Sunday, August 29, 2010

पाकिस्तानात आलेला पुर व त्याला मदत द्यायची झालेली भारताला घाई.

पाकिस्तानात पुर आला. आतोनात नुकसान झाले. आपण माणुसकी म्हणुन ५० लाख डॉलर्स मदत देऊ केली आहे. गेले एक महीना भर आपण प्रयत्न करत आहोत की पाकिस्तान ने भेट कबुल करावी म्हणुन. पाकिस्तान कधी म्हणते कि त्याला भारताकडुन भेट नको. खाण्यापिण्याच्या गोष्टींवरच्या वेष्टणावरचे भारताचे चिन्ह काढुन मग ते पुर ग्रस्ताना वाटतानाची चित्र दुरदर्शन वर दाखवली जात होती ती सगळ्यानी पाहीलीच असतीलच. मदत मिळणा-यांना समजु नाही की भारताने मदत दिली आहे त्यापेक्षा भारताचा अपमान कसा होईल ह्यातच पाकिस्तानी नेत्यांना स्वारस्य आहे असे दिसते. आपण फारच आग्रह धरला म्हणुन त्यानी भेट कबुल करायचे ठरवले. आपल्या परोपकारी सरकारला अगदी हायसे वाटल्या सारखे झाले की पाकिस्तान एकदाची आपली भेट कबुल करता होत आहे म्हणुन. तेवढ्यात पाकिस्तानात माशी शिंकली. पाकिस्तान आता म्हणतो की जे काही भारताला द्यायचे आहे ते त्याने संयुक्त राष्ट्रला द्यावे व ते मग ती मदत संयुक्त राष्ट्राकडुन आली असे समजुन कबुल करतील. आता म्हणे भारतीय बाबु लोकं संयुक्त राष्ट्राकडे डोळे लावुन बसले आहेत.
ह्या गोष्टीवरुन कोणाला असे वाटेल कि पाकिस्तानला कोणत्याही मदतीची गरज नाही. कारण ज्याला गरज असते तो ती कशी येत आहे ते बघत नाही फक्त स्वीकार करतो.
आपण देतो ते दान आहे कि मदत. दान म्हटले तर आपल्या शास्त्रातुन लिहीले आहे की – दान देताना आधी घेणा-याची पात्रता बघायची असते. अशी पात्रता न बघता दिलेले दान हे अघोरी ठरते व अशा दानाला तामसी दान म्हणतात. असे दान देण्याने ना देणा-याचे पुण्य वाढते, ना घेणा-याचे कल्याण होते. मदत म्हंटले तर ती मित्रांना, शेजा-याला किंवा अडलेल्याला असते. पाकिस्तान मित्र नाही. अडलेला नाही. असता तर त्याने गप्प बसुन मदत घेतली असती. आता तो शेजारी राष्ट्र म्हणुन आपण मदत द्यायची पण लोटांगण नाही घालायचे किंवा गळ्यात थोडेच पडायचे हे आपल्याला समजायला पाहीजे एव्हाना. पाकिस्तान प्रत्येक गोष्टीत भारताचा अपमान कसा होईल हेच बघत आला आहे व आपण डोळ्यावर पट्टी बांधुन तिकडे दुर्लक्ष करत आलो आहे. ह्यात आपल्याला काय मिळणार आहे. अंतर राष्ट्रीय सभे मध्ये काय कोणी आपली पाठ थोपटणार आहे की संयुक्त राष्ट्रांमध्ये आपल्याला कायमचे स्थान मिळायला मदत होणार आहे, का पाकिस्तान अतिरेक्यांना प्रशिक्षण द्यायचे थांबवणार आहे, का पाक व्याप्त काश्मिर आपल्यासाठी सोडुन देणार आहे.

Tuesday, August 24, 2010

हनुमानाला मिळालेला शाप व त्यावर उतारा





प्रास्ताविक



प्रसिद्ध ब्रिटिश सेनांनी फील्ड मार्शल फिलिप चेटवुडच्या शब्दात थोडा बदल करून राष्ट्रव्रती कसा असावा हे थोडक्यात सांगतो -



आपल्या राष्ट्राची सुरक्षा, राष्ट्राचा सन्मान आणि राष्ट्राचे कल्याण - नेहमीच सगळ्यात आधी.

