Monday, February 21, 2011

२० वर्ष - विस्थापीत काश्मिरी हिंदू – भाग ४ (अंतीम)





(१९८९ मध्ये काश्मीरच्या हिंदूंना अतिरेकी संघटनांनी पत्रके वाटून - खोऱ्यातून बाहेर जा - अशी ताकीद दिली व त्या वेळी हजारोंच्या संख्येने काश्मिरी हिंदू खोऱ्यातले पिढ्यांपिढ्यांचे त्यांचे घरदार सोडून जम्मू व दिल्ली ला निघून गेले. हा एक प्रकारचा होलोकास्टच त्यांनी अनुभवला................ वाचा २० वर्ष - विस्थापित काश्मिरी हिंदू – भाग १)



(आमच्या बॅच मध्ये सुनील खेर नावाचा काश्मिरी जिसी होता. आमच्या सारखाच तो ही एक कॅडेट. अधिकारी होण्याच्या प्रतीक्षेत दिवस मोजत. त्याला वडील नव्हते. तो आणि त्याची आई, बारामुल्ला जवळच्या सोयीबुक ह्या गावात राहायचे. त्यांची छोटी हवेली होती तिथे. त्याचे वडील काश्मीर खोऱ्यात एका दैनिकाचे संपादक होते. एक दिवस ते त्यांच्या कचेरीतून परत आलेच नाहीत.......... वाचा २० वर्ष - विस्थापित काश्मिरी हिंदू – भाग २)



(चार दिवस होऊन सुद्धा आला नाही त्यामुळे आम्ही काळजीत होतो. तो कोठे असेल आता, येईलका परत. परत आयएमएत आला तर त्याचे कायहोईल. आम्हाला त्याचा तो निग्रही चेहरा आठवून आम्हाला वारंवार वाईट वाटत होते. आठ महीने एकत्र रगडा खाल्लेले आम्ही. एकमेकांचे जिवाभावाचे मित्र झालो होतो........... वाचा २० वर्ष - विस्थापित काश्मिरी हिंदू – भाग ३)



आम्ही घर सोडताना माझ्या वडीलांचे श्री माटू नावाचे एक जवळचे मित्र भेटायला आले होते. त्यांच्या डोळ्यात पाणी होते. म्हणाले मी आज माझ्या मित्रासाठी काही करू शकत नाही. आम्हीच ठरवले होते की त्यांच्या कडे रहायचे नाही. आमच्या शेजारच्या वाखलू कुटूंबाला जेव्हा काश्मीर सोडून जायला सांगीतले होते तेव्हा ते काश्मीर सोडून जाण्या ऐवजी त्यांचे राहाते घर सोडून त्यांच्या आप्तेष्टांकडे राहायला लागले होते. पण काहीच दिवसात त्यांच्या आप्तेष्टांसकट त्या संपूर्ण कुटूंबासच प्राणास मुकावे लागले होते. माटू अंकलने आम्हाला जम्मू मधल्या मूठी नावाच्या विस्थापितांच्या शिबिरात जायचा सल्ला दिला. माटू अंकल म्हणाले, काय माहिती, काही दिवसांने मला पण तेथेच जावे लागेल. आमच्याकडे खोऱ्यातले घर सोडून दुसरे कोठचेच राहाण्याचे ठिकाण नव्हते. निघायच्या आधी घरात वडलांकरता एक चिठ्ठी लीहून ठेवली. माझी आई जवळ जवळ बत्तिस वर्ष त्या घरात राहीली होती. मी वीस वर्ष. त्या घराची भिंतीदारे बोलायला लागली होती. आज तेच घर आम्ही सोडून चाललो होतो. त्याघरात परत जाऊ शकू का त्याला कायमचे मुकू हे माहित नव्हते. घर परत बघायला मिळेल की नाही. मिळालेच तर किती वर्षाने आणि कोठच्या स्तिथीत. काहीच कल्पना नव्हती. आईसाठी मी गरम गरम कहावा केला. आमचा तो तेथला शेवटचा कहावा. रोज सकाळी आईला बाहेरच्या खोलीत बसून कहावा प्यायची सवय होती. आईने व मी घराला न्याहाळले. आईला रडू आवरत नव्हते व माझ्या घशात हुंदक्याचा गोळा जमून दुखायला लागला होता. आम्ही एकमेकांच्या हातावर चमचाभर विरजलेले दही दिले. घराला कुलूप ठोकले व बाहेर पडलो. मला आईचे खुप वाईट वाटत होते. ती शिबिरात गेल्यावर स्वतःला कशी सावरेल ह्याची कल्पनाच करवत नव्हती. एक टॅक्सी करून थेट जम्मूला पोहोचलो.



