यावर जेव्हा उमगले की आपण कोठे आहोत तेव्हा तर दुःख अनावर झाले, घरची मंडळी आता पुढचे वर्ष भर दिसणार नाहीत म्हणून. वर्षभर सुट्टी नाही असे आमच्या जॉयनिंग इन्स्ट्रक्शन्स मध्येच लिहिले होते.



(क्रमशः)

Sunday, May 29, 2011

पुढे सरकत रहा

पुण्याच्या पिएमटी बस मध्ये जेव्हा मी प्रवास करतो तेव्हा खिडकीवर जागे जागेवर लिहीलेल्या एका सुचनेकडे माझे लक्ष वेधले जाते. पुढे सरकत रहा अशी सुचना दोन्ही कडच्या बाकांमध्ये उभे राहून प्रवास करणा-या प्रवाशांसाठी लिहीलेली असते. ही सुचना मागच्या दारातून येणा-या प्रवाशांना उभे राहायला जागा मिळावी व, पुढच्या दारादून उतरणा-या प्रवाशांना उतरण्याची सुविधा व्हावी अशा साठी असते.

ह्या एका वाक्याने माझ्या विचारांची गाडी बस सुरु होण्या अगोदरच सुरु होते. आपल्या आयुष्या साठी हे वाक्य किती सुचक आहे. वेगवेगळ्या पातळीवरुन बघीतले तर त्यातून केवढा बोध मिळतो.

पुर्णपणे भौतिक अर्थ घेतला तर आपण जे काम करतो, छंद जोपासतो त्यात निपूण होऊन आपल्या प्रतिभेची पुढची पायरी गाठा व मागून येणा-यांना जागा करुन द्या असा होतो. ब-याच लोकांना मागून येणा-याना जागा करुन द्यायचे जिवावर येते, ह्याला कारण की ते जेथे असतात तेथे आता ते स्थिरावलेले असतात. त्यांना रोजचे काम नेहमीचे झालेले असल्या कारणाने ते करण्यासाठी फार श्रम घ्यावे लागत नाहीत. पाट्या टाकावे तसे ते काम करतात. पुढे सरकायचे म्हणजे जेथे ठेवला नसतो तेथे पाय ठेवावा लागतो. ह्या साठी नव्या गोष्टी शिकाव्या लागतात. श्रम करायची तयारी लागते. पुढे सरकून नवे शिकताना मिळणारी अस्थिरता माणसाला बोचते. अस्थिरतेला तोंड द्यावे लागते. नव्या जागेवर आपल्याला कामात आपले कौशल्य दाखवावे लागते. लोकांना आपले काम आवडायला वेळ लागतो व आपला वेळ लोकांना पटवून देण्यात जातो. एक
दुस-यामध्ये नाते जमवायला वेळ लागतो. मेळ बसवायला ब-याच खस्ता खाव्या लागतात. त्यापेक्षा असतो तिथेच राहीलो तर काम येत असल्या मुळे सोपे जाते. झालेल्या ओळखींचा उपयोग कामात होतो व चटकन आपले काम दुस-याच्या नजरेत भरते. त्यामुळेच खुप वेळा माणूस आहे त्याच जागेवर पाय रोवून ठेवतो व मागच्याला येऊ देत नाही आपल्या जागेवर. काही लोकंतर स्वतः पुढे सरकत राहतात पण मागच्याला तरी सुद्धा पुढे येऊ देत नाहीत.

पारमार्थिक अर्थ अगदी सरळ, सोपा व साधा आहे. पुढे सरकत रहा. आपण पुढे सरकत राहून राहीलेल्या आयुष्यात आपल्या असलेल्या चित्ताच्या पातळीतून पुढच्या पातळीत सरकत रहावे. आज जर आपण मद, मत्सर, लोभ, भेद ह्याने ग्रासलो असू तर पुढे सरकून हे जड दगड धोंडे मागे ढकलून द्यावेत म्हणजेच चित्त शुद्धीच्या पाय-यांवर पुढे सरकत रहावे. असे म्हणतात चित्ताच्या जागरुकतेत प्राणीमात्रांमध्ये मनुष्यजन्म ही खुप वरची पायरी आहे. पण मनुष्य जन्मात सुद्धा चित्ताच्या जागरुकतेच्या पातळ्या आहेतच की. त्या पाय-या चढून पुढे सरकत आत्मशुद्धीची अंतीम व परमोच्च पायरी गाठायच्या ध्येयाचे बिज पुढे सरकत रहा ह्यात लपलेले आहे.

कधी कधी ट्रॅफिक जॅम मध्ये फसल्या प्रमाणे आपले आयुष्य होते. ट्रॅफिक जॅम मध्ये अडकलेले असतो तेव्हा ज्या वाहनात आपण प्रवास करत असतो त्या वाहनात असलेल्या शक्तीचा तो जॅम फोडायला काही जसा उपयोग होत नसतो. नाईलाजाने जॅम मध्ये अडकलेल्या वाहन चालकाला ट्रॅफिक प्रमाणे जॅम सुटे पर्यंत हळू हळू वाहन हाकत पुढे सरकत रहावे लागते. तसेच आपल्या आयुष्याचे आहे. ट्रॅफिक जॅम मध्ये फसल्या मुळे संथ गतीने गाडी हाकावी लागते तसेच विपरीत परिस्थितीत स्वतःची कितीही प्रतिभा असली तरी तिला फुलोरा येत नाही. त्या वेळेला सुद्धा पुढे सरकत रहा हे वाक्य उपयोगी पडते. जॅम संपे पर्यंत हळूहळू पुढे सरकत राहण्यातच शहाणपण असते. नाहीतर पुढच्याला धक्का तरी लागतो, किंवा मागच्याच्या शिव्या तरी झेलाव्या लागतात. अशा वेळेला आयुष्याची साडेसाती संपे पर्यंत असेच संथ गतीने पुढे सरकत राहीलेले बरे असते. मोठे अपघात होत नाहीत ट्रॅफिक जॅम किंवा चाकोरी बद्ध आयुष्यात – अनंत फंदींनी त्यांच्या फटक्यात म्हटलच आहे -
 बिकट वाट वहिवाट नसावी , धोपट मार्गा सोडू नको, संसारामधि ऐस आपुल्या , उगाच भटकत फिरू नको ||

Monday, February 21, 2011

२० वर्ष - विस्थापीत काश्मिरी हिंदू – भाग ४ (अंतीम)





(१९८९ मध्ये काश्मीरच्या हिंदूंना अतिरेकी संघटनांनी पत्रके वाटून - खोऱ्यातून बाहेर जा - अशी ताकीद दिली व त्या वेळी हजारोंच्या संख्येने काश्मिरी हिंदू खोऱ्यातले पिढ्यांपिढ्यांचे त्यांचे घरदार सोडून जम्मू व दिल्ली ला निघून गेले. हा एक प्रकारचा होलोकास्टच त्यांनी अनुभवला................ वाचा २० वर्ष - विस्थापित काश्मिरी हिंदू – भाग १)



(आमच्या बॅच मध्ये सुनील खेर नावाचा काश्मिरी जिसी होता. आमच्या सारखाच तो ही एक कॅडेट. अधिकारी होण्याच्या प्रतीक्षेत दिवस मोजत. त्याला वडील नव्हते. तो आणि त्याची आई, बारामुल्ला जवळच्या सोयीबुक ह्या गावात राहायचे. त्यांची छोटी हवेली होती तिथे. त्याचे वडील काश्मीर खोऱ्यात एका दैनिकाचे संपादक होते. एक दिवस ते त्यांच्या कचेरीतून परत आलेच नाहीत.......... वाचा २० वर्ष - विस्थापित काश्मिरी हिंदू – भाग २)



(चार दिवस होऊन सुद्धा आला नाही त्यामुळे आम्ही काळजीत होतो. तो कोठे असेल आता, येईलका परत. परत आयएमएत आला तर त्याचे कायहोईल. आम्हाला त्याचा तो निग्रही चेहरा आठवून आम्हाला वारंवार वाईट वाटत होते. आठ महीने एकत्र रगडा खाल्लेले आम्ही. एकमेकांचे जिवाभावाचे मित्र झालो होतो........... वाचा २० वर्ष - विस्थापित काश्मिरी हिंदू – भाग ३)



आम्ही घर सोडताना माझ्या वडीलांचे श्री माटू नावाचे एक जवळचे मित्र भेटायला आले होते. त्यांच्या डोळ्यात पाणी होते. म्हणाले मी आज माझ्या मित्रासाठी काही करू शकत नाही. आम्हीच ठरवले होते की त्यांच्या कडे रहायचे नाही. आमच्या शेजारच्या वाखलू कुटूंबाला जेव्हा काश्मीर सोडून जायला सांगीतले होते तेव्हा ते काश्मीर सोडून जाण्या ऐवजी त्यांचे राहाते घर सोडून त्यांच्या आप्तेष्टांकडे राहायला लागले होते. पण काहीच दिवसात त्यांच्या आप्तेष्टांसकट त्या संपूर्ण कुटूंबासच प्राणास मुकावे लागले होते. माटू अंकलने आम्हाला जम्मू मधल्या मूठी नावाच्या विस्थापितांच्या शिबिरात जायचा सल्ला दिला. माटू अंकल म्हणाले, काय माहिती, काही दिवसांने मला पण तेथेच जावे लागेल. आमच्याकडे खोऱ्यातले घर सोडून दुसरे कोठचेच राहाण्याचे ठिकाण नव्हते. निघायच्या आधी घरात वडलांकरता एक चिठ्ठी लीहून ठेवली. माझी आई जवळ जवळ बत्तिस वर्ष त्या घरात राहीली होती. मी वीस वर्ष. त्या घराची भिंतीदारे बोलायला लागली होती. आज तेच घर आम्ही सोडून चाललो होतो. त्याघरात परत जाऊ शकू का त्याला कायमचे मुकू हे माहित नव्हते. घर परत बघायला मिळेल की नाही. मिळालेच तर किती वर्षाने आणि कोठच्या स्तिथीत. काहीच कल्पना नव्हती. आईसाठी मी गरम गरम कहावा केला. आमचा तो तेथला शेवटचा कहावा. रोज सकाळी आईला बाहेरच्या खोलीत बसून कहावा प्यायची सवय होती. आईने व मी घराला न्याहाळले. आईला रडू आवरत नव्हते व माझ्या घशात हुंदक्याचा गोळा जमून दुखायला लागला होता. आम्ही एकमेकांच्या हातावर चमचाभर विरजलेले दही दिले. घराला कुलूप ठोकले व बाहेर पडलो. मला आईचे खुप वाईट वाटत होते. ती शिबिरात गेल्यावर स्वतःला कशी सावरेल ह्याची कल्पनाच करवत नव्हती. एक टॅक्सी करून थेट जम्मूला पोहोचलो.