तद्नंतर आपल्या परिवाराचा सन्मान, परिवाराचे कल्याण आणि परिवाराची सोय.

स्वतःची सोय, स्वतःचे कल्याण व स्वतःची सुरक्षा - शेवटी, नेहमीच शेवटी.



हनुमानाला मिळालेला शाप व त्यावर उतारा – पहिल्या भागात खालील निर्देशित मुद्द्यांवर चर्चा केली आहे.



हिंदू धर्म - विषय प्रवेश

मानवाचे अस्तित्व

त्या अस्तित्वाचे उद्दिष्ट – मानसिक प्रगती व उत्कर्ष

देश व राष्ट्रांची संकल्पना

राष्ट्राची विचारसरणी

राष्ट्रासमोर ठाकलेले महत्त्वाचे प्रश्न

राष्ट्राबद्दलची तळमळ



बहुतेक वेळा प्रस्तुत संकल्पना किंवा विचारसरणी मनाला पटेल अशी व आकर्षक वाटते पण ती अनुसरायची म्हणजे नक्की काय करायचे ह्या प्रश्नाचे उत्तर न मिळाल्यामुळे – वाचायला छान वाटते, अध्ययन करायला आवडते पण प्रस्तुत विचारसरणी रोजच्या जीवनात उपयोगात कशी आणायची असा प्रश्न पडतो.



आपण जेव्हा म्हणतो व ऐकतो की प्रत्येक हिंदू मनाला आपण हिंदू आहोत ह्याचा अभिमान असला पाहिजे हे महत्त्वाचे. तो योग्य तऱ्हेने प्रगट करता आला पाहिजे हे त्याहून महत्त्वाचे. हिंदू धर्माचा अभिमान बाळगणे व तो योग्य तऱ्हेने प्रगट करणे म्हणजे नक्की काय करणे? कारण हे जर स्पष्ट केले नाही तर लोकांच्या मनात आधी गोंधळ उडतो, नंतर संभ्रम उत्पन्न होतो व तद्नंतर आपल्या कृतीवरचा व धर्मावरचा विश्वास उडतो. काही लोकं मग वाटेल ते करून हिंदू धर्माचा अभिमान प्रगट करायला निघतात त्यात – प्रामुख्याने राष्ट्रीय संपत्तीची तोडफोड करणे, दारू पिऊन गणपतीच्या मिरवणुकीत धिंगाणा घालणे, आचार विचार सोडून वागणे, दुसऱ्यांशी उर्मटपणाने वागणे वा बोलणे इत्यादी गोष्टी प्रामुख्याने आढळतात.



भाग २ व ३ मध्ये राष्ट्रव्रताच्या दहा सूत्रांबद्दल लिहिले आहे. धर्मा बद्दल अभिमान बाळगणे म्हणजे नक्की काय करणे हे स्पष्ट केले आहे. ती दहा सूत्र अशी आहेत.



- आपल्या व आपल्या भोवतालच्या लहान मुलांना योग्य वळण लावणे व जागृत करणे, राष्ट्रव्रती बनवणे.

- अहंभाव कमी करणे.

- राष्ट्र सुधार कार्यात नेहमी अग्रेसर राहणे.

- लाचलुचपतीपासून व वित्तीय घोटाळ्यांपासून स्वतः दूर राहणे व दुसऱ्याला परावृत्त करणे.

- आपल्यातले कला, नैपुण्य सतत वाढवणे व छंद जोपासणे. शरीराला व्यायामाची सवय ठेवणे.

- कामाच्या चांगल्या सवयी लावून घेणे. तसेच कोणत्याही कामाची व काम करणाऱ्यांची उपेक्षा टाळणे.

- नीतिमत्ता व चांगल्या आचरणांचा सतत वापर करणे.

- टोकाच्या आवडी-निवडी टाळणे. छांदिष्टपण टाळणे व स्वतः बद्दलची कीव कमी करणे.

- दूरदर्शी बनायचा प्रयत्न करणे व स्वतःचे विचार उत्तम, उदात्त व उत्तुंग बनवणे.

- आपल्या धर्मातल्या चांगल्या नियमांचे पालन काटेकोरपणे करणे.



