Thursday, November 13, 2014

स्वच्छ भारत अभियान

१५ ऑगस्टला प्रधान मंत्री नरेंद्र मोदी ह्यांनी लाल किल्ल्यावरून स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केली व त्वरित त्याची अंमलबजावणी सुद्धा झाली. आपण सगळे आजूबाजूच्या गलिच्छ परिसराला कंटाळलो आहोत. आपल्या देशातल्या सार्वजनिक जागा किती गलिच्छ आहेत त्याचा अंदाज सर्वांनाच आहे. सगळ्यांना स्वच्छता हवी आहे. आपोआप झाली तर बरेच पण स्वच्छता आपोआप काही होत नाही.

दूरचित्रवाणी व रेडिओ वरून स्वच्छ भारत अभियानाने म्हणावा तसा जोर पकडलेला नाही हे समजते ह्याचे सगळ्यात मोठे कारण पिढ्यांपिढ्यांची घाणेरड्यात राहायची सवय. त्यातून वैयक्तिक स्वच्छता फक्त काय ती राखायची बाकी सगळीकडे घाण व उकिरडा. घराबाहेर सार्वजनिक जागांवर घर स्वच्छ करून उकिरडा फेकणे हा कार्यक्रम गेली अनेक वर्षे आपण राबवत आलो आहोत त्या मुळे सगळीकडे उकिरडाच उकिरडा दिसतो.

इतक्या पटकन अशी घाणेरडी सवय कशी जाणार? उकिरडा, गलिच्छता व घाणीबद्दलच्या संवेदना बधिर होऊन गेल्या आहेत. अगदी शिकलेले लोकंपण आपले घर झाडून कुंपणा बाहेर रस्त्यावर केर ढकलून देतात. बंगळूरला तर साठलेला कचरा प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवून घराबाहेर रस्त्यावर ठेवतात, दरवाजाला अडकवतात किंवा घराबाहेरच्या झाडाला टांगतात! महानगरपालिकेचा कचरावाला घेऊन जाईल अशी अपेक्षा. कचरावाला काही रोज येत नाही व टांगलेल्या व ठेवलेल्या पिशव्या रस्त्यावरची मोकाट कुत्री फाडून कचरा सगळ्याभर करतात. सकाळी आपल्यासकट आजूबाजूचे रहीवाशी महानगरपालिकेला नावे ठेवतात.

स्वच्छता अभियान एक पिढिभर तरी राबवले पाहिजे तरच काय तो फरक दिसायला लागेल. नाहीतर थोड्या दिवसाने परत तशीच सगळीकडे - घाण. स्वच्छता अभियानात काही गोष्टी आपण सर्वाने केल्या तर काही प्रमाणात तरी फरक पडेल. स्वच्छते बरोबर कचरा कमी करणे व उकिरडा न पसरवण्यावर भर दिला तर बऱ्याच प्रमाणात स्वच्छता दिसून येईल. घाण होऊ कशी द्यायची नाही ह्यासाठी काही प्रस्ताव देत आहे

- आपल्या घराजवळील रस्त्यालगतचा किंवा रस्त्याचा एक भाग किंवा घाणीचा एक कोपरा स्वच्छ करण्यासाठी दत्तक घ्यायचा प्रयत्न करूया. असे दत्तक घेतलेले ठिकाण, दर आठवड्याला साफ झाडून स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करूया. त्या जागेवर कोणी घाण टाकताना दिसली तर त्यांना घाण टाकू नका अशी विनंती करायचा प्रयत्न करावा. नियमाने दर आठवड्याला स्वच्छता करायची असा प्रयत्न असावा.

- आपल्या घरातल्या नोकरांना किंवा मोलकरीणबाईला कचरा कोठे व कसा टाकायचा ह्याची सूचना द्यावी. बऱ्याच वेळा सूचना न दिल्याने घर स्वच्छ ठेवण्यासाठी ठेवलेले नोकर घर स्वच्छ करून साठलेला कचरा घराबाहेर जवळच जेथे त्यांना सोपे जाईल तेथे टाकतात. बाकीचे लोकं असा वाटेल तसा कचरा टाकताना पाहून, नोकरांच्या मालकांना नावे ठेवतात.

- ज्यांच्याकडे पाळीव कुत्री, मांजरी असतील त्यांनी पाळीव जनावरांना फिरवायला घेऊन जाताना बरोबर एक प्लॅस्टिकची पिशवी व जुन्या वर्तमानपत्राचा तुकडा जरूर बाळगावा. पाळीवाची विष्ठा उचलून कचरा कुंडीत टाकावी. रस्त्यावरची विष्ठा उचलायला अतिशय सोपे असते. रस्त्यावरच्या माती व धुळीमुळे रस्त्याला विष्ठा चिकटत नाही. बऱ्याच जणांनी हे करून पाहिलेले नसते व त्यामुळे त्यांना असे वाटते की विष्ठा काढायला खूप वेळ लागेल व कोणीतरी पाहील. आपल्या पाळीव प्राण्याची विष्ठा काढायला लाज वाटायचे कारण नाही. उलट बाकीचे लोकं आपले बघून अनुकरण करायला लागतील. पहिल्यांदा काढताना थोडीशी लाज वाटेल पण मग काही वाटणार नाही. जो मालक स्वतःच्या पाळीव जनावराची विष्ठा काढून कचरा पेटीत टाकत नाही त्याचे हे करणे बाहेर शौचाला जाण्या एवढेच वाईट आहे.