आम्ही मूठी शिबिराच्या दाराशी येऊन धडकलो. एका जुन्या सरकारी गोदामाचे तात्पुरते शिबिर केले होते. आम्हाला एक खोली देण्यात आली. माझी आई एकटी होती म्हणून एक खोली तरी मिळाली. नाहीतर कुटूंबच्या कुटूंब ताडपत्रीच्या टेंट मध्ये राहताना मी बघीतले. मला तशा परिस्थीतीत सुद्धा आयएमएतल्या टेंट बांधायला शिकवायच्या कॅम्पची आठवण आली. आम्ही आयएमएत होतो व सैन्यातली नोकरी करण्यासाठी आलो होतो. आम्हाला शिकवतात टेंट मध्ये राहायला ते यद्धजन्य परिस्थीतीशी तोंड देण्यासाठी. वाईट ह्याचे वाटते की, येथे आपल्याच देशातल्या आपल्याच लोकांना त्यांचा प्रदेश सोडून कडाक्याच्या थंडीत टेंट मध्ये राहायला लागत होते. राज्यकर्त्यांना जर असे राहावे लागले असते तर ह्या प्रश्नाकडे पाहाण्याच्या त्यांच्या दृष्टीकोनात निश्चित बदल झाला असता. आपल्याच देशात आपणच पोरके. देव करो आणि येथे पदोपदी तुडवला जात होता तसा कोणाचा स्वभिमान पायतळी तुडवला जाऊ नये. मी आईला सोडले. शिबिरातल्या खानावळीत कहावा घेतला व परत जायला निघालो. आजचा चवथा दिवस होता. पोहोचायला अजून एक दिवस लागणार होता. माझ्या डोळ्या पुढे आता पुढची आयएमएतली लढाई दिसत होती. आईला एवढेच सांगीतले होते की मला जायला पाहीजे नाहीतर कोर्स बुडेल. काय सांगू अजून. आईचे दुःख काय कमी होते. त्या कॅम्प मध्ये एकटे रहायचे. इतक्या वर्षाचे स्वतःचे घर एका दिवसात सोडून, आपल्या सगळ्या जवळच्यांना सोडून येथे परक्या जागेत नवीन घर तयार करायचे. एक प्रकारचा वनवासच हा. बरेच विस्थापित मनोरुग्ण झाले ते ह्याच परिस्थिती मुळे. माझी आई खोऱ्यात शिक्षिका होती त्यामुळे ती मूठी शिबिरातल्या शाळेत शिकवायला लागली. तीने स्वतःला सावरून घेतले. आई येणाऱ्या डिप्रेशनशी कामात मग्न होऊन लढू शकली. एका अर्थाने ते बरेच झाले नाहीतर मी एवढ्या लांबवर राहून काहीच करू शकलो नसतो. बाकीच्यांचे काय हाल झाले असेल इश्वरच जाणे.



मी परत आयएमएत परतलो. माझ्या दिलेल्या सुट्टीच्या तब्बल २४ तास उशीरा. सकाळच्या पिटी परेडला हजर झालो. मला पिटी परेड मधून बाहेर काढून डि एस ने आपल्या ऑफिस मध्ये बोलावले. म्हणाला तु माझा दिलेला शब्द पाळला नाहीस. तूझे सैन्याच्या नियमांनुसार ओव्हर स्टेइंग ऑफ लिव्ह झाले आहे. उशिरा येणाऱ्याला आर्मी मध्ये कडक शिक्षा असते. तुझी केस आता माझ्या हातात नाही. तुला बटालियन कमांडर कडे जावे लागणार आहे. मी, डि एस गिलला मुठी कॅंप मध्ये आईला दाखल केले त्याची कागदपत्रे दाखवली. ती त्याने बघीतली पण त्याचा फार काही उपयोग झाला नाही. आयएमए मधल्या नियमांनुसार उशीरा आलो हा गुन्हा हातून घडलाच होता व त्यासाठी काही अपील नव्हते. त्याच्या साठी होणारी शिक्षा भोगावीच लागणार होती. आपल्याकडे नियमांविरुद्ध अर्ज करणे व नियम का पाळला नाही त्याला कारणे देणे आपल्यात भिनले आहे. नियम फक्त दुसऱ्यांसाठी असतात असे प्रत्येकाला वाटत राहाते. आपल्यावर नियमा प्रमाणे वागण्याची वेळ येते तेव्हा कारणे सुचतात व सुचलेली कारणे किती उचीत आहेत ह्याचे महत्व दुसऱ्याला पटवले जाते. मग नियमाचे उल्लंघन करायला आपण मोकळे होतो. गंमतीची गोष्ट अशी की आपले काम झाल्या झाल्या आपण त्याच नियमाचे समर्थन करायला सुरवात करतो व दुसऱ्याने नियमाने कसे वागले पाहिजे ह्याचे धडे देण्यास लागतो. ही सवय बरोबर नाही ह्याची कल्पना आयएमए करून देते. नियम न पाळणे ह्यात काही शहाणपण नाही. माणसाचे थोरपण तेव्हाच कळते जेव्हा तो नियम पाळून यशस्वी होतो. जर नियमांचे उल्लंघन झाले तर त्याला असलेली शिक्षा भोगाविच लागते त्या विरुद्ध अर्ज करण्याचा काही फायदा होत नाही व अर्ज करण्याची सवय पण तितकीच वाइट आहे हे ही आयएमएत नियमांचे काटेकोर पालन करायला लाउन उदाहरणाने शिकवले जाते.



कंपनी कमांडर कडे गेल्यावर त्याने मला सांगीतले की माझ्या कडून चार दिवसाच्या सुट्टीचे उल्लंघन झाले आहे व आयएमएच्या नियमांनुसार शिक्षा होऊ शकते. आता निर्णय बटालियन कमांडर व उपकमांडंट ह्यांच्यावर अवलंबून आहे. जेव्हा कंपनी कमांडर मेजर शेखावतने उपकमांडंटचे नाव घेतले तेव्हाच मी समजून चुकलो की माझ्या रेलीगेशनचा किंवा मला काढून टाकण्याचा विचार चालला आहे. कारण रेलीगेशनचा निर्णय व आयएमएतून काढून टाकायचा निर्णय बटालीयन कमांडर व उपकमांडंट दोघे मिळून घेतात. बटालियन कमांडर माझ्यावर आधीच नाराज आहेत ह्याची कल्पना होतीच. उपकमांडंटचा निर्णय बराचसा बटालियन कमांडर च्या शिफारसीवर अवलंबून असतो.



संध्याकाळी मला हॅकल ऑर्डर मध्ये बटालीयन कमांडर कडे नेण्यात आले. शिक्षा होणाऱ्या जिसीला हॅकल ऑर्डर मध्ये जावे लागते. हॅकल ऑर्डर मध्ये आयएमएचा पोषाख घालायचा व बॅरे वर लागलेल्या आयएमएच्या बिल्ल्यावर लाल पिसांचा तुरा खोवायचा. ह्या पोषाखात जिसी एकदम रुबाबदार दिसतो. आयएमएत डोक्यावर घालतो त्या टोपीला बॅरे म्हणतात. बॅरेवर लावायचा पिसांचा तुरा आयएमएच्या शॉपिंगसेंटरवर मिळतो. प्रत्येक जिसीकडे तो असतो. जेव्हा शिक्षेसाठी जावे लागायचे त्यावेळेला हा तुरा खुपसावा लागायचा. असा तुरा खुपसलेला जिसी दिसला की समजावे की काहीतरी चूक जिसीच्या हातून झालेली आहे व तो कोणत्या शिक्षेसाठी तरी जात आहे नाहीतर शिक्षा सुनावणीसाठी तरी जात आहे. आयएमएतल्या शिक्षा सुद्धा अजब असायच्या. प्रामुख्याने बजरी ऑर्डर, २८ डेज, पट्टी परेड, हॅकल ऑर्डर, मंदिर दाये छोड, चिंडिट ऑर्डर अशा विचित्र नावांच्या त्या शिक्षा.