ह्या सूत्राचे बारकाईने वर्णन भाग २ व ३ मध्ये केले आहे. बऱ्याच वेळेला वाचणाऱ्यांना असे वाटेल की इतक्या बारकाईने वर्णन करायची गरज आहे का? मला स्वतःला वाटते आहे. आपला धर्म सोपा, आकर्षक व आकलनीय करण्यासाठी एवढ्या बारकाईची गरज आहे. कारण विचारसरणीचा गोषवारा माहिती असला तरी नेमके प्रत्येकाने कसे वागायचे हे स्पष्ट नसेल तर आंधळीकोशिंबीरीचा खेळ ठरेल. माझी अशी विनंती आहे की वाचणाऱ्यांनी हे विचारात घेऊन लेख वाचावा.



शेवटच्या भागात राष्ट्रव्रत घेण्यास कोण पात्र आहे, ते कसे घ्यायचे व ते घेतल्याने काय होईल ह्या संबंधाने रूपरेषा दिली आहे. आपले राष्ट्र बलाढ्य, समृद्ध व कल्याणकारी करायचे असेल व ते तसे टिकवून ठेवायचे असेल तर पिढ्यांपिढ्यांचा प्रयत्न सतत झाला पाहिजे. हे राष्ट्रबांधणीचे कार्य हा आपला राष्ट्रधर्म झाला पाहिजे, आपला स्वभाव झाला पाहिजे. राष्ट्रव्रताची अशी आपली संस्कृती निर्माण झाली पाहिजे.



राष्ट्रव्रत हे प्रत्येकाने त्याच्या कुवतीला धरून घेतलेले पवित्र व्रत आहे. रामाच्या खारुटली प्रमाणे राष्ट्रबांधणी रुपी सेतू मध्ये घातलेले खारुटलीचे छोटे दगड आहेत. हे राष्ट्रव्रत आपल्या परिवाराच्या कल्याणाच्या आड न येणारे असे आहे. स्वतःवर ओझे न पाडणारे आहे, आपली गैरसोय न करणारे आहे आणि तरी सुद्धा राष्ट्रासाठी लागणारे सुकार्य आपल्या हातून घडवून आणणारे आहे.



तर मग केव्हा घेताय आपण राष्ट्रव्रत?





हनुमानाला मिळालेला शाप व त्यावर उतारा – भाग १



हनुमानाची गोष्ट अशी सांगतात की, जो पर्यंत त्याला त्याच्या शक्तीची कोणी जाणीव करून देणार नाही, तो पर्यंत त्याला स्वतःच्या शक्तीची जाणीव होणार नाही व स्वतःच्या शक्तीची जाणीव नसण्यामुळे तो त्याच्या शक्तीच योग्य उपयोग करू शकत नव्हता. त्याला ऋषींनी असा शाप दिला होता. किंबहुना त्याला माहीतच नव्हते की तो एका प्रचंड शक्तीचा धनी आहे. ही जाणीव करून देण्याचे काम जांबुवंताने केले. हनुमानाला कळून चुकले की तो शक्तिमान आहे व पुढे रामायण घडले.



सगळे धर्म तत्त्वतः चांगलेच असतात असे आपण लहानपणा पासून शिकतो. कोणताही धर्म मानव जातीचा उत्कर्ष कसा साध्य होईल ह्याचीच शिकवण देत असतो. त्यामुळे असा प्रश्न पडतो की सध्या जो हिंदुत्वाचा उद्घोष चालला आहे तो बरोबर आहे का? व त्याची गरज खरोखरीच आहे का? आपण सगळे येथे सामंजस्याने राहू, उगाच हिंदुत्वाचा प्रश्न उकरून जातीयवाद का निर्माण करा? व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ह्याचा सामान्य माणसांवर काय फरक पडणार आहे? त्यांचे रोजचे सतावणारे प्रश्न सुटणार आहेत का?



ह्या सगळ्याचा विचार करायचा म्हणजे आपल्याला काही गोष्टींचा खुलासा करून घ्यावा लागेल. विचारवंतांचे व तत्त्वज्ञानी लोकांचे ध्येय हे सर्वांना सामावणाऱ्या व अस्तित्वात असलेल्या सगळ्या जीवसृष्टीला पोषक व समृद्ध करण्याचे असते. ज्ञानेश्वरांनी त्याच दृष्टिकोनातून देवाजवळ पसायदान मागितले आहे.