- दर आठवड्याला समाजसेवा करायला थोडा वेळ द्या. आपल्या मुलांना घेऊन आठवड्यात एकदा एक तास तरी आपण ठरवलेला घराबाहेरचा कोपरा साफ करायचा प्रण घ्या. त्या निमित्ताने आपला व्यायाम होतो व मुलांना स्वच्छतेचे चांगले वळण लागते. दर आठवड्याला नियमाने साफ केल्याने, आपण ठरवलेल्या जागेबद्दल आपुलकी निर्माण होते व त्याच आपुलकीतून तो कोपरा साफ ठेवला जातो.

- सार्वजनिक स्वच्छता मोहिमेसाठी आपल्याला स्वतःचा अहंभाव जरा बाजूला ठेवावा लागेल. जी जागा आपली नाही ती साफ करायला बऱ्याच वेळेला आपला इगो मध्ये मध्ये येतो. आपण ती जागा साफ का करावी हा प्रश्न आपल्याला पडतो. आपण कारणे देतो हे काम खरे तर महानगरपालिकेचे आहे, गेल्याच आठवड्यात साफ केले होते मी, लोकांनी परत घाण केली मी काय त्यांचा नोकर आहे की मी साफ करावे? व त्यांनी घाण टाकावी? एवढ्याचसाठी आपण एक कोपरा स्वच्छतेसाठी आपलासा करावा, एखाद्या व्रता प्रमाणे तो नियमितपणाने साफ ठेवावा. हे काम चिकाटीचे आहे व मन शांत ठेवून साफ करण्याच्या उद्देश्याकडे लक्ष ठेवण्याचे आहे बाकीच्या गोष्टी गौण समजाव्यात.

आपण ठरवलेला व स्वच्छतेसाठी दत्तक घेतलेला कोपरा नियमितपणे साफ ठेवा. घाण होऊन देऊ नका, साफ ठेवण्यासाठी तळमळीने काम करावे लागेल पण तरी सुद्धा करा. एकदा करून पाहाच.

Friday, August 15, 2014

बिटींग द रिट्रीट किंवा परिसमाप्ती समारोह



बिटींग द रिट्रीट किंवा परिसमाप्ती समारोह



पश्चिम सीमेवर बिएसएफची फौज तैनात आहे. बॉर्डर सिक्युरिटी फोर्सला आपण ‘बिएसएफ’ ह्या नावाने ओळखतो. युद्धशांतीच्या काळात आंतरराष्ट्रीय सीमेवर बिएसएफ गस्त घालते पण युद्धजन्य काळात मात्र बिएसएफची जागा भारतीय सेना घेते. पाकिस्तानकडून त्यांची ‘बिएसएफ’, ज्याला ते ‘रेंजरर्स’ म्हणतात ते रेंजरर्स गस्त घालतात.



भारताचे अमृतसर व पाकिस्तानचे लाहोर. ह्या दोन शहरांमधून जाणारा ग्रॅन्डट्रंक रस्ता इतिहास प्रसिद्ध आहे. हाच रस्ता पुढे काबूल पर्यंत जातो, व पूर्वेला चितागॉन्ग पर्यंत! साधारण अडीचहजार किलोमीटरचा हा मौर्यकालिन रस्ता, ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात सुद्धा अस्तित्वात होता. त्या काळी ह्या रस्त्याचे नाव ‘उत्तरापथ’ होते. १९४७च्या फाळणीत, ह्याच ग्रॅन्डट्रंक रस्त्यावरून, हजारो हिंदू व पंजाबी लोकं, नवीनच कोरून काढलेल्या देशातून जिवमुठीत धरून भारतात आली होती.



स्वातंत्र्यप्राप्तीच्या वर्षी, सत्तांतराची तारीख १५ ऑगस्ट अशी ठरवली गेली. पण १९४७ सालाच्या जून महिन्याच्या अखेर पर्यंत भारत व नव्या कोरुन काढण्यात येणा-या देशा मधली सीमारेषा ठरवली गेली नव्हती. दोहोंमधली सीमारेषा ठरवण्यासाठी घाईघाईत एक बॉर्डर कमिशन गठीत केले गेले. त्यासाठी जस्टीस रॅडक्लिफ ह्या ब्रिटिश महाशयांना पाचारण धाडले गेले व त्यांना ह्या कमिशनचे अध्यक्ष नेमले गेले. ह्या कमिशन मध्ये मुस्लिम लीग व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते. निःपक्ष पणे कमीशनचे काम करता यावे म्हणूनच जणूकाही कधीही भारत देश न बघितलेल्या व इतिहास तज्ञ देखिल नसणाऱ्या रॅडक्लिफ ह्यांना अध्यक्षपद दिले गेले असावे.