आम्ही मूठी शिबिराच्या दाराशी येऊन धडकलो. एका जुन्या सरकारी गोदामाचे तात्पुरते शिबिर केले होते. आम्हाला एक खोली देण्यात आली. माझी आई एकटी होती म्हणून एक खोली तरी मिळाली. नाहीतर कुटूंबच्या कुटूंब ताडपत्रीच्या टेंट मध्ये राहताना मी बघीतले. मला तशा परिस्थीतीत सुद्धा आयएमएतल्या टेंट बांधायला शिकवायच्या कॅम्पची आठवण आली. आम्ही आयएमएत होतो व सैन्यातली नोकरी करण्यासाठी आलो होतो. आम्हाला शिकवतात टेंट मध्ये राहायला ते यद्धजन्य परिस्थीतीशी तोंड देण्यासाठी. वाईट ह्याचे वाटते की, येथे आपल्याच देशातल्या आपल्याच लोकांना त्यांचा प्रदेश सोडून कडाक्याच्या थंडीत टेंट मध्ये राहायला लागत होते. राज्यकर्त्यांना जर असे राहावे लागले असते तर ह्या प्रश्नाकडे पाहाण्याच्या त्यांच्या दृष्टीकोनात निश्चित बदल झाला असता. आपल्याच देशात आपणच पोरके. देव करो आणि येथे पदोपदी तुडवला जात होता तसा कोणाचा स्वभिमान पायतळी तुडवला जाऊ नये. मी आईला सोडले. शिबिरातल्या खानावळीत कहावा घेतला व परत जायला निघालो. आजचा चवथा दिवस होता. पोहोचायला अजून एक दिवस लागणार होता. माझ्या डोळ्या पुढे आता पुढची आयएमएतली लढाई दिसत होती. आईला एवढेच सांगीतले होते की मला जायला पाहीजे नाहीतर कोर्स बुडेल. काय सांगू अजून. आईचे दुःख काय कमी होते. त्या कॅम्प मध्ये एकटे रहायचे. इतक्या वर्षाचे स्वतःचे घर एका दिवसात सोडून, आपल्या सगळ्या जवळच्यांना सोडून येथे परक्या जागेत नवीन घर तयार करायचे. एक प्रकारचा वनवासच हा. बरेच विस्थापित मनोरुग्ण झाले ते ह्याच परिस्थिती मुळे. माझी आई खोऱ्यात शिक्षिका होती त्यामुळे ती मूठी शिबिरातल्या शाळेत शिकवायला लागली. तीने स्वतःला सावरून घेतले. आई येणाऱ्या डिप्रेशनशी कामात मग्न होऊन लढू शकली. एका अर्थाने ते बरेच झाले नाहीतर मी एवढ्या लांबवर राहून काहीच करू शकलो नसतो. बाकीच्यांचे काय हाल झाले असेल इश्वरच जाणे.



मी परत आयएमएत परतलो. माझ्या दिलेल्या सुट्टीच्या तब्बल २४ तास उशीरा. सकाळच्या पिटी परेडला हजर झालो. मला पिटी परेड मधून बाहेर काढून डि एस ने आपल्या ऑफिस मध्ये बोलावले. म्हणाला तु माझा दिलेला शब्द पाळला नाहीस. तूझे सैन्याच्या नियमांनुसार ओव्हर स्टेइंग ऑफ लिव्ह झाले आहे. उशिरा येणाऱ्याला आर्मी मध्ये कडक शिक्षा असते. तुझी केस आता माझ्या हातात नाही. तुला बटालियन कमांडर कडे जावे लागणार आहे. मी, डि एस गिलला मुठी कॅंप मध्ये आईला दाखल केले त्याची कागदपत्रे दाखवली. ती त्याने बघीतली पण त्याचा फार काही उपयोग झाला नाही. आयएमए मधल्या नियमांनुसार उशीरा आलो हा गुन्हा हातून घडलाच होता व त्यासाठी काही अपील नव्हते. त्याच्या साठी होणारी शिक्षा भोगावीच लागणार होती. आपल्याकडे नियमांविरुद्ध अर्ज करणे व नियम का पाळला नाही त्याला कारणे देणे आपल्यात भिनले आहे. नियम फक्त दुसऱ्यांसाठी असतात असे प्रत्येकाला वाटत राहाते. आपल्यावर नियमा प्रमाणे वागण्याची वेळ येते तेव्हा कारणे सुचतात व सुचलेली कारणे किती उचीत आहेत ह्याचे महत्व दुसऱ्याला पटवले जाते. मग नियमाचे उल्लंघन करायला आपण मोकळे होतो. गंमतीची गोष्ट अशी की आपले काम झाल्या झाल्या आपण त्याच नियमाचे समर्थन करायला सुरवात करतो व दुसऱ्याने नियमाने कसे वागले पाहिजे ह्याचे धडे देण्यास लागतो. ही सवय बरोबर नाही ह्याची कल्पना आयएमए करून देते. नियम न पाळणे ह्यात काही शहाणपण नाही. माणसाचे थोरपण तेव्हाच कळते जेव्हा तो नियम पाळून यशस्वी होतो. जर नियमांचे उल्लंघन झाले तर त्याला असलेली शिक्षा भोगाविच लागते त्या विरुद्ध अर्ज करण्याचा काही फायदा होत नाही व अर्ज करण्याची सवय पण तितकीच वाइट आहे हे ही आयएमएत नियमांचे काटेकोर पालन करायला लाउन उदाहरणाने शिकवले जाते.



कंपनी कमांडर कडे गेल्यावर त्याने मला सांगीतले की माझ्या कडून चार दिवसाच्या सुट्टीचे उल्लंघन झाले आहे व आयएमएच्या नियमांनुसार शिक्षा होऊ शकते. आता निर्णय बटालियन कमांडर व उपकमांडंट ह्यांच्यावर अवलंबून आहे. जेव्हा कंपनी कमांडर मेजर शेखावतने उपकमांडंटचे नाव घेतले तेव्हाच मी समजून चुकलो की माझ्या रेलीगेशनचा किंवा मला काढून टाकण्याचा विचार चालला आहे. कारण रेलीगेशनचा निर्णय व आयएमएतून काढून टाकायचा निर्णय बटालीयन कमांडर व उपकमांडंट दोघे मिळून घेतात. बटालियन कमांडर माझ्यावर आधीच नाराज आहेत ह्याची कल्पना होतीच. उपकमांडंटचा निर्णय बराचसा बटालियन कमांडर च्या शिफारसीवर अवलंबून असतो.