जोजे वांछेल तो ते लाहो। प्राणिजात सकळा।।



जो ज्याची इच्छा करेल त्याची प्राप्ती त्याला व्हावी. इथे इच्छा ह्याचा अर्थ भौतिक इच्छा नव्हे. ज्ञानेश्वरांना आत्म्याची परमोच्च प्रगती हा अर्थ अभिप्रेत आहे. ह्यालाच जिववाद म्हणतात व ह्याच साठी हे संतलोक आपला जीव खर्ची घालवतात. सर्व जिवमात्रांची अशा दृष्टीने प्रगती होण्यास जरूरीचे हे आहे की ह्या जीवसृष्टीचे सगळे घटक सुदृढ झाले पाहिजेत. आपल्या सोयीसाठी ह्या जीवसृष्टींचा प्रमुख दोन गटां मध्ये भाग करू. प्राणिमात्र व मानव. एकूणच मानव व प्राणिमात्र ह्यांचे संवर्धन; जीवसृष्टीचे अस्तित्व व शारीरिक आणि मानसिक प्रगती, ह्या नियमांमुळे चालू असते.



जीवसृष्टीचे अस्तित्व हे निसर्गाच्या संतुलनावर अवलंबून असते. निसर्गाचा समतोल राखला जाणे किंवा निसर्गाचे संतुलन ह्याचे थोडक्यात विश्लेषण द्यायचे झाले तर, आपण आपल्या भूतलावरचा कोणताही जीव हा एकटा असा बघायचाच नाही. सगळी पृथ्वी हा एक जिवंत, जगणारा ग्रह आहे असे गृहीत धरले म्हणजे. ह्यातले प्रत्येक जीव हे स्वतंत्रपणे जगण्याचे नियंत्रण करत नाहीत, तर सर्व जिवमात्र मिळून त्यांच्या जगण्याने पृथ्वीच्या वातावरणाचे नियमन करत राहतात व पृथ्वीच्या वातावरणाचा फरक इथल्या जिवांवर साहजिकच पडतो. प्राणिमात्र व मानव हे दोन्ही घटक हा समतोल सतत सांभाळायच्या प्रयत्नात असतात. किंबहुना त्यांच्या नकळत ते होत राहते. असा प्रबंध प्रोफेसर लव्हलिक ह्या अमेरिकन शास्त्रज्ञानाने पुर्वीच मांडला आहे. आपल्या पृथ्वी वर २१ टक्के प्राणवायू आहे. जर तो, १५ टक्के असता तर कोणताही जीव जगू शकला नसता व प्राणवायूचे हेच प्रमाण जर २५ टक्के झाले तर, झाडांचे हिरवे बुंधे सुद्धा पेट घेतील. एवढेच काय पण आपल्या श्वासनलिका सुद्धा जळतील. प्राणवायूचे इतके नाजुक प्रमाण, कोट्यवधी वर्ष पृथ्वीची होऊनही कसे राहिले? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. प्रोफेसर लव्हलिक यांच्या मता प्रमाणे, हे संतुलन पृथ्वीवरच्या सगळ्या जीवसृष्टींच्या जगण्याने आपोआपच होत असते व जोपर्यंत अनैसर्गिकरीत्या आपण वातावरण बदलणार नाही तो पर्यंत पुढेही होत राहील. ही झाली आपल्या अस्तित्वा बद्दलची ग्वाही व ह्या बाजूने इतक्यात काळजी करण्याचे काही कारण नाही.



दुसरी म्हणजे जिवमात्रांची शारीरिक व मानसिक प्रगती. प्राणिमात्रांचा प्रवास एका पेशींच्या जिवांपासून, मानवा सारख्या प्रगत जीवा पर्यंत कसा झाला हे सर्वज्ञातच आहे. चार्लस डार्वीन ह्यांच्या सर्व्हाइवल ऑफ द फिटेस्ट व प्रोफेसर लव्हलिक ह्यांच्या कारणमीमांसे वरून अजून एक गोष्ट आपल्या लक्षात येते, ती म्हणजे पुढे आताच्या मानवाच्यादृष्टीने प्रतिकूल असे आपल्या पृथ्वीचे वातावरण जरी बदलले तरीही नवीन वातावरणाला तोंड देऊन जिवंत राहू शकेल अशी एखादी नवीन मानवजात किंवा परजाती निर्माण होईल व ती, ह्या आपल्याला प्रतिकूल वाटणाऱ्या वातावरणात मोठ्या ऐषारामात राहील. अस्तित्व व शारीरिक प्रगती हे न थांबणारे स्रोत आहेत ह्याची काळजी संपली की मग येते मानसिक प्रगती. मानसिक प्रगती ही खऱ्या रूपाने जिवमात्रांमध्ये मानवालाच लागू आहे. तेव्हा आपण आतापासून मानवजातीचा विचार करूया.