सत्तांतराची तारीख जवळ येत होती. रॅडक्लिफ साहेबांवर बरेच जोखमीचे काम पडले होते. त्यांना पश्चिमेकडे पंजाब प्रांत व पूर्वेकडच्या बंगाल प्रांतातून एक नवा देश कोरून काढायचा होता. हे करण्यासाठी, मुसलमान लोकसंख्या व हिंदू लोकसंख्येला अनुसरून नकाश्यावरती रेघ मारायची होती आणि हे काम करायला रॅडक्लिफ साहेबांकडे फक्त पाच आठवडेच होते. थोड्याच दिवसात रॅडक्लिफ साहेबांच्या असे लक्षात आले की कसेही केले तरी भारतीय जनतेचे समाधान होणारे नाही. परिस्थितीच अशी होती. शेवटी घाईगडबडीत त्यांनी फाळणीचा पाया रचला. गव्हर्नर जनरल माउंटबॅटनला जेव्हा कळले की मुसलमान व हिंदू दोन्ही गटात फाळणीवरून राग धुमसतो आहे तेव्हा त्यांनी रॅडक्लिफ साहेबांचा देशाचे तुकडे करणारा नकाशा, १५ ऑगस्ट ऐवजी दोन दिवस थांबून १७ ऑगस्टला प्रसिद्ध करायचे ठरवले. ह्याच कारणास्तव, आपल्याला स्वातंत्र्य मिळाले तरी दोन दिवस पंजाब मधील जनतेत बरीच घालमेल होती व शेवटी जेव्हा १७ ऑगस्टला नकाशा प्रसिद्ध झाला तेव्हा तर लोकांवर आकाशच कोसळले. फाळणीत लाखो लोकं बेघर झाली व लाखो लोकं प्राणास मुकली. अटारी व वाघा गावांचे पण असेच काहीसे हाल झाले होते. वाघा गावाच्या मधून फाळणीची रेघ ओढली गेली होती. ग्रॅन्डट्रंक रस्त्यावर अटारी पासून चार किलोमीटर अंतरावर घाईघाईत वाघा येथे, बाउंड्री पिलर क्रमांक १०२ जवळ चेकपोस्ट बांधले गेले. कारण फाळणीची रेघ तेथून जात होती. फाळणी नंतर त्या चेकपोस्टचा ताबा, भारतीय सेनेच्या कुमाऊ रेजीमेंट ने घेतला. ११ ऑक्टोबर १९४७ ह्या दिवशी तेथे पहिल्यांदा भारतीय तिरंग्याचा ध्वजारोहण समारंभ पार पडला. सोहळ्याला ब्रिगेडियर मोहिंदर सिंग उपस्थित होते. पुढे पन्नासच्या दशकात ह्या चेकपोस्टवर पंजाब पोलिस गस्त घालत. त्या वेळेला वाघा चेकपोस्ट हा एकच भारत – पाकिस्तान मधला आवक जावकीचा रस्ता होता. १९६५ मध्ये जेव्हा बिएसएफ चे गठन झाले, तेव्हापासून हे चेकपोस्ट बिएसएफकडे आहे. ऑक्टोबर १९४७ सालापासून सुरू झालेला ध्वजारोहण व ध्वज उतरवण्याचा समारोह आजतागायत अव्याहतपणे रोज होतो. ह्याला अपवाद फक्त १९६५ व १९७१चे साल. भारत पाक युद्धकाळात, तेवढा पुरता हा समारोह थांबवला गेला होता.

परदेशात पूर्वीच्या काळी शत्रूपासून गावांचे रक्षण करण्यासाठी गावाच्या वेसेवर तट बांधला जायचा. सकाळी गावातली लोकं तटा बाहेर जाऊन शेती करायची. सूर्यास्ताच्या वेळेला शेती करणाऱ्या गावकरऱ्यांना गावात परतण्यासाठी, नगारे व ब्युगलची धून वाजवून सुचीत केले जायचे व ही बिगुलाची व नगाऱ्याची धून कानावर पडल्यावर आपले काम थांबवून शेतकरी गावात परतायचे व तटाचे दरवाजे रात्रीसाठी बंद व्हायचे. ह्याच सोळाव्या शतकातल्या प्रघाताला अनुसरून युरोप मध्ये ‘बिटींग द रिट्रीट’ ची कल्पना सुरू झाली. त्या काळी सैनिकांना ड्रम्सच्या वेगवेगळ्या बिट्सचा अर्थ माहिती असायचा व त्याच्या तालावर काम चालायचे.



सूर्यास्ता नंतर युद्ध त्या दिवशी पुरते बंद ठेवत असत. ह्याला कारण म्हणजे, रात्रीच्या अंधारात काही दिसत नाही व आपले कोण, व शत्रू कोण हे समजत नाही. अशा मध्ये युद्ध करणाऱ्या दोन्ही गटांमध्ये सूर्यास्ता पासून सूर्योदयापर्यंत युद्धविराम पाळला जायचा. ह्याची सूचना तुताऱ्या, नगारे व ध्वज उतरवून दिली जात असे. असा इशारा होताच सैन्याच्या तुकड्या युद्ध थांबवून छावणीत परतायच्या. ह्यालाच ‘बिटींग द रिट्रीट’ किंवा परिसमाप्ती समारोह म्हणतात. महाभारतात युद्धामध्ये अचानक सूर्यग्रहण लागल्या मुळे गोंधळ उडाला. युद्धविरामाची घोषणा होत असतानाच ग्रहण संपले, युद्धपुन्हा सुरू झाले व त्या गोंधळात जयद्रथाला मारले गेले. अशी कथा आहे. शिवाजीच्या काळात सुद्धा तटाचे दरवाजे संध्याकाळी बंद झाल्या मुळेच हिरकणी गडावर अडकली होती. संध्याकाळी राजवाड्यांची, किल्ल्यांची, गावाच्या वेसेजवळ बांधलेल्या तटाची दारे बंद करण्याचा व भगवा ध्वज उतरवण्याचा प्रघात जरी पूर्वीपासून चालत असला तरी, परिसमाप्ती समारोहा सारखा सोहळा होत नसायचा. तो आपण इंग्रजांकडून स्वीकारला आहे. शिवकालीन किंवा पशवेकालीन सैन्याच्या कवायतींच्या प्रथांमध्ये परिसमाप्तीची प्रथा असल्याच्या नोंदी सापडत नाहीत.