संध्याकाळी मला हॅकल ऑर्डर मध्ये बटालीयन कमांडर कडे नेण्यात आले. शिक्षा होणाऱ्या जिसीला हॅकल ऑर्डर मध्ये जावे लागते. हॅकल ऑर्डर मध्ये आयएमएचा पोषाख घालायचा व बॅरे वर लागलेल्या आयएमएच्या बिल्ल्यावर लाल पिसांचा तुरा खोवायचा. ह्या पोषाखात जिसी एकदम रुबाबदार दिसतो. आयएमएत डोक्यावर घालतो त्या टोपीला बॅरे म्हणतात. बॅरेवर लावायचा पिसांचा तुरा आयएमएच्या शॉपिंगसेंटरवर मिळतो. प्रत्येक जिसीकडे तो असतो. जेव्हा शिक्षेसाठी जावे लागायचे त्यावेळेला हा तुरा खुपसावा लागायचा. असा तुरा खुपसलेला जिसी दिसला की समजावे की काहीतरी चूक जिसीच्या हातून झालेली आहे व तो कोणत्या शिक्षेसाठी तरी जात आहे नाहीतर शिक्षा सुनावणीसाठी तरी जात आहे. आयएमएतल्या शिक्षा सुद्धा अजब असायच्या. प्रामुख्याने बजरी ऑर्डर, २८ डेज, पट्टी परेड, हॅकल ऑर्डर, मंदिर दाये छोड, चिंडिट ऑर्डर अशा विचित्र नावांच्या त्या शिक्षा.



बजरी ऑर्डर मध्ये अंगावरच्या रुट मार्चच्या पॅक्स मध्ये सामाना ऐवजी टॉन्स नदीच्या किनाऱ्यावरली वाळू व गोटे भरावे लागायचे. मागे भदराज कॅंपच्या वेळेला वर्णन केलेला पंधरा किलो वजनाचा पॅक असे गोटे भरल्या मुळे चांगला तीस चाळीस किलो वजनाचा भरायचा. मग असा वाळूने म्हणजेच बजरीने भरलेला पॅक घेऊन उभे रहायचे किवा काही अंतर चालावे लागायचे. ते शिक्षा देणाऱ्याच्या मर्जीवर अवलंबून असायचे. पाठीची अक्षरशः वाट लागायची त्या शिक्षेत. मणक्याला ते टॉन्स नदी मधले गोटे टोचत राहायचे. ह्याच पॅक मध्ये बजरी ऐवजी जर कॅंपचे सामान घातले तर त्याला चिंडीट ऑर्डर म्हणायचे. ह्या चिंडीट ऑर्डरचा पॅक जरा मोठा असायचा. कांबळे, मछरदाणी, खायचा डब्बा, दाढीकरायचे सामान, विजेरी, खायचे सामान इत्यादी सगळ्या मिळून पन्नास गोष्टी भराव्या लागायच्या. तपासनी मध्ये एकही गोष्ट कमी आढळली की अजून शिक्षा वाढायची. दुसऱ्या महायुद्धात चिंडीट नावाची एक स्पेशल फोर्स ब्रिगेडीयर विनगेटने तयार केली होती. ब्रह्मदेशातल्या मंदीरांचा –चिंथे- नावाचा राखणकरणारा देव आहे असे तेथिल लोकांचे मानणे. त्यावरून त्या स्पेशल फोर्सला चिंडीट हे नाव पडले. स्पेशल फोर्सेसना ब्रह्मदेशातल्या इरावडी नदी पार करायला जंगलातून व नद्या नाले पार करण्यास उपयुक्त असे सामान घेऊन जावे लागले होते. त्या मुळे चिंडीट ऑर्डर मध्ये अशा प्रकारचे सामान बांधलेले असते. आयएमएत चिंडिट ऑर्डरचा अर्थ हे सगळे सामान मोठ्या पॅक मध्ये बांधायचे व निर्देशवल्या ठिकाणी हजर रहायचे. ह्या शिक्षेनी तसे सामान बांधण्याची सवय होते. पट्टी परेड म्हणजे पटापट वेगवेगळे पोषाख बदलायचे. प्रत्येक पोषाख बदलायला दोन मिनिटे मिळायची. आयएमएतले पोषाख तरी किती प्रकारचे असत. एक पोषाख पिटी परेड साठी. ड्रिल साठी वेगळा. आयएमएतल्या क्लासेस साठी वेगळा. शस्त्रांचे शिक्षण (विपन ट्रेनिंग) साठी वेगळा, मुफ्ती ड्रेस जो संध्याकाळच्या जेवणासाठी आसायचा तो वेगळा. असे ८ – ९ प्रकारचे पोषाख. संध्याकाळच्या वेळेला जेव्हा बाकीचे जिसी अभ्यासाला बसायचे त्यावेळेला ही पट्टी परेड चालायची. मंदिर दाये छोड ही गमतीदार शिक्षा असायची. डि एस एखादे लांबवर दिसणारे मंदीर, जिसीला बोटाने दाखवायचा व म्हणायचा त्या मंदिराला शिवून ये. मग जिसी दुरवर दिसणाऱ्या त्या मंदीराच्या दिशेने पळत जायचा व मंदीराची प्रदक्षिणा घालून यायचा. अगदी स्टिपल चेस मध्ये जसे पळावे लगाते तसेच. कोठचे मंदीर दाखवायचे ते डि एसच्या मनावर अवलंबून असायचे. कधी कधी ते मंदीर दोन किलोमीटरवर असायचे कधी कधी डि एस खुप चिडला असेल तर पाच किलोमीटर दूर असलेल्या मंदीराकडे बोट दाखवायचा. ह्यात सगळ्यात सोपी शिक्षा हॅकल ऑर्डरच असायची. अजून एक शिक्षा होती जी सगळ्यात कठीण व कठोर अशी मानली जायची. त्यात ह्या शिक्षेस पात्र जिसी साठी वेगळे वेळापत्रक केलेले असायचे. त्यात आत्ताच वर्णन केलेल्या सगळ्या शिक्षा दिवसभरात केव्हा ना केव्हा वेळापत्रकाप्रमाणे कराव्या लागायच्या. जिसी हे सगळे करता करता अगदी जेरीला यायचा. ह्या शिक्षे मध्ये जिसीचा दिवस सकाळी चार वाजता सुरू व्हायचा – सकाळी चार वाजता जिसी, ड्रिलस्क्वेअरवर हॅकल ऑर्डर मध्ये रिपोर्ट करायचा. तशात आयएमएतली अंतरे एवढी लांब लांब असायची कि ड्रिलस्क्वेअर दोन तीन किलोमीटर दुर असायचे. सायकल वरून जायला लागायचे. हे झाल्यावर मग जेवणा पर्यंत जिसीचा नेहमीचा ठरलेला दिनक्रम बाकीच्या आयएमएच्या वेळापत्रकाप्रमाणे चालायचा. दुपारी जेव्हा बाकीचे जिसी एक तासाची विश्रांती घ्यायचे त्या वेळात ही शिक्षा झालेला जिसी एक्स्ट्रॉ ड्रिल – ड्रिलच्या पोषाखात करायचा. परत दुपारी बाकीच्या जिसीज बरोबर गेम्स परेड चालायचीच. संध्याकाळी स्मॉलपॅक लाऊन व रायफल घेऊन बॅटल ऑर्डर मध्ये ५ किलोमीटरची दौड लागायची. त्यानंतर संध्याकाळी ६ वाजता परत ड्रिलस्क्वेअर वर हॅकल ऑर्डर मध्ये रिपोर्ट द्यावा लागायचा. संध्याकाळी बाकीच्या जिसीजना अभ्यासासाठी जेव्हा वेळ मिळायचा त्या वेळेला ह्या शिक्षेत जिसी रात्रीच्या चिंडीट ऑर्डरची तयारी करायचा. रात्री अकरा वाजता अशा जिसीला चिंडीट ऑर्डर मध्ये ड्रिल स्क्वेअरला रिपोर्ट करावे लागायचे. रात्री अकरा वाजता त्याच्या पॅक मधले सामान चेक व्हायचे. छोट्या छोट्या अशा पन्नास गोष्टी असायच्या आणि एकही गोष्ट ठेवायची राहिली की मग अशी शिक्षा अजून एका दिवसाने वाढायची. हा ह्या कठोर शिक्षेचा अजून एक नियम. असा हा खास वेळापत्रकाने बांधलेला ह्या कठोर शिक्षेचा एक दिवस. किती दिवस अशी शिक्षा झेलायची ते जिसीच्या चूकीवर अवलंबून असे. परेडला लेट आला तर साधारण तीन दिवस अशी शिक्षा मिळायची. पोषाख वाईट असेल तर एक दिवसाची ही कठोर शिक्षा मिळायची. गंमत अशी की शिक्षा करताना जर काही चूक झाली तर मागे सांगितल्या प्रमाणे शिक्षेत हळू हळू वाढ व्हायची. एका टर्म मध्ये जिसीला जर अशी कठोर शिक्षा मिळून अठ्ठाविस दिवसा पेक्षा जास्त दिवस झाले तर त्याचे आपोआप रेलीगेशन व्हायचे. सगळ्यात कठोर अशी ती शिक्षा असायची व साधारण जिसीला एका वेळेला दहा दिवसा पेक्षा जास्त ही शिक्षा मिळायची नाही. त्या मुळे ह्या कठोर शिक्षेचा हिशोब प्रत्येक जिसी ठेवायचा व आपले वर्तन सांभाळायचा.