बजरी ऑर्डर मध्ये अंगावरच्या रुट मार्चच्या पॅक्स मध्ये सामाना ऐवजी टॉन्स नदीच्या किनाऱ्यावरली वाळू व गोटे भरावे लागायचे. मागे भदराज कॅंपच्या वेळेला वर्णन केलेला पंधरा किलो वजनाचा पॅक असे गोटे भरल्या मुळे चांगला तीस चाळीस किलो वजनाचा भरायचा. मग असा वाळूने म्हणजेच बजरीने भरलेला पॅक घेऊन उभे रहायचे किवा काही अंतर चालावे लागायचे. ते शिक्षा देणाऱ्याच्या मर्जीवर अवलंबून असायचे. पाठीची अक्षरशः वाट लागायची त्या शिक्षेत. मणक्याला ते टॉन्स नदी मधले गोटे टोचत राहायचे. ह्याच पॅक मध्ये बजरी ऐवजी जर कॅंपचे सामान घातले तर त्याला चिंडीट ऑर्डर म्हणायचे. ह्या चिंडीट ऑर्डरचा पॅक जरा मोठा असायचा. कांबळे, मछरदाणी, खायचा डब्बा, दाढीकरायचे सामान, विजेरी, खायचे सामान इत्यादी सगळ्या मिळून पन्नास गोष्टी भराव्या लागायच्या. तपासनी मध्ये एकही गोष्ट कमी आढळली की अजून शिक्षा वाढायची. दुसऱ्या महायुद्धात चिंडीट नावाची एक स्पेशल फोर्स ब्रिगेडीयर विनगेटने तयार केली होती. ब्रह्मदेशातल्या मंदीरांचा –चिंथे- नावाचा राखणकरणारा देव आहे असे तेथिल लोकांचे मानणे. त्यावरून त्या स्पेशल फोर्सला चिंडीट हे नाव पडले. स्पेशल फोर्सेसना ब्रह्मदेशातल्या इरावडी नदी पार करायला जंगलातून व नद्या नाले पार करण्यास उपयुक्त असे सामान घेऊन जावे लागले होते. त्या मुळे चिंडीट ऑर्डर मध्ये अशा प्रकारचे सामान बांधलेले असते. आयएमएत चिंडिट ऑर्डरचा अर्थ हे सगळे सामान मोठ्या पॅक मध्ये बांधायचे व निर्देशवल्या ठिकाणी हजर रहायचे. ह्या शिक्षेनी तसे सामान बांधण्याची सवय होते. पट्टी परेड म्हणजे पटापट वेगवेगळे पोषाख बदलायचे. प्रत्येक पोषाख बदलायला दोन मिनिटे मिळायची. आयएमएतले पोषाख तरी किती प्रकारचे असत. एक पोषाख पिटी परेड साठी. ड्रिल साठी वेगळा. आयएमएतल्या क्लासेस साठी वेगळा. शस्त्रांचे शिक्षण (विपन ट्रेनिंग) साठी वेगळा, मुफ्ती ड्रेस जो संध्याकाळच्या जेवणासाठी आसायचा तो वेगळा. असे ८ – ९ प्रकारचे पोषाख. संध्याकाळच्या वेळेला जेव्हा बाकीचे जिसी अभ्यासाला बसायचे त्यावेळेला ही पट्टी परेड चालायची. मंदिर दाये छोड ही गमतीदार शिक्षा असायची. डि एस एखादे लांबवर दिसणारे मंदीर, जिसीला बोटाने दाखवायचा व म्हणायचा त्या मंदिराला शिवून ये. मग जिसी दुरवर दिसणाऱ्या त्या मंदीराच्या दिशेने पळत जायचा व मंदीराची प्रदक्षिणा घालून यायचा. अगदी स्टिपल चेस मध्ये जसे पळावे लगाते तसेच. कोठचे मंदीर दाखवायचे ते डि एसच्या मनावर अवलंबून असायचे. कधी कधी ते मंदीर दोन किलोमीटरवर असायचे कधी कधी डि एस खुप चिडला असेल तर पाच किलोमीटर दूर असलेल्या मंदीराकडे बोट दाखवायचा. ह्यात सगळ्यात सोपी शिक्षा हॅकल ऑर्डरच असायची. अजून एक शिक्षा होती जी सगळ्यात कठीण व कठोर अशी मानली जायची. त्यात ह्या शिक्षेस पात्र जिसी साठी वेगळे वेळापत्रक केलेले असायचे. त्यात आत्ताच वर्णन केलेल्या सगळ्या शिक्षा दिवसभरात केव्हा ना केव्हा वेळापत्रकाप्रमाणे कराव्या लागायच्या. जिसी हे सगळे करता करता अगदी जेरीला यायचा. ह्या शिक्षे मध्ये जिसीचा दिवस सकाळी चार वाजता सुरू व्हायचा – सकाळी चार वाजता जिसी, ड्रिलस्क्वेअरवर हॅकल ऑर्डर मध्ये रिपोर्ट करायचा. तशात आयएमएतली अंतरे एवढी लांब लांब असायची कि ड्रिलस्क्वेअर दोन तीन किलोमीटर दुर असायचे. सायकल वरून जायला लागायचे. हे झाल्यावर मग जेवणा पर्यंत जिसीचा नेहमीचा ठरलेला दिनक्रम बाकीच्या आयएमएच्या वेळापत्रकाप्रमाणे चालायचा. दुपारी जेव्हा बाकीचे जिसी एक तासाची विश्रांती घ्यायचे त्या वेळात ही शिक्षा झालेला जिसी एक्स्ट्रॉ ड्रिल – ड्रिलच्या पोषाखात करायचा. परत दुपारी बाकीच्या जिसीज बरोबर गेम्स परेड चालायचीच. संध्याकाळी स्मॉलपॅक लाऊन व रायफल घेऊन बॅटल ऑर्डर मध्ये ५ किलोमीटरची दौड लागायची. त्यानंतर संध्याकाळी ६ वाजता परत ड्रिलस्क्वेअर वर हॅकल ऑर्डर मध्ये रिपोर्ट द्यावा लागायचा. संध्याकाळी बाकीच्या जिसीजना अभ्यासासाठी जेव्हा वेळ मिळायचा त्या वेळेला ह्या शिक्षेत जिसी रात्रीच्या चिंडीट ऑर्डरची तयारी करायचा. रात्री अकरा वाजता अशा जिसीला चिंडीट ऑर्डर मध्ये ड्रिल स्क्वेअरला रिपोर्ट करावे लागायचे. रात्री अकरा वाजता त्याच्या पॅक मधले सामान चेक व्हायचे. छोट्या छोट्या अशा पन्नास गोष्टी असायच्या आणि एकही गोष्ट ठेवायची राहिली की मग अशी शिक्षा अजून एका दिवसाने वाढायची. हा ह्या कठोर शिक्षेचा अजून एक नियम. असा हा खास वेळापत्रकाने बांधलेला ह्या कठोर शिक्षेचा एक दिवस. किती दिवस अशी शिक्षा झेलायची ते जिसीच्या चूकीवर अवलंबून असे. परेडला लेट आला तर साधारण तीन दिवस अशी शिक्षा मिळायची. पोषाख वाईट असेल तर एक दिवसाची ही कठोर शिक्षा मिळायची. गंमत अशी की शिक्षा करताना जर काही चूक झाली तर मागे सांगितल्या प्रमाणे शिक्षेत हळू हळू वाढ व्हायची. एका टर्म मध्ये जिसीला जर अशी कठोर शिक्षा मिळून अठ्ठाविस दिवसा पेक्षा जास्त दिवस झाले तर त्याचे आपोआप रेलीगेशन व्हायचे. सगळ्यात कठोर अशी ती शिक्षा असायची व साधारण जिसीला एका वेळेला दहा दिवसा पेक्षा जास्त ही शिक्षा मिळायची नाही. त्या मुळे ह्या कठोर शिक्षेचा हिशोब प्रत्येक जिसी ठेवायचा व आपले वर्तन सांभाळायचा.



रेलीगेशन होते की आपल्याला आयएमएतूनच काढून टाकले जाणार ह्या पैकी काय कानावर पडणार ह्या विचारात मी हॅकल ऑर्डर मध्ये बटालीयन कमांडरच्या ऑफिसच्या पोर्च मध्ये उभा होतो. माझा पोषाख ठिक आहे का हे कॅप्टन गिल स्वतः जातीने बघत होता. छान खोचलेला शर्ट, बेल्टच्या वर फक्त तीन बटणे दिसली पाहिजेत म्हणजे छान दिसतो पोषाख. तसा आहे ह्याची खात्री करत मला धिर देत होता कॅप्टन गिल. ड्रिलचे नाळ लावलेले पॉलीशने लख्ख चमकावलेले जोड्याचे पुढचे काळे टोक, मी माझ्या रुमालाने हलकेच साफ केले. हॅकल लावलेली बॅरे डोक्यावर चापून बसवली. बॅरेची कपाळावर बसणारी पट्टी आणि भुवया ह्यात तीन बोटांचे अंतर आहे हे सुनिश्चीत केरून मी तयारीत उभा राहिलो. तेवढ्यात सुभेदारमेजरचा खडा आवाज माझ्या कानावर आदळला. साsssव धान. जिसी सुनील खेर आगे चलेगाssssss तेज चल. जसा मी बटालियन कमांडरच्या ऑफिसात टेबला पुढे संचलन करत पोहोचलो तसा मागून पुन्हा आवाज आला. जिसी सुनील खेर sssss......... थम १ २. मी सावधान मध्ये उभा राहीलो. सुभेदारमेजरचा पुन्हा आवाज जिसी सुनील खेर सॅल्यूट १ २. माझ्या बरोबर शेजारी उभ्या असलेला कॅप्टन गिलने पण बटालियन कमांडरला त्याच तालावर सॅल्यूट केला.



सुभेदारमेजरने खड्या आवाजात माझा गुन्हा म्हणून दाखवला. नं ३८९७ जिसी सुनील खेर चार दिनकी छुट्टीपर गया था। छुट्टीके बाद एक दिन देरीसे उसने रिपोर्ट किया है। आर्मी एक्ट ३२ के मुताबिक जिसी सुनील खेर एक दिन बिना छुट्टी लिये छावनीसे बाहर था। सजा के लिये हाजिर है।



हे ऐकून बटालियन कमांडर करड्या आवाजात म्हणतो - जिसी सुनील खेर, यु वेअर एब्सेंट विदाऊट लिव फॉर वन डे. एज पर आर्मी एक्ट ३२ यु आर गिल्टी. डु यु प्लिड गिल्टी.



मी म्हणालो - येस सर.



बटालियन कमांडर - फॉर युअर एक्ट ऑफ धिस यु आर गिवन अ पनिशमेंट ऑफ २८ डेज. सुभेदारमेजर मार्च हीम ऑफ.



मला मागून सुभेदारमेजरचा आवाज आला. जिसी सुनील गाडरू सॅल्यूट १ २. पिछेssss मुड......... जिसी सुनील खेर आगेसेssssss तेज चल. बाकीची कवायत एका यंत्रा सारखी मी करत होतो. लांबवर कोठे तरी अजून बटालियन कमांडरचा आवाज कानात घुमत होता. – २८ डेज. २८ दिवसांची कठोर शिक्षा. सगळ्यात कठोर वाटणारी ती शिक्षा ऐकून कोणा जिसी वर आभाळच कोसळले असते पण मला एकदम हूरुप आला. माझ्या आनंदाला पारावार राहीला नाही. माझे रेलीगेशन सुद्धा झाले नव्हते मग आयएमएतून काढून टाकणे राहिले बाजूला. बटालियन कमांडरनेच माझी तशी शिफारिश केली असणार उपकमांडंट कडे. मनातल्या मनात मी बटालियन कमांडरला धन्यवाद दिला. माझ्या मित्रांना ही बातमी कधी सांगतो असे झाले. आईला ह्यातले काहिच माहित नव्हते त्या मुळे सांगायचे असे काहीच नव्हते. आज रात्री शिक्षेवरून आल्यावर आईला पत्र लिहिणार होतो आमच्या नव्या पत्त्यावर – श्रीमती इंदूकुमारी खेर, नं २६७५, मूठी विस्थापित शिबिर, फेज

२, जम्मू १८११२४.

२० वर्षा नंतर –



आपणाला जर जाणून घ्यायची इच्छा असेल की आज सुनील खेर आणि त्याचा

परिवार कोठे आहे तर वाचा....