इंग्रजांकडून शिकलेली परिसमाप्ती समारोहाची परंपरा भारतीय सैन्यात आज सुद्धा अस्तित्वात आहे. प्रत्येक सैन्य मुख्यालयात सूर्यास्ताला ‘बिटींग द रिट्रीट’ च्या तालावर भारताचा तिरंगा व त्या त्या मुख्यालयाचा झेंडा उतरवला जातो. दरवर्षी दिल्लीत २६ जॅनेवरीच्या गणतंत्र दिवसाच्या समारोहा नंतर २९ जॅनेवरीला राष्ट्रपतींच्या उपस्तिथीत विजय चौकात परिसमाप्ती समारोह संपन्न होतो. अशा कार्यक्रमाला भारतीय वायुदल, नौदल व सैन्यदलाचे विविध वाद्यवृंद भाग घेतात. दर वर्षी डिसेंबर महिन्यात नौदल हा समारोह मुंबईत साजरा करते.



असाच समारोह, अमृतसर पासून २३ किलोमीटरवर असलेल्या, अमृतसर – लाहोर रस्त्यावरच्या ‘वाघा चेकपोस्ट’ आंतरराष्ट्रीय सीमेवर रोज होतो. भारतीय तिरंगा सूर्यास्ताच्या सुमारास बिएसएफच्या वाद्यवृंदाच्या तालावर त्यादिवसासाठी उतरवण्यात येतो व अमृतसर लाहोर रस्त्यावरचे लोखंडी दार रात्रीसाठी बंद केले जाते. जणूकाही आपल्या देशाचे रक्षण करणारा तट रात्रीसाठी कडेकोट बंद करावा तसेच.



कधीकधी जन्मोजन्मीचे वैरी, अल्पकाळासाठी हसतखेळत एकमेकात चेष्टा करत एकमेकांबद्दलचे वैर दर्शवतात, तसेच काहीसे उभय राष्ट्रांमध्ये आहे. किंबहुना परिसमाप्ती समारोहा मध्ये हेच वैर नाटकीय रूपाने रोज दर्शविले जाते. १९४७ पासून सातत्याने सुरू झालेला ध्वजारोहण व सूर्यास्ताला ध्वज उतरवण्याचा कार्यक्रम सुरवातीला साधाच असायचा. त्याच कार्यक्रमाचे पर्यवसान, सन १९६५ मध्ये एका छोटेखानी पाऊणतासाच्या कार्यक्रमात झाला. आपले बघून लागलीच पाकिस्तान्यांनी पण त्यांचा कार्यक्रम सुरू केला. पुढे जेव्हा बिएसएफचे डायरेक्टर जनरल व पाकिस्तान रेंजर्सचे प्रमुख एकमेकांना भेटले तेव्हा एक नाट्यपूर्ण दिग्दर्शित सोहळा करायचे ठरवले गेले व आताचा वाघा समारोह सुरू झाला. आधी फक्त आवेशच होता. पण बघताबघता हा सोहळा, भारत – पाक संबंधांचा थर्मामीटर ठरला व जसजसा त्यात एकमेकांबद्दलचा द्वेष, त्वेष व क्रोध नाट्यपूर्ण रीतीने रेखाटला जाऊ लागला, तसतसे त्याची प्रसिद्धी व्हायला लागली. आता हा समारोह पर्यटकांचे आकर्षण झाला आहे. आज जगात कोठेही असा समारोह होत नाही. पूर्वी जेव्हा पश्चिम जर्मनी व पुर्व जर्मनी दुभंगलेली राष्ट्र होती, त्या वेळेला सुद्धा बर्लिन वॉलपाशी असा समारोह व्हायचा नाही. उत्तर व दक्षिण कोरिया मध्ये अजूनही होत नाही. बाहेरच्या देशातल्या बऱ्याच पर्यटकांनी वाघा येथे होणाऱ्या कार्यक्रमाची टिका केली आहे. हसे उडवले आहे पण ह्या समारोहा पाठीमागची भावना फाळणी मध्ये होरपळल्या गेलेल्या इथल्या आपल्या हिंदू भावंडांनाच समजू शकते. इतरांना नाही. त्यामुळे बाहेरच्या देशातल्या पर्यटकांच्या टीकेचा फरक आपल्यावर पडत नाही.