रेलीगेशन होते की आपल्याला आयएमएतूनच काढून टाकले जाणार ह्या पैकी काय कानावर पडणार ह्या विचारात मी हॅकल ऑर्डर मध्ये बटालीयन कमांडरच्या ऑफिसच्या पोर्च मध्ये उभा होतो. माझा पोषाख ठिक आहे का हे कॅप्टन गिल स्वतः जातीने बघत होता. छान खोचलेला शर्ट, बेल्टच्या वर फक्त तीन बटणे दिसली पाहिजेत म्हणजे छान दिसतो पोषाख. तसा आहे ह्याची खात्री करत मला धिर देत होता कॅप्टन गिल. ड्रिलचे नाळ लावलेले पॉलीशने लख्ख चमकावलेले जोड्याचे पुढचे काळे टोक, मी माझ्या रुमालाने हलकेच साफ केले. हॅकल लावलेली बॅरे डोक्यावर चापून बसवली. बॅरेची कपाळावर बसणारी पट्टी आणि भुवया ह्यात तीन बोटांचे अंतर आहे हे सुनिश्चीत केरून मी तयारीत उभा राहिलो. तेवढ्यात सुभेदारमेजरचा खडा आवाज माझ्या कानावर आदळला. साsssव धान. जिसी सुनील खेर आगे चलेगाssssss तेज चल. जसा मी बटालियन कमांडरच्या ऑफिसात टेबला पुढे संचलन करत पोहोचलो तसा मागून पुन्हा आवाज आला. जिसी सुनील खेर sssss......... थम १ २. मी सावधान मध्ये उभा राहीलो. सुभेदारमेजरचा पुन्हा आवाज जिसी सुनील खेर सॅल्यूट १ २. माझ्या बरोबर शेजारी उभ्या असलेला कॅप्टन गिलने पण बटालियन कमांडरला त्याच तालावर सॅल्यूट केला.