मानवाचे अंतिम लक्ष्य, हे मानव जातीची मानसिक प्रगती करणे आहे. ज्ञानेश्वरांनी ह्याच ध्येयाचे प्रतिपादन त्यांच्या पसायदानात केलेले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मताने, आपण सगळे ह्या आखील मानवजातीच्या मानसिक उत्कर्षासाठी सतत खपले पाहिजे. आपली प्रत्येक कृती त्यालाच पोषक अशी असली पाहिजे. आपली वृत्ती अशीच सर्वव्यापी झाली पाहिजे. आपले प्रयत्न त्याच दिशेने नित्य नेमाने झाले पाहिजेत. ह्यालाच म्हणतात मानवतावाद.



शरीर सुदृढ व निकोप होण्यासाठी हे जरुरी आहे की, शरीराचे सगळे अवयव निकोप व बलवान असले पाहिजेत. म्हणजे जो शरीर सुदृढ होण्यासाठी झटतो, त्याने शरीराचे सगळे अवयव धष्ट पुष्ट होण्याची काळजी घेतली पाहिजे. तसेच, साऱ्या मानवजातीची प्रगती व्हायची असेल तर ती, ज्याने बनलेली आहे ते सगळे मनुष्य समूह समृद्ध झाले पाहिजेत. हे मनुष्य समूह म्हणजेच भूतलावर असलेले वेगवेगळे देश. हे शरीररूपी मानवजातीचे, देशरूपी अवयव आहेत. मग साहजिकच प्रत्येक देशावर जबाबदारी पडते की, त्या त्या देशाने स्वतःची मानवजात समृद्ध करण्याच्या दृष्टीने कार्यभाग सांभाळावा. महान इटालियन क्रांतीकारी नेता, जोसेफ मॅझीनी हेच सांगत आला आहे. ह्या विश्वात जन्म झालेल्या प्रत्येक प्राणिमात्रांचे विशिष्ट असे करायचे कार्य आहे. प्रत्येकाच्या शिरांवर कोणतीनाकोणती जबाबदारी असते. ती त्याने पारखून त्याप्रमाणे कार्य करायचे असते. हे त्याचे कार्य वाया जात नाही, आखील विश्वाचे कल्याण होण्यात त्या कार्याचा उपयोग होतो. अगदी तसेच देशांचे आहे. प्रत्येक देशाच्या वाट्याला मानवजातीची मानसिक प्रगती करण्यासाठी, ठरावीक जबाबदारी आलेली असते. ती त्या त्या देशाने पार पाडल्या वाचून गत्यंतर नसते. सगळ्या मानवजातीचे कल्याण करण्याचा मक्ता कोणा एका देशावर नसतो व तसे चालणार पण नाही. प्रत्येक देशाने आपले कार्य ओळखावे, पहिल्यांदा स्वतः समृद्ध व बलिष्ठ व्हावे मग इतरांना बरोबर घेऊन पुढे जावे. आता पर्यंत आपण ह्या मनुष्य समूहांना देश असे संबोधत होतो. पण हा सर्वव्याप्त शब्द नव्हे. देश म्हणजे, मनुष्य समूहाने व्यापलेला विशिष्ट भौगोलिक परिसर. ह्याला जीव नसतो. कोणत्याही देशाला स्थिर अशी सीमा असते. देश स्वतः काही कार्य करणारा नसतो. फक्त कार्य करणाऱ्या साठी जागा देतो.