वाघा चेकपोस्ट जवळ लोकं संध्याकाळी चार वाजल्यापासून जमू लागतात. हा समारोह बघण्यासाठी बांधलेल्या ग्रॅन्डस्टॅन्ड जवळ जसजसे आपण जायला लागतो तसतसे आपल्याला भारतीय झेंडे व तिरंगी टोप्या विकणारे, रोज होणाऱ्या समारोहाचे फोटो विकणारे विक्रेते भेटायला लागतात. कपाळावर आठ्या आणून नको नको म्हणत पर्यटक त्यांना हुसकावताना दिसतात. आपण जसजसे त्या शाही मंडपाजवळ जायला लागतो तसतसा, हळूहळू गोंगाट वाढायला लागतो. मोठमोठ्यांनी ध्वनिक्षेपकावर लागलेली देशभक्तिपर गीते व गाणी आपल्या कानावर पडत असतात व समारोहाची वातावरण निर्मिती व्हायला लागते. मोठ्याने ऐकू येणारी ‘सारे जहासे अच्छा’, ‘ऐमेरे वतन के लोगो’ अशी गाणी अंगावर रोमांच उठवतात. आधीच ग्रॅन्डस्टॅन्ड वर येऊन बसलेली भारतीय जनता मधूनमधून मोठमोठ्याने ‘हिंदूस्ताsssssन झिंदाबाद’, ‘वंदेsssss मातरम्’ चे नारे लावत असतात. आपल्या नकळत आपण त्या ओरडण्यात सहभागी व्हायला लागतो.



साधारण पाऊणतास, चालणाऱ्या ह्या कवायतीत, रुबाबदार, मोठ्यामोठ्या मिशा ठेवलेले, बिएसएफचे गणवेशधारी जवान असतात. छान कांजी केलेला खाकी रंगाचा शर्ट व खाकी रंगाची विजार. शर्टावर उजवीकडे खिशावर नावाची छोटी पाटी. काळ्या पाटीवर पांढऱ्या रंगाने नाव कोरलेले. शर्टाच्या डाव्या खिशावर रीबनला लावलेली चकाकणारी मेडल्स्. पॅन्ट अशी चढवलेली की पट्ट्यावर जिथे शर्ट दिसायला लागतो त्या भागात शर्टाची फक्त तीनच बटणे दिसतात. कमरेला बिएसएफच्या निळ्या, पिवळ्या व लाल चट्ट्यांचा कमरबंद. त्यावर बिएसएफचे बक्कल असलेला कातड्याचा काळा जाड पट्टा. डोक्यावर मस्त दिमाखदार पागोटे. त्या पागोट्याच्याच कापडाचा डौलदार तुरा व पागोट्याच्या डाव्या बाजूला हळूच कानावर रुळणारी सोनेरी झालर. खांद्यावर बिएसएफच्याच रंगाच्या अॅपलेटस्, खाली काळ्या रंगाचे चकाकणारे ड्रिलशूज. पॅन्ट व जोडे जेथे मिळतात तेथे पांढरी पट्टी ज्याला इंग्रजीत अॅन्कलेट म्हणतात अशी लावलेली असते. अॅन्कलेटमुळे पोषाख उठावदार दिसतो. ड्रिलशूज चामड्याचे असतात व नडगी पर्यंत येतात. टाचेला १३ खिळ्यांनी घोड्याची नाल ठोकलेली असते. त्या ठोकलेल्या नालीमुळे, जोडे घालून चालताना खाड खाड आवाज होतो. जोड्याची लेस लांब असते. लेस बांधताना ती दुमडली गेली नाही पाहिजे म्हणजे छान दिसते. खांद्यावर रायफल व हातात कॉपरपर्यंत येणारे पांढरे हातमोजे. फार रुबाबदार व लक्षवेधी असतो हा पोषाख.



अमृतसर लाहोर रस्त्याच्या डाव्या बाजूला आपला तिरंगा व दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचा चांद तारा, दोन्ही ध्वज असे दिमाखात दिवसभर फडकत असतात. ह्या समारोहात बिएसएफचा एक सेक्शन भाग घेतो. सेक्शनमध्ये बिएसएफचे दहा जवान असतात. एक ब्युगल धारक जवान, व बाकीच्यांनी खांद्यावर घेतलेली रायफल अशी ती दहा जणांची तुकडी असते. तुकडीचे नेतृत्व बिएसएफचा एक हवालदार करतो.



"साsssवधान। बिएसएफच्या हवालदाराचा खड्या आवाजात आपल्या तुकडीला दिलेल्या आदेशाने समारोहाची सुरवात होते. ध्वनिक्षेपकांवर लागलेली सगळी गाणी थांबतात. फक्त लोकांचा एकमेकांशी बोलण्याचा गोंगाट ऐकायला यायला लागतो.