जिसी सुनील खेर आता कर्नल सुनील खेर झाला आहे. पुण्यात एक छोटा दोन

खोल्यांचा ब्लॉक आहे. जेव्हा त्याची पोस्टींग फिल्ड मध्ये असते तेव्हा त्याची आई तिथे राहाते. वडील परत कधी भेटलेच नाहित. इतर वेळेला आई त्याच्या बरोबर राहते. गेल्या वीस वर्षात काश्मीर मधिल घरात ते कधी गेले नाहीत. कमीशन मिळाल्यावर काश्मीर मध्ये त्याची पोस्टींग दोनदा झाली. तरी सुद्धा. एकदा पोस्टींगवर असताना हेलीकॉप्टर मधून त्याने त्याचे घर बघितले होते. दुसरेच कोणी तरी राहाते त्यात आता. त्याचे काश्मीर सुटले पण त्या आठवणी व तो कडवटपणा गेला नाही. असेच काहिसे बाकीच्यांबरोबर झाले आहे. आता काश्मीर मध्ये काश्मिरी हिंदू नगण्य राहिले आहेत. त्यांची घरे, त्यांची स्थावर मिळकत, सारे फस्त झाले आहे. मागे राहिलेत फक्त कटू आठवणी, मानसिक क्लेश व मनोरुग्ण. जम्मू मध्ये आता आठ शिबिरे आहेत व दिल्ली मध्ये साधारण पंधरा जागी शिबिरांसारखे साधारण पस्तीस हजार काश्मिरी कुटूंब राहतात.



(राजाराम सिताराम एक, राजाराम सिताराम दो – ही आय एम ए वर आधारीत कथा लवकरच प्रसिद्ध करत आहे)




Thursday, February 10, 2011

२० वर्ष - विस्थापीत काश्मिरी हिंदू – भाग ३


जीसी सुनील खेर चार दिवसाच्या सुट्टीवर गेल्या पासून परत आला नव्हता. तो गेल्या पासून आजचा पाचवा दिवस होता. आम्ही काळजीत होतो. तो कोठे असेल आता, येईल का परत? सुट्टी वरून उशीराने परत जरी आला तरी आय एम ए च्या नियमानुसार त्याचे काय होईल? त्याचा तो निग्रही चेहरा आठवून आम्हाला वारंवार वाईट वाटत होते. आठ महीने एकत्र रगडा खाल्लेले आम्ही जीसी, एकमेकांचे जिवाभावाचे मित्र झालो होतो. त्यातून तो आमच्याच बटालियनचा, आमच्याच कंपनी मधला व आमच्याच प्लटूनचा. मला दोन गोष्टींची काळजी लागून राहीली होती. तो परत येईल का, व तो त्याच्या आईला कोठे सोडणार – त्याची आई घर सोडून कोठे जाइल, कोठे राहील व तीचे कसे होईल.

कोणाला जर का फर्मावले की, तुमचे राहाते घर तडकाफडकी खाली करा व चालते व्हा तर काय वाटेल त्या कुटूंबाला? कोठे राहतील, कसे होईल? त्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम होईल? कोणाच्या आयुष्यात भोगाव्या लागणाऱ्या अशा अचानक घडामोडी पाहील्या की पुर्व संचित म्हणून काही असते का असा विचार डोकावून जातो. वाटते, आपण असतो तर त्यांच्या जागी? त्यांनाच का ही पिडा? जी लोकं संचित मानत नाहीत, ते अशा घडामोडींकडे कसे पाहतात? लॉटरी लागण्या एवढी निसर्गात ही प्रोसेस रॅन्डम असते असे जे संचीत मानित नाहीत ते सुचीत करतात. संचीताला अंधश्रद्धा म्हणून त्याविरुद्ध बोलत राहतात. अंधश्रद्धा मानू नये हे खरे आहे. पण कोणती गोष्ट अंधश्रद्धा मानावी व कोणती नाही हे कोण ठरवणार? डोळस श्रद्धा असते का? का श्रद्धा हाच एक भंपकपणा आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे संचित म्हणजे अंधश्रद्धा मानणाऱ्या लोकांना जर स्वतः उद्या अशा परीस्थीतीला तोंड द्यावे लागले तरी ते निसर्गातील एक रॅन्डम प्रोसेसचा भाग आहे असे समजतील का त्या वेळेला सोयीने त्यांच्या दृष्टीकोनात फरक येईल? ह्याचे उत्तर मी अजून शोधत आहे. संचित जर नसेलच तर अशा घटनांना निसर्ग नियम म्हणून आपण विषय संपवू शकतो का. अशा घटना काहींनाच का भोगाव्या लागतात ह्या प्रक्रियेला काही नाव व कारण देऊ शकतो का.

सुनील खेर गेल्या पासून आमच्या डोक्यात एकच विषय – त्याचे काय झाले व आय एम एत परतला तर काय होणार.

आमच्या रोजच्या कार्यक्रमात सुनील गेल्याने काही बदल झाला नाही. नाही म्हणायला आमचा डि एस कॅप्टन गिल आम्हाला सांगून गेला होता की सुनीलच्याबद्दल काहीही माहीती समजल्यास त्वरीत कळवा. सुनील सुट्टीवर गेल्याच्या सहाव्या दिवशी जीसी सुनीलच्या खोलीत आम्हाला दिवा लागलेला दिसला. आमच्या जिवात जीव आला. आम्ही पि टी परेड ला जायच्या आधी त्याला भेटलो. कॅप्टन गिलनी निरोप पाठवला की जीसी सुनीलला आठ वाजता कंपनी कमांडरने त्याच्या ऑफीस मध्ये बोलावले आहे. आम्हाला त्याच्याशी बोलून गेल्या सहा दिवसांचा हिशोब घ्यायला वेळच नव्हता. तो आम्ही संध्याकाळसाठी सोडला, व आम्ही पि टी परेडला गेलो. त्याचे रेलीगेशन होणार का त्याला काढून टाकणार अशा अटकळी लावे पर्यंत संध्याकाळ झाली. जीसी सुनील दिवसभर दिसला नाही. संध्याकाळी जेवायच्या वेळेला भेटला. खुप थकल्या सारखा वाटत होता. पण चिंता कमी झाली होती. आम्ही आतूर होतो त्याच्या दोन्ही गोष्टी ऐकायला. एक तर तो सूट्टीच्या तब्बल २४ तास उशीरा आला होता व त्यामूळे बटालीयन कमांडरने त्याचे काय केले हे ऐकायचे होते व दूसरे त्याच्या आईचे काय झाले, सुखरुप आहे का कशी आहे. ह्या दोन्ही गोष्टी ऐकूया त्याच्याच शब्दात...............



ज्या दिवशी भदराजवरून आल्यावर मला आईची तार मिळाली व त्या नंतर सुट्टी मिळत नाही असे कळले तसा मी खुप उदास झालो. कर्नल कटोच ह्यांचा भयंकर राग आला होता. आईची आठवण येत होती. काळजी लागली होती. कशातच लक्ष लागत नव्हते. डोक्यात गोंधळ उडाला होता. संध्याकाळ झाली तसा एक एक क्षण एक तासा सारखा जाणवत होता. शांत राहा, १ ते १० मोजा, उलटी गिनती करा, देवाचे नाव घ्या, डोळे मिटून स्वस्थ बसा हे सगळे डोके शांत ठेवण्यासाठी करायचे उपाय माहीत असून राहून गेले. हे उपाय करायचे सुद्धा स्वारस्य राहीले नव्हते. मलाच माहीत होते काय परिस्थीती होती खोऱ्यात ती. सगळ्यात वाईट वाटत होते ते कर्नल कटोच ह्यांचा माझ्या सुट्टी मागण्याच्या कारणावर विश्वास बसला नव्हता ह्या गोष्टीचा. खोऱ्यातले वातावरण हळू हळू बदलायला लागले होते. रोज जवळच्या मशिदीतून प्रक्षोभक भाषणे सुरू झाली होती. रोज कोणते न कोणते काश्मिरी हिंदू कुटूंब खोरे सोडून जाण्याचा विचार करत होते व जात होते. तेव्हा आम्हाला काय माहीती होते की काश्मिरी हिंदूंचे खोरे सोडून जाण्याच्या ह्या प्रक्रियेचा शेवट सगळ्यात मोठ्या विस्थापनात होणार आहे ते. ह्या आधी सहादा असे मोठ्या प्रमाणात काश्मिरी हिंदूंचे स्थलांतरण झाले होते. पहीले स्थलांतरण तेराव्या शतकात झाले – सुलतान शमसुद्दीनने मोठ्या प्रमाणात हिंदूं मंदिरांची तो़ड फोड करून हिंदूंना धाक दाखवून पळवून लावले असा इतिहास आहे. १४ व्या शतकात दुसरे व तिसरे स्थलांतरण, सुलतान अली शाहच्या जाचक सुलतानशाहीने उद्भवले. त्याने पहील्यांदा काश्मीर मध्ये हिंदूंवर झिझीया कर सुरू केला. १४ व्या शतकातच पूढे मीर शमसुद्दीन इराकी ह्या नवाबाने जोर जबरदस्तीने हजारो हिंदूंना पळवून लावले. चवथे व सगळ्यात मोठे स्थलांतरण १६ व्या शतकातले. औरंगझेबच्या बादशाहीत झाले. ह्या बादशहाशी लढता लढता शिखांच्या नवव्या गूरुंना गुरू तेग बहादूरांना प्राणाना मुकावे लागले होते. हा औरंगझेबच्या काळातील इतिहास पाहाता असे वाटते की जसे महाराष्ट्राला शिवाजी राजे मिळाले तसे काश्मीरला लाभले असते तर कदाचीत इतिहास काही वेगळा झाला असता. पण काश्मिरी हिंदूंपेक्षा महाराष्ट्रातल्या हिंदूंचे नशिब जास्त बलवोत्तर होते असेच म्हणावे लागेल. पाचवे स्थलांतरण, १७ व्या शतकात मुल्ला अब्दुल ह्याच्या नवाबीत झाले. सहावे स्थलांतरण, अफघाण सुलतांनांच्या क्रूर कारवायांमुळे झाले. १९८९-९० सालातले सातवे स्थलांतरण पाकीस्तानच्या ऑपरेशन टोपूक मुळे होत होते. ते त्यावेळेला आम्हाला अवगत नव्हते. कोणालाच माहीत नव्हते. कोठल्याही देशा पुढील समस्येवर देशातल्या जनतेचा मानसिक दृष्टीकोण बदलायला वेळ लागतो. खुपदा लोकांना समजे पर्यन्त वेळ निघून गेलेली असते. ह्या सगळ्या सहा स्थलांतरांने जे एकेकाळी काश्मीर मध्ये फक्त हिंदूच होते ते कमी होत होत, १९४८ मध्ये फक्त १० टक्के राहीले. हिंदूंची संख्या सातव्या स्थलांतरानंतर १ टक्का राहीली. ज्या समाजाला इतिहासाचा विसर पडला तो समाज संपला हे आम्हाला सातव्यांदा कळणार होते. शेवटी जिसकी लाठी उसकी भैस हेच फक्त सत्य आहे बाकी ह्या कलीयुगात सभ्यता वगैरे सोयीच्या गोष्टी आहेत. आपल्या जवळ ती लाठी का नसते कधी. सभ्यतेखातर आपण लाठी सोडली हे खरे पण त्याचबरोबर दुसरे सोडतात की नाही हे पाहीले नाही. दुसऱ्याने जर लाठी घेतली असेल व आपल्यावर उगारत असेल तर तेवढ्या पुरती तरी आपण लाठी घेतली पाहीजे नाहीतर शतकानुशतके आपण असेच भरडले जाणार. पुर्वी क्रृर सुलतानशाही होती आता एक क्रृर असे शेजारी राष्ट्र आहे.