सुभेदारमेजरने खड्या आवाजात माझा गुन्हा म्हणून दाखवला. नं ३८९७ जिसी सुनील खेर चार दिनकी छुट्टीपर गया था। छुट्टीके बाद एक दिन देरीसे उसने रिपोर्ट किया है। आर्मी एक्ट ३२ के मुताबिक जिसी सुनील खेर एक दिन बिना छुट्टी लिये छावनीसे बाहर था। सजा के लिये हाजिर है।



हे ऐकून बटालियन कमांडर करड्या आवाजात म्हणतो - जिसी सुनील खेर, यु वेअर एब्सेंट विदाऊट लिव फॉर वन डे. एज पर आर्मी एक्ट ३२ यु आर गिल्टी. डु यु प्लिड गिल्टी.



मी म्हणालो - येस सर.



बटालियन कमांडर - फॉर युअर एक्ट ऑफ धिस यु आर गिवन अ पनिशमेंट ऑफ २८ डेज. सुभेदारमेजर मार्च हीम ऑफ.



मला मागून सुभेदारमेजरचा आवाज आला. जिसी सुनील गाडरू सॅल्यूट १ २. पिछेssss मुड......... जिसी सुनील खेर आगेसेssssss तेज चल. बाकीची कवायत एका यंत्रा सारखी मी करत होतो. लांबवर कोठे तरी अजून बटालियन कमांडरचा आवाज कानात घुमत होता. – २८ डेज. २८ दिवसांची कठोर शिक्षा. सगळ्यात कठोर वाटणारी ती शिक्षा ऐकून कोणा जिसी वर आभाळच कोसळले असते पण मला एकदम हूरुप आला. माझ्या आनंदाला पारावार राहीला नाही. माझे रेलीगेशन सुद्धा झाले नव्हते मग आयएमएतून काढून टाकणे राहिले बाजूला. बटालियन कमांडरनेच माझी तशी शिफारिश केली असणार उपकमांडंट कडे. मनातल्या मनात मी बटालियन कमांडरला धन्यवाद दिला. माझ्या मित्रांना ही बातमी कधी सांगतो असे झाले. आईला ह्यातले काहिच माहित नव्हते त्या मुळे सांगायचे असे काहीच नव्हते. आज रात्री शिक्षेवरून आल्यावर आईला पत्र लिहिणार होतो आमच्या नव्या पत्त्यावर – श्रीमती इंदूकुमारी खेर, नं २६७५, मूठी विस्थापित शिबिर, फेज

२, जम्मू १८११२४.

२० वर्षा नंतर –



आपणाला जर जाणून घ्यायची इच्छा असेल की आज सुनील खेर आणि त्याचा

परिवार कोठे आहे तर वाचा....



जिसी सुनील खेर आता कर्नल सुनील खेर झाला आहे. पुण्यात एक छोटा दोन

खोल्यांचा ब्लॉक आहे. जेव्हा त्याची पोस्टींग फिल्ड मध्ये असते तेव्हा त्याची आई तिथे राहाते. वडील परत कधी भेटलेच नाहित. इतर वेळेला आई त्याच्या बरोबर राहते. गेल्या वीस वर्षात काश्मीर मधिल घरात ते कधी गेले नाहीत. कमीशन मिळाल्यावर काश्मीर मध्ये त्याची पोस्टींग दोनदा झाली. तरी सुद्धा. एकदा पोस्टींगवर असताना हेलीकॉप्टर मधून त्याने त्याचे घर बघितले होते. दुसरेच कोणी तरी राहाते त्यात आता. त्याचे काश्मीर सुटले पण त्या आठवणी व तो कडवटपणा गेला नाही. असेच काहिसे बाकीच्यांबरोबर झाले आहे. आता काश्मीर मध्ये काश्मिरी हिंदू नगण्य राहिले आहेत. त्यांची घरे, त्यांची स्थावर मिळकत, सारे फस्त झाले आहे. मागे राहिलेत फक्त कटू आठवणी, मानसिक क्लेश व मनोरुग्ण. जम्मू मध्ये आता आठ शिबिरे आहेत व दिल्ली मध्ये साधारण पंधरा जागी शिबिरांसारखे साधारण पस्तीस हजार काश्मिरी कुटूंब राहतात.



(राजाराम सिताराम एक, राजाराम सिताराम दो – ही आय एम ए वर आधारीत कथा लवकरच प्रसिद्ध करत आहे)




Thursday, February 10, 2011

२० वर्ष - विस्थापीत काश्मिरी हिंदू – भाग ३


जीसी सुनील खेर चार दिवसाच्या सुट्टीवर गेल्या पासून परत आला नव्हता. तो गेल्या पासून आजचा पाचवा दिवस होता. आम्ही काळजीत होतो. तो कोठे असेल आता, येईल का परत? सुट्टी वरून उशीराने परत जरी आला तरी आय एम ए च्या नियमानुसार त्याचे काय होईल? त्याचा तो निग्रही चेहरा आठवून आम्हाला वारंवार वाईट वाटत होते. आठ महीने एकत्र रगडा खाल्लेले आम्ही जीसी, एकमेकांचे जिवाभावाचे मित्र झालो होतो. त्यातून तो आमच्याच बटालियनचा, आमच्याच कंपनी मधला व आमच्याच प्लटूनचा. मला दोन गोष्टींची काळजी लागून राहीली होती. तो परत येईल का, व तो त्याच्या आईला कोठे सोडणार – त्याची आई घर सोडून कोठे जाइल, कोठे राहील व तीचे कसे होईल.