गणवेशावर जान्हव्या सारखा सॅटिनचा लाल सॅशे घातलेला हवालदार खर्ड्या आवाजात तुकडीला तिरंगा उतरवण्यासाठी लागणारे ‘वर्ड ऑफ कमांडस्’ म्हणजेच मोठमोठ्यांदी शब्दाज्ञ्या देत कवायत करवून घेतो. जर बरोबर ठिकाणी पॉज दिला तर कवायत देखणी होते. चपळाईने केलेल्या दोन हालचालींमध्ये जर काही घटकांचा पूर्ण विराम दिला गेला तर, त्या हालचाली खूप उठावदार दिसतात. सांघिक कवायतीत प्रत्येकांच्या हालचाली एकसमयावेच्छेनुसार होतात व एक लय, एक ताल जमतो. संचलन उमदे दिसते. ड्रिल करताना एक लयबद्धता येते, सांघिक शक्तीचा अनुभव येतो, मन तल्लीन होते, हालचाल एकसारखी दिसते. कवायतीत, ज्या बाजूला आपला ध्वज असतो त्याच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे रस्त्याच्या उजव्या बाजूला संचलन करत जायचे व बिगुलाच्या लयबद्ध कर्णमधुर धुनेवर हळूहळू दोरी ओढत ध्वज उतरवायचा. हृदयचीरुन जाणारा बिगुलाचा आवाज ऐकून ग्रॅन्डस्टॅन्ड मध्ये एकदम स्तब्धता होते, शांतता पसरते व बघायला आलेले सगळे लोकं उभे राहतात. प्रत्येकाच्या मनात तिरंग्याप्रतीच्या भावना अशा काही जागृत होऊन एका क्षणासाठी सगळे विसरून देशासाठी सर्वस्व अर्पण करायचा विचार मनात येतो. बिएसएफची पूर्ण तुकडी सावधान होऊन सॅल्यूट करते. तेवढ्यात बिगुलाची ‘रिट्रीट’ धून संपते व बघणारे सगळे ह्या जगात परत येतात. ह्याच प्रकारे हा सोहळा दोघांकडील जवान पार पाडतात. दोघे जेव्हा समोरा समोर येतात तेव्हा एकमेकांनी केलेल्या वैराच्या नाट्ट्याला तोड नाही. बिएसएफ व रेंजरर्सचे दोघेही जवान, नेहमीचीच कवायत करतात, पण त्यात जोष भरत ड्रिलशूज खाड खाड आपटत, उंच उंच कदम ताल करत, एकमेकांसमोर येतात. जसजसे एकमेकांच्या जवळ येतात तसतसे त्यांचा जोष वाढत जातो. ढम ढम वाजणाऱ्या ढोलाच्या तालावर ड्रिल करताना पहिल्यांदा डाव्या पायाने सुरवात करून पाय घुडग्यात न वाकवता पुढे नेऊन टाकताना त्यांचे पाय इतके उंच जायला लागतात की डोळ्यांच्या रेषेत समोर चकाकणारे ड्रिलशूज येतात! परत पाय खाली आणताना जोरात हिलडीग करतात. हिलडिग म्हणजे कवायतीत पाय खाली आणताना आपली टाच जोरात जमिनीला मारायची व जमिनीत रुतवायची. त्याचवेळेस तडक उजवा पाय घुडग्यात न वाकवता पुढे न्यायचा. हात कोपऱ्यात न वाकवता नीट शिताफीने पुढे लंबकासारखा फिरवायचा, परत आणताना जेवढा पुढे नेला तेवढाच तो मागे आणायचा. जसे कवायत करत दोन्हीकडचे जवान समोरासमोर येतात तसे मग आवेशात मिशांना पीळ देत, जोरात श्वास सोडत, मुठी आवळत असा काही आव आणतात की आता दोघे एकमेकांना ठोसेच मारणार असे वाटायला लागते. समारोह समाप्तीला आपआपल्या तुकडीचे नेतृत्व करणारे, दोन्ही ‘वैरी’ हस्तांदोलन करतात व आपआपली लोखंडी दारे लोटून घेतात.



हल्ली ह्या समारोहामध्ये थोडा फरक पडत चालला आहे. सध्या सरकारने नरमाईचे धोरण धरल्यामुळे बिएसएफच्या डायरेक्टर जनरलने व रेंजर्सच्या प्रमुखाने ‘ह्या संचलनातला त्वेष ठेवायचा पण द्वेष काढून टाकायचा’ असा निर्णय घेतला आहे. पण तो संदेश अजून बिएसएफच्या जवानांपर्यंत पोहचायचा आहे असे वाटते. कारण एकदा का ‘भारत माता की जय’ व वंदे मातरम् च्या गर्जना सुरू झाल्या की मग बिएसएफच्या जवानांमध्ये एक आगळाच त्वेष चढतो. पुढचे सगळे आपोआप घडते. २०१० साला पासून बिएसएफच्या ह्या संचलनात महिला सैनिक पण भाग घ्यायला लागल्या आहेत. महिलांच्या सहभागामुळे समारोहाला आगळाच रंग येऊ लागला आहे. हा समारोह बघताना आपल्याला क्षणभर आपल्या मायभूमीसाठी जीवन देणाऱ्या महावीरांचे स्मरण होऊन जाते. डोळ्यात कधी पाणी येते ते कळत नाही व छाती देशाभिमानाने फुलून जाते.



हा सोहळा बघण्या साठी पाचसहा हजाराची गर्दी रोज होते. समारोहाच्या आधी, दोन्ही बाजूला सहलीवर आलेली शाळकरी मुले मुली आपआपल्या देशभक्तिपर गाण्यांवर नाच करताना आढळतात व समारोह संपल्यावर जेव्हा दारे बंद होतात तेव्हा भावनाविवश झालेले प्रेक्षकातील काही बघे धावत लोखंडी दारा जवळ शत्रूवर धावा बोलावा तसे येतात.