ह्याच देशाला अर्थ देणारी, जिवंत करणारी, त्यात राहणारी अशी माणसे असतात. आता ही माणसे सगळ्या देशात सारख्याच विचारसरणीचा उच्चार व आचार करणारी असती तर मग ह्या देशांना काही अर्थ प्राप्त झाला नसता. पण तसे नाही होत. जे जे मनुष्य समूह विशिष्ट प्रकारची विचारसरणी आचरतात, ती विचारसरणी अंगिकारण्यास प्रबळ अशी कारणे असतात, जी विचारसरणी त्या त्या देशात राहाणाऱ्या मनुष्य समूहाने वर्षोंवर्षे जोपासलेली असते, जी विचारसरणी वर्षोंवर्षीच्या विचारमंथनातून निर्माण झालेली असते, जी विचारसरणी त्या त्या मनुष्य समूहांना मार्ग दाखवते, प्रगती करण्यास आत्मविश्वास प्रदान करते, जी विचारसरणी त्या त्या मनुष्य समूहांचे मनोबल वाढवते, कारण ती विचारसरणी त्या समूहाच्या वाडवडिलांनी अनुभवाने व गाढ विचारांनी सिद्ध केलेली असते. अशी विचारसरणी व तिचा अंगीकार करणारे लोकसमूह त्या त्या देशांना अर्थ प्राप्त करून देतात. तो देश जिवंत होतो. त्या देशाला राष्ट्र म्हणतात. देशाला सीमा असतात आणि त्याच सीमेत राहून राष्ट्र विकासाची परिसीमा गाठू शकतो. राष्ट्राला अधोगती नसते, प्रगती असते. कारण प्रगती फक्त जिवंत गोष्टीच करू शकतात. मग ते ते राष्ट्र जगात त्या त्या विचारसरणीमुळे ओळखले जाऊ लागते व स्वतःचे अस्तित्व बनवते. आपोआपच राष्ट्र ज्या विचारसरणीवर बनले आहे, त्या विचारसरणीवर, व ती अनुसरणाऱ्या लोकांवर, आपले राष्ट्र जर जिवंत व प्रगत बनवायचे असेल तर आपली विचारसरणी जोपासण्याची जबाबदारी येते. अशा विचारसरणीचा उच्चार केला पाहिजे, तिचा आचार केला पाहिजे. बहुतेक बलाढ्य राष्ट्रांनी हेच केले आहे व करत आहेत. जी राष्ट्र त्यांची विचारसरणी बदलण्याच्या मागे लागतात, त्या राष्ट्रातले लोक गोंधळलेल्या मनस्थितीत राहतात. आपोआपच प्रगती थांबते. रशियाची सध्या हीच द्विधा मनस्तिथी झाली आहे. कम्युनिझम सोडवत नाही आणि कॅपिटॅलीझम धरवत नाही. पाश्चिमात्य देशांमध्ये आयन रॅन्ड यांच्या कॅपिटॅलीझम ह्या विचारसरणीचा पगडा कायम आहे, आणि ही विचारसरणी ज्यापासून उद्भवली तो त्यांचा देश पण अबाधित आहे. पाया भक्कम आहे. लोक गोंधळलेली नाहीत. परिणाम स्वरूप, पाश्चिमात्य राष्ट्रांची प्रगती न थांबता होत आहे.



मग आपल्या राष्ट्राचीच अशी गोंधळेली परिस्थिती का. आपल्या देशाचा प्रवास समृद्धीच्या वाटेवर सुरू झाला आहे त्यात शंका नाही, पण त्याची गती बरीच संथ आहे. आपल्या राष्ट्राचा जीडीपी (GDP) जरी सातत्याने वाढत असला, व आपले उद्योग धंधे बाहेरील बाजारपेठेत जास्त नफा कमावायला लागले असले तरी ते किती नितीनीयमानूसरून व किती आपल्या सरकारी नियमांची भलावण करून पुढे जात आहेत ह्याचा विचार आपण करायला पाहिजे. बऱ्याच वेळा पैसा कमावायचा म्हणून प्रस्थापित नीतिमत्ता सुद्धा ठोकरली जाऊ लागली आहे. नीतिमत्तेला धरून पैसा कमावणे व काहीही करून पैसा कमावणे ह्यातला फरक फार थोड्यांना कळू शकतो व त्यांहून थोड्यांना त्याचे महत्त्व कळू शकते. नाहीतर हल्ली सगळ्यांनी गृहीत धरले आहे की, पैसा कमावण्यासाठी सरकारचे नियम आपल्याला पाहिजेतसे लाच देऊन वळवता येतात. ह्याला उद्योगपती – ‘सरकारी शिक्षण’ म्हणतात, किंवा मग मोठमोठाली कॉनफरनसेस आयोजित करण्यात येतात, त्यात हवे तसे कायदे बनवण्याच्या दृष्टीने पाउले उचलली जातात. त्याचा परिणाम – आपल्याला मिळणाऱ्या विविध निकृष्ट सेवेतून दिसून येतो. प्रसिद्ध उद्योगपती भारतरत्न जे आर डी टाटा यांनी किती मार्मिक टिप्पणी करून ठेवली आहे ते पाहा – "मला भारत आर्थिक दृष्ट्या बलाढ्य राष्ट्र नको आहे. मला भारत सुखी व समृद्ध राष्ट्र हवा आहे". एवढेच काय पण आपला दृष्टिकोन बऱ्याच महत्त्वाच्या बाबींवर स्पष्ट नाही. आपला राजकीय दृष्टिकोन पण त्यामुळे शीड उडालेल्या जहाजा सारखा झाला आहे.