१९८९ च्या सुरवातीला हिंदूंचे एखाद दुसरे कुटूंब सोडून गेल्याचे ऐकीवात होते. त्यात हळू हळू वाढ होऊ लागली. अतीरेकी प्रेरित हिंदूंच्या स्थलांतराची मोहीम पाकिस्तानच्या ऑपरेशन टोपूक प्रमाणे कशी घडत आहे ती आमच्या लक्षात यायला लागली. अतिरेक्यांचा डाव एकदम चपखल बसला होता. खोऱ्यात तणावाचे वातावरण निर्माण करायचे. कोठच्यातरी गल्लीतल्या एका दोघा तरुणाला किंवा काश्मिरी हिंदूला मारायचे. त्याचे परिणाम लागलीच त्या गल्लीतल्या इतर हिंदूंवर व्हावयाचे. गर्भगळीत अवस्थेत ती गल्लीची गल्ली रिकामी होऊन खोरे सोडून जायची. ह्याच बरोबर सतत मशिदीदतून होणारी प्रक्षोभक भाषणे एक प्रकारचे भयानक तणावाचे वातावरण निर्माण करायचे. त्यात हिंदूना काफिर म्हणवून त्यांच्या विरुद्ध जिहाद पुकारण्याची मुस्लीम जनतेला हाक असायची. खोऱ्यात अशा प्रकारचा तणाव कायम आसायचा. कधी कोणा हिंदूला पळवून धाक निर्माण करायचा. कोणा हिंदूचे घर जाळून त्या गल्लीतल्यांचे मनोधैर्य खच्ची करायचे, असे वारंवार घडू लागले. ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना, राज्याचे प्रशासन दिलासा वाटण्यासारखे काही करत आहे असे आढळत नव्हते. तो विश्वास राहिलाच नव्हता. अतिरेक्यांना फार काही करावे लागायचे नाही. गल्लीतल्या कोणा हिंदूला मारले की गल्लीतले सगळे हिंदू आपले सामान घेऊन पसार व्हायचे. त्यामुळे जर कोणी मानव हत्या किती झाली ह्यावरच फक्त क्रुरता ठरवणार असेल तर मानव हत्या फार झाली नाही. साधारण २५० ते ३०० हिंदूंची हत्या झाली असेल. पण महीलांवर सततचे अत्याचार करून, हिंदूंना पळवून नेउन, धाक धप्पटशहा दाखवून, घाबरवून लोकांच्या मनात भीती उत्पन्न करून स्थलांतरण करायला अनावृत्त केल गेले. वाईट ह्याचेच वाटत होते की पाकिस्तान हे हिंदूंना पळवून लावायचे व इथल्या मुस्लीम जनतेला चिथवण्याचे काम त्यांचे परराष्ट्रधोरण म्हणून ऑपरेशन टोपूकच्या नावा खाली राबवत होता, व आपल्या सरकारला हे समजत नव्हते. इथले मुस्लीम पण जिहादाच्या नावाखाली भरकटून जात होते व काश्मिरी हिंदूंच्या विरुद्ध शस्त्र घेऊन सज्ज होत होते. तशातच कलम ३७० लागू होते. त्यामुळे काश्मिरात एकीकडे कोणाला स्थायिक होता यायचे नाही व दुसरीकडे हजारोंच्या संख्येने असलेले काश्मिरी हिंदू लोकं खोरे सोडून जात होते. त्यामुळे साहजिकच खोऱ्यातल्या काश्मिरी हिंदूंच्या संख्येत घट पडत चालली होती.



संध्याकाळी कॅप्टन गिल माझ्या रुमवर आला. तो म्हणाला बटालीयन कमांडरला अजून सुद्धा वाटते की जीसी रोजच्या आय एम एच्या रगड्यातून काही दिवस सुटण्यासाठी हा कांगावा करत आहे. १९८९ च्या सुरवातीच्या काळात काश्मीरच्या बाहेर काश्मीरच्या स्थितीवर अगदी त्रोटक बातम्या यायला लागल्या होत्या. त्यामुळे काश्मिरी हिंदूंच्या विस्थापना बरोबर उत्पन्न होणाऱ्या अडचणी, काश्मिरी हिंदू कुटूंबियांना झेलावे लागणारे प्रश्न ह्या बिकट परिस्थीतीशी बाकीची जनता अवगत नव्हती. काश्मीर बाहेर राहणाऱ्यांच्या कानावर पडणाऱ्या बातम्यांनी काश्मीर मधली खरी स्थिती किती गंभीर रुप घेत आहे हे त्या लोकांना समजले नव्हते. ह्याचा परिणाम त्यांच्या निर्णयांवर व काश्मीर प्रश्नाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनावर होत होता. माझ्या सुट्टीच्या अर्जात दिलेल्या कारणा बद्दल सुद्धा हेच झाले असावे. बटालियन कमांडरच्या दृष्टीने माझा सुट्टीचा अर्ज अवाजवी होता. ह्या उलट कॅप्टन गिल जरी कठोर होता तरी आमचा प्लटून कमांडर असल्या मुळे आम्हाला रोज सकाळ संध्याकाळ भेटायचा. आमचे प्रश्न तो जाणायचा.

तो मला म्हणाला की - संध्याकाळी बटालियन कमांडरने मला परत बोलावले होते. मी त्यांना सांगितले की जी सी सुनील खेरच्या घरची परिस्थिती गंभीर आहे. त्याचे वडील आधीच अतीरेक्यांच्या कारवायांना बळी पडले आहेत व अजूनही बेपत्ता आहेत. आता हीच परिस्थिती त्याच्या आईवर येऊन ठेपली आहे. कर्नल कटोच ह्यांनी फक्त माझ्या शब्दाखातर तुला चार दिवसाची सुट्टी देऊ केली आहे. चार दिवसात परत ये नाहीतर मी दिलेला शब्द वाया जाईल. कॅप्टन गिलने चार दिवसाच्या सुट्टीचे पत्र माझ्या हातात दिले व म्हणाला सुट्टी जरी उद्या पासून सुरू होत आहे तरी आजच रात्री जायची परवानगी तुला देतो. माझ्या जिवात जिव आला. हूरुप आला. आता एक नवा प्रश्न उभा राहीला माझ्या समोर. चार दिवस – ह्या चार दिवसात डेहराडूनहून खोऱ्यात जायचे व आईचा राहण्याचा कोठेतरी बंदोबस्त करून परत यायचे. भदराजचा कॅंप मला ह्याच्या पुढे एकदम सोपा वाटायला लागला.

मला सुट्टी तर मिळाली आता चार दिवसात येण्याचा आराखडा ठरवत मी माझे मोजकेच सामान बांधले. मित्रांकडून काही पैसे उसने घेतले व रात्रीच्या बसने डेहराडूनहून निघालो. दिल्लीहून जम्मूला सुट्टीच्या पहील्या दिवशी रात्री पोहोचलो. कॅप्टन गिलने रात्रीच जाऊ दिले होते म्हणून बरे झाले नाहीतर अजूनच वेळ लागला असता. जम्मू ते श्रीनगर ह्या एक दिवसाच्या रस्त्याला दोन दिवस लागले पोहोचायला. बर्फवृष्टी मुळे बनीहाल घाटात असणारा जवाहर बोगदा बंद होता. त्यामुळे एक रात्र रामबन येथेच काढावी लागली होती. जवाहर बोगदा थंडीत नेहमीच असा मधून मधून बंद असतो. रामबनला थांबणे माझ्या जिवावर आले होते. कारण सुट्टीचा एक दिवस वाया जाणार होता. मजल दर मजल करत तिसऱ्या दिवशी सकाळी मी घरी पोहोचलो. मला बघून आईला आनंद व थोडे आश्चर्य वाटले. तिला वाटले नव्हते मला सुट्टी मिळेल असे. आम्हाला एकमेकांशी आय एम एतल्या गोष्टी करायला वेळच नव्हता. राहाते घर सोडून जायचे ह्या नुसत्या कल्पनेनेच आईला खूप वाईट वाटत होते. सामान कसे घेऊन जायचे हा प्रश्न होता. वडीलांचा अजून पत्ता नव्हता. शेवटी आम्हाला दोघांना नेता येईल ईतकेच सामान घेऊन जायचे असे ठरले. मग सामान बांधायला वेळ लागला नाही.

(क्रमशः)

(राजाराम सिताराम एक, राजाराम सिताराम दो – ही आय एम ए वर आधारीत कथा लवकरच प्रसिद्ध करत आहे)


Friday, January 28, 2011

२० वर्ष - विस्थापीत काश्मिरी हिंदू – भाग २



(१९८९ मध्ये काश्मीरच्या हिंदूंना अतिरेकी संघटनांनी पत्रके वाटून - खोऱ्यातून बाहेर जा - अशी ताकीद दिली व त्या वेळी हजारोंच्या संख्येने काश्मिरी हिंदू खोऱ्यातले पिढ्यांपिढ्यांचे त्यांचे घरदार सोडून जम्मू व दिल्ली ला निघून गेले. हा एक प्रकारचा होलोकास्टच त्यांनी अनुभवला................ वाचा २० वर्ष - विस्थापित काश्मिरी हिंदू – भाग १)

आमच्या बॅच मध्ये सुनील खेर नावाचा काश्मिरी जीसी होता. आमच्या सारखाच तो ही एक कॅडेट. अधिकारी होण्याच्या प्रतीक्षेत दिवस मोजत. त्याला वडील नव्हते. तो आणि त्याची आई, बारामुल्ला जवळच्या सोयीबुक ह्या गावात राहायचे. त्यांची छोटी हवेली होती तिथे. त्याचे वडील काश्मीर खोऱ्यात एका दैनिकाचे संपादक होते. एक दिवस ते त्यांच्या कचेरीतून परत आलेच नाहीत. आज पर्यंत त्यांचा पत्ता लागला नाही. हल्ली त्याच्या कुटुंबाने वडील परत भेटण्याची आशा सोडून दिली आहे.