सूर्यास्ताला सुरू झालेला हा समारोह संपता संपता अंधार पडलेला असतो व तो पर्यंत आपण इतके भावनावश होऊन गेलेलो असतो की आता पर्यंत आपल्या देशासाठी आपण काहीच केले नाही ह्या सतावणाऱ्या विचाराने आपल्या व्यर्थ घालवलेल्या जीवनाचा आढावा घेत हिरमुसले होऊन परत जायला निघतो. मात्र जाताना ‘त्या’ झेंडे, तिरंगी टोप्या व फोटो विकणाऱ्या मुलाला शोधून, त्याच्या कडून भारताचा छोटा ध्वज व समारोहाचे फोटो आवर्जून घ्यायला आपण विसरत नाही.





Wednesday, July 23, 2014

विचा-यांचा अविचार


 
ठाण्याच्या खासदारांनी, महाराष्ट्र सदनात जेवण चांगले नाही मिळाले म्हणून तेथल्या सुपरीटेंडंटच्या तोंडात बळेने पोळी कोंबल्याचे दृष्य सर्वानीच पाहीले असेल. जेवण चांगले नाही म्हणून राग आलेल्या ठाण्याच्या राजन विचा-यांनी जे कृत्य केले ते निंदनीय आहेच पण त्यावर त्यांचा बचावाचा प्रयत्न अजूनच निंदनीय आहे.
त्या केटररची किंवा त्या सुपरीटेंडंटची कितीही चूक असली तरी कोणाच्या तोंडात कोंबणे म्हणजे व्यक्ति स्वातंत्र्यावर कु-हाड मारण्यासारखे आहे. आपण खासदार आहात, प्रशासनिक कारवाई घेण्याचा अधिकार आपण बाळगता, मग तो सोडून हा अविचार म्हणजे तुमचा खासदारकीचा निव्वळ मगरुरपणाच दाखवतो.
आपण काय विचार करतो ह्या पेक्षा आपण काय कृती करतो ह्यावरच समाजातली आपली प्रतिमा बांधली जाते. लोकसंग्रह करण्या-यांनी तरी हे मनात बाळगून आपली कृती केली पाहिजे. जे राजन विचा-यांनी केले नाही. कोणाला समज द्यायचीच असेल तर असे तोंडात कोंबून कोणाचा वैयक्तिक अपमान करायचे स्वातंत्र्य तर कोणालाही नाही.
ह्या परिस्थितीत राजन विचा-यांनी त्या सुपरिटेंडंची सार्वजनिक माफी मागणे हेच उचित आहे. तसेच राजकीय पक्षांकडून ह्या गोष्टीला हिंदू मुसलमान रंग देण्याची चूक झाली नाही पाहिजे.
 

Sunday, July 20, 2014

बुकर पाहीतोषिक मिळवणा-या बाईंनी केला गांधींचा अपमान


काहीच दिवसांपूर्वी महात्मा अय्यनकालीह्यांच्या जीवनावर बोलताना अरुंधती रॉय ह्यांनी महात्मा गांधींना वर्णद्वेशी म्हटले. त्या पुढे म्हणाल्या It is part of a political conspiracy to perpetuate the caste system that such heroes are never celebrated. All the while, the nation has been fed on centuries of lies about “mahatmas,” who never openly renounced the caste system but instead, advocated that the hereditary occupation of people who belonged to a particular caste ought to be the maintained social order. The story of Gandhi that we have been told, is a lie. It is time to unveil a few truths, about a person whose doctrine of nonviolence was based on the acceptance of a most brutal social hierarchy ever known, the caste system. Gandhi believed that a scavenger should always remain a scavenger. Do we really need to name our universities after him?”

गांधी, सावरकर, फूले, आय्यनकलीह्या सगळ्या महात्म्यांनी छूत अछूत व वर्णद्वेशा विरुद्ध केवढे मोठे काम केले होते ते सर्व परिचितच आहे. पण ह्या सगळ्याला बगल देऊन फक्त प्रसिद्धीसाठी अरूंधती बाईनी जो महात्मा गांधींचा अपमान केला तो निंदनीय आहे.

 

अरूंधती बाईंना देशद्रोही वक्तव्य देण्याची जणूकाही सवयच आहे. एवढे काय कमी होते, आता राष्ट्रपित्याचा अपमान करुन प्रसिद्धी माध्यमात राहण्याचा प्रयत्न चालू आहे. दूस-यांना नावे ठेवून स्वतः वर्तमान पत्रातून बातमी बनून राहायचे हे केजरीवाल, अरूंधती बाई ह्यांना सहजच जमते.

 

आपले मत ठेवण्याचा अधीकार सगळ्यांना आहे, पण ह्या थोर स्वातंत्र्य सैनिकांच्या आपला देश स्वतंत्र होण्यासाठी दिलेले योगदान विसरून चालणार नाही. बूकर पारितोषिक मिळाले म्हणून कोणालाही काहीही म्हणायचे स्वातंत्र्य मिळाले असे वाटायला नको.

Thursday, January 23, 2014

लालबत्तीचे राजकारण

लालबत्तीचे राजकारण

"मैं अनार्कीस्ट (अराजक) हूँ।". "हमारे लोगोंसे हम राजपथ भर देंगे। देखता हूँ गणतंत्र दिन कैसे मनाते है इस बार।". "दिल्ली पुलीस को मेरा आवाहन है की छुट्टी लेके आम आदमी पार्टी के इस धरने मे शामील हो जाए।" श्री केजरीवालसाहेबांनी हरताळ करणाऱ्या कार्यकर्त्यांना भाषणात इशारा केला. हरताळ रेल भवना समोरच्या बागेत चालला होता. दोन दिवस दिल्लीकरांना मेट्रो सेवा उपलब्ध होऊ शकली नाही.