- आपला शत्रू देश व त्याच्याशी आपला व्यवहार कसा असला पाहिजे ह्यावर आपले अजून एकमत नाही.

- समान नागरी कायदा व त्या संबंधातले धोरण कायम नाही.

- आपल्या देशाच्या सीमा अजून पूर्णपणे निश्चित झाल्या नाहीत. पाक व्याप्त काश्मीरवर आपण बोलू शकत नाही.

- काश्मीर जर भारताचा अविभाज्य भाग आपण मानत असू तर पाकिस्तान बरोबर काश्मीर मुद्द्यावर आपण का म्हणून बोलायचे? आपला देश, आपले राज्य त्यात आणखीन पाकिस्तान कोठून आले? बोलायचेच तर फक्त पाक व्याप्त काश्मीरवर बोलायला पाहिजे. ‘काश्मिरीयत’ पाहिजे असे अजून सुद्धा म्हणणारी मंडळी येथे सापडतात.

- हिच गोष्ट अरुणाचल प्रदेश बद्दल. चीन आपला मित्र आहे की शत्रू राष्ट्र आहे हे अजून आपल्याला ओळखायचे आहे.

- आपल्या देशासाठी काय बरे व काय वाईट हे आपण ठरवणार का जगाचे बलाढ्य आंतरराष्ट्रीय उद्योग ठरवणार – हा अजून संभ्रम आहे आपल्याकडे. भोपाळ वायू गळती मुळे हजारो लोक मेली पण कोण्या एकाच्या अमेरिकेहून आलेल्या दूरध्वनी वरून अँडरसन महाशयांना चार्टर विमानाने अमेरिकेला परत पोहचविले जाते. ह्या वरुनच आपली विचारशक्ती किती गोंधळलेली आहे हे दिसते.

- आपल्याला जो इतिहास शिकवला जातो तो आपण पारखून घेतला पाहिजे. त्या संबंधाने आपले धोरण ठरवणारी कोणतीही संस्था अजून नाही.



आपली विचारसरणी एवढी प्रखर असताना, आपल्या पूर्वजांनी भरभक्कम तत्त्वांवर आधारलेल्या विचारांचे देणे आपल्या पदरात घातले ते फक्त जाहिरातींवर दाखवण्यासाठीच आहे काय? ती अनुसरायला आपण लाजतो का? आपल्या देशाने सेक्यूलॅरीझम’ (सर्व धर्म समभाव) अंगिकारला आहे, पण त्याला अजून जाणीव झालेली दिसत नाही की हा - सर्व धर्म समभाव ज्या विशिष्ट विचारसरणीचा भाग आहे, जी विचारसरणी भारताला ज्ञात अशा ५००० वर्षा पासून मिळालेली आहे, जी विचारसरणी आपल्या पूर्वजांनी आचरून आपला देश समृद्ध केला होता, ज्या विचारसरणीचे आजही भारतात ८० टक्के सदस्य आहेत, असा जो हिंदू धर्म आहे, त्याचाच ‘सेक्युलर’ हा अर्धवट लचका तोडून त्याला सजवून ठेवलेला भाग आहे. मग लचका तोडलेला भाग का घ्यायचा, सगळीच्या सगळीच विचारसरणी अंगीकारुयाना. गणित शिकायचे तर पाढे म्हणायची लाज का आपल्याला. आपल्या पूर्वजांनी हिंदू विचारसरणिरूपी पक्वान्नाचा घास आपल्या तोंडाशी आणून ठेवलेला असताना, आपण गिळायचा कंटाळा का करावा. आपण आपल्या देशाचे भाग्य समजायला हवे की आपल्याला सगळ्या विचारांचे सार तयार मिळालेले आहे. कोणा देशांसारखे विचारांचे दारिद्र्य आपल्याकडे नाही मग हा करंटेपणा कसला का सुचला आपल्याला. ओरपूया ते विचारसरणी रुपी अमृत.