कोणाला जर का फर्मावले की, तुमचे राहाते घर तडकाफडकी खाली करा व चालते व्हा तर काय वाटेल त्या कुटूंबाला? कोठे राहतील, कसे होईल? त्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम होईल? कोणाच्या आयुष्यात भोगाव्या लागणाऱ्या अशा अचानक घडामोडी पाहील्या की पुर्व संचित म्हणून काही असते का असा विचार डोकावून जातो. वाटते, आपण असतो तर त्यांच्या जागी? त्यांनाच का ही पिडा? जी लोकं संचित मानत नाहीत, ते अशा घडामोडींकडे कसे पाहतात? लॉटरी लागण्या एवढी निसर्गात ही प्रोसेस रॅन्डम असते असे जे संचीत मानित नाहीत ते सुचीत करतात. संचीताला अंधश्रद्धा म्हणून त्याविरुद्ध बोलत राहतात. अंधश्रद्धा मानू नये हे खरे आहे. पण कोणती गोष्ट अंधश्रद्धा मानावी व कोणती नाही हे कोण ठरवणार? डोळस श्रद्धा असते का? का श्रद्धा हाच एक भंपकपणा आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे संचित म्हणजे अंधश्रद्धा मानणाऱ्या लोकांना जर स्वतः उद्या अशा परीस्थीतीला तोंड द्यावे लागले तरी ते निसर्गातील एक रॅन्डम प्रोसेसचा भाग आहे असे समजतील का त्या वेळेला सोयीने त्यांच्या दृष्टीकोनात फरक येईल? ह्याचे उत्तर मी अजून शोधत आहे. संचित जर नसेलच तर अशा घटनांना निसर्ग नियम म्हणून आपण विषय संपवू शकतो का. अशा घटना काहींनाच का भोगाव्या लागतात ह्या प्रक्रियेला काही नाव व कारण देऊ शकतो का.

सुनील खेर गेल्या पासून आमच्या डोक्यात एकच विषय – त्याचे काय झाले व आय एम एत परतला तर काय होणार.

आमच्या रोजच्या कार्यक्रमात सुनील गेल्याने काही बदल झाला नाही. नाही म्हणायला आमचा डि एस कॅप्टन गिल आम्हाला सांगून गेला होता की सुनीलच्याबद्दल काहीही माहीती समजल्यास त्वरीत कळवा. सुनील सुट्टीवर गेल्याच्या सहाव्या दिवशी जीसी सुनीलच्या खोलीत आम्हाला दिवा लागलेला दिसला. आमच्या जिवात जीव आला. आम्ही पि टी परेड ला जायच्या आधी त्याला भेटलो. कॅप्टन गिलनी निरोप पाठवला की जीसी सुनीलला आठ वाजता कंपनी कमांडरने त्याच्या ऑफीस मध्ये बोलावले आहे. आम्हाला त्याच्याशी बोलून गेल्या सहा दिवसांचा हिशोब घ्यायला वेळच नव्हता. तो आम्ही संध्याकाळसाठी सोडला, व आम्ही पि टी परेडला गेलो. त्याचे रेलीगेशन होणार का त्याला काढून टाकणार अशा अटकळी लावे पर्यंत संध्याकाळ झाली. जीसी सुनील दिवसभर दिसला नाही. संध्याकाळी जेवायच्या वेळेला भेटला. खुप थकल्या सारखा वाटत होता. पण चिंता कमी झाली होती. आम्ही आतूर होतो त्याच्या दोन्ही गोष्टी ऐकायला. एक तर तो सूट्टीच्या तब्बल २४ तास उशीरा आला होता व त्यामूळे बटालीयन कमांडरने त्याचे काय केले हे ऐकायचे होते व दूसरे त्याच्या आईचे काय झाले, सुखरुप आहे का कशी आहे. ह्या दोन्ही गोष्टी ऐकूया त्याच्याच शब्दात...............