तो आम्हाला काश्मीर बद्दलच्या गोष्टी सांगायचा. तो पर्यंत मला लोकसत्ता, म टा ह्या नियतकालिकामधून व वेगवेगळ्या मासिकातून वाचलेला तपशील एवढीच काय ती काश्मीर बद्दलची माहिती होती. आय एम ए च्या मुलाखती साठी केलेली तयारी, ती पण अशी तशीच. थोडक्यात काश्मीर प्रश्ना विषयी एकदम तोकडी कल्पना होती. मला इंडियन एक्सप्रेस नियतकालीकेत, १९८६- ८७ मध्ये छापून आलेला काश्मीर विषयीचा लेख वाचल्याचे आठवत होते. त्यात निवृत्त ब्रिगेडियर एन बि ग्रॅन्ट ह्यांनी लिहिले होते की १९४८, १९६५ आणि १९७१ मध्ये भारत पाक युद्धांमधून झालेल्या पाकिस्तानच्या जबरदस्त पराजयाचा धक्का पाकिस्तानाला सतत सतावत असतो. पाकिस्तानाला कळून चुकले आहे की, भारता बरोबर सरळ युद्ध केल्याने त्या देशाची वित्त व मनुष्य हानी फार होते आहे. ह्या सर्व बाबींचा विचार करून पाकिस्तानच्या इंटर सर्विसेस इंटलीजन्स (आय एस आय) ने एक नवी योजना आखली आहे. त्या योजने नुसार सरळ युद्धा पेक्षा अतिरेकी संघटना उभारून भारत आतून पोखरून टाकायचा. मग अशा पोखरून अशक्त भारताला हरवायला वेळ लागणार नाही. योजना चार पदरी कार्यक्रमावर आधारित अशी राबवायची. पाहिला पदर – काही काश्मिरी युवकांना भडकवून पाक व्याप्त काश्मीर मध्ये नेऊन प्रशिक्षण देऊन अतिरेकी बनवणे. काश्मीर मधल्या भारत पाक युद्ध विराम सीमे (लाइन ऑफ कंट्रोल) मधून अशा अतिरेक्यांना खोऱ्यात धाडायचे. एकदा अतिरेकी आत घुसले की मग त्यांचे थैमान चालू द्यायचे. अशा अतिरेक्यांना एके ४७, हॅन्ड ग्रेनेड्स व तत्सम साधन सामुग्री पुरवायची. दुसरा पदर – जम्मू काश्मीर राज्य प्रशासन अतिरेकी कारवायांनी व अतिरेकी फतव्यांनी खिळखिळे करायचे. तिसरा पदर – काश्मिरी हिंदूंना पहिल्यांदा खोऱ्यातून व नंतर उधमपूर जम्मू मधून हुसकवून लावून काश्मिरी हिंदूंची संख्या नगण्य करायची. त्याच युक्तीचे पुनरावर्तन कारगिल व त्याच्या वरती लडाख भागात मग करायचे. शेवटचा चौथा पदर – काश्मिरी मुस्लिम जनतेला भारता विरुद्धं जेहाद साठी उत्तेजित करायचे.

ह्या पार्श्वभूमीवर जेव्हा जीसी सुनील खेरच्या रूपाने प्रत्यक्ष काश्मिरी हिंदू भेटला तेव्हा काश्मीर संबंधी बऱ्याच गोष्टी कळायला लागल्या. आम्ही वेळ मिळेल तेव्हा सुनील खेर व अजून एक काश्मीरचा राहणारा जीसी हिरालाल गाडरू ह्या दोघां कडून काश्मीरच्या स्थिती बद्दल चौकशी करायचो. हिंदूंची होणारी गळचेपी व ससेहोलपट खरेच होतेका, हे आम्हाला जाणून घ्यायची प्रबळ इच्छा असायची. त्या दोघांकडून आम्हाला कळले की काश्मिरी हिंदूंची घरे रोज कशी जाळली जात आहेत व धमक्या कशा मिळत आहेत ते. आम्ही जीसी सुनीलला नेहमी सांगायचो की आईला घेऊन दुसरीकडे राहा म्हणून आणि त्यालाही तसे राहायचे होते पण दुसरीकडे राहायला लागणारे पैसे नव्हते व त्याची आई तयार नव्हती काश्मीर सोडायला. काश्मीर सोडून दुसरीकडे राहायचे म्हणजे काश्मीर मधले घर विकावे लागणार होते. दुसरीकडे म्हणजे कोठे स्थायिक व्हायचे हा प्रश्न होताच त्याला सतावणारा. आता पर्यन्त खोरे सोडून कोठेही गाडरू कुटुंब राहिले नव्हते. त्यातून वडील सापडत नाहीत ह्याची सतत मनाला खंत लागून राहिलेली. सैन्यात जाऊन अधिकारी होण्याचे लहानपणापासूनचे सुनीलचे स्वप्न होते. सैन्यात राहायला सरकारी घर मिळते हे कळल्यावर तर सुनीलला त्याच्या अडचणीचे उत्तरच सापडल्या सारखे झाले होते. म्हणूनच जरी आई एकटी राहणार असली तरी तो तिच्याशी भांडून आय एम ए मध्ये दाखल झाला होता. आय एम ए चे शिक्षण पूर्णं करूनच आता घर बदलायचे असे त्याने ठरवले होते.

काश्मीर मध्ये हिंदूंची घरे विकली जात नाहीत तर ती बळजबरीने घेतली जातात हे त्यावेळेला मला पहिल्यांदा समजले. जीसी हिरालाल गाडरू (हा जीसी, वर्ष भर आम्हाला त्याच्या आडनावाचा उच्चार बरोबर कसा करायचा हेच शिकवीत राहिला व आम्हीही मुद्दामून त्याला गदरू असे बोलवत राहायचो. हा खेळच झाला जणू काही. शेवटी त्याचे नाव जीसी हिरालाल गाडरू ऐवजी - जीसी हिरालाल गदरू नहीं गाडरू - असे लांबलचक पडले. वीस वर्षांनी जेव्हा त्याची भेट पुन्हा झाली तेव्हा मी त्याला ह्याच नावाने संबोधले होते. ) ह्या गाडरू च्या वडलांची लाकडाची वखार होती ती जाळली होती अतिरेक्यांनी.

अशा परिस्थितीत भर म्हणजे लहानपणापासून काश्मिरी जनतेने टेलिव्हिजन वर फक्त पाकिस्तानी कार्यक्रमच बघितले होते कारण तेवढेच दिसायचे. आपले दूरदर्शनचे प्रक्षेपण तेथ पर्यंत पोहचायचे नाही. लहानपणापासून त्यांना रेडियोवर फक्त उर्दू ऐकायला मिळालेले. त्यात सुद्धा पाकिस्तानी कार्यक्रम. काश्मीर हून जम्मू भागाला जोडणारा असा एकच रस्ता – जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग - एन एच वन. थंडीत बर्फवृष्टीमुळे जवाहर बोगदा कित्येक वेळेला बंद व्हायचा. त्यामुळे एन एच वन बंद व आवक जावक बंद. रेल्वेचा प्रवास तर अजून सुद्धा नाही श्रीनगरला. ह्याच्या उलट पाक व्याप्त काश्मीर कडून मात्र दळणवळण नेहमी चालू असायचे. काश्मीर खोऱ्यातल्या लोकांचे नातेवाईक व लग्न संबंध असायचे पाक व्याप्त काश्मिरात.

ह्या सगळ्याचा परिणाम काश्मिरी हिंदू मानसिकतेवर होत होता व अजूनही होत आहे. भोवतालची लोकवस्ती आपल्या बरोबर नसेल तर केवढी पंचाईत होते सगळ्या बाबतीत. आपल्याला सगळ्यांनी वाळीत टाकल्या सारखे वाटायला लागते. काश्मिरात त्या वेळेला अशी परिस्थिती होती की साधे घरा बाहेर सुद्धा पडता यायचे नाही. दिसता क्षणी गोळी घालण्याचे आदेश सतत असायचे. दोन दोन महीने कर्फ्यू चालायचा. शाळातर नेहमीच बंद असायच्या. बऱ्याच शाळा हळूहळू सशस्त्रबलांनी ताब्यात घ्यायला सुरवात केली होती. त्यांना तिथे छावण्या लावायच्या होत्या. सतत हिंदूंची घरे जाळणे, त्यांना पळवून नेणे, त्यांना धाक दाखवून घरे खाली करायला लावणे, त्यांना नोकऱ्या न देणे, मुली व महिलांवर अत्याचार होणे हे सगळे प्रकार हळूहळू १९८९ मध्ये वाढायला लागले होते. त्या मुळे जरी ती लोकं काश्मिरी हिंदू असली तरी बाकीच्या हिंदूंपेक्षा खूपच दूरचे झालेले व दुरावलेले असे होते. मानवी हक्क समिती (ह्युमन राईटस कमिशन) त्या वेळेला मूग गिळून बसले होते का काय कोण जाणे.

आम्हाला कोर्स मध्ये आठ महीने झाले होते. आम्ही ८ दिवसांच्या भदराज कॅम्पला गेलो होतो. हा कॅम्प डोंगराळ प्रदेशात युद्ध कसे करायचे ह्या शिक्षणाचा भाग म्हणून असतो (माउंटन वॉरफेअर ट्रेनिंग). संपूर्ण कोर्स ४ बटालियनस मध्ये विभागलेला असायचा. ह्या ४ बटालीयन् स नेतृत्व आलटून पालटून कोण्या जीसी वर सोपोवले जायचे. भदराज ह्या कॅम्प साठी त्या त्या तुकडीचा तेवढ्या वेळे पुरता नेमून दिलेला जीसी मग सेनापती असायचा. माउंटन वॉरफेअर संबंधी आय एम ए मध्ये जे काही शिकवले ते उपयोगात आणून भदराज वर धावा बोलायचा.