हिंदू धर्म अनुसरणाऱ्यांनी ही जबाबदारी आपणहून घ्यावी – भारताच्या प्रत्येक नागरिकांवर ही जबाबदारी आपोआपच पडते की ते भारताच्या प्रगतीचे प्रहरी ठरो. सावरकरांच्याच शैलीत बोलायचे म्हणजे – आपला भारत, सांस्कृतिक दृष्ट्या जगाला मार्ग दाखवणारा व्हायला हवा व अशा भारताला शिरोग्राह्य बनवण्यासाठी हिंदू लोकांनी स्वतःहून प्रयत्न केले पाहिजेत. भारत अग्रेसर बनवण्यात आपल्याला कधी यश मिळेल? असे कोणते लोक जबाबदारीने पुढे येऊन काम करतील?



ज्यांना भारत खरोखरच बलाढ्य व समृद्ध देश व्हावा, ज्यांना हे घडायला हवे ह्याची तीव्र कळकळ आहे, ज्यांची देशासाठी झटण्याची तयारी आहे, जे स्वतःचा उत्कर्ष भारताच्याच उत्कर्षात बघतात, त्यांच भारतीयांकडून भारताची प्रगती होणार आहे. तेच लोक भारताचे खङगहस्त बनण्यास पात्र आहेत. तेच नेते आहेत व तेच जेते ठरणार आहेत. पण ही अशी प्रबळ इच्छा लोकांच्या मनात उत्पन्न कशी होणार. की जेणे करून ही इच्छा अस्वस्थ करणाऱ्या कळवळीला जन्म देईल व त्याच अस्वस्थ करणाऱ्या कळवळीच्या पोटी देशासाठी झटण्याचा मनोनिग्रह निर्माण होऊन लागणारा आत्मविश्वास प्रदान करील व जेणे करून, अशा प्रबळ इच्छेची व त्या इच्छेतून, प्रचंड प्रमाणात काम करणारी अशी न संपणारी मानवी साखळी तयार होईल, व हळूहळू भारतात राहणाऱ्या प्रत्येकाचे मन ह्या लाटेने चिंब भिजून, आपल्या देशासाठी कोणतेही काम, माझे स्वतःचे काम आहे व मी ते मन ओतून करीन असे वाटायला लावणारी तळमळ व तसे काम करणारे लोकसैन्य निर्माण होईल. हे कधी होईल? हे कसे होईल? हे होईल का?






(क्रमशः)

 

Monday, August 16, 2010

आठवणींच्या गाठी


आठवणींच्या गाठी

 

आठवणींच्या जुन्या गाठी सोडवू,
पूर्वीच्या घड्या पुन्हा उलगडू।।
 परत एकदा लहान होऊ,
 
पुन्हा आपण वर्गात बसू।
वह्या उलगडून रोजच्या प्रश्नांना,
मग्न व्यापातून उत्तरं लिहिताना।
 थोडं थांबून व्यस्त जीवनात,
 
हरवून जाऊ स्नेह बंधनात।
सर्व जगच जिथे शाळा,
पूर्ण आयुष्य त्याचा फळा।
 जे मिळाले ते नशीब कोरले,
 
जे गमावले ते हसून पुसले।
आठवणींच्या जुन्या गाठी सोडवू,
पूर्वीच्या घड्या पुन्हा उलगडू।।




- राष्ट्रार्पण

Tuesday, August 3, 2010

तंगड्यांवर तंगडे

पाक चे पि.ओ.के, चीन चे अकसाई,


आतातर म्हणे, अरुणाचल आमचा नाही,

येतच आहेत, बंगदेशचे विस्थापित अजुनही।

विचार करुन होते मनाची लाही लाही,

किती सोसणार घाव आता माझी आई,

किती अजुन २६/११, ‘आपले’ म्हणुन सोसायचे।

तंगड्यां वर तंगडे ठेवून अजुन सुद्धा बसायचे?