ज्या दिवशी भदराजवरून आल्यावर मला आईची तार मिळाली व त्या नंतर सुट्टी मिळत नाही असे कळले तसा मी खुप उदास झालो. कर्नल कटोच ह्यांचा भयंकर राग आला होता. आईची आठवण येत होती. काळजी लागली होती. कशातच लक्ष लागत नव्हते. डोक्यात गोंधळ उडाला होता. संध्याकाळ झाली तसा एक एक क्षण एक तासा सारखा जाणवत होता. शांत राहा, १ ते १० मोजा, उलटी गिनती करा, देवाचे नाव घ्या, डोळे मिटून स्वस्थ बसा हे सगळे डोके शांत ठेवण्यासाठी करायचे उपाय माहीत असून राहून गेले. हे उपाय करायचे सुद्धा स्वारस्य राहीले नव्हते. मलाच माहीत होते काय परिस्थीती होती खोऱ्यात ती. सगळ्यात वाईट वाटत होते ते कर्नल कटोच ह्यांचा माझ्या सुट्टी मागण्याच्या कारणावर विश्वास बसला नव्हता ह्या गोष्टीचा. खोऱ्यातले वातावरण हळू हळू बदलायला लागले होते. रोज जवळच्या मशिदीतून प्रक्षोभक भाषणे सुरू झाली होती. रोज कोणते न कोणते काश्मिरी हिंदू कुटूंब खोरे सोडून जाण्याचा विचार करत होते व जात होते. तेव्हा आम्हाला काय माहीती होते की काश्मिरी हिंदूंचे खोरे सोडून जाण्याच्या ह्या प्रक्रियेचा शेवट सगळ्यात मोठ्या विस्थापनात होणार आहे ते. ह्या आधी सहादा असे मोठ्या प्रमाणात काश्मिरी हिंदूंचे स्थलांतरण झाले होते. पहीले स्थलांतरण तेराव्या शतकात झाले – सुलतान शमसुद्दीनने मोठ्या प्रमाणात हिंदूं मंदिरांची तो़ड फोड करून हिंदूंना धाक दाखवून पळवून लावले असा इतिहास आहे. १४ व्या शतकात दुसरे व तिसरे स्थलांतरण, सुलतान अली शाहच्या जाचक सुलतानशाहीने उद्भवले. त्याने पहील्यांदा काश्मीर मध्ये हिंदूंवर झिझीया कर सुरू केला. १४ व्या शतकातच पूढे मीर शमसुद्दीन इराकी ह्या नवाबाने जोर जबरदस्तीने हजारो हिंदूंना पळवून लावले. चवथे व सगळ्यात मोठे स्थलांतरण १६ व्या शतकातले. औरंगझेबच्या बादशाहीत झाले. ह्या बादशहाशी लढता लढता शिखांच्या नवव्या गूरुंना गुरू तेग बहादूरांना प्राणाना मुकावे लागले होते. हा औरंगझेबच्या काळातील इतिहास पाहाता असे वाटते की जसे महाराष्ट्राला शिवाजी राजे मिळाले तसे काश्मीरला लाभले असते तर कदाचीत इतिहास काही वेगळा झाला असता. पण काश्मिरी हिंदूंपेक्षा महाराष्ट्रातल्या हिंदूंचे नशिब जास्त बलवोत्तर होते असेच म्हणावे लागेल. पाचवे स्थलांतरण, १७ व्या शतकात मुल्ला अब्दुल ह्याच्या नवाबीत झाले. सहावे स्थलांतरण, अफघाण सुलतांनांच्या क्रूर कारवायांमुळे झाले. १९८९-९० सालातले सातवे स्थलांतरण पाकीस्तानच्या ऑपरेशन टोपूक मुळे होत होते. ते त्यावेळेला आम्हाला अवगत नव्हते. कोणालाच माहीत नव्हते. कोठल्याही देशा पुढील समस्येवर देशातल्या जनतेचा मानसिक दृष्टीकोण बदलायला वेळ लागतो. खुपदा लोकांना समजे पर्यन्त वेळ निघून गेलेली असते. ह्या सगळ्या सहा स्थलांतरांने जे एकेकाळी काश्मीर मध्ये फक्त हिंदूच होते ते कमी होत होत, १९४८ मध्ये फक्त १० टक्के राहीले. हिंदूंची संख्या सातव्या स्थलांतरानंतर १ टक्का राहीली. ज्या समाजाला इतिहासाचा विसर पडला तो समाज संपला हे आम्हाला सातव्यांदा कळणार होते. शेवटी जिसकी लाठी उसकी भैस हेच फक्त सत्य आहे बाकी ह्या कलीयुगात सभ्यता वगैरे सोयीच्या गोष्टी आहेत. आपल्या जवळ ती लाठी का नसते कधी. सभ्यतेखातर आपण लाठी सोडली हे खरे पण त्याचबरोबर दुसरे सोडतात की नाही हे पाहीले नाही. दुसऱ्याने जर लाठी घेतली असेल व आपल्यावर उगारत असेल तर तेवढ्या पुरती तरी आपण लाठी घेतली पाहीजे नाहीतर शतकानुशतके आपण असेच भरडले जाणार. पुर्वी क्रृर सुलतानशाही होती आता एक क्रृर असे शेजारी राष्ट्र आहे.

१९८९ च्या सुरवातीला हिंदूंचे एखाद दुसरे कुटूंब सोडून गेल्याचे ऐकीवात होते. त्यात हळू हळू वाढ होऊ लागली. अतीरेकी प्रेरित हिंदूंच्या स्थलांतराची मोहीम पाकिस्तानच्या ऑपरेशन टोपूक प्रमाणे कशी घडत आहे ती आमच्या लक्षात यायला लागली. अतिरेक्यांचा डाव एकदम चपखल बसला होता. खोऱ्यात तणावाचे वातावरण निर्माण करायचे. कोठच्यातरी गल्लीतल्या एका दोघा तरुणाला किंवा काश्मिरी हिंदूला मारायचे. त्याचे परिणाम लागलीच त्या गल्लीतल्या इतर हिंदूंवर व्हावयाचे. गर्भगळीत अवस्थेत ती गल्लीची गल्ली रिकामी होऊन खोरे सोडून जायची. ह्याच बरोबर सतत मशिदीदतून होणारी प्रक्षोभक भाषणे एक प्रकारचे भयानक तणावाचे वातावरण निर्माण करायचे. त्यात हिंदूना काफिर म्हणवून त्यांच्या विरुद्ध जिहाद पुकारण्याची मुस्लीम जनतेला हाक असायची. खोऱ्यात अशा प्रकारचा तणाव कायम आसायचा. कधी कोणा हिंदूला पळवून धाक निर्माण करायचा. कोणा हिंदूचे घर जाळून त्या गल्लीतल्यांचे मनोधैर्य खच्ची करायचे, असे वारंवार घडू लागले. ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना, राज्याचे प्रशासन दिलासा वाटण्यासारखे काही करत आहे असे आढळत नव्हते. तो विश्वास राहिलाच नव्हता. अतिरेक्यांना फार काही करावे लागायचे नाही. गल्लीतल्या कोणा हिंदूला मारले की गल्लीतले सगळे हिंदू आपले सामान घेऊन पसार व्हायचे. त्यामुळे जर कोणी मानव हत्या किती झाली ह्यावरच फक्त क्रुरता ठरवणार असेल तर मानव हत्या फार झाली नाही. साधारण २५० ते ३०० हिंदूंची हत्या झाली असेल. पण महीलांवर सततचे अत्याचार करून, हिंदूंना पळवून नेउन, धाक धप्पटशहा दाखवून, घाबरवून लोकांच्या मनात भीती उत्पन्न करून स्थलांतरण करायला अनावृत्त केल गेले. वाईट ह्याचेच वाटत होते की पाकिस्तान हे हिंदूंना पळवून लावायचे व इथल्या मुस्लीम जनतेला चिथवण्याचे काम त्यांचे परराष्ट्रधोरण म्हणून ऑपरेशन टोपूकच्या नावा खाली राबवत होता, व आपल्या सरकारला हे समजत नव्हते. इथले मुस्लीम पण जिहादाच्या नावाखाली भरकटून जात होते व काश्मिरी हिंदूंच्या विरुद्ध शस्त्र घेऊन सज्ज होत होते. तशातच कलम ३७० लागू होते. त्यामुळे काश्मिरात एकीकडे कोणाला स्थायिक होता यायचे नाही व दुसरीकडे हजारोंच्या संख्येने असलेले काश्मिरी हिंदू लोकं खोरे सोडून जात होते. त्यामुळे साहजिकच खोऱ्यातल्या काश्मिरी हिंदूंच्या संख्येत घट पडत चालली होती.