डेहराडूनहून मसुरी चे डोंगर दिसतात. त्या डोंगरांच्या रांगेतला भदराज नावाचे सगळ्यात डावीकडचे शिखर. त्या शिखरा वरती एक मंदिर आहे. भदराज साधारण ५५०० फुटा उंचीचा. त्या पर्वतराशीला लोअर हिमालयन रेंजेस असे म्हणतात. ते शिखर सर करून परत आय एम ए मध्ये यायचे. चारही बटालीयन् स मध्ये चुरस. जी बटालीयन भदराज सर करून पहिल्यांदा आय एम ए त पोहोचेल ती जिंकली. त्या बटालीयनला भदराज चषक मिळायचा. भदराज चढायला रात्री सुरवात करायची. पूर्णं युद्ध पोषाखात – जंगलात घालतात ते कॅमोफ्लॉज कपडे, तोंड ब्ल्यांको ने काळे केलेले, पाठीवर मोठा पॅक त्यात अत्यावश्यक लागणारे सामान. भूक शमवण्यासाठी शक्करपाऱ्याच्या वड्या, टेंट बांधण्यासाठी आवश्यक असे ताडपत्रीचे बिवोक, एक दुर्बीण व चुंबकीय कंपास. ह्या सगळ्याचे वजन साधारण १५ किलो भरायचे. कमरेच्या पट्टयाला लागलेली अर्ध्या लीटरची पाण्याची बाटली. तेवढेच काय ते पाणी (माहीत नसलेल्या ठिकाणाहून पाणी पिण्यास सक्त मनाई कारण शत्रूच्या इलाक्यात शत्रूने इलाका सोडून पळताना विहिरींमध्ये विष घालून ठेवले असेल तर जिंकलेला इलाका पाण्याच्या लोभापायी घालवावा लागेल. आपली माणसे मरतील ते वेगळेच). हातात गवत कापण्यासाठी दाह किंवा खुरपे व खांद्यावर साडे पाच किलो वजनाची आता पर्यंत अंगाचाच भाग झालेली अशी रायफल. पहाटे पर्यंत भदराज सर करून आपला तिरंगा फडकवून आय एम ए कडे परत यायला लागायचे. परतीचा रस्ता दिलेल्या नकाशा वरून थोधत. असा तो भदराजचा कॅंप. साधारण ४० किलोमीटर चा तो शेवटचा मार्च म्हणजे चिकाटी, ताकद, शिस्त, धाडस, नेतृत्व व तुकडीतले सामंजस्य ह्या वर अवलंबून असायचे. परतताना आमच्या माणेकशॉ तुकडीचे नेतृत्व जीसी रोहित वर्मा ह्यावर सोपोवले गेले होते. आम्ही नकाशे पाहत आमच्या गटातल्या साथीदारांसह आय एम एत परतलो. ४० किलोमीटर चालून आल्याने सगळे जीसी दमले होते. पण साथिदारांबरोबर चालताना एवढे दमलो असे वाटत नाही. कदाचित एकट्याला एवढे अंतर जड गेले असते. पंढरपूरच्या वारीचे पण तसेच असेल. ग्यानबा तुकारामाचा गजर व आजूबाजूला वारकऱ्यांचा मेळा ह्या मुळे तेच अंतर समजून येत नाही, सहनिय होते व उलट आनंद मिळतो.

पोहोचल्या बरोबर शस्त्रागारात आपआपल्या रायफली, दुर्बिणी व चुंबकीय कंपास जमा झाल्यावर आमचे स्वागत गरम गरम चहा व बिस्किटांनी झाले. हा प्रत्येक कॅंप चा आमचा सगळ्यात आवडणारा भाग असे. आम्ही आतुरतेने ह्या मेजवानीची वाट बघायचो. आमचे शिक्षक कॅप्टन गिल - आय एम ए मध्ये अशा शिक्षकाला डायरेक्टींग स्टाफ (डी एस) असे संबोधले जाते. आमच्या डी एस ह्यांनी त्या दिवशीचे बाकीचे आय एम ए चे कार्यक्रम आमच्या साठी रद्द झाल्याची घोषणा करताच सगळ्या जीसी कडून उत्फुर्त पणे माणेकशॉ बटालीयन की जय निघाले. आमचे अर्धे दमणे तेथेच विरून गेले. आता प्रत्येक जण त्यांना आलेल्या पत्रांचे वाचन करण्यात गुंग झाला. १९८९ मध्ये मोबाईल काय असते ते कोणालाच माहीत नव्हते व दूरध्वनी सेवा नुकतीच सुरू झाली असल्या कारणाने ती फक्त आय एम एच्या शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्येच असायची अन तेथे जायचे म्हणजे काही सोपे नव्हते. त्या मुळे आम्ही व आमचे आप्तेष्ट ह्या मध्ये असणारा पत्र हा एकच दुवा होता.

मी माझ्या आईचे पत्र संपवतच होतो तेव्हा माझ्या कडे जीसी सुनील खेर व जीसी हिरालाल गाडरू आले. सुनीलचा रडवेला चेहरा पाहून मी काय झाले म्हणून विचारले. मला म्हणाला – आईला अतिरेक्याचा धमक्या आल्या आहेत व त्यांनी महिना अखेर पर्यंत घर सोडायला सांगितले आहे. त्याच्या तोंडाचे पाणीच पळाले. एक तर घर सोडून ती अशी एकटी जाणार कोठे. खोऱ्या बाहेर नवे घर घ्यायला पैसे नाहीत. असलेले घर विकता येत नाही अशी काश्मीर खोऱ्यात परिस्थिती आणि हे सगळे करायला सुनीलला सुट्टी कोण देणार व कशी मागणार सुट्टी. आमचा डि एस, कॅप्टन गिल असा कर्दन काळ होता की त्याच्या कडे जाणे म्हणजे शिक्षा घेऊनच येणे असे होते. आम्ही काही बोलायच्या आधीच, तो आमच्या चुका काढायचा. आमच्या पोशाखात जरा जरी खोट सापडली तर तेथेच आमची रोलिंग सुरू. आता हे रोलिंग काय तंत्र आहे ते समजावून सांगतो. आपण कशा लहानपणी गाद्या टाकल्या वर कोलांट्या उड्या मारायचो. अगदी तशाच कोलांट्या उड्या मारणे म्हणजे रोलिंग. फक्त हे रोलिंग गाद्यांवर नाही करायचे. आता हे रोलिंग कधीही कोठेही व कोणच्याही कपड्यांमध्ये होऊ शकते. आम्ही रोलिंग अंडरवेअर (फक्त) पासून कोट टाय मध्येही केलेले आहे. रस्त्यावर, खेळाच्या मैदानावर, उथळ वाहणाऱ्या टॉन्स नदीच्या पात्रात, ड्रिल स्क्वेअर मध्ये भर दुपारी असे वाटेल तिथे केलेले आहे. त्या मुळे आम्ही शक्यतोवर आमच्या डि एस कडे जायचे टाळायचो. पण आजचा दिवस वेगळा होता. एक तर आमच्यावर कॅप्टन गिल खूश होता कारण माणेकशॉ बटालीयन भदराज मध्ये सगळ्या बटालीयन् स मधून पहिली आली होती व म्हणूनच त्या दिवशी सुट्टी मिळाली होती. बाकीच्या बटालीयन् स आल्या आल्या कपडे बदलून पुढच्या कार्यक्रमाला लागल्या होत्या. धीर धरून आम्ही कॅप्टन गिल कडे गेलो. घाबरत घाबरत सुनीलने सगळे सांगितले. कॅप्टन गिलला सुनीलची घरची सगळी परिस्थिती माहीत होती. त्या मुळे त्याने सगळे नीट ऐकून घेतले. आज आमच्या पोषाखाची खिल्ली उडवली गेली नाही व शिक्षेचे नावही निघाले नाही. सगळे ऐकून घेतल्यावर तो म्हणाला – मी समजू शकतो तुला सुट्टी हवी आहे. तू सुट्टी चा अर्ज लिही मी शिफारीश करतो बाकी पुढचे कंपनी कमांडर व बटालीयन कमांडर वर अवलंबून आहे. मी पण तुझ्या सुट्टी बद्दल त्यांच्याशी बोलेन. सुनीलने वेळ जायला नको म्हणून डि एस कडे जाण्या अगोदरच लिहून ठेवलेला अर्ज पुढे केला. कॅप्टन गिलने लागलीच त्याची शिफारिश लिहून तो कंपनी कमांडर कडे स्वतः गेला. सुनीलला रात्री कंपनी कमांडर कडून निरोप आला की त्याला बटालीयन कमांडरने मुलाखती करता सकाळी बोलावले आहे. आमचा डि एस कॅप्टन गिल ह्यांच्याशी रोजच्या रोज संबंध यायचा. पण कंपनी कमांडर मेजर शेखावत कडे जाण्याचा किंवा त्याला भेटण्याचा प्रसंग गेल्या आठ महीन्यात क्वचितच आला होता. बटालियन कमांडर चे डर तर मग विचारुच नका. त्याचे ऑफिस जेथे असायचे तो रस्ता आम्हा जीसीज ना रहदारी साठी बंद होता. त्या रस्त्या वरून आम्हाला जाता यायचे नाही. आम्ही बटालीयन कमांडरला फक्त खेळाच्या मैदानावर किंवा कॅंपस च्या वेळेला पाहीले होते. कर्नल कटोच नाव होते त्यांचे. ज्या जीसीच्या हातून त्यांच्या गेल्या जन्मात घोर पापे घडली असावीत तेच जीसी बटालीयन कमांडरच्या ऑफिस मध्ये जायचे असे काहीसे चित्र होते. ज्यांचे रेलीगेशन होणार असायचे त्यांनाच फक्त तो एकदा भेटायचा हे सांगायला की तु रेलिगेट झालास म्हणून. हे सांगायला फारसा वेळ लागत नाही. त्यामुळे कोणताही जीसी त्याच्या ऑफिस मध्ये दोन मिनटा पेक्षा जास्त वेळ कधीही उभा राहिला नव्हता. त्या मुळे जीसी सुनील खुप घाबरला होता. जेव्हा दुपारच्या जेवणाच्या वेळेला भेटला तेव्हा त्याचा चेहेरा अजूनच रडवेला झाला होता. तो म्हणाला बटालीयन कमांडर ने सुट्टी चा अर्ज रद्द केला. म्हणाला हे काही कारण होत नाही सुट्टी मागायला. आम्हाला राग आला व खुप वाईट वाटले. जीसी सुनील खेर तर वेडापीसा झाला होता. खूप शिव्या घातल्या बटालियन कमांडरला. त्याला त्याच्या आई व्यतीरिक्त कोणीच दिसत नव्हते.