अनार्कीस्टची परिभाषा बदलली पाहिजे असे केजरीवालांचे मित्र श्री आशुतोष दूरदर्शनवर म्हणाले. अराजक ह्याचा एकच अर्थ होऊ शकतो. केजरीवाल साहेबांनी अराजकता केली म्हणून त्याला राजकारणाचा भाग म्हणून खपवून घेता येणार नाही. "मैं जेटली और सालवे पर थुंकता हूं।" आम आदमी पक्षाचे सोमनाथ भारती हरताळात भाग घेताना म्हणाले. गेले दोन दिवस दिल्ली मध्ये आम आदमी पक्षाच्या धरण्यामुळे, लोकांचे भयंकर हाल झाले.

धरणे देऊन काही उपयोग होत नाही असे दिसल्यावर व चोहोबाजूंनी टीकेची झोड उठलेली बघून आम आदमी पक्षाने केंद्र सरकारचा काही पोलिसांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याच्या प्रस्तावाचा अतिशीघ्रतेने स्वीकार करून धरणे संपवले. केजरीवालांनी सोमनाथ भारती ह्यांना पाठिंबा देऊन आफ्रिकन मुलींवर केलेल्या कारवाईचे पूर्णं खापर पोलीस कर्मचा-यांवर फोडले. तीन पोलीस कर्मचा-यांना निलंबित करण्यासाठी हरताळाचा घाट घातला. केजरीवाल स्वतः हरताळ करायला बसले. जर केजरीवालजींनी सोमनाथ भारती ह्यांना तपास पूर्णं होई पर्यंत मंत्र्यांच्या जबाबदारीतून मुक्त केले असते तर काही तरी वेगळे केले असे वाटले असते. पण बाकीच्या राजकीय पक्षांसारखेच त्यांनी सोमनाथ भारती ह्यांची चूक असून सुद्धा पाठीशी घातले. एवढेच नव्हे तर लोकांची दिशा भूल करण्याच्या इराद्याने हरताळाचे सोंग घेतले. जर का आम आदमी पक्ष इतर पक्षांपेक्षा काही वेगळा आहे हे दाखवायचे असते तर सोमनाथ भारती ह्यांना केजरीवालांनी निलंबित किंवा तो पर्यंत त्यांना मंत्र्यांच्या जबाबदारीतून मोकळे करायला पाहिजे होते. पण मंत्रिमंडळांत आल्यावर सोमनाथ भारती "आम" चे "खास" आदमी झाले ना!

केजरीवालांचे सरकार आल्यापासून तुसडेपणाची भाषा रोज ऐकायला मिळते. ते व त्यांच्या अनुयायांचा गर्विष्ठपणा सतत अनुभवायला येतो. कोणत्याही दूरदर्शन वाहिनीवर चांगुलपणाचे पुढारी फक्त आम आदमी पक्षच आहे अशा आवेशात बोलणे असते त्यांच्या प्रवक्त्यांचे. काही काही वाहिनीवर तर प्रवक्ते येत सुद्धा नाहीत.

केजरीवालसाहेब, लाल बत्तीचा खरा अर्थ असा आहे की, जे सरकारच्या जवळचे आहेत त्या मोजक्याच लोकांना मिळणारी सूट, मिळणारे छत्र आणि मिळणाऱ्या सुविधा. त्याचे द्योतक म्हणजे मंत्र्यांच्या गाडीवर लागलेले लाल दिवे. केजरीवालसाहेब, हे लाल बत्तीचे दिवे काढून टाकले असले तरी एका मंत्र्याला पाठीशी घालून व तीन पोलीस कर्मचाऱ्यांना घरी बसवून लाल बत्तीच्या त्याच पूर्वीच्या संस्कृतीचे विद्रूप दर्शन सगळ्यांना दिले आहेत तुम्ही. केजरीवालसाहेब लोकांना दाखवायला लाल दिवे काढण्याने लाल बत्तीची संस्कृती जाणार नाही. उलट ह्या सगळ्या प्रकारामुळे तुमचे सुद्धा दाखवायचे दात व खायचे दात निराळे आहेत ह्याची आम आदमीला कल्पना आली.

ह्या कृती मुळे केजरीवालांची आम आदमी पार्टी बाकीच्या पक्षांसारखीच आहे असे दिसून येते एवढेच काय पण ह्या पंधरा दिवसात तुमचे अराजकतेचे गुण सुद्धा लोकांना कळले. बरे झाले वेळेवर कळले. शहाण्यांनी ह्या पक्षा पासून दूरच राहावे. नाहीतर आपण सुद्धा त्यांच्या बरोबर अराजक ठरायचो.

आज केजरीवालसाहेबांनी पोलिसांना जसे चिथवले तसे सेनेत कोणी केले असते तर त्या आधीकाऱ्याचे लागलीच कोर्ट मार्शल झाले असते व सेनेतून तडका फडकी बाहेर निघावे लागले असते.