संध्याकाळी कॅप्टन गिल माझ्या रुमवर आला. तो म्हणाला बटालीयन कमांडरला अजून सुद्धा वाटते की जीसी रोजच्या आय एम एच्या रगड्यातून काही दिवस सुटण्यासाठी हा कांगावा करत आहे. १९८९ च्या सुरवातीच्या काळात काश्मीरच्या बाहेर काश्मीरच्या स्थितीवर अगदी त्रोटक बातम्या यायला लागल्या होत्या. त्यामुळे काश्मिरी हिंदूंच्या विस्थापना बरोबर उत्पन्न होणाऱ्या अडचणी, काश्मिरी हिंदू कुटूंबियांना झेलावे लागणारे प्रश्न ह्या बिकट परिस्थीतीशी बाकीची जनता अवगत नव्हती. काश्मीर बाहेर राहणाऱ्यांच्या कानावर पडणाऱ्या बातम्यांनी काश्मीर मधली खरी स्थिती किती गंभीर रुप घेत आहे हे त्या लोकांना समजले नव्हते. ह्याचा परिणाम त्यांच्या निर्णयांवर व काश्मीर प्रश्नाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनावर होत होता. माझ्या सुट्टीच्या अर्जात दिलेल्या कारणा बद्दल सुद्धा हेच झाले असावे. बटालियन कमांडरच्या दृष्टीने माझा सुट्टीचा अर्ज अवाजवी होता. ह्या उलट कॅप्टन गिल जरी कठोर होता तरी आमचा प्लटून कमांडर असल्या मुळे आम्हाला रोज सकाळ संध्याकाळ भेटायचा. आमचे प्रश्न तो जाणायचा.

तो मला म्हणाला की - संध्याकाळी बटालियन कमांडरने मला परत बोलावले होते. मी त्यांना सांगितले की जी सी सुनील खेरच्या घरची परिस्थिती गंभीर आहे. त्याचे वडील आधीच अतीरेक्यांच्या कारवायांना बळी पडले आहेत व अजूनही बेपत्ता आहेत. आता हीच परिस्थिती त्याच्या आईवर येऊन ठेपली आहे. कर्नल कटोच ह्यांनी फक्त माझ्या शब्दाखातर तुला चार दिवसाची सुट्टी देऊ केली आहे. चार दिवसात परत ये नाहीतर मी दिलेला शब्द वाया जाईल. कॅप्टन गिलने चार दिवसाच्या सुट्टीचे पत्र माझ्या हातात दिले व म्हणाला सुट्टी जरी उद्या पासून सुरू होत आहे तरी आजच रात्री जायची परवानगी तुला देतो. माझ्या जिवात जिव आला. हूरुप आला. आता एक नवा प्रश्न उभा राहीला माझ्या समोर. चार दिवस – ह्या चार दिवसात डेहराडूनहून खोऱ्यात जायचे व आईचा राहण्याचा कोठेतरी बंदोबस्त करून परत यायचे. भदराजचा कॅंप मला ह्याच्या पुढे एकदम सोपा वाटायला लागला.

मला सुट्टी तर मिळाली आता चार दिवसात येण्याचा आराखडा ठरवत मी माझे मोजकेच सामान बांधले. मित्रांकडून काही पैसे उसने घेतले व रात्रीच्या बसने डेहराडूनहून निघालो. दिल्लीहून जम्मूला सुट्टीच्या पहील्या दिवशी रात्री पोहोचलो. कॅप्टन गिलने रात्रीच जाऊ दिले होते म्हणून बरे झाले नाहीतर अजूनच वेळ लागला असता. जम्मू ते श्रीनगर ह्या एक दिवसाच्या रस्त्याला दोन दिवस लागले पोहोचायला. बर्फवृष्टी मुळे बनीहाल घाटात असणारा जवाहर बोगदा बंद होता. त्यामुळे एक रात्र रामबन येथेच काढावी लागली होती. जवाहर बोगदा थंडीत नेहमीच असा मधून मधून बंद असतो. रामबनला थांबणे माझ्या जिवावर आले होते. कारण सुट्टीचा एक दिवस वाया जाणार होता. मजल दर मजल करत तिसऱ्या दिवशी सकाळी मी घरी पोहोचलो. मला बघून आईला आनंद व थोडे आश्चर्य वाटले. तिला वाटले नव्हते मला सुट्टी मिळेल असे. आम्हाला एकमेकांशी आय एम एतल्या गोष्टी करायला वेळच नव्हता. राहाते घर सोडून जायचे ह्या नुसत्या कल्पनेनेच आईला खूप वाईट वाटत होते. सामान कसे घेऊन जायचे हा प्रश्न होता. वडीलांचा अजून पत्ता नव्हता. शेवटी आम्हाला दोघांना नेता येईल ईतकेच सामान घेऊन जायचे असे ठरले. मग सामान बांधायला वेळ लागला नाही.

(क्रमशः)

(राजाराम सिताराम एक, राजाराम सिताराम दो – ही आय एम ए वर आधारीत कथा लवकरच प्रसिद्ध करत आहे)