त्या संध्याकाळी कॅप्टन गिल आमच्या बरॅक मध्ये सुनीलला येऊन भेटला. सुनील म्हणाला त्याला पण खूप वाईट वाटत होते अर्ज रद्द झाल्या बद्दल कारण त्याने सूनीलच्या सुट्टी साठी कंपनी कमाडरला स्वतः भेटून जीसी सुनील वर बेतलेल्या संकटा बद्दलची कल्पना दिली होती.

कॅप्टन गिल ला संध्याकाळी भेटल्या पासून जीसी सुनील खेर मध्ये आम्हाला अचानक एक बदल जाणवला. तो जरी दुःखी होता तरी त्याचा रडवेला चेहरा जाऊन निश्चयी बनला होता. त्याचा चेहरा निग्रही वाटत होता जसा काही त्याला त्याच्या वर बेतलेल्या संकटावर तोडगा सापडला आहे असा.

(क्रमशः)

(राजाराम सिताराम एक, राजाराम सिताराम दो – ही आय एम ए वर आधारीत कथा लवकरच प्रसिद्ध करत आहे)




Sunday, January 23, 2011

२० वर्ष - काश्मिरी विस्थापीत

(१९८९ मध्ये काश्मीरच्या हिंदूंना अतिरेकी संघटनांनी पत्रके वाटून - खोऱ्यातून बाहेर जा - अशी ताकीद दिली व त्या वेळी हजारोंच्या संख्येने काश्मिरी हिंदू खोऱ्यातले पिढ्यांपिढ्यांचे त्यांचे घरदार सोडून जम्मू व दिल्ली ला निघून गेले. हा एक प्रकारचा होलोकास्टच त्यांनी अनुभवला. त्यामुळे खोऱ्यात आता हिंदू नगण्य राहिले आहेत व हिंदू मत नगण्य झाले आहे. पुढे कधी मताधिकार राबवून (प्लेबिसाईट) काश्मीर प्रश्न सोडवायचा असा निर्णय कार्यान्वित झाला तर फुटिरतावाद्यांना त्यांचा डाव जिंकायला साहजिकच सोपे जाईल. कलम ३७० लागू असल्या कारणाने जम्मू काश्मीर सोडून बाकी लोकं तिथे वस्ती करू शकत नाहीत, पण हिंदूंना मात्र तेथून घालवून देऊन पाकिस्तानचा इरादा सफल होत आहे. १९८८ मध्ये पाकिस्तान च्या राष्ट्राध्यक्ष ह्यांचा ऑपरेशन टोपुक कार्यान्वित झाल्यावर १९८९ – ९० मध्ये ज्या हजारो हिंदूंना मारून, धाक दाखवून पद्धतशीर पणे खोऱ्यातून हुसकवून लावले त्याला गेल्या आठवड्यात २० वर्षे झाली, नव्या पिढीला कदाचित ह्या इतिहासाचे विस्मरण झाले असेल किंवा कदाचित हा इतिहास माहीत पण नसेल. त्या होलोकास्ट चे व त्या काळ्या दिवसांचे स्मरण करून विस्थापित काश्मिरी हिंदूंनी गेल्या आठवड्यात एक मोर्चा काढला होता.

जर नवीन पिढीला होऊन गेलेला इतिहास माहीत नसेल तर पूर्वी राष्ट्राकडून झालेल्या चुका पुन्हा होण्याची भीती निर्माण होते. बरोबर इतिहास माहीत नसेल तर नवी पिढी आहे त्या परिस्तिथीचा विचार वेगळ्याच दृष्टिकोनातून घेऊ शकते. काही वर्षाने मग इतिहास माहीत नसल्याने किंवा त्याचे विस्मरण झाल्याने नव्या नव्या पिढी कडून ही चूक होण्याची देखिल शक्यता आहे आणि मग असे उद्गार निघायला लागतील - की, एवी तेवी हिंदू कोणी तेथे राहत नाहीत, जे राहतात त्यांना काश्मीर भारतात नको आहे आपण का धरून बसायचे काश्मीरला, सोडून द्या ना. भारत विरोधी अरुंधती रॉय ह्यांच्या सारख्या प्रसिद्धीची हाव असणारे स्वयंघोषित नेते ह्याच गोष्टीचा फायदा आता सुद्धा घेताना दिसतात. येणाऱ्या पिढ्या काश्मीर प्रश्नावर सतत उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत राहणार, पण गेल्या २० वर्षांचा इतिहास कोणच्याही शैक्षणिक संस्थांमधून शिकवला जात नाही व ही इतिहासाची जी रिक्त स्थाने आहेत ती भरल्या शिवाय काश्मीर प्रश्नाचे गांभीर्य, सोडवण्याची प्रबळ इच्छा व प्रश्न सोडवण्याचा मार्ग सुकर होणार नाही.

ह्याच पार्श्वभूमीवर ही कथा लिहिली आहे. ह्या कथेत पात्रांची नावे जरी बदलली असली तरी प्रसंग खरे आहेत. परिस्थितीचे वर्णन कथेच्या रूपाने केले असले तरी ज्यांना जाणून घ्यायची इच्छा आहे त्यांनी ऑपरेशन टोपुक व त्यानंतर चे काश्मिरी हिंदूंचे विस्थापन ह्या विषयावर लेख, बातम्या, इतिहास ह्या वर अधिक संशोधन करावे. )







२० वर्षापूर्विची गोष्ट. १९८९ चा काळ. आम्ही इंडियन मिलिटरी अकादमी, डेहराडून (आय एम ए) मध्ये होतो. एक वर्षाच्या कालावधीचा सैन्यात अधिकारी बनण्याचा कोर्स. आम्हाला जंटलमॅन कॅडेट (जीसी) असे संबोधले जायचे. आय एम ए चे सकाळी ४ पासून रात्री १० पर्यंत शिस्तबद्ध भरगच्च कार्यक्रम व त्यात काही चूक झाली तर मिळणाऱ्या रोजच्या शिक्षा ह्या मुळे दिवस व महिने कसे संपायचे हे कळायचेच नाही. आय एम ए चे कठोर नियम व ते पाळले नाही तर मिळणाऱ्या कठोर शिक्षा. बऱ्याच नियमांमध्ये एक अजूनच कठीण असा नियम म्हणजे ह्या कोर्सच्या दरम्यान सुट्टी मिळत नाही. अगदीच जर नाईलाज असेल तर चार दिवसाची सुट्टी मिळायची. आय एम ए च्या शब्दकोशात नाईलाज ह्या शब्दाची परिभाषा म्हणजे - जीसी च्या दुर्दैवाने त्याच्या पालकांपैकी कोणाचा मृत्यू झाला तर चार दिवसाची सुट्टी मिळायची. एरव्ही सुट्टी मागितली तर आय एम ए मधल्या शिक्षकगणां कडून त्वरित उत्तर मिळायचे – तुझ्या स्वतःच्या अंत्यसंस्कारासाठी सुद्धा तुला सुट्टी मिळणार नाही मग उगाच कशाला मागतोस. नाही म्हणायला जर कोणी जास्त सुट्टी घेतली तर कोर्स मधून नापास व्हावे लागायचे. त्याला रेलीगेशन म्हटले जायचे. रेलीगेशन म्हणजे आणखीन सहा महिने आय एम ए चे ते नियम व त्या शिक्षा झेला. जर दोनदा रेलीगेशन झाले तर अकादमी मधून काढून टाकले जायचे व तेथेच जीसीची अधिकारी व्हावयाची स्वप्न भंग पावायची. त्यामुळे आम्ही कोणी सुट्टी घेण्याचा विचारही डोक्यात आणायचो नाही.


(क्रमशः)


Thursday, January 20, 2011

हसन अली

हसन अली ह्या इसमा कडे ३७००० कोटी रुपयाची करबाकी आहे असे एक दोन वर्षापूर्वी वाचनात आले होते.

त्या नंतर आता म्हणे त्याच्या कडे ५०००० कोटी रुपयाची कराची थक बाकी आहे.



हा इसम पुण्याचा.



१. हा कोण आहे. कोणाला माहीत आहे का. माझ्या माहिती प्रमाणे ह्या माणसाचे स्टड फार्म आहे पुण्यात. स्टड फार्म एवढा पैसा मिळवून देत असेल तर आतापर्यंत मोठ मोठ्या उद्योजकांनी त्यात पैसा ओतून बरेच असे फार्मस् निर्माण केले असते. मग एवढा पैसा आला कोठून.



२. टाइम्स नाऊच्या नुसार हा कोण्या राजकीय पुढाऱ्याचा मोहरा आहे. कोण असेल तो पुढारी. ५०००० कोटी रुपये जर कर बाकी असेल तर स्विस बॅंकेत त्याच्या तिप्पट पैसा जरुर असणार - म्हणजे साधारण १५०००० कोटी रुपये झाले. ह्या पैशात किती अतिरेकी संघटनांना पैसा पुरवता आला असेल. २०१० - २०११ मध्ये भारताचा सगळा मिळून संरक्षण खर्च १४७००० कोटी रुपये झाला. ह्या राष्ट्रात अराजक माजवण्याचे सामर्थ्य ह्या माणसा कडे आहे. हा विचार डोक्यात येतो. आपल्याला काय वाटते.



एवढे सगळे असून सरकार अजून सुद्धा चुप का.  मला वाटते सरकार ने ह्या पैशाचा जर प्रामाणिकपणाने शोध लावला व ही गोष्ट पुर्णत्वाला नेऊन जर देशा समोर एक केस स्टडी म्हणून ठेवली तर त्यातून फार मोठे कार्य होणार आहे. हे घडवून आणण्यासाठी लागणारी यंत्रणा सरकार कडे आहे, पैसा आहे. फक्त इच्छा शक्ती नाही असे वाटते. ह्याचीच खंत आहे. पैसे खाऊ पणा पुर्वी पण होता पण आता पाणी डोक्यावरून जाऊ लागले आहे. लोक हतबल आहेत का लोकांच्या संवेदना बोधट झाल्या आहेत. त्यांना उठवणारा व जागे करणारा एखादा जांबूवंत पाहिजे आहे.